‘रिक्लेम द नाईट’ म्हणत कोलकत्यात मध्यरात्री मुली रस्त्यावर, सोबत त्यांचे आई-वडीलही; काय होतं त्यांचं म्हणणं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रभाकर मणि तिवारी
- Role, कोलकाताहून बीबीसी हिंदीसाठी
14 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता कोलकात्याच्या अकॅडमी ऑफ फाइन आर्ट समोरील रस्त्यांवर खुर्च्या टाकून लोकांनी गर्दी केली होती.
कार्यक्रमाची वेळ रात्री 11.30 वाजताची होती. मात्र, महिला आणि तरुणी 10 वाजतापासूनच घटनास्थळी दाखल होण्यास सुरूवात झाली होती.
अनेकींच्या हातात पोस्टर आणि बॅनर्स दिसून येत होते. कार्यक्रमाच्या ठिकाणीही बॅनर आणि फ्लेक्स लावण्यात आलेले होते.
'रिक्लेम द नाईट'
रस्त्याच्या एका बाजूला एक मंडप घालण्यात आलेला. त्यात काही महिला आणि तरुणी बसल्या होत्या...
चारही बाजूंनी पोस्टर आणि बॅनर्स लावण्यात आले होते. रस्त्यावर प्रचंड गर्दी जमली होती. यामुळे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
'रिक्लेम द नाईट' म्हणजे 'रात्रीवर ताबा घ्या' असे कार्यक्रमाचं शीर्षक होतं.

फोटो स्रोत, PRABHAKAR MANI TEWARI/BBC
कोलकाता येथील शासकीय आर जी कर रुग्णालयात गेल्या शुक्रवारी (9 ऑगस्ट) एका शिकाऊ डॉक्टरची लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली होती.
या विरोधात आंदोलन करत बुधवारी (14 ऑगस्ट) मध्यरात्री महिला शहरातील रस्त्यांवर उतरल्या. त्यांनी संपूर्ण रस्ता ताब्यात घेतला आहे.
सुरुवातीला या कार्यक्रमाचे आयोजन जगदलपूर येथे करण्याचे नियोजन होते. मात्र, आंदोलकांचा सहभाग बघता या कार्यक्रमाचे आयोजन शहरात तीन ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अखेर समाजमाध्यांद्वारे या अभियानाची एवढी चर्चा झाली की, या कार्यक्रामाचे शहरात 300 ठिकाणी आयोजन करण्यात आले.
मध्यरात्री महिलांनी मेणबत्त्या पेटवत निषेध रॅली काढली, तर काही ठिकाणी धरणे आंदोलन करत घोषणा देण्यात आल्या.


लांबच लांब वाहतूक कोंडी
या अभियानाची व्याप्ती लक्षात घेता कोलकाता पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त तैनात केला होता.
पोलीस बंदोबस्त हा अभियान रोखण्यासाठी नसून महिलांना सुरक्षा पुरवण्यासाठी असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
दुरून येणाऱ्या महिलांना येण्याजाण्यासाठी अडचण होऊ नये यासाठी शहरातील रस्त्यांवरून रात्रभर पोलिसांकडून गस्त घालण्यात आली.

फोटो स्रोत, PRABHAKAR MANI TEWARI/BBC
जादवपूर येथील आयोजित कार्यक्रमात एवढी गर्दी आहे, की लोकांना घटनास्थळी येण्यासाठी अनेक किलोमीटरून पायी चालत यावे लागत आहे.
आता या आलेल्या गर्दीला घरी परततानाही मोठी अडचण होणार आहे. कोलकात्याच्या रस्त्यांवर उतरलेली ही गर्दी 8 बी बसस्थानकाकडे प्रस्थान करत असल्याचे दिसत होते.
उत्साह कमी झालाच नाही
मध्यरात्री 12 वाजता पावसाला सुरूवात झाली. तरीही महिलांचा उत्साह कमी झाला नाही. लोक भिजत होते तरीही घोषणा देणं सुरूच होतं.
या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शेकडो लोक कुटुंबासह सहभागी झाले होते.
काही महिलांच्या कडेवर लहान बाळं होती. यावरून या घटनेचा समाजमनावर किती तीव्र परिणाम झाला आहे, हे दिसून येते.
गेल्या काही वर्षांत कोलकात्याच्या रस्त्यांवर महिलांची एवढी गर्दी कधीच पहायला मिळाली नाही.
या अभियानाच्या मुख्य संयोजक आणि प्रेसिडेन्सी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी रिमझिम सिन्हा सांगतात,"या अभियानात सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनाला एवढा प्रतिसाद मिळेल याचा स्वप्नातही विचार मी केला नव्हता."

फोटो स्रोत, GETTY IMAGES
त्यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे कोलकात्यासह संपूर्ण बंगालमध्ये या अभियानाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
येथे जेवढे पोस्टर्स आणि बॅनर्स लागलेले आहेत, ते आयोजकांनी बनवलेले नसून कोलकात्यातील विविध भागातून आलेल्या तरुणींनी स्वत:च्या हाताने ते बनवून आणले होते.
आंदोलनात जेवढे पोस्टर्स वापरण्यात आले तेवढ्याच घोषणाही अविरत सुरू होत्या. काही बॅनर्सवर आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे, तर काही पोस्टर्समधून महिलांना चांगली सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
गर्दी एक इंचही हटण्यास तयार नव्हती
रात्रीचे सव्वाबारा वाजलेले होते. मात्र, गर्दी अजिबात हटण्यास तयार नव्हती.
मधूनच मंचावरून 'हमें चाहिये आजादी' अशी घोषणा दिली जाते आणि संपूर्ण गर्दी त्यापाठोपाठ घोषणा देते.
हातात पोस्टर घेऊन आलेली महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुप्रिया घोष सांगते, "मी दक्षिण कोलकात्याच्या गडिया भागातून आले आहे. गर्दीमुळे मला माझी स्कुटी दोन ते तीन किलोमीटर मागेच एका ओळखीच्यांकडे ठेवून यावे लागले. तिथून मी पायी चालत आले आहे. माझ्यासोबत माझ्या चार मैत्रिणीसुद्धा आहेत."
तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी एवढ्या रात्री बाहेर पडण्याची परवानगी कशी दिली, असे विचारले असता त्या म्हणाल्या, "आर. जी. कर येथील घटनेनंतर प्रत्येक आईवडील मुलींच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. त्यामुळे माझी आईदेखील आमच्यासोबत आली आहे."

