भारत की पाकिस्तान, कुणाची एअर डिफेन्स सिस्टीम शक्तीशाली? भारताकडे कोणती क्षेपणास्त्रं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारताने पाकिस्तानवर आणि काश्मिरमधे 7 मेच्या पहाटे लष्करी कारवाई केली.या लष्करी कारवाईला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव दिलं आहे. भारताचं असं म्हणणं आहे की हे हल्ले 'दहशतवादी ठिकाणांवर केले आहेत.'
भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या या तणावानंतर दोन्ही देशांच्या लष्करी क्षमतेवर चर्चा सुरू झाली आहे.
तेव्हा, भारत आणि पाकिस्तानकडे कोणकोणती क्षेपणास्त्र आहेत आणि दोन्ही देशांकडे असलेल्या हवाई संरक्षण प्रणालीची क्षमता काय आहे ते समजून घेऊ.
भारताकडे असलेलं अग्नी- 5 हे क्षेपणास्त्र जमिनीपासून 5 ते 8 हजार किलोमीटर वरपर्यंत मारा करू शकतं.
दुसरीकडे पाकिस्तानच्या शाहीन-3 या क्षेपणास्त्राची मारण्याची क्षमता 2,750 किलोमीटर एवढी आहे.
शस्त्रांसाठी भारत रशियावर अवलंबून आहे, तर पाकिस्तान चीनवर.
पश्चिमेकडील देश अनेक वर्ष भारताला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान देण्यास टाळाटाळ करत होते. पण फ्रान्स आणि भारत यांनी मिळून क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर काम केलं आहे.
त्यातच भारताला इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (आयसीबीएम) या क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे. हे आयसीबीएम क्षेपणास्त्र असलेले जगात फक्त 7 देश आहेत.
भारताची अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टिम
त्याचबरोबर अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टिम असणाऱ्या मोजक्या देशांमध्येही भारताचा समावेश होतो, असं संरक्षण विश्लेषक हॅरिसन कास 'द नॅशनल इंटरेस्ट'मध्ये लिहितात.
"भारताकडे क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीअतंर्गत दोन पद्धतीची क्षेपणास्त्र येतात. पहिलं, पृथ्वी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र (पीएडी). त्याचा वापर उंचावरचे हल्ले थांबवण्यासाठी करता येऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
"तर, दुसरी थोडी ॲडव्हान्स हवाई संरक्षण प्रणाली (एएडी). त्याने कमी उंचीवरचे क्षेपणास्त्राचे हल्ले रोखता येऊ शकतात," असं हॅरिसन कास सांगतात.
भारताच्या अँटी बॅलेस्टिक मिसाईल सिस्टिम कमीतकमी 5000 किलोमीटर दूरवरून होणारा क्षेपणास्त्र हल्ला थांबवू शकते अशी आशा बाळगता येईल.
भारताने रशियासोबत ब्राह्मोस आणि ब्राह्मोस-2 हायपरसोनिक क्रूज ही क्षेपणास्त्रही विकसित केली आहेत. ती जमिनीवर, हवेत, समुद्रात आणि समुद्रावर बांधलेल्या व्यासपीठावरूनही प्रक्षेपित करता येतात.
"भारताकडे पारंपरिक आणि आण्विक शस्त्र असणाऱ्या क्षेपणास्त्रांचे अनेक प्रकार आहेत. यासोबतच, समोरून क्षेपणास्त्र हल्ला झाला तर तो थांबवण्याचीही क्षमता आहे," असं हॅरिसन कास सांगतात.
दुसरीकडे पाकिस्तानकडेही पारंपरिक आणि आण्विक शस्त्र असणाऱ्या क्षेपणास्त्राचे अनेक प्रकार आहेत.
दोन्ही देशांनी एकमेकांपासून असणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून आपल्या क्षेपणास्त्र क्षमतेचा विकास केला आहे, असं म्हटलं जातं.
पण भारतासारखी आयसीबीएम क्षेपणास्त्र प्रणाली पाकिस्तानकडे नाही. पाकिस्तानला त्याची अत्यंत गरज असल्याचं अनेक संरक्षण विश्लेषक सांगतात.
यापूर्वी चीन आणि भारतात युद्ध झालेलं आहे. भारत स्वतःच्या संरक्षण क्षमतेची बांधणी त्यादृष्टीनेच करत आहेत.
दुसरीकडे पाकिस्तान अजूनही फक्त भारतालाच आपला शत्रू मानतो.
"भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला आयसीबीएमची फार गरज नाही. पाकिस्तानची क्षेपणास्त्र क्षमता प्रादेशिक लक्ष्य साधण्यात सक्षम आहे."
पाकिस्तानकडे आयसीबीएम नाही
भारतातले प्रसिद्ध संरक्षण विश्लेषक राहुल बेदी सांगतात की, आयसीबीएम वापरायची वेळ आली तर सगळं उद्ध्वस्त होईल.
"आयसीबीएमचा आकाशातला वेळ 15 ते 20 सेकंद एवढाच आहे. आयसीबीएम हे एक धोरणात्मक शस्त्र आहे. चीनचा विचार करता भारताने ते बनवलं होतं. पाकिस्तानकडे आयसीबीएम उपलब्ध नाही. पाकिस्तानला त्याची गरजही नाही. पाकिस्तानने भारताकडे पाहात त्यांची लष्करी तयारी केली आहे. तर, भारताने चीनचं आव्हान समोर ठेवून," राहुल बेदी सांगतात.
1998 मध्ये भारताने अणू चाचणी केली तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी बिल क्लिंटन यांना लिहिलेल्या पत्रात तसंच म्हटलं होतं, असंही राहुल बेदी पुढे सांगत होते.
पाकिस्तानने चीनसोबत शाहीन ही क्षेपणास्त्राची मालिका विकसित केली आहे. हे शाहीन क्षेपणास्त्राने लहान, मध्यम अंतरावर आणि दूरवरही हल्ला करता येऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानकडे एचक्यू-9बीई आहे असं हॅरिसन सांगतात. पण भारतानं ब्राह्मोसचा वापर केला तर त्याचा बचाव करणं पाकिस्तानला शक्य होणार नाही.
पाकिस्तानच्या संसदेत ब्राह्मोस सुपरसोनिक क्षेपणास्त्रावरून विरोधी पक्ष चिंता व्यक्त करतात. भारताचं एक क्षेपणास्त्र मे 2022 मध्ये चुकून पाकिस्तानकडे प्रक्षेपित झालं होतं.
तेव्हा पाकिस्तानचे तेव्हाचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार मोईद युसूफ यांनी म्हटलं होतं, "एक सुपरसोनिक प्रोजेक्टाइल 40 हजार फूट उंचीवरून सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये पडली. ही मिसाइल आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत व्यावसायिक एअरलाइनच्या मार्गाच्या जवळून गेली होती. पाकिस्तानला भारताने याबद्दल काहीही माहिती दिली नाही, हे अत्यंत गैरजबाबदार आहे."
पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते क्षेपणास्त्र भारताची सीमेपासून 75 किलोमीटर दूर मिया चानू नावाच्या एका छोट्या शहरात जाऊन पडलं.
यावेळी काय झालं?
राहुल बेदी म्हणतात, ''भारतानं यावेळी पाकिस्तानात घुसून हल्ला करण्याऐवजी आपल्याच क्षेत्रातून क्षेपणास्त्र सोडली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यावेळी भारताने पाकिस्तानची मुख्य भूमी पंजाबमधून हल्ला केला आहे.''
भारत आणि पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र क्षमतेवर राहुल बेदी म्हणतात, "भारताजवळ बीएमडी सील्स यांनी बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स आहे आणि पाकिस्तानजवळ ती प्रणाली उपलब्ध नाही. पण बीएमडी नेहमी 100 टक्के यशस्वी होत नाही. इस्रायलमध्ये आपण ते पाहिलं आहे. त्याचा आर्यन डोम काही वेळा काम करत नव्हता. असं असलं तरीही या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीनं अनेक मोठे हल्ले थांबवण्यात महत्त्वाची भुमिका बजावली."
राहुल बेदी सांगतात, "भारताजवळ धोरणात्मक आणि पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीची क्षेपणास्त्र आहेत. अग्नी हे धोरणात्मक क्षेपणास्त्र आहे तर ब्राह्मोस पारंपरिक.
"याची तुलना पाकिस्तानच्या गौरी आणि बाबर या क्षेपणास्त्रांशी करता येईल. पण भारताकडच्या क्षेपणास्त्राची हल्ल्याची क्षमता त्यापेक्षा फार जास्त आहे. भारताच्या देखरेख प्रणालीतही आता खूप सुधार झाला आहे."
दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राष्ट्रीय सुरक्षा केंद्रातले प्राध्यापक लक्ष्मण कुमार सांगतात, "आकाश आणि एस-400 या दोन भारताकडे असलेल्या हवाई संरक्षण प्रणालींचा फार उपयोग होईल. पाकिस्तानजवळ एवढी प्रभावी यंत्रणा उपलब्ध नाही. "
पाकिस्तान भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करणार नाही, असं लक्ष्मण कुमार यांना वाटतं. मात्र, "याचं प्रत्यूत्तर नक्की देईल," ते म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











