विरारमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, 7 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

इमारत

पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व भागातील रमाबाई अपार्टमेंट ही रहिवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. 7 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना मंगळवारी (26 ऑगस्ट) रात्री 11.30 च्या दरम्यान घडली. त्यात या इमारतीचा काही भाग शेजारच्या घरांवर कोसळला.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकून असल्याची माहिती आहे. दुर्घटनास्थळी एनडीआरएफचं पथक तैनात असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत 19 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

माहितीनुसार, ही इमारत 15 वर्षं जुनी होती आणि पालिकेने इमारतीला नोटीसही दिली होती. या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या इमारतीत 25 ते 30 कुटुंब राहत होते. त्यापैकी 30 लोक अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली होती.

दरम्यान, रमाबाई अपार्टमेंट या इमारतीच्या दुर्घटनेला 24 तास उलटून गेले असले तरी अजूनही एनडीआरएफ 3 पथक आणि इतर यंत्रणाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. कारण आणखी काही लोक या दुर्घटनेत अडकल्याची माहिती मिळत आहे.

या इमारतीत झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 19 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

फोटो स्रोत, Alpesh Karkare

फोटो कॅप्शन, या इमारतीत झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 19 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

घटनेबाबत माहिती देताना पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड म्हणाल्या, "या इमारतीच्या कोसळण्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पालिका कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून मदत व बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफ पथकालाही पाचारण करण्यात आलं. आतापर्यंत 11 लोकांना रेस्क्यू करण्यात आलं असून रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे.

"तसेच, कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 10 जण अडकल्याची शक्यता असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्याचं कार्य सुरू आहे. यासह इमारतीतील रहिवाशांकडून त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेणंही सुरू आहे. इमारतीखाली अडकलेल्यांना शक्य तितक्या लवकर बाहेर काढण्यावर आमचा भर आहे," असं जाखड यांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)