'बायकोचा बुरखा बघून त्यांनी आम्हाला चिरडलं'

- Author, मुस्तान मिर्झा
- Role, बीबीसी मराठीसाठी
लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळ 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी एक घटना घडली. कारने मागून धडक दिल्याने मोटारसायकलवर जाणाऱ्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला.
दुचाकीवरील पती-पत्नी आणि 2 मुलांपैकी पत्नी आणि 3 वर्षीय लहान मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. तर पती आणि 6 वर्षीय मुलगा यात गंभीर जखमी झाले.
अपघात झाला म्हणून तात्काळ चौघांना तात्काळ रुग्णालयात नेलं. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्या सादीक शेख यांनी केलेला आरोप, फारच खळबळजनक आहे.

हा अपघात नसून मुस्लीम असल्यामुळं धार्मिक द्वेषातून मारण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक धडक दिली असं त्यांचं म्हणणं आहे.
आरोपींच्या समोर आलेल्या एका व्हीडिओतही एका आरोपीनं चालकावर मुद्दाम पीडितांना धडक दिल्याचं म्हटलंय. मात्र धार्मिक द्वेषाच्या मुद्द्याचा एफआयआरमध्ये उल्लेख नाही.
कारमध्ये बसलेल्यांनी अपघातापूर्वी आम्हाला धार्मिक उल्लेख करत शिविगाळ केली आणि त्यानंतर धडक दिली. त्यात माझी पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप सादीक शेख यांनी केला आहे.


त्यादिवशी नेमकं काय घडलं?
लातूर येथील रहिवासी सादीक उस्मान शेख (35) हे 29 सप्टेंबर रोजी दुपारी औसा येथे राहणाऱ्या बहिणीकडे गेले होते.
त्यांच्यासोबत त्यांची पत्नी ईकरा (26), 6 वर्षीय मुलगा अहद आणि 3 वर्षांची मुलगी नादिया हे देखील होते.
सादीक म्हणतात की, "रात्रीचं जेवण आटोपून आम्ही मोटारसायकलवर लातूरच्या दिशेने निघालो. त्यावेळी नागराज पेट्रोल पंपाजवळ एमएच 44 जी 0970 क्रमांकाच्या कारने आम्हाला कट मारला आणि पुढे जाऊन गाडी थांबवली. त्या गाडीतील 5 जण दारु प्यायलेल्या स्थितीत होते.
मी त्यांच्याजवळ गेलो आणि गाडी सावकाश चालवा, आमच्यासोबत लहान मुलं आहेत असं सांगू लागतो. त्यावेळी त्यांनी मला शिविगाळ केली आणि निघून जाण्यास सांगितलं. एवढंच नाही तर त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळही केली, असं सादिक म्हणाले.

सादीक यांचे वकील अल्ताफ काझी यांच्या मते, सादीकच्या पत्नी ईकरा यांनी बुरखा परिधान केला होता. त्यावरून गाडीत बसलेल्यांनी मोटारसायकलवरील कुटुंब मुस्लीम असल्याचं ओळखलं होतं.
सादीक यांचे भाऊ अली शेख म्हणाले की, शिवीगाळ केल्यानंतर कारने 5 किलोमीटरपर्यंत दुचाकीचा पाठलाग केला. त्यानंतर बुधोडा गावच्या पुढे हसडा पाटीजवळ कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या धडकेत सादीक शेख यांची पत्नी ईकरा आणि 3 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर सादीक आणि 6 वर्षीय मुलगा अहद गंभीर जखमी झाले.
गाडीत बसलेल्या एका आरोपीला गावकऱ्यांनी पकडलं होतं. त्यानं गाडीचा वेग 100 ते 125 किमी असल्याचं सांगितलं होतं, असंही ते म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
व्हायरल व्हीडिओमध्ये कबुली
या घटनेनंतर आणखी एक व्हीडिओ व्हायरल झाला. त्यात आरोपी मनोज माने यानं म्हटलं की, मी, कारचालक दिगंबर पांडुळे, मनोज मुद्दामे, बसवराज धोत्रे, कृष्णा वाघे आम्ही कारने जात होतो.
कट मारल्याच्या कारणावरून दुचाकीस्वार सादीक शेख यांच्यासोबत बाचाबाची झाली. नंतर आम्ही थांबलो आणि दुचाकीस्वार पुढे गेला. दुचाकी पुढे गेल्यानंतर कार चालवणारा दिगंबर पांडुळे याने जाणूनबुजून मागून जोरदार धडक दिली, असंही त्यानं सांगितलं.
एवढंच नाही तर कार चालकानं मद्यपान केलं होतं, अशी कबुलीही त्यानं दिली.
घटनेच्या दोन दिवसांनंतर, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103(1) (हत्या) आणि 352 (शांतता भंग करण्याच्या हेतूने चिथावणी देण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान) नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी मनोज माने, बसवराज धोत्रे, मनोज मुद्दमे आणि कृष्णा वाघे या चार आरोपींना अटक केली.

पाचवा संशयित दिगंबर पाधुरे फरार आहे.
सादीकने सर्वांना सावधपणे गाडी चालवण्यास सांगितले तेव्हा त्यांनी त्याला शिविगाळ केली आणि निघून जाण्यास सांगितलं, असा आरोप एफआयआरमध्ये आहे.
या घटनेमागे धार्मिकतेचा मुद्दा असण्याचा संशय पीडितांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
"मुस्लिम असल्यानेच चिरडले"
सादीक शेख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी गंभीर आरोप केला आहे. आम्ही मुस्लिम असल्यानं घात केल्याचा त्यांचा आरोप आहे. एफआयआर दाखल करण्यात अडचणी आल्याचा आरोपही, सादीक यांचे भाऊ अली यांनी केला आहे.
या प्रकरणी 2 ऑक्टोबरच्या पहाटे एफआयआर दाखल करण्यात आली.
“दुसऱ्या दिवशी, आम्ही औसा पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा पोलिसांनी आम्हाला ते एफआयआर दाखल करतील असं आश्वासन दिलं. आम्ही कुटुंबातील सदस्यांचे अंतिम संस्कार करावे असं सांगितलं.
नंतर संध्याकाळी आम्ही वकिलांमार्फत पोलिसांशी संपर्क साधला, पण ते एका राजकीय कार्यक्रमासाठी सुरक्षेत व्यस्त होते. आम्हाला दुसऱ्या दिवशी परत येण्यास सांगितले, असं अली म्हणाले.
शेवटी पोलीस माझ्या भावाचे स्टेटमेंट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले. तेव्हा त्यांनी आम्हाला कलम 106 अंतर्गत एफआयआर दाखल करतील, असं कळवलं.

पोलीस अधीक्षकांनी या कलमाखाली कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर आम्ही हे धार्मिक द्वेषातून घडलेलं प्रकरण असल्याचा युक्तिवाद केला. पण पोलीस ऐकत नव्हते, असा दावाही अली शेख यांनी केला.
“मी कलम 103(1) च्या तक्रारीसाठी युक्तिवाद केला, तेव्हा ते कलम 106 कडं वळले. पोलिसांना हत्येचा गुन्हा दाखल न करण्यासाठी काही दबाव होता का किंवा असं न करण्यासाठी काही देवाणघेवाण झाली असावी, असा आरोप कुटुंबाचे वकील अल्ताफ काझी यांनी केला.
दरम्यान, "आमचा या प्रकरणात उशिरा गुन्हा दाखल करण्याचा कसलाही हेतू नव्हता. सुरुवातीला अपघात झाल्याचं दिसून आलं. नंतर पीडितेचे म्हणणे आणि कुटुंबीयांनी दिलेला तपशील लक्षात घेऊन आम्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही 4 जणांना अटक केली असून पाचव्याचा शोध घेत आहोत", अशी प्रतिक्रिया औसाचे पोलीस निरीक्षक सुनील रजतवाड यांनी दिली.
तसंच धार्मिक शिविगाळ, कारने चिरडले, या दाव्यावर पोलिसांना विचारले असता, त्यांनी सादीक शेख यांच्या जबाबानुसार गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं. त्या जबाबात याचा उल्लेख नाही, तसं शेख यांनी सांगितल्यास त्या अँगलनेही तपास करू, असं ते म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











