महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेध, निवडणूक आयोगाचं पथक 27, 28 सप्टेंबरला राज्याच्या दौऱ्यावर

निवडणूक आयोगाचं मुख्यालय, नवी दिल्ली.

फोटो स्रोत, Getty Images

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पथक राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष, अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेणार आहे. त्यानंतरच निवडणूक कार्यक्रमाचं चित्र स्पष्ट होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक मुंबई दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश देतील.

28 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्याकडंही सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे.

दरम्यान, सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून प्रत्येक राज्याचा आढावा दौरा करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यापूर्वी नवं सरकार स्थापन होणं अपेक्षित आहे. त्यामुळं आता महाराष्ट्राच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमक्या तारखा मात्र अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित होत्या निवडणुका

हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत. महाराष्ट्रातही ऑक्टोबर महिन्यात विधानसभेसाठी निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण या दोन राज्यांबरोबर महाराष्ट्राच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत.

त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजीव कुमार यांनी म्हटलं होतं की, "गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र झाली होती. पण त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. यावेळी चार राज्यांत निवडणुका आहेत. नंतर लगेचच पाचव्या राज्यात म्हणजे दिल्लीतही. त्यामुळं सुरक्षा दलांच्या उपलब्धतेचा विचार करून आम्ही दोन निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला."

जम्मू-काश्मीरची निवडणूक सुरू असताना मध्येच दुसऱ्या निवडणुकीच्या घोषणेची शक्यता नाही, असंही त्यांनी म्हटलं.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरद पवार आणि उद्धव ठाकरे

राजीव कुमार यांनी पुढे म्हटलं की, "इतरही काही कारणे आहेत. महाराष्ट्रात पाऊस होता. तसंच गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्र असे सण येत असल्यानं आम्हाला एकावेळी दोन निवडणुका शक्य आहेत, असं वाटलं नाही."

विधानसभांच्या कार्यकाळाच्या सहा महिन्यांपर्यंत तसाही कालावधी असतो, असंही त्यांनी म्हटलं.

राज्याच्या राजकीय स्थितीचा विचार करता यावेळी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी दोन आघाड्यांमध्ये निवडणूक होणार हे जवळपास स्पष्ट आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

महाराष्ट्रातील राजकीय स्थिती

महाराष्ट्रात राजकीय स्थितीचा विचार करता 2019 ते 2024 ही पाच वर्ष एकामागून एक राजकीय धक्के किंबहुना भूकंप देणारी ठरली आहेत.

निवडणुकांच्या आधीच्या आघाड्या, नंतरच्या आघाडाच्या, पक्षफुटी, पक्षांवर दावे, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातील खटले असं बरंच काही या 5 वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं आहे.

राज्यातील 288 जागांच्या विधानसभेत 2019 च्या निवडणुकीचा विचार करता भाजपनं सर्वाधिक 105 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेनं 56, राष्ट्रवादी काँग्रेसनं 54 तर काँग्रेसनं 44 जागा जिंकल्या होत्या.

प्रतिकात्मक छायाचित्र

पण सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून भाजपची साथ सोडली. त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं.

हे सरकार सत्तेत असतानाच शिवसेनेला धक्का देत एकनाथ शिंदेंनी बंड केले. फडणवीसांच्या साथीनं त्यांनी सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हंही त्यांना मिळालं.

त्यानंतर लोकसभेच्या काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनीही शरद पवारांशी बंड केले. तेही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनाही राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्हं मिळालं.

आता या सर्व राजकीय गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतरच निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असून त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

ग्राफिक्स

या बातम्याही वाचा -

ग्राफिक्स

सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबर 2024 पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला हवी असे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर करण्यात आल्या.

जम्मू काश्मीरमधील निवडणुकांच गणित

जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्यात येत आहेत.

18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 01 ऑक्टोबरला जम्मू-काश्मिरमध्ये मतदान होणार आहे. 04 ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील.

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. त्यांपैकी 74 सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत, 9 एसटी आणि 7 एससी प्रवर्गाच्या जागा आहे.

जम्मू काश्मीर

सुप्रीम कोर्टानं गेल्या वर्षी दिलेल्या एका निर्णयामध्ये निवडणूक आयोगाला जम्मू काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुका घेण्यासाठी पावलं उचलण्याचे निर्देश दिले होते.

जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्याच्या विरोधातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिला होता.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, ANI

लडाखचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा सु्प्रीम कोर्टानं कायम ठेवला होता. त्याचवेळी जम्मू-काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा बहाल करून त्याठिकाणी निवडणुका घ्याव्यात असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.

भारतीय निवडणूक आयोगानं 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घ्याव्यात असे निर्देश सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं दिले होते.

हरियाणात कधी होणार निवडणूक?

हरियाणात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

1 ऑक्टोबरला हरियाणात मतदान होईल आणि 4 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.

हरियाणात विधानसभेच्या 90 जागा असून त्यांपैकी 73 खुल्या आणि 17 एससी प्रवर्गातील आहेत.

हरियाणा

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.