मुक्ता साळवे : महात्मा फुल्यांच्या शाळेतील या विद्यार्थिनीला पहिली दलित लेखिका म्हटलं जातं...

सावित्रीबाई फुले

फोटो स्रोत, फुले स्मारक

    • Author, विद्या कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मुक्ता साळवे. जोतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळेतली एक विद्यार्थिनी. लिहायला-वाचायला शिकता शिकता मुक्ताला तिचा आवाज गवसला. त्यातून तिचा पहिला निबंध जन्माला आला.

‘मांग आणि महारांच्या दुःखाविषयी’ या तिच्या छोटेखानी निबंधात मुक्ता केवळ दु:ख मांडून थांबत नाही तर या दु:खाची कारणं मांडते. तत्कालिन सामाजिक विषमतेवर जोरदार प्रहार करते.

ही घटना आहे 1855 मधली, जवळपास 167 वर्षांपूर्वीची. तेव्हाही तिच्या लेखनाची चांगलीच दखल घेतली गेली. आजही मुक्ताचा निबंध हा ‘दलित स्त्री साहित्याचा पहिला हुंकार’ मानला जातो. ही प्रखर अभिव्यक्ती करणाऱ्या मुक्ता साळवे यांची ओळख.

मुक्ता साळवेंचा जन्म 1840 साली पुण्यात झाला. जातीपातीत काटेकोर विभागलेला आणि सवर्णांचे वर्चस्व असलेला तो काळ. मुक्ताचा जन्म तर मातंग, म्हणजे त्याकाळी अस्पृश्य मानलेल्या जातीतला.

जातीच्या उतरंडीत तळात असल्याने समाजाकडून मिळणारी मानहानी पाहात, झेलत त्या मोठ्या झाल्या.

तेव्हा प्रचलित असलेलं धार्मिक शिक्षण केवळ ब्राह्मण जातीपुरतं मर्यादित होतं. ना स्त्रियांना शिकायला परवानगी होती, ना समाजाच्या लेखी तुच्छ मानलेल्या ‘अस्पृश्यांना’.

पेशवाई अस्ताला जाऊन ब्रिटीश राजवट पाय पसरू लागली होती. जातीभेदाचे जोखड सैल होत होते. इंग्रजांनी सरकारी शाळा सुरू केल्या.

मिशनऱ्यांतर्फे सुरू असलेल्या काही शाळा हिंदू मुलींसाठी खुल्या होत्या. पण ज्यांना आजवर शिक्षणापासून हेतूत: दूर ठेवलं त्यांची या शाळांपर्यंत पोहोच अद्याप नव्हती. मुक्ताचा शाळेशी संपर्क यायला 1851 साल उजाडावं लागलं.

जोतिबा आणि सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे ते पहिले भारतीय.

या शाळा सर्व समुदायाच्या मुलींसाठी खुल्या होत्या. 1848 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात त्यांनी पहिली शाळा सुरू केली आणि सामाजिक विरोधाला न जुमानता चालू ठेवली.

‘मांग आणि महारांच्या दुःखाविषयी’

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एकच शाळा सुरू करून चालणार नव्हतं. ज्यांना ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं त्यांच्यापर्यंत शाळा नेण्याची गरज होती. ती ओळखून फुले दांपत्यानं पुण्यात ठिकठिकाणी शाळा सुरू केल्या. दुसरी शाळा बुधवार पेठमधील चिपळूणकर वाड्यात 1851-52 मध्ये सुरू झाली. त्याच वर्षी तिसरी शाळा वेताळ पेठ, म्हणजे आत्ताची गुरुवार पेठ, येथे सुरू झाली.

जोतिबा-सावित्रीबाईंच्या शिक्षणप्रसाराच्या कामाला पाठिंबा असलेल्यांनी त्यांना ठिकठिकाणी शाळा काढायला मदत केली. त्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे लहुजी साळवे. त्यांच्या तालमीमध्ये जोतिबा जात असत. क्रांतीगुरू वस्ताद म्हणून ओळखले लहुजी साळवे रास्ता पेठमध्ये युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र चालवायचे. शिक्षणप्रसाराच्या चळवळीलाही त्यांचे पाठबळ होते.

