शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक

फोटो स्रोत, ANI
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 35 फुटी पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पण अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा कोसळला.
हा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बरंच तापल्याचं पाहायला मिळालं. ठडाभरापूर्वी या किल्ल्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याचंही पाहायला मिळालं होतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणी माफी मागितली होती. त्यानंतर पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करण्याची मागणी सातत्यानं होत होती. अखेर बुधवारी पोलिसांनी त्यांना अटक केली.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधकांनी रविवारी (1 सप्टेंबर) मुंबईत आंदोलन केलं.
यावेळी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितलेली माफी स्वीकारण्यास नकार दिला. पंतप्रधान मोदींनी माफी मागितली पण मग्रुरीने मागितलेली माफी मान्य नसल्याचं उद्धव ठाकरेंनी आंदोलनावेळी बोलताना सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मागितलेली ही अर्धवट माफी आम्हाला मान्य नसल्याचंही विरोधी नेत्यांनी यावेळी म्हटलं.

फोटो स्रोत, @ShivSenaUBT_/X
रविवारी विरोधी महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत पायी मोर्चा काढला.
आंदोलनात उद्धव ठाकरेंसह तिव्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. सर्वांनीच यावेळी राज्य सरकारवर टीका केली.
मोदींनी माफी मागितली त्यात मग्रुरी दिसत होती आणि त्यावेळी एक उपमुख्यमंत्री हसत होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर, शरद पवारांनी हे प्रकरण भ्रष्टाचाराचे असल्याचे म्हटलं आहे.
मोदी पुतळा पडला म्हणून माफी मागत होते, की त्यात भ्रष्टाचार झाला त्यासाठी माफी मागत होते, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
'नतमस्तक होत माफी मागतो-मोदी'
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली होती. 'महाराजांच्या चरणावर नतमस्तक होत मी माफी मागत आहे', असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
शुक्रवारी ( 30 ऑगस्ट) पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या पायाभरणी कार्यक्रमावेळी त्यांनी हे उद्गार काढले.
"छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी केवळ एक महापुरुषच नाहीत तर ते आमचे आराध्य दैवत आहेत आणि मी आराध्य दैवताच्या चरणी नतमस्तक होत आता त्यांची माफी मागत आहे," असे मोदींनी म्हटले.
29 ऑगस्टला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली होती.

फोटो स्रोत, Getty Images
29 ऑगस्ट रोजी राज्य सरकारनं शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी नौदलासह संयुक्त समितीची स्थापना केली. त्याविषयी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण शिवाजी महाराजांच्या चरणी शंभरदा डोकं ठेवायला तयार असल्याचं म्हटलं होतं.
"शिवाजी महाराज आपलं दैवत आहे, आपली अस्मिता आहे. यावर राजकारण करू नये. ते माफीची मागणी करत आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर एकदा नाही, शंभरवेळा डोकं ठेवायला मी तयार आहे. मला त्यात कमीपणा वाटणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य आहेत," असं शिंदे म्हणाले.
तसंच छत्रपतींचा रुबाबदार असा पुतळा उभा राहण्यासाठी विधायक असं काय करता येईल हे विरोधकांनी सांगायला हवं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी 29 ऑगस्ट रोजी एक महत्त्वाची बैठक झाली. ज्यात सर्व अधिकारी आणि नौदलाचे अधिकारीही उपस्थित होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या समितीत नौदलाचे अधिकारी, सरकारचे प्रतिनिधी तसंच विशेषज्ञांचा समावेश असणार आहे अशी माहिती नौदलानं दिली आहे.
ही समिती पुतळा का पडला याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करेल.

बुधवारी (28 ऑगस्ट) या किल्ल्यावर भाजपचे नेते नारायण राणे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कार्यकर्ते आपसांत भिडले होते.
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने या किल्ल्यावर तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी या दोन्हींमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली. यावेळी कार्यकर्त्यांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीने येत्या रविवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकारला 'जोडे मारा' आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागितली माफी
2023च्या नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.
बुधवारी (28 ऑगस्ट) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतळा पडल्याबद्दल माफी मागितली.
लातूर जिल्ह्यातील जाहीर सभेत ते म्हणाले की, "मी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत असून वर्षभरात त्यांचा असा पुतळा कोसळणे हा आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे."
मात्र, अवघ्या आठ महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर कामाचा दर्जा आणि पुतळ्याच्या अनावरणातील घाई यावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

फोटो स्रोत, @AJITPAWARSPEAKS
छ. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला
हा पुतळा नौदलाने उभारला होता आणि वाऱ्याने कोसळला असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले होते. लवकरात लवकर नवीन पुतळा उभारण्यात येईल असे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मात्र, निव्वळ आठ महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळल्यामुळे त्याच्या कामाच्या दर्जावरून आणि या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी केलेल्या घाईवरून विरोधकांनी सरकारवर धारेवर धरलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज या किल्ल्याला भेट दिली आणि तिथे ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत अंबादास दानवे आणि वैभव नाईक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जयंत पाटीलदेखील होते.
या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून नारायण राणे समर्थकांनीही घोषणाबाजी करुन विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबरोबर निलेश राणेदेखील होते. पोलिसांकडून दोन्ही गटांशी बातचित करुन हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी तो अयशस्वी ठरताना दिसला.
यावेळी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे गोंधळ टाळून सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी निलेश राणे यांच्यासमवेत चर्चा करतानाही दिसले.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "फक्त आठ महिन्यांपूर्वी बांधलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. हा पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे."
जयंत पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणतात प्रचंड वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पुतळा पडला. तसं असतं तर दोन-तीन झाडे पडली असती; पण तसं न होता फक्त पुतळा पडला, याचा अर्थ पुतळ्याचे काम सदोष होतं. अपरिपक्व माणसाला पुतळ्याचं काम देण्यात आलं. दीड-दोन फुटांचे पुतळे तयार करणाऱ्या व्यक्तीला 35 फुटाच्या पुतळ्याचे काम दिले."
"सरकार म्हणतंय पुतळा नेव्हीने बांधला आहे. सरकारला हात झटकून चालणार नाही, यात सरकार जबाबदारी ही सरकारची आहे. नेव्हीच्या लोकांनी फक्त पुतळा तिथे बसवला. हा शिल्पकार कोणी शोधला? कोणी नेव्हीला त्याची माहिती दिली? तो कल्याणचाच कसा? या पुतळ्याचे टेंडर काढले गेले नाही मग त्यालाच कसे कंत्राट मिळाले? या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे," अशी मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली.
महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रमुख शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रसच्या नाना पटोले यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
या पत्रकार परिषदेमधून येत्या रविवारी सरकारला 'जोडे मारा' आंदोलन करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. हे आंदोलन मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ होणार आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचार वाढतोय. महाफुटी (महायुती) सरकारच्या भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे आणि कारभाराने किळस आणलेला आहे. या किळसवाण्या कारभाराचा निषेध करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती. मात्र, कोर्टाच्या माध्यमातून त्यावरही बंदी आणली गेली."
"आता महाविकास आघाडीतर्फे राजकोट घटनेचा निषेध करण्यासाठी जो निषेध करण्यात आला त्यामध्ये मोदी सरकारचे दलाल आणि शिवद्रोही हे रस्ता अडवून बसलेत. महाराजांचा पुतळा वाऱ्याने पडला, हे कारण अत्यंत निर्लज्जपणाचे आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, "येत्या रविवारी (1 सप्टेंबर) दुपारी अकराच्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करुन आम्ही सगळे जण गेट वे ऑफ इंडियासमोर निदर्शने करणार आहोत. या निर्ढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला 'जोडे मारो' हा कार्यक्रम करणार आहोत."

विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, "यामध्ये राजकारण काय आहे? शिवाजी महाराजांच्या काळात राझ्यांच्या पाटलाने मुलीवर अत्याचार केल्यावर शिवरायांनी त्याचे हात-पाय कलम केले होते. अशी कठोर भूमिका त्यांनी जनतेसमोर ठेवली होती. आज असा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची प्रतिकृती तयार करण्यामध्ये भ्रष्टचार झाला आहे."
ते पुढे म्हणाले की, "जिथे पंतप्रधान स्वत: जाऊन आले, तो पुतळा कोसळला आहे. याचा अर्थ भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे, हे यातून दिसतं. कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये, याचं तारतम्यही या सरकारमध्ये नाही. शेवटी लोकांमध्ये जी तीव्र भावना आहे ती व्यक्त व्हावी, म्हणूनच आम्ही तिघांनी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करुन हे आंदोलन करण्याचे ठरवले आहे."
यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, "स्वत: नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला उपस्थित होते. मात्र, पुतळा उभारण्यासाठीची सगळी प्रक्रिया पार पाडण्यात आलेली नाही. सांस्कृतिक मंत्रालयाने या पुतळ्याला प्रमाणित केल्याशिवाय पंतप्रधानांनीही या पुतळ्याच्या उद्घाटनाला जायला नको होतं. मात्र, निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही कसे शिवप्रेमी आहोत, हे दाखवण्यासाठी हे सगळं करण्यात आलं."


निवडणुका समोर असल्यानं राजकारण - राणे
यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले की, "पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी होती. ऐन पावसाळ्यात हवामान प्रतिकूल असल्याने हा पुतळा कोसळला आहे. मी यामध्ये कोणावरही आरोप करण्याऐवजी हा पुतळा ज्यांनी बांधला, त्यांची चौकशी व्हावी आणि नेमका कशामुळे हा पुतळा कोसळला ते कारण बाहेर यावे, अशी माझी आणि जनतेची इच्छा आहे.
"निवडणुका समोर असल्याने विरोधक याचे भांडवल करत आहेत. या जिल्ह्यामध्ये भाजपवर टीका करता येईल, असे कोणतेही कारण सापडत नसल्याने या घटनेचे निमित्त करुन सगळे जण शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट आणि काँग्रेस हे सगळे एकत्र येऊन टीका करत आहेत," राणे म्हणाले.
पुढे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, "त्यांनी शिवद्रोही अशी टीका आमच्यावर केली आहे. मात्र, शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयांना त्यांनी उदरनिर्वाहाचं साधन बनवलं. त्यांनी याच जोरावर पैसा कमावला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी पुतळा उभा केला का? स्वत:च्या वडिलांचा पुतळाही महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने उभा केला. म्हणून त्यांना या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही."
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन )











