You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#BudgetWithBBC : शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून काय मिळणार?
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला.
त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवातच शेती क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या योजनांच्या घोषणांनी झाली.
कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांशी निगडीत महत्त्वाच्या घोषणा
- 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवणार
- कमी लागवडीखाली अधिक उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न, शेतकऱ्यांना मालाचा अधिक भाव मिळावा यावर जोर देण्यात येणार
- उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव
- अन्नप्रक्रिया अद्योगासाठी 1400 कोटींची तरतूद
- देशभरात 42 मेगा फूड पार्क उभारणार
- ऑपरेशन ग्रीनसाठी 500 कोटींची तरतूद
- खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत दीडपटीने वाढवणार
- मच्छिमार आणि पशुपालन करणाऱ्यांना शेतकऱ्यांप्रमाणं क्रेडिट कार्ड दिले जाणार
- राष्ट्रीय बांबू मिशनसाठी 1200 कोटींची तरतूद
- कृषी क्षेत्रासाठी आगामी वर्षात 11 लाख कोटींची गुंतवणूक
- मत्स्योपादन आणि पशुपालनासाठी 10 हजार कोटींची तरतूद
- ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणासाठी 14 लाख कोटींची तरतूद
- कृषी बाजारांसाठी 2 हजार कोटींची तरतूद
- शेतीमालाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवणार
- शेतीमाल प्रकियेसाठी 500 कोटींची तरतूद
शेती क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी असल्या तरी यावर संमिश्र प्रतिक्रया व्यक्त केल्या जात आहेत.
"पिकांवरील किमान आधारभूत किंमत (एमएसपी) उत्पादन खर्चापेक्षा दीडपटीनं वाढवण्याचा मोदी सरकारनं घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे", असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र शेतीला कर्ज मिळण्याची काहीही सोय या अर्थसंकल्पात नसल्यानं हा अर्थसंकल्प नसून भ्रमसंकल्प आहे, अशी टीका केली आहे.
"शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं अर्थसंकल्पात सांगण्यात आलं आहे. पण ते कसं करणार ? त्यासाठी कोणत्या योजना आणणार ? पद्धत कोणती वापरणार ? याविषयी काहीही सूतोवाच करण्यात आलेलं नाही," असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
स्वराज इंडिया पक्षाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी ट्विटरवरील प्रतिक्रयेत यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत हातचलाखी केली, असं म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)