महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Uddhav Thackeray/facebook

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे
    • Author, दिपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत पूर्ण लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात आज (11 एप्रिल) महत्त्वाची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात ही बैठक झाली असून चर्चेनंतर लॉकडॉऊनसंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

कोव्हिड टास्क फोर्स ही तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती आहे. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ही समिती स्थापन करण्यात आली होती.

शनिवारी (10 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत एक आठवडा ते पंधरा दिवस लॉकडॉऊन लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

"कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे," अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या बैठकीनंतर मांडली.

पुण्यात रेमडेसिव्हिसाठी लागलेली रांग

फोटो स्रोत, Getty Images / Hindustan Times

फोटो कॅप्शन, पुण्यात रेमडेसिवीरसाठी लागलेली रांग

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 एप्रिल रोजी दिलेल्या माहितीनुसार,

  • 1 मार्च 2021 पर्यंत राज्यात दर दिवशी 75 हजार चाचण्या होत होत्या. हीच संख्या गेल्या 3 दिवसांत 2 लाख पेक्षा जास्त चाचण्या एवढी झाली आहे.
  • दररोज 1.25 लाख आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत. 7 एप्रिल रोजी 2 लाख 35 हजार 749 एवढ्या चाचण्या राज्यात झाल्या यात 1 लाख 33 हजार 344 आरटीपीसीआर आणि 1 लाख 2 हजार 405 एन्टीजेनचा समावेश आहे.
  • राज्यातील कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन बेड्स सध्याच्या घडीला 80.51 टक्के एवढे भरले आहेत. संशयित रुग्णांसाठी 17.17 टक्के एवढ्या बेड्स भरल्या आहेत. ऑक्सिजन बेड्स 32.77 टक्के, आयसीयू बेड्स 60.95 टक्के भरल्या असून आताच्या घडीला 33.97 टक्के एवढे व्हेंटीलेटर्स लावले आहेत.
  • राज्यातील कोरोना रुग्णांमधील मृत्यूदर जानेवारी महिन्यात 1.69 टक्के, फेब्रुवारीमध्ये 0.82 टक्के, मार्च महिन्यात 0.37 टक्के इतका होता.
  • 1 एप्रिल ते 7 एप्रिल या कालावधीत 3 लाख 60 हजार 281 रुग्ण असताना मृत्यू दर 0.55 टक्के आहे.
  • सध्या राज्यात 5 लाख 1 हजार 559 सक्रिय रुग्ण आहेत. 60 टक्के रुग्ण गृह विलगीकरण तर 40 टक्के संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
  • 4.32 टक्के सक्रीय रुग्ण ऑक्सिजनवर आहेत तर 1 टक्के पेक्षा कमी रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.

अशा सर्व माहितीच्या आधारावर कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी किती दिवसांचा लॉकडॉऊन लागू करणे आवश्यक आहे? याबाबत या बैठकीत चर्चा होईल.

सरकार समोर आव्हान?

कोरोनाची रुग्णसंख्या राज्यात उच्चांक गाठत असताना संपूर्ण लॉकडॉऊन लागू केल्याशिवाय संसर्गाची साखळी तुटणार नाही याबाबत सर्वपक्षीय बैठकीत एकमत दिसून आले.

कामगार

फोटो स्रोत, Getty Images

असं असलं तरी उद्धव ठाकरे सरकारला व्यापारी वर्ग, कामगार वर्ग आणि नोकरदारांच्या तीव्र नाराजीला सामोरं जावं लागू शकतं.

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनने (FRTWA) व्यापाऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा करण्याची मागणी केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष वीरेन शाह सांगतात, "सरकार संपूर्ण लॉकडॉऊन जाहीर करणार असेल तर त्यांनी आजच्या बैठकीत व्यापाऱ्यांसाठी काय पॅकेज (आर्थिक मदत) देणार हे सुद्धा स्पष्ट करणं गरेजेचे आहे. आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि कर सवलत याबाबतही धोरण हवे."

शिवाय, ऑनलाईन विक्रीसाठी परवानगी देण्यालाही व्यापारी संघटनेचा विरोध आहे.

"आमचा कोट्यवधी रुपयांचा माल दुकानांमध्ये पडून आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेत नसतानाही ऑनलाईन व्यापाऱ्यांना विक्रीची परवानगी दिल्यास आम्ही विरोध करू," असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.

अर्थसंकल्प 2019

फोटो स्रोत, Getty Images

5 एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये कामगारांसाठी सरकारने काही नियम जाहीर केले. त्यानुसार, बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोव्हिडची लागण झाल्यामुळे त्याला काढून टाकता येणार नाही. संबंधित कर्मचाऱ्याला आजारपणाची रजा द्यावी लागेल. तसंच त्यादरम्यान त्याला पूर्ण पगार देणं बंधनकारक आहे. कामगारांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी ठेकेदाराकडे असेल.

गेल्या वर्षभरात नोकरदार वर्गालाही पगार कपातीसह नोकरी गमावण्यापर्यंत संकटांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता पुन्हा संपूर्ण लॉकडॉऊन लागू करत असताना सरकारला नोकरदार वर्गाचाही विचार करावा लागणार आहे.

त्यामुळे एकाबाजूला गेल्या वर्षभरापासून तोटा सहन करणारा व्यापारी वर्ग आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक कोंडीमुळे हैराण झालेला नोकरदार वर्ग अशा दोन्ही वर्गांची नाराजी दूर करण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.

रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेणार?

मुंबईत पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेची 95 टक्के सेवा सध्या सुरू असून विशिष्ट वेळेत सर्वसामान्य प्रवाशांनाही प्रवास करण्याची परवानगी आहे.

मुंबई, लोकल

फोटो स्रोत, Tim Graham

फोटो कॅप्शन, मुंबईत लोकल रेल्वे

पण लॉकडॉऊन लागू झाल्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेतून प्रवास करण्याची मूभा दिली जाऊ शकते.

पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सध्या निर्धारित वेळेत रेल्वे प्रवास सर्व प्रवाशांसाठी खुला आहे. यात बदल करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही."

तसंच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकातही सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मुंबई लोकलमध्ये गेल्या वर्षीप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांनाच परवानगी देण्याचा निर्णय होऊ शकतो. तसंच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसू नये म्हणून काही लांब पल्ल्याच्या गाड्या तातडीने बंद केल्या जाणार नाहीत. अंतिम निर्णय येईपर्यंत मात्र प्रतीक्षा करावी लागेल."

फेब्रुवारीत पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण 18 लाख एवढी होती. ती आता कमी होऊन 15-16 लाखांवर आली आहे.

किशोरी पेडणेकर

फोटो स्रोत, Twitter/Kishori Pednekar

तर मध्य आणि हार्बर रेल्वेने दर दिवशी जवळपास 40 लाख प्रवासी प्रवास करत असतात, पण कोरोना काळात 20 लाख प्रवासी प्रवास असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

मध्य रेल्वेत 90 टक्के (1600) तर पश्चिम रेल्वेच्या 95% रेल्वे गाड्या सुरू आहेत.

राज्यात काय सुरू? काय बंद?

राज्यात 5 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसंच शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडॉऊन लागू करण्यात आले आहे. त्यानुसार आताच्या घडीला राज्यात काय बंद आणि काय सुरू आहे ते पाहूया,

  • रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
  • राज्यात 144 कलम लागू.
  • सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.
  • रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.
  • यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.
  • बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील.
  • दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करत आहेत, असं निदर्शनास आल्यास स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करू शकतं.
  • शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहतील.
  • किराणा, औषधे, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.
  • सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील.
  • सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही.
  • बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.
  • खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील.
  • केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.
  • शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील.

काय बंद?

  • मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील.
  • चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
  • सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील.
  • मात्र, याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल.
  • उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील.पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही.
  • टेक-अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील
  • खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा
  • रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल.
  • ई-कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरूच राहील.
  • सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील.
  • शाळा-महाविद्यालये बंद
  • मात्र 10 वी आणि 12 वी परीक्षांचा त्यांना अपवाद असेल.
  • याशिवाय, सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेले पाहिजेत, याची काळजी घ्यावी.
  • चित्रपटांचं चित्रीकरण सुरू ठेवता येईल, पण जास्त गर्दी करता येणार नाही.
  • सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची RTPCR चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
  • 5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात येईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)