Solar Eclipse 2021 : सूर्यग्रहण का होतं? खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?

सूर्यग्रहण

फोटो स्रोत, Getty Images

गुरुवार 10 जून रोजी 2021 वर्षातील पहिलं सूर्यग्रहण झालं.

भारतीय प्रमाणवेळेनुसार, हे सूर्यग्रहण दुपारी 1 वाजून 42 मिनिटांनी सुरू झालं. तर संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी ते सुटलं. भारतात बहुतांश ठिकाणी गुरुवारचं सूर्यग्रहण दिसलं नाही.

नासानं प्रसिद्ध केलेल्या इंटरअॅक्टिव्ह मॅपनुसार, भारतात हे ग्रहण फक्त लडाख आणि उरुणाचल प्रदेशातील काही भागात अंशतः पाहायला मिळालं. काही ठिकाणी हे फक्त सूर्यास्ताच्या वेळी फक्त काही मिनिटेच दिसलं.

आजचं सूर्यग्रहण उत्तर-पूर्व अमेरिका, युरोप, उत्तर आशिया आणि उत्तर अटलांटीक महासागरात पाहायला मिळालं. जगभरातील नागरिकांना हे ग्रहण पाहता यावं, यासाठी नासाने त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंगही केलं.

आगीचं रिंगण

यादरम्यान सूर्याभोवती एक कडं पाहायला मिळालं. जगभरातील कोट्यवधी नागरिकांनी रिंग ऑफ फायरचं हे दृश्य आपल्या डोळ्यांत सामावून घेतलं.

कॅनडा, ग्रीनलँड आणि उत्तर रशियातील काही भागात याचा आनंद नागरिकांना घेता आला.

यंदाच्या वर्षी दोन सूर्यग्रहण होणार आहेत. पुढील सूर्यग्रहण 4 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. पण तेसुद्धा भारतातून दिसणार नाही.

यापूर्वी 26 मे रोजी सुपर ब्लड मून चंद्रग्रहण लागलं होतं. पण तेसुद्धा भारतातून पाहता आलं नव्हतं.

कंकणाकृती ग्रहण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रिंग ऑफ फायर

सूर्यग्रहण का होतं?

अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं.

सूर्यग्रहण स्थिती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतातत, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो.

ही ग्रहणं तीन प्रकारची असतात आणि शाळेत याविषयी आपण शिकलो आहोत. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती.

ग्रहणाच्या स्थितीत सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे? ते नेमके सरळ रेषेत आहेत का? आणि तुम्ही पृथ्वीवर नेमके कुठे आहात? या तीन गोष्टींवर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो.

खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?

पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला 'खग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात. सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो, त्याला 'खंडग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात.

एरवी चंद्र सूर्यापेक्षा, अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकारानं एकसारखे दिसतात. आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं.

सूर्यग्रहण

फोटो स्रोत, Getty Images

पण पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूजवळ असतो, अशा वेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो.

याचदरम्यान जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद्या कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात.

सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी 'Ring of Fire', अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावं दिली आहेत.

कंकणाकृती ग्रहणात चंद्राच्या थेट छायेखाली असलेल्या प्रदेशातच 'ring of fire' दिसून येते. तर त्याच्या आसपासच्या प्रदेशात खंडग्रास ग्रहण पाहायला मिळतं.

15 जानेवारी 2010 रोजी कन्याकुमारीतून दिसलेलं कंकणाकृती ग्रहण

फोटो स्रोत, BBC/Janhavee Moole

फोटो कॅप्शन, 15 जानेवारी 2010 रोजी कन्याकुमारीतून दिसलेलं कंकणाकृती ग्रहण

भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा पुढचा योग 21 मे 2031 रोजी येणार आहे.

ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी?

ग्रहण पाहताना कधीही सूर्याकडे थेट पाहू नका. कारण सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.

ग्रहण पाहण्यासाठीचे खास फिल्टर लावलेले चष्मे घालूनच ग्रहण पाहावे. पिनहोल कॅमेरा, घरातली चाळणी किंवा सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडून ग्रहणाची स्थिती पाहता येते.

- चाळणीचा वापर करून दिसणारे ग्रहण

फोटो स्रोत, DK Soman

फोटो कॅप्शन, चाळणीचा वापर करून दिसणारे ग्रहण

पिनहोल कॅमेरा कसा तयार करायचा, त्याची माहिती इथे पाहू शकता.

तुमच्या शहरात किंवा शाळेत एखादं विज्ञानकेंद्र असेल किंवा विज्ञानप्रेमींची संस्था असेल, तर तिथे अनेकदा ग्रहण पाहण्यासाठी विशेष सोय केलेली असेल. त्याविषयीची माहितीही तुम्ही घेऊ शकता.

ग्रहणाविषयीचे समज-गैरसमज

जगभरात असे अनेक जण आहेत ज्यांच्या मनात ग्रहणाविषयी अनेक समज-गैरसमज असतात. काहींना वाटतं ग्रहण हे जगबुडीचं प्रतीक आहे. त्याबाबातचा एक इशारा आहे.

ग्रहणाविषयी सामान्यांना जितकी उत्सुकता वाटत आली आहे, तितकीच भीतीही वाटत आली आहे.

खरं तर माणसाला ग्रहणाच्या उगमाविषयी काहीएक माहिती नव्हती, तेव्हा त्याने याविषयीच्या कथा रचायला सुरुवात केली.

17 व्या शतकातले यूनानी कवी आर्कीलकस यांनी म्हटलं की, भर दुपारी अंधार झाला आहे आणि आता या अनुभवानंतर त्यांना कोणत्याच गोष्टीचं आश्चर्य वाटणार नाही.

विशेष म्हणजे आज आपल्याला ग्रहणाबाबतचे वैज्ञानिक कारणं माहिती असूनही त्यासंदर्भातल्या कथा आणि अंधश्रद्धा आजही कायम आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)