नाना पटोलेंची टीका, 'मोदीजी तुम्ही जे पेरलं तेच उगवलं' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. मोदीजी, तुम्ही जे पेरलं तेच उगवलं, पंजाबमधील घटनेवरून नाना पटोले यांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याची घटना घडली. या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
वास्तविक पाहता गेला वर्षभर शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले. त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधील शेतकरी व देशातील जनता हा अत्याचार विसरलेली नाही. मोदीजी, तुम्ही जे पेरले, तेच आज उगवले अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पंतप्रधानांना SPG सुरक्षा असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत तडजोड करण्याचा प्रश्नच उद्धवत नाही. पंतप्रधानांनी नियोजित कार्यक्रमात बदल करून रस्ते मार्गे जाण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबमध्ये आधीपासूनच शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत, असं पटोले म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.
दरम्यान, नाना पटोले यांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. नौटंकी करणं हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावं, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
2. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यासंदर्भात एक पत्रक काढलं आहे. त्यानुसार, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, आरोग्य कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
3. BulliBai App प्रकरण : अटकेतील तरुणीला माफ करण्याची जावेद अख्तर यांची मागणी
BulliBai App प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 18 वर्षीय तरूणीला माफ करावं, अशी मागणी लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी श्वेता सिंह नामक 18 वर्षीय तरूणीला अटक केली असून तिच्याबाबत विविध माहिती समोर येत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
जावेद अख्तर यांनी यासंदर्भात ट्वीट करत म्हटलं, "Bulli Bai अॅपची मास्टरमाईंड खरंच ही मुलगी असेल जिने नुकतेच कोरोनामुळे आपले पालक गमावले आहेत. मला वाटतं तिची आपण एका मोठ्या व्यक्तीप्रमाणे भेट घ्यायला हवी. तिने असं का केलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. तिच्यावर दया दाखवून तिला माफ करायला हवं," ही बातमी टाईम्सनाऊ न्यूजने दिली.
4. अण्णाभाऊंचं नाव महामानवांच्या यादीत न टाकणे हा केंद्राचा पूर्वाग्रहदूषितपणा - नितीन राऊत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्थापन केलेल्या फाउंडेशनला अण्णाभाऊ साठे यांचे नाव माहिती नसावे यावरून या फाउंडेशनच्या कार्यक्षमतेचे वास्तव आणि केंद्र सरकारचा वैचारिक पूर्वग्रहदूषितपणा स्पष्ट होतो,अशी टीका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे सरकार सध्या केंद्रात सत्तेत असल्याने त्यांना अण्णाभाऊ साठेंच्या नावाची एलर्जी असावी, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यातील पुरोगामी व प्रबोधन परंपरेतील सर्व संत, समाजसुधारक आणि फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील सर्व महामानवांची माहिती लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला कळविले जाईल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
5. कर्नाटकात हिजाबच्या विरोधात भगवा शेला आंदोलन
कर्नाटकातील एका सरकारी महाविद्यालयात नवा वाद समोर आला आहे. याठिकाणी हिजाब परिधान करून येणाऱ्या विद्यार्थिनींना विरोध करण्यासाठी इतर विद्यार्थी भगवा स्कार्फ/शेला परिधान करून येत आहेत.
सुरुवातीला येथील प्रशासनाने हिजाब घालण्यास परवानगी दिली नव्हती. पण तरीही काही विद्यार्थिनी हिजाब घालून येऊ लागल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून काही विद्यार्थी भगवा स्कार्फ/शेला घालून येऊ लागले.
दरम्यान, या महाविद्यालयाने या प्रकरणी येत्या 10 जानेवारी रोजी पालक-शिक्षक संघाची बैठक आयोजित केली आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या इच्छेनुसार कोणताही पोशाख घालावा, असं महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केलं. ही बातमी एनडीटीव्ही इंडियाने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








