PM Kisan : पीएम किसान योजनेत दोन बदल, जाणून घ्या...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणारा दोन हजार रुपयांचा अकरावा हप्ता 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी मध्यप्रदेशात 'मुख्यमंत्री किसान कल्याण योजना' या कार्यक्रमाला संबोधित करताना ही घोषणा केली आहे.
यावेळी ते म्हणाले, "केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत आतापर्यंत साडे अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 82 हजार कोटी रुपये रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा पुढचा हप्ता 31 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिला जाणार आहे."
दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
यातला पहिला बदल म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 31 मे पर्यंत ई-केवायसीची करण्याची मुदत सरकारनं दिली आहे.
तर दुसरा बदल म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार कार्डाशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. अन्यथा इथून पुढचे हप्ते संबंधित शेतकऱ्याला मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
आता या दोन्ही बदलांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
eKYC कशी करायची?
eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.
आता पीएम किसान योजनेसाठी eKYC करायची असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला pmkisan.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
ही वेबसाईट उघडल्यावर सगळ्यात वरती तुम्हाला लाल अक्षरात एक सूचना दिसेल.
"eKYC is MANDATORY for PMKISAN Registered Farmers. OTP Based eKYC is available on PMKISAN Portal. You may also contact nearest CSC centres for Biometric authentication based eKYC. Deadline of eKYC for all the PMKISAN beneficiaries has been extended till 31st May 2022."
- अशी ही सूचना आहे.

फोटो स्रोत, Pmkisan
याचा अर्थ पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. ओटीपी बेस्ड ई-केवायसीची सुविधा पीएम किसानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. eKYC करण्यासाठीची मुदत 31 मे 2022 पर्यंत आहे.
eKYC करण्यासाठी इथं 2 पर्याय सांगितलेत.
एक म्हणजे जर तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी लिंक असेल तर तुम्ही Aadhar based OTP authentication वापरून eKYC करू शकता. त्यासाठी फार्मर कॉर्नरमधील eKYC या पर्यायावर क्लिक करा. पण, जर तुम्हाला Biometric authentication करायचं असेल, तर जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्यावी लागेल.
आता यातला पहिला पर्याय म्हणजे आधार कार्ड वापरून eKYC कसं करायचं ते पाहूया.
यासाठी तुम्हाला Farmers Corner मधील eKYC या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर Aadhar Ekyc नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
इथं सुरुवातीला तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा क्रमांक आणि पुढच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.
हे टाकून झालं की समोरच्या Search या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर एक नवीन पेज तुम्हाला दिसेल. इथं सुरुवातीला तुमचा आधार नंबर दिसेल. त्यापुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे.
मोबाईल नंबर टाकला की पुढच्या Get OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड पाठवला जाईल. म्हणजेच काही आकडे पाठवले जातील. ते तुम्हाला इथल्या OTP या रकान्यात टाकायचे आहेत.
मग पुढे असलेल्या Submit for Auth या रकान्यात क्लिक करायचं आहे.
त्यानंतर EKYC is Sucessfully Submitted असा मेसेज तिथं येईल. याचा अर्थ तुमची EKYC ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आधार कार्ड बँक खात्याशी जोडून घ्या
पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत आतापर्यंत एकूण 10 हप्ते शेतकऱ्यांचे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
पण एप्रिल 2022 ते जुलै 2022 या कालावधीतील 2 हजारांचा हप्ता आणि यापुढील प्रत्येक हप्ता हा लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
त्यामुळे जर तुमचं बँक खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला पुढच्या हप्त्याची रक्कम मिळवण्यास अडचण येऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्राचे कृषी गणना उपायुक्त विनयकुमार आवटे यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील 1 कोटी 6 लाख 53 हजार 329 पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण झालं आहे.
यापैकी 88 लाख 74 हजार 872 लाभार्थ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहेत. तर 17 लाख 78 हजार 283 लाभार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाहीये.
त्यामुळे मग या योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते तपासून पाहावं. बँक खात्याशी आधार लिंक नसल्यास ते त्वरित करून घ्यावं, असं आवाहन विनयकुमार आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केलं आहे.
पीएम किसान योजना काय आहे?
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.
आतापर्यंत एकूण 10 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