फोटो स्रोत, GETTY IMAGES
जादवपूर विद्यापिठाची एमएची विद्यार्थिनी प्रीती गांगुलीसुद्धा आपल्या मैत्रिणींसोबत 'रिक्लेम द नाईट' या अभियानात सहभागी होण्यासाठी आलेली आहेत. त्यांच्या वसतीगृहातील सर्व विद्यार्थीनीही येथे आलेल्या आहेत.
प्रीती सांगते, "आर. जी. करसारखी घटना कधीही आणि कुठेही घडू शकते. ज्याप्रकारे या घटनेला आधी आत्महत्या म्हणून दर्शविण्यात आलं आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलं ते अक्षम्य होतं. आमचा लढा त्या मानसिकेतविरोधात आहे, जे पीडितेला तिचे कपडे आणि रात्री बाहेर पडण्यावरून दोषी ठरवतात. जोपर्यंत गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत या परिस्थितीत बदल होणार नाहीत."
सर्वांचे चेहरे उदास
या अभियानात सहभागी झालेल्या गर्दीच्या चेहऱ्यावर एक तीव्र नाराजी स्पष्ट दिसून येत होती.
सुरुवातीला प्रचंड उकाडा, नंतर पाऊस आणि पुन्हा उकाडा अशा अवस्थेतही लोक जागेवरून हलले नाहीत. आंदोलनास समर्थन देण्याची उर्मी त्यांच्यात दिसून येत होती.
कोलकात्याच्या रस्त्यांवर महिलांची अशी गर्दी फक्त एखाद्या उत्सवाच्या दिवसांतच आढळून येते. आज तसे कोणतेही निमित्त नसताना एखाद्या मोठ्या उत्सवाप्रमाणे गर्दीचा आभास होत आहे.
महिलांनी रात्री रस्त्यांवर अक्षरश: ताबा घेतला होता. "रात हमारी है और सडके भी हमारी है" अशा आशयाच्या घोषणा देण्यात येत होत्या.
रात्री 12.40 वाजता ही गर्दी जादवपूर पोलीस ठाण्याकडे सरकत गेली.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
ही गर्दी पोलीस ठाण्याकडे जाईल अशा सूचना आयोजकांतर्फे माईकवरून दिल्या जात होत्या.
पोलीस ठाण्याजवळील या गर्दीमुळे दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तासभर लागत होता.
रस्त्यांवरून चालताना गर्दीने दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पोलीस ठाण्याजवळ पोहोचल्यानंतर हे अभियान समाप्त झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर लोकांनी आपापल्या घराचा मार्ग धरला.
परतणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी या गर्दीबाबतच चर्चा होती.
'क्लेम द नाईट' हे अभियान नेमकं काय आहे ?
सुसान अलेक्झांडर स्पीथ नावाच्या एका महिला मायक्रोबायोलॉजिस्टची रात्रीच्या वेळी घरी परतताना चाकून भोकसून हत्या करण्यात आली होती.
या विरोधात 'टेक बॅक द नाईट' या नावाने मोहीम राबविण्यात आली होती.
त्यानंतर दोन वर्षांनी महिलांविरोधातील हिंसेच्या विरोधात जर्मनीत अशा प्रकारची मोहीम राबवली गेली.
12 नोव्हेंबर 1977 रोजी इंग्लंडमध्ये लीड्स येथे 'रिक्लेम द नाईट' अभियानांतर्गत अडीचशे महिला मध्यरात्री रस्त्यांवर उतरल्या होत्या.
त्यानंतरच्या वर्षी ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी आणि पर्थमध्ये महिलांनी रात्रीच्या वेळी रॅली काढली होती.
अमेरिका आणि जर्मनीसह अनेक देशात वेळोवेळी या अभियानाबाबत जनजागृतीसाठीसाठी आवाहन करण्यात आले आहे.
निर्भया गॅंगरेपच्या निषेधार्थ कोलकात्यात अशाच प्रकारच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बुधवारी रात्री झालेली गर्दी अभूतपूर्व होती.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
"बांगलादेशमधील शेख हसीना यांचे सरकार ज्या प्रकारे पाडण्यात आले त्या धर्तीवर काही लोक आमचे सरकार पाडण्यासाठी या आंदोलनाला जोर देत आहेत."
ममता बॅनर्जी यांच्या मते, आंदोलनात सर्वच विद्यार्थी नाहीत. सीपीएम आणि भाजपचे नेते या माध्यमातून आंदोलनाच्या आडून राजकारण करत आहेत.
सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये या आंदोलनावरून दोन गट पडले आहेत. काही नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे, तर काही नेत्यांच्या मते हे आंदोलन निरर्थक आहे.
कोलकात्यात एकीकडे हे आंदोलन सुरू होते, तर दुसरीकडे शहरातील आर.जी कर वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्कारच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या विरोध प्रदर्शनादरम्यान 14-15 ऑगस्टच्या रात्री हिंसेची घटना घडली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन











