आंबा पिकतो रस गळतो, 'पुरोगामी' महाराष्ट्र झिम्मा खेळतो

आंबा

फोटो स्रोत, MyLoupe

    • Author, डॉ. शंतनू अभ्यंकर
    • Role, स्त्री-आरोग्य आणि प्रसूती तज्ज्ञ

गणेश जन्माच्या पुराणकथेला प्लास्टिक सर्जरीची जोड देणारे मा. पंतप्रधान ते आंब्यांमुळे संततीची प्राप्ती होते, असा दावा करणारे श्री. भिडे गुरूजी व्हाया सत्यपालसिंह (आमच्या पूर्वजांनी माकडाचा माणूस झाल्याचे पहिले नाही सबब डार्विन झूठ), बिप्लब देब (संजयाची दिव्यदृष्टी म्हणजेच इंटरनेट) आणि दिनेश सिंह (सीतेचा जन्म हा तर टेस्टट्यूब बेबीचा प्रयोग) असा हा मोठा रंजक प्रवास आहे.

ह्या सगळ्या समजुती मूर्खपणाच्या आहेत, यांची यथेच्छ टिंगल करण्याचे काम समाजमाध्यमांवर अहोरात्र चालू आहे. दिवस का आणि कसे जातात हे सार्वजनिक गुपित आहे. मुलगा किंवा मुलगी कसे ठरते, हे तर सरकारने एसटी स्टँण्डवर लावलेल्या फलकावरही लिहिले आहे. तेंव्हा भिडे गुरुजींच्या दावा सकृत् दर्शनी किती हास्यास्पद आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

मुळात ८०% जोडप्यांना लग्नानंतर वर्षभरात दिवस राहतात. उरलेल्यांतील १०% जोडप्यांना दुसऱ्या वर्षाअखेरपर्यंत दिवस राहतात. तेव्हा कोणत्याही उपचाराची कामगिरी ह्या नैसर्गिक कामगिरीच्या तुलनेत सरस आणि चमकदार हवी. सरस आणि चमकदार म्हणजे काय याचे संख्याशास्त्रीय निकष उपलब्ध आहेत. आजची वंध्यत्वावरची औषधे या तत्त्वावर उत्तीर्ण ठरली म्हणूनच वापरात आहेत. उद्या आंबे ह्या परीक्षेस उतरले तर आम्ही ते वापरू. पण १५० जोडप्यांना दिवस राहिल्याची कथा हा पुरावा होऊ शकत नाही आणि पुष्कळ कथांचा मिळून आपोआप सबळ पुरावा (किंवा डाटा बेस) तयार होत नाही.

तेव्हा भिडे गुरुजींचा दावा तपासण्यासाठी अनेक कसोट्या पार पाडाव्या लागतील. पुराव्याचे देखील एक शास्त्र असते. आंबा खाऊन जोडप्यांना मुले झाली याचा अर्थ ती आंबे खाल्यामुळे झाली असा होत नाही. 'अमुक'नंतर एखादी गोष्ट घडली म्हणजे ती 'अमुक'मुळेच घडली असे नव्हे. पुराव्याच्या भाषेत याला 'पोस्ट हॉक इर्गो प्रोक्तर हॉक' गैरसमज, असे नाव आहे.

आंबे खाणारी आणि न खाणारी जोडपी यांची तुलना, त्यातही भिडे सांगत असलेले आंबे खाणारी जोडपी आणि इतरांचे आंबे खाणारी जोडपी अशी तुलना, असे किमान अभ्यास लागतील. शिवाय आंबे खाल्ल्याने मुले होतात असे नसून आंबे खाल्ल्याने चालू उपचारांचे यश वाढते असाही दावा भिड्यांना करता येईल. तेव्हा फक्त आंबे, फक्त उपचार आणि आंबे+उपचार (यात पुन्हा भिडे सांगत असलेले आंबे आणि इतरांचे आंबे असे उपप्रकार) असाही अभ्यास करावा लागेल.

संभाजी भिडे

फोटो स्रोत, Raju Sanadi

फोटो कॅप्शन, संभाजी भिडे

आंबे खाणे हा पूरक उपचार जरी ठरला तरी ही अत्यंत क्रांतिकारी घटना म्हणावी लागेल. पण असे कोणी सिद्ध करणार तर नाहीच पण असा विचारही कोणी करणार नाही. महत्त्व पुराव्यासह सिद्धतेला नसून आंधळ्या विश्वासाला आहे. कारण तर्कबुद्धी गहाण ठेवून किती अनुयायी अतर्क्य दावा मान्य करतात यावर दावा करणाऱ्यांचे महात्म्य ठरते.

पण असे दावे का केले जातात, का मानले जातात हे मात्र तपासायला हवे.

मूल होण्यामागे अनेक आग्रह असतात. जैविक प्रेरणेचा, उत्क्रांतीच्या स्पर्धेचा, सामाजिक संकेतांचा, असे अनेक. तेव्हा वंध्यत्व म्हणजे ह्या सगळ्याच आघाड्यांवर अपयश. बायकांना तर हे सहन करणे अवघडच पण पुरुषांनाही काही कमी सोसावे लागत नाही. त्यामुळे वंध्यत्वावर मात करण्यासाठी प्रयत्न जबर. पण काहींच्या बाबतीत सर्व प्रयत्न थकतात.

सत्य स्वीकारणं कठीण

सत्याचा स्वीकार ही मोठी नादान चीज आहे. आपल्याला मूल होणार नाही किंवा ते होण्यासाठी जी उस्तवारी करावी लागेल त्यासाठीची शारीरिक, मानसिक, आर्थिक ताकद आपल्यात नाही हे जाणून अथवा अजाणता, माणूस चमत्काराच्या आणि चमत्कारिक भाकडकथांच्या मागे लागतो. स्वस्त, सोप्या, पण चमत्कृतीपूर्ण उपायांना, तोड्ग्यांना, व्रतवैकल्यांना सर्वाधिक मागणी असते.

अर्थात समस्येच्या आणि समस्याग्रस्ताच्या स्तराप्रमाणे उपायातही प्रतवारी असते. झटपट समस्यापूर्तीची ही आखुडशिंगी, बहुदुधी, गाय प्रत्येकाला हवी असते. काही बुवा, बाबा, धर्मस्थळे ही दुभती गाय पाळतात. नाम स्मरणापासून ते स्वत्व-विस्मरणापर्यंत अनेक तंत्रमंत्र विकतात आणि गबर होतात.

समस्येला थेट भिडण्यापेक्षा हे बरे. काहीतरी तरी केल्याचे समाधान. गंडे, दोरे, तंत्र, मंत्र आणि आंबे असे वृथा उपचार, असे कृतक समाधान देत असतात. पण यामुळे आधीच हतबल झालेला माणूस शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या अधिक विकलांग होतो.

खोलात जाणं अडचणीचं

पण क्षणभर विचार केला तर असं लक्षात येईल की आंब्याची कथा भाकड खरीच पण विश्वरूपदर्शनाची कथाही भाकडच आहे. येशूच्या पुनरुथ्थानाच्या आणि मोहंमद पैगंबराची उडत्या घोड्यावरून स्वर्गारोहणाच्या कथाही भाकडच आहेत. पण या कथा सांगणाऱ्या पुस्तकांच्या लाखो प्रती रोज विकल्या जातात. ह्या कल्पना उराशी बाळगणारे सन्मान्य ठरतात. यातीलच काहींच्या (मोदी, सत्यपालसिंह, देब, दिनेशसिंह प्रभृती) काही दाव्यांच्या वाट्याला मात्र अशी टवाळी येते.

वंध्यत्वावर मात करण्यासाठी टेस्टट्यूब बेबीसारखे अनेक आधुनिक वैद्यकीय मार्ग उपलब्ध आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वंध्यत्वावर मात करण्यासाठी टेस्टट्यूब बेबीसारखे अनेक आधुनिक वैद्यकीय मार्ग उपलब्ध आहेत.

यावर फार खोलात विचार करणे अडचणीचे ठरू शकते. आपापल्या प्रिय पुराणपुरुषांच्या आणि महापुरुषांच्या कथा आपल्याला कधी भाकड वाटत नाहीत. आपापला देव आणि धर्म प्रत्येकाला प्यारा असतो. हिंदू माणूस अल्ला मानत नाही आणि मुसलमानांची खात्री असते की 'येशूचा बाप' असा कोणी आभाळात नाहीच. थोडक्यात स्वतःचा एक देव सोडल्यास इतर सर्वच देवांबाबत आपण 'नास्तिक' असतो.

पुराव्याचे शास्त्र नीट न समजावून घेतल्याचे हे दुष्परिणाम. हेच असे नाही तर चुटकीसरशी डायबेटीस, दमा, कॅन्सर, ब्लडप्रेशर, मतिमंदत्व, इ. नष्ट करणारे उपाय; हा हा म्हणता वजनाचा डोलारा उतरवून शरीर सुघटित करणाऱ्या गोळ्या, चार वेळा चोळताच नवयौवनाची ग्यारंटी देणारी मलमे आणि औषधे खपतात, ते सारे यामुळेच. या आंब्याची पाळेमुळे अशी खोलवर रुजलेली आहेत. आता मॉन्सून आला आहे, आंबा आता उतरणार, मोसम संपणार, पण रसनिष्पत्ती सुरूच रहाणार असे दिसतेय.

(लेखक स्त्री-आरोग्य आणि प्रसूती तज्ज्ञ असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत. लेखातील विचार त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)