लहुजी साळवे यांची पुतणी असलेली मुक्ता ही वेताळ पेठेतल्या तिसऱ्या शाळेतली विद्यार्थिनी. मांग/मातंग समाजातली शाळेत जाणारी पहिली मुलगी! शाळेत भरती झाली तेव्हा ती 11 वर्षांची होती.

‘मांग आणि महारांच्या दुःखाविषयी’ हा पहिला निबंध समोर आला 1855 मध्ये. तिला शाळेत जाऊन केवळ तीन वर्षे झाली होती. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी लिहिलेल्या निबंधाने तिचं नाव इतिहासात अजरामर झालं. एका दलित स्त्रीने केलेलं हे पहिलं वहिलं लेखन म्हणून त्याचं महत्त्व तर आहेच, त्यातील आशय आजही विचार करायला लावणारा आहे.

फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुलेंसह शाळेतल्या दोन विद्यार्थिनी

फोटो स्रोत, फुले स्मारक

ईश्वराला उद्देशून सांगितलेल्या ‘मांग आणि महारांच्या दुःखाविषयी’ बोलणाऱ्या मुक्ताचं सामाजिक स्थितीचं भान तिच्या हरेक शब्दातून व्यक्त होते. तिची देवाकडे तक्रार आहे की आम्हाला धर्मव्यवस्थेच्या बाहेरचं मानलं जातं.

या धर्मव्यवस्थेचा अंकुश स्वत:च्या नियंत्रणात ठेवणाऱ्या ब्राह्मण समाजाला ती ‘लाडूखाऊ’ म्हणून संबोधते! “बाह्मण लोक असे म्हणतात की, वेद तर आमचीच मत्ता आहे. आम्हीच ह्यांचे अवलोकन करावे. तर ह्यावरून उघड दिसते की, आम्हास धर्मपुस्तक नाही. जर वेद बाह्मणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे बाह्मणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की नाही बरे?”

याला जोडूनच ती धर्माची चिकित्साही करते. आमचा धर्म कोणता? असा प्रश्न जगनियंत्याला विचारून एखादा धर्म कसा असावा हे आपलं मतही सांगते.

“तर हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ. परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडेस पहावे. तो व त्यासारिखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत; व असा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो.”

मुक्ताची धारदार भाषा...

ज्ञानोदयमध्ये छापून आलेला लेख

फोटो स्रोत, फुले स्मारक

धर्माचा दुराभिमान बाळगणाऱ्या आणि जन्मावरून सामाजिक स्थान ठरवणाऱ्यांना चपराक देणारी मुक्ता, धर्म हा मानवतेची आणि समानतेची कास धरणारा पाहिजे, असं म्हणते.

पेशवेकालीन स्थिती मांडताना मुक्ताची लेखणी आणखी धारदार होते.

पेशवेकाळातले अन्याय, ब्राह्मण जातींकडून मिळणारी अमानवी वागणूक आणि पशुपेक्षाही हीन वागणूक हे वास्तव सांगताना मुक्ता म्हणते, ‘आम्हा मनुष्यास बाह्मण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानिले आहे. सांगते ऐका, ज्या वेळी बाजीरावाचे राज्य होते त्या वेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानीत होते की काय?

पहा बरे तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे; त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय? परंतु मांगमहारांस मारू नका असे म्हणणारे कोण बरे?’ आपली बाजू घेणारे कोणीच नव्हते ही असहायता आणि अमानुष वागणुकीची चीड ती व्यक्त करते.

“त्यासमयी मांग अथवा महार ह्यातून कोणी तालीमखान्यापुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते.” बहुजन समाज जातव्यवस्थेमध्ये कसा भरडला जात होता याचे भान ती देते.

पेशवेकालीन वृत्तीच्या परंपरांवर टीका

शिक्षण हाही तेव्हा ब्राह्मणांचा विशेषाधिकार मानला गेला. आपल्याला शिक्षणापासून म्हणजेच ज्ञानार्जनापासून कसे वंचित ठेवले याची जाणीव शिकते झालेल्या मुक्ताच्या लेखणीतून व्यक्त होते.

“अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार? कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महारमांग असून वाचतात, तर ब्राम्हणांनी का त्यास दप्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे की काय? असे बोलून तो त्यास शिक्षा करी.”

यातून त्या काळची सामाजिक स्थिती समोर येते.

ज्ञानोदयमधील मुक्ता साळवेंचा लेख

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ज्ञानोदयमधील मुक्ता साळवेंचा लेख

शिकायला बंदी, अस्पृश्य म्हणून तुच्छ वागणूक आणि चाकरीही द्यायलाही नकार, मग या लोकांच्या हाती पैसा कसा येणार आणि त्यांची स्थिती कशी सुधारणार?

समाजाने लादलेली, हीन मानलेली कामे करत जगण्यातील अगतिकता तसंच बेरोजगारी आणि गरिबीचे दुष्टचक्र समजून येतं. समाजाचं हे वास्तव आजही पूर्ण बदललेलं नाही ही खेदाची गोष्ट आहे.

ब्राम्हण समाजसुधारकांबद्दल...

गरिबीच्या जोडीला जात विषमता आणि लिंगभाव विषमता यांची दुहेरी-तिहेरी आपल्या समाजातील स्त्रियांना सहन करावी लागते भानही या निबंधातून व्यक्त होतं.

“ज्या वेळेस आमच्या स्त्रिया बाळंत होतात त्या वेळेस त्यांच्या घरावर छपर सुद्धा नसते, म्हणून हीव, पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दु:ख होत असेल बरे! ह्याचा विचार स्वत:च्या अनुभवावरून करा.

जर एखाद्या वेळेस त्यास बाळंतरोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसे कोठून मिळणार? असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्याने फुकट औषधे दिली?”

पेशवाईतील जातीय अत्याचार ते ब्रिटिशांच्या काळात बदलत गेलेलं जातीचं वास्तव असा सामाजिक बदलाचा मोठा पट मुक्ता साळवेंच्या छोटेखानी निबंधातून समोर येतो. इथल्या जातव्यवस्थेला पगडा इंग्रजांमुळे कमी झाला हे ती सांगते.

सोबतच ब्राह्मणी वृत्तीचा परामर्ष घेणारी मुक्ता समाजसुधारक ब्राह्मणांच्या कामाचे स्वागत करते, त्यांना त्यांच्याच समाजाकडून होणाऱ्या जाचाबद्दल नाराजी व्यक्त करते.

फुले स्मारक

फोटो स्रोत, SAVITRIBAI PHULE SMARAK

“आता निःपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते. ती अशी कि जे ब्राम्हण आम्हांस वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते, तेच आता माझे स्वदेशीय प्रिय मित्र बंधू आम्हांस ह्या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात.

परंतु सर्वच ब्राम्हण घेतात असे नाही. त्यातून ज्यांचा विचार सैतानाला नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करतात. आणि जे माझे प्रिय बंधु आम्हांस बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यांस म्हणतात कि तुम्हांस जातीबाहेर टाकू.”

शिक्षणाचं बाळकडू मिळालेली मुक्ता आपल्या समाजालाही जागवण्याचं काम करते. अज्ञानरूपी आजार बरा करण्यासाठी शिका, जुनाट समजुतींना धरून राहू नका, अन्याय वागणुकीला सहन करू नका, असं म्हणते.

मुक्ता साळवेंचं हे लेखन पुन:पुन्हा वाचावं असं वाटणारं आहे.

अवघे तीन वर्षे शिकलेली चौदा वर्षाची मुलगी इतकं थेट, परखड तरीही भिडणारं कसं लिहिती झाली याचं आश्चर्य वाटत राहतं. याचं श्रेय जितकं हुषार, तल्लख मुक्ताचं आहे, तितकंच फुले दांपत्यानं दिलेल्या शिक्षणाचंही आहे. त्यांनी केवळ लिखापढीचं शिक्षण दिलं नाही, सत्यशोधक वृत्ती रूजवली.

जेव्हा निबंध जाहीरपणे वाचला गेला...

आत्मभान आणि परिस्थितीचं भान देणारं शिक्षण दिलं आणि धर्मचिकित्सा करत व्यवस्थेला प्रश्न विचारायलाही शिकवलं. हे खरं गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे. अशा शिक्षणाच्या प्रवाहात आलेली व्यक्ती झपाटून, बदलून जाते.

मुक्ताचा निबंध 1855 मध्ये ‘ज्ञानोदय’च्या अंकात दोन भागात छापून आल्याने अनेक वाचकांपर्यंत पोहोचला. पहिला भाग 15 फ्रेबुवारी (पूर्वार्ध) आणि दुसरा 1 मार्चला (उत्तरार्ध) प्रकाशित झाला. नंतर या निबंधावर प्रतिक्रिया म्हणून दोन पत्रेही छापली गेली. त्याचवर्षी हा निबंध इंग्रज शासनाने मुंबई राज्याच्या शैक्षणिक अहवालामध्ये छापला.

आपला निबंध मोठ्या जनसमुदायासमोर वाचायची संधीही मुक्ताला मिळाली.

सावित्रीबाई फुले

फोटो स्रोत, GOVERNMENT OF MAHARASHTRA

पूना कॉलेजचे प्राचार्य, सरकारी शिक्षामंडळाचे प्रमुख आणि फुले यांच्या शैक्षणिक कार्याचे हितचिंतक मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामबागवाडयात जोतिबांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

तिथे साधारण 3 हजार लोकांच्या उपस्थितीत मुक्ताने आपला निबंध वाचला. तो ऐकून मेजर कॅंडी प्रभावित झाले. त्यांनी तिचे कौतुक करत तिला चॉकलेट देऊ केले.

मेजर कॅडींना बाणेदारपणे उत्तर देत मुक्ता म्हणाली, “सर, आम्हाला चॉकलेट नको, वाचनालयाची सोय करून द्या!” त्याकाळात एका दलित मुलीने पुस्तकांची मागणी करणे किती विलक्षण आणि क्रांतिदायी होते.

‘पहिली महिला दलित लेखिका’

मुक्ता साळवेंचा शिक्षणप्रवास खरंच थक्क करणारा आहे.

या निबंधाने उठवलेले विचार मोहोळ तत्कालिन चर्चेपुरतंच सीमित नव्हतं. मुक्ता साळवे यांनी मांडलेले विचार आणि मुद्दे समाजभान देणारे तसंच संदर्भ म्हणून महत्त्वाचे होते.

महात्मा फुले, बाबा पदमजी आणि रेव्हरंड मरे मिचेल यांचे मित्र असलेल्या ना. वि. जोशी यांनी आपल्या ‘पुणे शहराचे वर्णन’ या 1868 साली प्रकाशित ग्रंथातही मुक्ताच्या निबंधाचा काही भाग छापला. या मराठी निबंधाचा इंग्रजी अनुवाद, सुसी थारु (Susie Tharu) आणि के. ललिता (K. Lalita) यांनी लिहिलेल्या ‘Women Writing in India: 600 BC to Present’ पुस्तकात आहे. 1991 साली हे पुस्तक प्रकाशित झालं.

आजही मुक्ता साळवेंचा मूळ निबंध इंग्रजी, हिंदी अनुवादासह इंटरनेटवर उपलब्ध आहे.

‘मांग महारांच्या दु:खाविषयी’ या निबंधातून लिहिती झालेली चौदा वर्षांची मुक्ता साळवे आज ‘आद्य दलित लेखिका’ म्हणून ओळखली जाते.

मुक्तानं पुढे काय लिखाण केलं यांसह तिची बाकी माहिती आज उपलब्ध नाही. तिचा बाकी इतिहास पुसला गेला असली तरी तिचं पहिलं, कदाचित एकमात्र लिखाण जिवंत आहे. ते जितकं परखड आहे तितकंच प्रेरणादायीही आहे.

(लेखिका फोटोग्राफर, फिल्ममेकर आणि स्त्रीप्रश्नाच्या अभ्यासक आहेत. या लेखात मांडलेली मतं ही लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत. )

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)