जया 'अमिताभ' बच्चन; अँग्री यंग 'मॅन'चं नाव लावण्यावरुन पुन्हा भडकले 'शोले': ब्लॉग

जया 'अमिताभ' बच्चन; अँग्री यंग 'मॅन'चं नाव लावण्यावरुन पुन्हा भडकले शोले: ब्लॉग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जया आणि अमिताभ बच्चन
    • Author, नासिरुद्दीन
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

‘श्रीमती जया अमिताभ बच्चन जी’

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण यांनी 29 जुलै रोजी सभागृहात बोलण्यासाठी जया बच्चन यांचं नाव घेतलं.

जया बच्चन उभं राहून कठोर आवाजात म्हणाल्या, “सर, फक्त जया बच्चन म्हणाला असतात तरी चाललं असतं. हे जे काही चाललं आहे की महिला, या त्यांच्या पतीच्या नावानेच ओळखल्या जातील, त्यांची स्वत:चं काही अस्तित्व नाहिये का?

उपसभापती यावर म्हणाले – येथे (संसदेतील कागदपत्रात) तुमचं पूर्ण नाव असंच लिहिलंय.

या घटनेनंतर, चर्चा सुरू असताना, जया बच्चन यांनी 2 ऑगस्ट रोजी संसदेत अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यासमोर ‘मी, जया अमिताभ बच्चन’ असं उपहासाने म्हटलं.

पतीचं नाव आणि आडनावावरुन जया बच्चन यांनी उपस्थित केलेले प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून उपस्थित केली जात आहेत.

जया बच्चन या प्रसिद्ध कलाकार आणि समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत. राज्यसभेतील प्रतिज्ञापत्रात त्यांचे पूर्ण नाव म्हणून, 'जया अमिताभ बच्चन' अशी नोंद आहे.

मात्र, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरून आणि प्रतिक्रियेनंतर महिलांचे नाव व त्यावरुन ठरलेली त्यांची ओळख हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय.

बीबीसी
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

नाव आणि ओळख

या प्रकरणातून महिलांच्या ओळखीला अनुसरून एका मोठ्या गोष्टीकडे लक्ष वेधले गेले.

महिलांना स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे की नाही? लग्न म्हणजे लग्नाआधीचं जीवन आणि ओळख मिटणे होय का? लग्नाचा अर्थ स्वत:ची ओळख दुसऱ्याच्या ओळखीत समाविष्ट करणे होय का? हे सर्व मुद्द्यांमुळेच जया बच्चन यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे ठरतात.

जया बच्चन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत

आपला पुरुषप्रधान समाज हा फक्त महिलांवर ओझं टाकून त्यांना फक्त दबावातच ठेवत नाही तर त्यांची स्वतंत्र ओळखही पुसून टाकतो. हे प्रश्न.

घरातील कुटुंबप्रमुख कोण असणार, स्त्री की पुरुष? वंशावळीचा आधार कोण ठरणार, स्त्री की पुरुष? महिला आणि तिच्या बाळाची सामाजिक ओळख कोण ठरवणार, स्त्री की पुरुष? वारसाहक्क कोणाला मिळाला, स्त्री की पुरुष? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात.

कायदेशीर कागदपत्रांत महिलेचं नाव काय असणार? या सर्व प्रश्नांच्या केंद्रात पुरुषच असून पुरुषसत्ताच दिसून येते. आणि तिच्या अस्मितेच्या या संघर्षातूनच समानतेचा संघर्ष निर्माण होतो.

ओळख अस्मितेची

महिलांच्या नावाचा आणि अस्मितेचा मुद्दा आपल्या समाजात वर्षानुवर्ष उपस्थित केला जातोय. अस्मितेचा संघर्ष हा माणसासाठी नेहमीच महत्त्वाचा संघर्ष राहिलाय.

मात्र, महिलांचा विचार करता हा संघर्ष पुरुषांच्या तुलनेत कितीतरी पटीने मोठा होत जातो. कारण त्यांची ओळख पुसण्याचे किंवा लपवण्याचे प्रयत्न होताना सर्वत्रच दिसून येतात.

स्त्रियांच्या जीवनात पडदा किंवा पदर हा केवळ एक प्रकार राहिलेला नाही. त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्वच पडद्याआड झाकलं गेलं. विशेषतः लग्नानंतर त्यांची ओळख ही लहान सून-मोठी सून या रूपात तर कुठे, सदर ठिकाण, गाव किंवा जिल्ह्याचं नावाने ओळखली गेली.

महिलांचे हक्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महिलांचे हक्क दर्शविणारी वॉल पेंटिंग

काही भागात लहान-मोठ्या सुनेच्या रूपात तर कुठे तिथली, त्या गावची किंवा त्या जिल्ह्याची अशी केली गेली. काही ठिकाणी तर तिचं नावचं बदलून नवीन नामकरण करण्यात आल्याचंही बऱ्याच ठिकाणी दिसून येतं.

लग्नानंतर नव्याने ठेवलेलं नाव हिच तिची ओळख मानल्या जायची. म्हणजे जुन्या नावाशी जुळलेला जीवनाचा भागही संपला. मग लग्न म्हणजे मुलीचे जुने आयुष्य संपतं का? एखाद्याची सून किंवा एखाद्याची बायको अशी तिची ओळख तयार होते.

याचा संबंध फक्त नाव किंवा ओळखीशी नाही तर सन्मानाशीही आहे. महिलेच्या नावासोबत पतीचं नाव असणं हे संपत्तीवरील अधिकाराशी तर जोडलेलं नाही ना? याचाही विचार व्हायला हवा.

जेव्हा नावंही लपवून ठेवली जातात....

एक काळ होता जेव्हा महिलांचा चेहरा आणि आवाजासह नावंही लपवली जायची. मात्र, शिक्षणामुळं त्यांना सार्वजनिकरित्या नावं लिहिण्याचा मुद्दा उपस्थित झाला. ‘नावात काय ठेवलंय’ असं जरी म्हटलं जात असलं तरी, नावावरूनच एखाद्याची संपूर्ण ओळख ठरते.

मात्र, त्या काळात महिलांची नावं सार्वजनिकरित्या घेतली जात नसत. त्यामुळे सुरुवातीला लिहित्या मुली, महिला आणि स्त्रिया त्यांचे वडील, पती किंवा मुलांच्या नावाने ओळखल्या गेल्या. तर काही अज्ञातच राहिल्या. कित्येक महिलांची नावं तर त्यांच्या मृत्यूपश्चात पुढे आली.

जया बच्चन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जया बच्चन

अशा कित्येक होतकरू महिला होऊन गेल्या ज्यांची नावे माहित नसल्याने त्यांचे योगदानदेखील अज्ञातच राहिले. जेव्हा नावे सार्वजनिक होऊ लागली, तेव्हा पुरुषांची आडनावे जोडली जाऊ लागली. लग्नाआधी वडिलांचे आडनाव आणि लग्नानंतर पतीचे नाव अशी त्यांची ओळख होऊ लागली.

नुकतंच एका बहुचर्चित लग्नातही मुलीच्या आडनावाऐवजी तिच्या पतीचं पूर्ण नाव टाकलं गेलं. आणि त्याला परंपरा, संस्कृतीचा मुलामा चढवण्यात आला. अशी प्रकरणं भारतातच आहेत असं नाही तर जगभरात आपल्याला हे पाहायला मिळेल. अनेक प्रगतीशील महिलांच्या नावासोबतही हे दिसून येतं.

मुली आडनाव का बदलतात...

पतीचं आडनाव लावण्यामागचं कारण काय? मुली, स्त्रिया का करतात असं? लग्न आणि त्यासोबतच्या रुढी-प्रथांचं दडपण लहानपणापासूनच त्यांच्यात रुजवलं जातं. त्यांना मानलं नाही किंवा विरोध केला तर काहीतरी वाईट होणार, शुभ-अशुभ किंवा अनिष्ट होणार, या गोष्टी लहानपणापासूनच डोक्यात भरल्या जातात.

लहाणपणापासूनची दिली जाणारी ही शिकवण इतकी मजबूत असते की त्यापलीकडचा विचार करणं हे कोणत्याही विवाहित मुलीसाठी फार कठीण आहे.

लग्नकार्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लग्नकातील विधीचा प्रतीकात्मक फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या सर्व गोष्टी संस्कृती, परंपरा, धर्म आदींच्या नावाखाली केल्या जातात. सोबत कौटुंबिक आणि सामाजिक दबावही असतोच. मुलींचे संस्कारही अशा पद्धतीने केले जातात की लग्नानंतर सौभाग्याचं लेणं म्हणत नाना प्रकारचा श्रृंगार सहज स्वीकारतात. यातील सगळ्यांत पहिली गोष्ट येते ती नाव बदलण्याची. लग्नानंतर बऱ्याच जणी स्वेच्छेने आपल्या नावामागे पतीचं नाव आणि आडनाव लावतात.

तर काहींनी आता आपल्या आडनावाबरोबर पतीचंही नाव ती तिचे आडनाव काढत नाही. त्यासोबत ती तिच्या पतीचे नाव आणि आडनावही जोडणं सुरू केलंय. म्हणजे नावाबरोबर दोन-दोन आडनाव. कदाचित एक चांगली पत्नी असल्याचा पुरावा म्हणून असं करणं त्यांना महत्वाचं वाटत असावं.

तर, लग्नानंतर मुलीचं आडनाव बदललंच असेल असा समजही समाजात सहज मानला जातो. आणि त्यानुसार तिला तिच्या पतीच्या नावासह नवीन नामकरण केलं जातं.

मात्र, लग्नानंतर पुरुषांचं नाव बदललं असेल किंवा त्याने सौभाग्याचं लेणं म्हणून एखादा श्रृंगार करण्याची कुठलीही प्रथा आपल्याकडे नाही. किंवा पुरुषांनी याबबत विचार केला असेल असंही काही दिसून येत नाही. किंवा एखाद्या पुरुषाला त्याच्या पत्नीचं नाव आणि आडनाव लावण्यास सांगितलं तर त्याची काय प्रतिक्रिया असेल? तर, सभागृहात एखाद्या स्त्रीच्या नावापुढे ‘श्रीमती’ का लावलं जावं? सभागृहात बोलण्यासाठी वैवाहिक ओळख आवश्यक आहे का?

पुरुषांसाठी नावावरून ओळखीचे काही निकष पण नाहीत. मात्र, सभागृहात अशा परंपरा आणि त्यांच्या बदलावाबाबतची विचारात्मक चर्चा व्हायला हवी.

काळानुसार होत असलेले बदल

असं नाही की बदल होत नाहीये, मात्र, सकारात्मक बदलासाठी मानसिकदृष्ट्या बदलणे खूप गरजेचे आहे. पण हे वाटतं तितकं सोप नाही. शतकांपासून चालत आलेल्या या रुढी-परंपरांना बदलण्यास काही वेळ लागेलच. मात्र या बदलांसाठी रूढी-प्रथांना टक्कर देण्याचं धैर्य आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे.

म्हणूनच कित्येक विवाहित स्त्रियां आपल्या पतीचं नाव किंवा आडनाव लावत नाहीत. चित्रपटसृष्टीतही अशी अनेक नावं आहेत ज्यांनी लग्नानंतर त्यांचं नाव-आडनावात बदल केलेला नाही.

समानता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लिंग समानतेचा संदेश देणारी वॉल पेंटिंग

काही महिला लग्नानंतर सौभाग्याचं लेणं म्हणवणारे दागिनेही वापरत नाहीत. किंवा आपल्या नावापुढे ‘श्रीमती’ सारखी विशेषणं लावत नाहीत.

मुली किंवा महिलांसाठी स्वत:ची ओळख निर्माण करणे आणि ती अबाधित राखण्यासाठीचा संघर्ष मोठा आहे. हा संघर्ष तिला आयुष्यभर करावा लागतो. यात एखाद-दोन पुरुषांनीही पुढाकार घेत आपल्या नावासह आईचं नाव लावण्यास सुरुवात केलीयं.

आणि शेवटी..

आता आपण जया बच्चनकडे परत येऊ या. जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नानंतर त्या जया भादुडीवरून जया बच्चन झाल्या.

संसदेच्या कागदपत्रांमध्ये त्यांचं नाव 'जया अमिताभ बच्चन' म्हणून नोंदवले गेले आहे. मात्र, अचानक उपसभापतींनी त्यांच्या नावासोबत 'अमिताभ बच्चन' जोडल्याचे ऐकले तेव्हा असहज वाटलं. मात्र, ही भावना त्यांच्यात निर्माण व्हायला त्यांना इतकी वर्षे लागली.

कदाचित त्यांना अस वाटलं असावं की आता 'जया'चं काय उरलंय? जया बच्चन यांची प्रतिक्रिया अनुभवण्यासाठी हे समजून घेणे आवश्यक आहे. किंवा त्यांना असं वाटलं असावं की, एका झटक्यात त्यांची ओळख, त्यांचे कार्य, त्याचं व्यक्तिमत्व सर्वकाही नाहीसं झालंय.

अमिताभ आणि जया बच्चन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमिताभ आणि जया बच्चन

त्या नावाने दिलेली ओळख दुसऱ्याच्या ओळखीशी, कामाशी आणि व्यक्तिमत्त्वाशी जोडलेली होती. त्यामुळे पतीचं नाव किंवा आडनाव वापरणं ही केवळ एक बाब नाही. तर, हा कुणाच्या तरी अस्तित्वाचा मुद्दा आहे. मात्र, मुली आणि स्त्रियाही असा विचार करू शकतात का? हा एक प्रश्नही येथे उपस्थित होतो.

किंवा हा विचार त्यांच्या डोक्यात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो? याचा विचार फक्त जया बच्चनच करणार का? ज्या नावावर त्यांनी आक्षेप घेतला त्या त्याबाबत त्या पुन्हा विचार करतील का? कारण, चांगल्या कारणासाठी पुढाकार घ्यायला कधीही उशीर होत नसतो.