मविआचा महामोर्चा आणि भाजपाचं माफी मागो आंदोलन, महाराष्ट्राच्या राजकारणाला आक्रमक वळण का लागलंय?

उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस
    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाविकास आघाडीचा महामोर्चा आणि भाजपाचं माफी मांगो आंदोलन मुंबईत झालं खरं पण या दोन्ही आंदोलनांनी लोकोपयोगी असं नक्की काय साध्य केलं हा प्रश्न सर्वांनाच पडू शकतो.

दोन्ही राजकीय बाजू सध्या एकमेकांविरोधात आक्रमक झालेल्या असताना राज्याच्या राजकीय स्थितीत झालेले मोठे बदल विचार करायला लावणारे आहेत.

या दोन्ही आंदोलनांच्या निमित्ताने राज्याच्या बदललेल्या राजकीय संस्कृतीचा येथे विचार करू. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या घडामोडी राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्याने तोंडात बोटं घालावी लागतील अशा प्रकारची आहेत.

निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन करण्यास लागलेला वेळ, त्याच काही तासांसाठी भाजप आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी स्थापन केलेलं सरकार, त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन होऊन तिचं सरकार स्थापन होणं अशा वेगानं घडामोडी घडून या राजकारणाची सुरुवात झाली. 

आताही या राजकीय नाट्याचे एकेक अंक सुरू असल्याचं दिसत आहे. या सर्व घटना पाहाता कोणत्याच घटनेचा एकमेकीशी संबंध आहे, राज्यात सुरू असलेलं राजकारण एका विशिष्ट तर्कावर आधारीत आहे असं दिसत नाही.

महाविकास आघाडीचे नेते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाविकास आघाडीचे नेते

 या तीन वर्षांमध्ये महाविकास आघाडी आणि त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आलं.

तीन वर्षांमध्ये तीन नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यातल्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेण्याआधी राज्यात राष्ट्रपती राजवटही होती.

म्हणजेच सर्वच प्रकारची व्यवस्था या तीन वर्षांत आपल्या वाट्याला आली आहे असं म्हणावं लागेल.

नाट्यमय घडामोडी

देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम शपथ घेतली ती त्यांच्या आधीच्या कार्यकाळात विरोधी पक्षात असलेल्या अजित पवार यांच्याबरोबर.

हे दोघेही यापूर्वी कधीही एका आघाडी-युतीमध्ये नव्हते किंवा त्यांनी 2019 साली एकत्र निवडणूक लढवलेली नव्हती. पण फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

फडणवीस यांचं सरकार अगदी अल्पकाळ चालल्यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जात सरकार स्थापन केलं.

या दोन्ही पक्षांबरोबर त्यांनी 2019 साली एकत्र निवडणूक लढवलेली नव्हती, पण त्यांनी सरकार स्थापन केलं.

विशेष म्हणजे अजित पवार या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस या मविआ सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते झाले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 3 वर्षांत 3 मुख्यमंत्र्यांना शपथ दिली. देवेंद्र फडणवीस यांना एकदा मुख्यमंत्रीपदाची आणि एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. अजित पवार यांना दोनवेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. तर एकनाथ शिंदे यांना एका सरकारमध्ये मंत्री म्हणून तर दुसऱ्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 3 वर्षांत 3 मुख्यमंत्र्यांना शपथ दिली. देवेंद्र फडणवीस यांना एकदा मुख्यमंत्रीपदाची आणि एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. अजित पवार यांना दोनवेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. तर एकनाथ शिंदे यांना एका सरकारमध्ये मंत्री म्हणून तर दुसऱ्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

हे सगळं सुरू असताना शिवसेनेतून मोठा गट घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्यांनी भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं आणि शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि अजित पवार विरोधीपक्षनेते झाले.

 म्हणजे या विधानसभेची निवडणूक झाल्यावर पहिल्यांदा शपथ घेणाऱ्या दोन नेत्यांना या तीन वर्षांत स्वतःची मर्जी असो वा नसो उपमुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते व्हावं लागलं आहे.

या विधानसभेच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अल्पकाळासाठी सरकार स्थापन केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या विधानसभेच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अल्पकाळासाठी सरकार स्थापन केलं होतं.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांना त्यांचे पहिले विरोधीपक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे ‘लाभले’ होते.

त्यानंतर थोड्याच काळात शिवसेना भाजपाबरोबर सत्तेत आली आणि एकनाथ शिंदे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आले होते. 

