T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या निवडीचा समितीचा निर्णय गोंधळात टाकणारा का वाटतोय

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अयाज मेमन
- Role, क्रिकेट पत्रकार
अमेरिकेत होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी निवड केलेला भारतीय संघ अनेकांना गोंधळात टाकत आहे.
पुढील चार आठवड्यांत अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघाला आता अग्नपरीक्षेतून जावं लागणार आहे.
कारण जागतिक क्रमवारीत सध्या या संघाचं वरचं स्थान आहे. तसंच या संघाकडून चाहत्यांच्या आणि तज्ज्ञांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
2007 मध्ये पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप खेळण्यात आला. तेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. पण तेव्हापासून भारताला विजयाची पुनरावृत्ती करता आली नाही.
भारतीय संघाचं प्राबल्य वाढलंय. नव्या दमाचे क्रिकेटर्स संघात येत आहेत. तरीही क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताची कामगिरी अंतिम टप्प्यात निराशाजनक राहिलीय.
खरंतर, 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विजेतेपद जिंकलेलंच नाही.
तीन उत्कृष्ट कर्णधार - एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा - आणि दोन प्रख्यात मुख्य प्रशिक्षक - रवी शास्त्री आणि राहुल द्रविड - यांनी वेगवेगळ्या पातळीवर उत्कृष्ट निकाल दिले. पण ते सर्व वर्ल्ड कपच्या प्रसंगी अपयशी ठरले.
गेल्या वर्षी भारताला क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
यावेळी टीम इंडिया चमकदार कामगिरी करेल?
2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPLचे सामने सुरू झाले.
तेव्हापासून T20 आणि कधी कधी 50 ओव्हरच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघनिवडीच्या प्रक्रियेत IPLमधील कामिगिरीचाही मोठा प्रभाव पडू लागला.
IPLच्या तीव्र स्पर्धेमुळे कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर दबाव वाढायचा. पण IPL 2024मधील कामगिरीवर आधारित आता T20 वर्ल्डकपसाठी निवडलेला भारतीय संघ जरा गोंधळात टाकणारे संकेत देत आहे. यामागची कारणं आपण जाणून घेऊयात.
उदाहरणार्थ, IPL फायनलमध्ये खेळलेला एकही खेळाडू आता निवड केलेल्या संघात दिसला नाही.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून खेळलेला रिंकू सिंग 15 जणांच्या मुख्य संघात नाहीये.
त्याला राखीव ठेवलं आहे. शुबमन गिल ज्याच्याकडून भारतीय क्रिकेटला मोठी आशा आहे, त्यालाही यावेळी मुख्य संघात स्थान दिलेलं नाहीये.
विराट कोहलीनंतर 2024च्या IPLमध्ये सर्वाधिक धावा करणारा ऋतुराज गायकवाड आणि रियान पराग यांना पण स्थान मिळालेलं नाहीये.
महत्त्वाचं म्हणजे ऋतुराज गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले होते.

फोटो स्रोत, Getty Images
हर्षल पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना नुकत्याच झालेल्या IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या. ते दोघेही 2022मध्ये T20 वर्ल्ड कप संघात होते. त्यांनाही यावेळी दुर्लक्षित केलं आहे.
IPL 2024 च्या कामगिरीवर खेळाडूंची निवड करणं आणि पारंपरिक निवड प्रक्रियेला डावलणं, यातून काही ‘रेड सिग्नल’ समोर येत आहेत.
IPLमधली कोहलीची सुरुवात जेमतेम राहिली. पण नंतर त्याने उत्कृष्ट फलंदाजी करून सगळ्यांचं तोंड बंद केलं. तसंच सगळ्या प्रकारात आपण जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचं त्याने सिद्ध केलं.
बुमराहने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या नसल्या तरी, त्याने बऱ्यपैकी दरारा निर्माण केला होता.
प्रत्येक ओव्हरमध्ये फलंदाजाला सात धावांच्या खाली रोखणं हे बुमराहचे उत्कृष्ट कौशल्य आहे. कोणत्याही टप्प्यावर विकेट घेण्याची क्षमता त्याच्याकडे असल्याने त्याने जबरदस्त प्रभाव पाडलाय.
गेल्या वर्षी एकदिवसीय वर्ल्डकपमधील यश आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमुळे बुमराहची वेगवान गोलंदाजी अतुलनीय दिसते.
ऋषभ पंत हा माझ्या मते, कोहली आणि बुमराह यांच्याच श्रेणीतील खेळाडू आहे.
अपघातामुळे ऋषभ जवळजवळ 18 महिने क्रिकेटपासून दूर होता. पण ऋषभची मनमोकळी, चमकदार आणि नाविन्यपूर्ण फलंदाजीमुळे भारत अनेक सामने जिंकला आहे. आताच्या वर्ल्डकमध्येही त्याचाकडून चांगल्या अपेक्षा आहेत.
त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे शिवम दुबेचा. IPL चे ब्रेकआउट झाले तेव्हा निवडकर्त्यांचे त्याने लक्ष वेधून घेतले होते.
भारतीय संघाची दुसरी बाजू
संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल (पुनरागमन करत आहे) यांनी IPL 2024 मध्ये चांगली कामगिरी केली. पण त्यांच्या खेळीत लक्षणीय गोष्टी पाहायला मिळाल्या नाहीत.
याशिवाय यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांची कामगिरी बरी राहिली.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेत ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या ‘ड्रॉप-इन’ खेळपट्ट्या या वर्ल्डकपमधील सर्व संघांसाठी महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहेत.
आणखी एक गोष्ट काळजीत टाकणारी आहे, ती म्हणजे रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांची IPL2024मधील कामगिरी खराब राहिलीय. तरीही कॅप्टन आणि व्हाईस-कॅप्टन म्हणून त्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
ओपनर म्हणून रोहितची फलंदाजी ही भारताच्या यशात निर्णायक ठरू शकते, हे एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये स्पष्ट झालं आहे.
तसंच वेगवान गोलंदाज आणि उत्कृष्ट विकेटकीपर म्हणून पंड्याचा पराक्रम तितकाच महत्त्वाचा ठरू शकतो.
असं सगळं असलं तरी भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी बहुतेक सर्व बॉक्स टिक करण्यात यश मिळवलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
IPL हे भारतीय खेळाडूंसाठी चाचणीचं मैदान आणि जगभरातील (पाकिस्तान वगळून) खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचा प्लॅटफॉर्म बनला आहे.
जेतेपदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये यावेळी गतविजेता इंग्लंड, दोनदा चॅम्पियन वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांनीही या स्पर्धेसाठी कष्ट घेतले आहेत.
वर्ल्ड कपच्या मागील आठ स्पर्धेत, पाकिस्तान आणि श्रीलंकेसह सहा वेगवेगळे देश चॅम्पियन म्हणून उदयास आले आहेत.
याशिवाय अफगाणिस्तान सारख्या धडाकेबाज संघाने वर्ल्ड कपमध्ये दाखवल्याप्रमाणे, पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये अधिक अनुभवी संघांना सहज अस्वस्थ केलं आहे.
या सर्व फॅक्टर्समुळे यंदाच्या वर्ल्ड कपच्या जेतेपदाची भविष्यवाणी करणं केवळ धोकादायकच नाही तर पूर्णपणे मूर्खपणाचे ठरेल.
साखळी फेरीत भारताला पाकिस्तानसोबत एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 9 जून रोजी सामना खेळला जाणार आहे.
भारत-पाक सामना हा क्रिकेटच्या इतिहासातील "सर्वांत मोठा सामना" मानला जातो. तेव्हा दोन अब्जांहून अधिक लोक हा सामना पाहतील असं सांगितलं जातंय.
कोणत्याही संघाला पराभव आवडत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत भारताने नेहमीच चांगली कामगिरी केलीय. पण फायनलमध्ये त्यांना घवघवीत यश मिळत नाहीये.
त्यामुळे या संघाने सामने जिंकण्यापलीकडेचे ध्येय ठेवायला पाहिजेत. पाकिस्तानला हरवणे ही केवळ एक पायरी असेल; वर्ल्डकप जिंकण्यातच खरी मुक्ती आहे.