बदलत्या भूमिका

साधारणपणे ईशान्येकडील राज्यांत किंवा गोव्यासारख्या लहान राज्यांच्या विधानसभांमध्ये जशा घटना घडतात तशा घटना गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्यातही घडताना दिसत आहेत.

  • विरोधी पक्षनेतेपदावरुन थेट सत्तेत जात मंत्री होणं.
  • एकमेकांविरोधात लढून सरकार स्थापन करणं किंवा ज्या पक्षाबरोबर एकत्र निवडणूक लढवली आहे त्यांच्या विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी करणं.
  • निवडणुकीच्या तोंडावर आणि निवडून आल्यावरही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं.
  • अगदी अल्पकाळात एकापेक्षा जास्त पक्ष बदलणं.
  • सत्ताधारी-विरोधकांनी एकमेकांवर टीका करताना पातळी सोडणं.
  • सोशल मीडियावर सर्वबाजूंनी एकमेकांवर ट्रोलिंग

या घडामोडी आता महाराष्ट्रात आश्चर्यकारक वाटत नाहीत.

या घडामोडी लोकसभेचे सदस्य, विधानसभेतील सदस्य यांच्यापासून महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही घडत आहेत.

मोठ्या संख्येनं अगदी अल्पकाळात पक्षांतर करणं, गट बदलणं ही इतर राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्राच्या राजकारणतली मोठी आणि ठळक गोष्ट झाली आहे. 

राजकीय परिस्थिती काही महिन्यांमध्ये, दिवसांमध्ये बदलते मग अचानक त्या बदललेल्या परिस्थितीनुसार आपली जुनी भूमिका राजकारण्यांना बदलावी लागत आहे.

त्यानुसार अगदी काही महिन्यांपुर्वी केलेली भाषाही बदलावी लागत आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी विधानपरिषदेचे तेव्हाचे सदस्य नारायण राणे यांच्या जुन्या प्रकरणाचा उल्लेख केला होता. त्यानंतर काही काळातच नारायण राणे आधी भाजपाच्या जवळ गेले, नंतर त्या पक्षातच गेले आणि नंतर केंद्रात मंत्रीच झाले. आता दोन्ही नेते एकमेकांसाठी उभे असल्याचं दिसतं. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते, हे दोन्ही नेत्यांचे पक्ष निवडणुकीत एकत्र लढले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते, या दोन्ही नेत्यांचे पक्ष निवडणुकीत एकत्र लढले होते.

एकेकाळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र असताना आपण एक आहोत असा सभांमधून, वक्तव्यांतून संदेश जाईल याचे प्रयत्न करायचे. पण आता परिस्थिती बदलल्यावर दोन्ही नेते एकमेकांविरोधात बोलण्याची संधी सोडत नाहीत.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला त्यांनी निवडणूक झाल्यावर त्याच नेत्यांबरोबर सत्ता स्थापन केली.

विरोधी(?) पक्षनेते

महाराष्ट्राचं राजकारण सोयीचं आणि परिस्थितीनुरुप किती वेगानं बदलतं आहे यासाठी आपण एक उदाहरण येथे पाहू. लोकशाहीत विरोधी पक्षाला महत्त्व सत्ताधारी पक्षाइतकंच असतं, असं मानलं गेलं असलं तरी, विरोधी पक्ष आणि त्या पक्षातले नेते आपल्या राजकारणाशी आणि मूळ भूमिकेशी सुसंगत राहातीलच असे नाही.

तृप्ती सावंत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी त्यांचा पराभव केला. आज नारायण राणे काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत. तृप्ती सावंत यांनी 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवली, आता त्याही भाजपात आहेत.

इतर राज्यांपेक्षा आमचं राजकारण वेगळं आहे असं सतत सांगणाऱ्या महाराष्ट्रातलं हे उदाहरण पाहिल्यास महाराष्ट्र कशातच मागे नाही हे दिसून येईल. 

मधुकरराव पिचड- 1995 ते 1999 या कार्यकाळात विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी काँग्रेसचे मधुकरराव पिचड होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर ते त्या पक्षात गेले. त्यानंतर ते ज्या युती सरकारविरोधात सभागृहात आवाज उठवायचे त्याच सरकारमधील भाजपामध्ये सहभागी झाले आहेत. 

नारायण राणे- त्यानंतर 1999 साली युतीचं सरकार गेल्यावर नारायण राणे विरोधी पक्षनेते झाले. ते 2005 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही काळ स्वतःचा पक्ष काढला आणि आता ते भाजपामध्ये आहेत.

वांद्रे पोटनिवडणूक जिंकल्यानंतरचे दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वांद्रे पोटनिवडणूक जिंकल्यानंतरचे दृश्य

रामदास कदम- राणे यांच्यानंतर 2005 ते 2009 या काळामध्ये शिवसेनेचेच रामदास कदम विधानसभेतील विरोधीपक्षनेते झाले. आज रामदास कदम यांनी शिवसेना सोडली असून त्यांचे पुत्र योगेश कदम बाळासाहेबांची शिवसेना या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील गटात आहेत. 

एकनाथ खडसे- 2009 ते 2014 या पाच वर्षांसाठी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद सांभाळणारे भाजपाचे एकनाथ खडसे हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारवर सडकून टीका करत असत आता ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेत आमदार आहेत. 

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकनाथ खडसे

एकनाथ शिंदे- खडसे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विरोधीपक्षनेते पद अल्पकाळासाठी सांभाळलं. यावेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. शिवसेनेने थोड्याच दिवसांत भाजपाला पाठिंबा दिल्यावर एकनाथ शिंदे थेट कॅबिनेट मंत्री झाले. 

राधाकृष्ण विखे-पाटील- शिवसेनेने भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर विरोधी पक्षनेते पद काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्य़ाकडे आलं. पण विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच विखे-पाटील भाजपात गेले आणि मंत्री झाले. म्हणजेच या 2014-2019 विधानसभेतील दोन विरोधीपक्षनेते थेट सरकारमध्ये जाऊन कॅबिनेट मंत्रीही झाले. 

राधाकृष्ण विखे-पाटील

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राधाकृष्ण विखे-पाटील

विजय वडेट्टीवार- राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पद सोडल्यानंतर हे पद काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांच्याकडे आले.

विजय वडेट्टीवार पहिल्यांदा विधानसभेत आले तेव्हा ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्याआधी ते विधान परिषदेतही शिवसेनेच्या कोट्यातून आले होते.

आता त्यांनाच शिवसेनेच्या विरोधात विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती.

त्यानंतर अल्पकाळातच निवडणूक झाली आणि विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेबरोबर स्थापन झालेल्या मविआ सरकारमध्ये मंत्री होण्याची संधी मिळाली.

आता ते पुन्हा शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीत आहेत. 

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस- 2019 साली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या शिवसेनेबरोबर दीर्घकाळ युतीचं राजकारण केलं होतं त्याच शिवसेनेविरोधात देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपद सांभाळावं लागलं.

अडीच वर्षांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ या खात्यांसह अनेक जबाबदाऱ्या पाहात आहेत. 

अजित पवार- एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते झाले आहेत.

अजित पवार यांचा पक्ष शिवसेना-भाजपाविरोधात निवडणूक लढवला होती परंतु अजित पवार एकदा देवेंद्र फडणवीसांच्या आणि नंतर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले.

आता ठाकरे गटाचे आमदार त्यांच्याबरोबर विरोधी पक्षात आहेत. हे सगळं एकाच विधानसभेत तेही 3 वर्षांत झालं आहे.

या एका उदाहरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणाची गेल्या काही काळातली स्थिती दिसून येते.

विकासकामांबद्दल बदलते राजकारण

साधारणपणे विकासकामे किंवा कोणत्यांही उद्योग-प्रकल्पांवर राजकीय पक्षांची भूमिका परिस्थितीनुरुप बदलत असल्याचं दिसतं.

म्हणजेच जो पक्ष सध्या सत्तेत असेल तो एखादा प्रकल्प सुरू करतो तो विरोधी पक्षात असताना त्याच्या विरोधात कृती करू लागतो.

समृद्धी महामार्गाचे बांधकाम सुरू असताना घेतलेले छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, समृद्धी महामार्गाचे बांधकाम सुरू असताना घेतलेले छायाचित्र

आज विरोधी पक्षात असताना ज्या प्रकल्पाला विरोध केला आहे तोच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सत्तेत गेल्यावर प्रयत्न केले जातात.

यासाठी नाणार, जैतापूर, समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टल रोड अशा काही प्रकल्पांकडे उदाहरण म्हणून पाहाता येईल.

भावनिक मुद्द्यांचं राजकारण 

रोजगार निर्मिती, उद्योग, गुंतवणूक, शेती तसेच महिला-युवक यांच्यासंदर्भातील समस्यांऐवजी भावनेला हात घातला जाणाऱ्या मुद्द्यांकडे लक्ष वळेल असे मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहात आहेत.

 महापुरुष, महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद, स्थानिक-परप्रांतीय वाद असे मुद्दे राजकीय नेत्यांची भाषणं आणि माध्यमं तसेच सोशल मीडियात सर्वात वरती दिसतात.

याच मुद्द्यांनी माध्यमांचं अवकाश पूर्ण व्यापलेलं दिसतं. यामध्ये सर्वच पक्षांनी आपापलं योगदान देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

आरेला-कारे आणि सतत युद्धासाठी सज्ज

 महाविकास आघाडीचा मोर्चा होत असेल तर सत्ताधारी युतीचं माफी मांगो आंदोलन मुंबईत झालं. अशाप्रकारचं आरे ला कारे म्हणून उत्तर देण्याची एक व्यवस्था सुरू झालेली आहे.

एका नेत्यानं एखादं विधान केलं की त्यावर दुसऱ्या पक्षानं प्रतिक्रिया देणं, त्याला तिसऱ्या पक्षातल्या नेत्यानं उत्तर देणं, चौथ्यानं त्यावर व्यक्त होणं यानं बातम्यांमध्ये महत्त्वाची जागा पटकावलेली दिसते. सर्वपक्षीय नेते आपापल्या नेत्यांना आरेला- कारे उत्तर द्या, असं 'मार्गदर्शन'ही करतात.

नारायण राणे घर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युवा सेनेचे कार्यकर्ते आणि भाजपा समर्थकांमध्ये जुहू येथे तणाव निर्माण झाला होता., तेव्हाचे छायाचित्र.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

 फक्त निवडणुकांच्या काळात राजकीय वातावरण तापण्याऐवजी आता हे वातावरण सतत पेटलेलंच दिसतं. किंबहुना ते पेटतं राहावं यासाठी वक्तव्यं आणि तशा गोष्टीही होत असताना दिसतात.

सत्ताधारी आणि विरोधक कोणीही असोत ते मुद्द्यांऐवजी एकमेकांविरोधात सदैव आक्रमक स्थितीत राहिल्याचं दिसतं. यातून राज्यातला कोणताही मुद्दा, प्रकल्प, नेता सुटलेला नाही.

राजकीय नेते आणि कार्यकर्ते सतत एकमेकांविरोधात प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत असल्याचं दिसतं.

सतत कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरू असल्यामुळे या वक्तव्यांमध्ये, प्रतिक्रियांमध्ये, आंदोलनांमध्ये कोणताही खंड पडत नसल्याचं दिसतं.

माध्यमांमधील चर्चा, भाषणं, समाजमाध्यमांतील चर्चा, ट्रोलिंग यामध्ये सर्व नेते, कार्यकर्ते यथाशक्ती भार उचलत आहेत.

एकेकाळी ईशान्येकडील राज्यांमध्ये, हरियाणा-गोवा अशा राज्यांमध्ये मोठी पक्षांतरं होतात, दक्षिण भारतात राजकीय संस्कृती आक्रमक उग्र आहे, मात्र महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे असं म्हटलं जायचं. आता राज्यामधील राजकारणात आलेली आक्रमकता पाहाता असं विधान करता येईल का? याबद्दल शंका निर्माण झाली आहे.

कुटुंबीयांचा प्रवेश 

महाराष्ट्रातल्या राजकारणात नेत्यांच्या कुटुंबीयांना उडी घ्यावी लागत आहे किंवा त्यांना ओढलंही जात आहे असं दिसतं.

एखाद्या नेत्यावर टीका करण्यासाठी कुटुंबीयांचे आर्थिक-सामाजिक व्यवहार चर्चेत आणणं सोपं ठरत आहे.

politics

फोटो स्रोत, FACEBOOK/BHAVNA GAWALI

त्या नेत्याचे पती किंवा पत्नी यांच्या आर्थिक व्यवहारांवरुन घेरणं किंवा त्यांनी केलेल्या एखाद्या कृतीवरुन नेत्याला अडचणीत आणणं ही एक नवी पद्धत झाली आहे. तसंच ट्रोल करण्यासाठी कुटुंबीयांचा वापर करणं यालाही सोशल मीडियात मान्यता मिळालेली दिसते.

उदाहरणार्थ, अमृता फडणवीस यांची वक्तव्यं, त्यांची गाणी देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यासाठी वापरली जातात, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी रायगड जिल्ह्यात रश्मी ठाकरे यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांचा उपयोग केला जातो.

भावना गवळी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटित पतीला ठाकरे गटात प्रवेश देण्य़ात आला.

सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यापासून विभक्त होऊन राहाणारे पती शिंदे गटात आले. अशाप्रकारे राजकारण आता वेगानं घरामध्ये पोहोचलंय. हे सर्वच पक्ष करत असल्यामुळे त्याला मान्यताच मिळाली आहे असं दिसत आहे.

बदलत्या राजकीय व्यवस्थेबद्दल बोलताना मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संहिता जोशी म्हणाल्या, “गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवर होणाऱ्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक बदलांचे पडसाद सगळ्यांच देशांमध्ये अनुभवले जात आहेत. लोकशाही आधारित पक्षीय राजकारणाचे स्वरुपही खूप बदलले आहेत. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेवर एकूणच जगाचे लक्ष आहे. अनेक प्रकाराच्या आव्हानांना पेलत आपण बऱ्यापैकी एक राजकीय संस्कृती उभी केली आहे. त्यामुळेच गेली 75 वर्षे आपली राज्यव्यवस्था टिकून आहे. पण गेल्या काही वर्षांत समाज माध्यमांचा वाढता प्रभाव आणि तंत्रज्ञानाने घेतलेली झेप यामुळे राजकारणाचे स्वरुपही खूप बदलले आहे."

त्या पुढे म्हणाल्या, "मूल्याधारित राजकारणाची जागा जातीवादी आणि जमातवादी आणि धर्माधारित राजकारणाने घेतलेली दिसते. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये ही हेच होत असेल तर ते चिंताजनक आहे. भारतीय प्रबोधनाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात तात्विक चर्चा, वैचारिक मंथन, संवाद याचा ऱ्हास म्हणजे एकूण राजकारणाच्या मूल्यांचा ऱ्हास असं दिसत आहे. आपण सगळ्यांनी पक्षीय राजकारणाच्या पुढे जाऊन या मूल्यांचे पुनरुज्जीवन कसे करता येईल याचा विचार करता येईल.”

‘सगळी स्पर्धा आपली जागा निर्माण करण्यासाठीच’

 महाराष्ट्राच्या राजकारणात आलेली आक्रमकता याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी यामागे राजकीय पक्षांची स्वतःची जागा निर्माण करण्याची धडपड असल्याचे कारण असावे असं सांगितलं.

ते म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये एकेकाळी सर्वदूर काँग्रेसचीच सत्ता होती, त्यावेळेस विरोधकांना तुलनेत अत्यंत कमी अवकाश उपलब्ध होतं. आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे. 1990च्या काळानंतर महाराष्ट्रात काँग्रेसविरोधी पक्षांची जागा वाढत गेली.

काँग्रेसचं अवकाश या पक्षांनी व्यापल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा सुरू झाली की आक्रमकता दिसते. पूर्वी फक्त काँग्रेस एक मोठा पक्ष असल्यामुळे तेव्हा काँग्रेसमधील गटबाजीच्याच बातम्य़ा येत असत आता मात्र सर्व पक्ष आपापली जागा मिळवण्याच्या कामात असल्यामुळे या पक्षांमधील संघर्ष दिसून यायला लागला आहे."

मुंबईतल्या एका बंदच्यावेळचे दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईतल्या एका बंदच्यावेळचे दृश्य

महाराष्ट्रातल्या राजकारणात झालेल्या बदलाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, " दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे प्रतिक्रियावादी राजकारणाचा. पूर्वीही नेते घटनांवर, इतर नेत्यांवर व्यक्त व्हायचे.

आता मात्र सोशल मीडियामुळे ते तात्काळ सगळीकडे पसरतं. लोक चटकन व्यक्त होतात. यामुळे प्रसिद्धीही मिळत असल्यामुळे त्याचा आधार घेतला जातो. माध्यमांमध्येही स्पर्धा असल्यामुळे अशा बातम्यांना स्थान मिळतं. स्वस्त डेटामुळे त्या वेगाने पसरतात.”

राजकीय वातावरण सतत धगधगत का राहातं याचं उत्तर देताना ते म्हणाले, “भारतात सतत कुठेतरी निवडणुका, पोटनिवडणुका सुरू असल्यामुळे राजकीय वातावरण सतत भारलेलं असतं. त्यामुळेही आक्रमकता सतत सगळीकडे दिसून येते. आपलं स्थान बळकट राहाण्यासाठी, नवी जागा मिळवण्यासाठी राजकीय नेते, कार्यकर्ते आक्रमकता प्रदर्शित करत राहातात.”

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)