भीमा कोरेगाव : वरवरा राव यांच्या आरोग्याचा अहवाल सादर करा - मुंबई उच्च न्यायालय

फोटो स्रोत, FACEBOOK/BHASKER KOORAPATI
भीमा कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेले कवी वरवरा राव यांच्या आरोग्याची माहिती देणारा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं नानावटी रुग्णालयाला दिले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
दुसरीकडे या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं दिल्ली विद्यापिठातील सहयोगी प्रध्यापक हनी बाबू मसलीयारवेट्टील तारायील यांना अटक केली आहे. त्यांना उद्या मुंबईच्या NIAच्या विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
वरवरा राव यांना कोव्हिडची लागण
वरवरा राव यांनी कोव्हिडची लागण झाल्यानंतर जे. जे. रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. त्यांना नंतर नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
वरवरा यांना सर्व सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयात पाठवण्यात यावे, असं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला म्हटलं आहे.
"वरवरा राव यांना वैद्यकीय तपासणीसाठी सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या विविध तपासण्यात करण्यात आल्या. कोव्हिड-19 तपासणी केली असता चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं," असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं.
"सर जे.जे रुग्णालय कोव्हिड-19 रुग्णालय नाही. त्यामुळे राव यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात कोव्हिड-19 च्या उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. राव यांची तब्येत स्थिर आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणं नाहीत," असं ते पुढे म्हणाले.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

सोमवारी संध्याकाळी तब्येत खराब असल्याने वरवरा राव यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राव यांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
कुटुंबीयांचा आरोप
जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केल्यानंतर राव यांच्या कुटुंबीयांनी त्यांची भेट घेतली. वरवरा राव यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात राव यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नसल्याचा आरोप केलाय. ह्युमन राईट्स डिफेंडर्स अलर्ट (Human Rights Defenders's Alert) या संघटनेनेही कुटुंबीयांच्या आरोपावरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र लिहिलं आहे.
याबाबत बीबीसीशी बोलताना ह्युमन राईट्स डिफेंडर्स अलर्ट (Human Rights Defenders's Alert) संघटनेचे राष्ट्रीय सचिव हेन्री टिफांगे म्हणाले, "राव यांच्या तब्येतीबाबत आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र लिहिलं आहे. वरवरा राव यांना खासगी रुग्णालयात दाखल करावं अशी आमची मागणी आहे. मला आशा आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याबाबत लवकरच आदेश देईल."
कुटुंबीयांच्या आरोपावरून ह्युमन राईट्स डिफेंडर्स अलर्ट (Human Rights Defenders's Alert) संघटनेने 15 जुलैला एक निवेदन जारी केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
ह्युमन राईट्स डिफेंडर्स अलर्टची भूमिका
"राव यांची पत्नी आणि मुलींनी जे जे रुग्णालयात त्यांची भेट घेतली. राव यांची परिस्थिती पाहून त्यांना धक्का बसला. राव यांना ट्रान्झिट वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांच्याकडे कोणाचच लक्ष नव्हतं. रुग्णालय प्रशासनाने त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं. ज्या बेडवर राव यांना ठेवण्यात आलं होतं तो लघवी झाल्याने ओला झाला होता. राव यांना त्यांची पत्नी आणि मुलींना ओळखता आलं नाही. काही वेळानंतर त्यांनी कुटुंबीयांना ओळखलं."
"रुग्णालयातील नर्स आणि इतर कर्मचारी त्यांची काळजी घेत नव्हते. पोलीस कर्मचारी दूरवर उभे होते. रुग्णालयातील नर्सने कुटुंबाला सांगितलं की ट्रान्झिट वॉर्डमध्ये रुग्णांवर कोणतेही उपचार केले जात नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी जेव्हा लघवी झालेली बेडशीट बदलली. तर कुटुंबाला बाहेर काढण्यात आलं."
जे.जे रुग्णालयाचं स्पष्टीकरण
राव यांच्या कुटुंबीयांचे आरोप सर जे.जे रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावले आहेत. याबाबत बोलताना सर जे. जे समुह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर म्हणाले, "रुग्णालयात राव यांची रुग्णालयात योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली."

फोटो स्रोत, Getty Images
राव यांना जामिनाची मागणी
80 वर्षाचे वरवरा राव एल्गार परिषद प्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून तुरुंगात आहेत. राव यांचं वय आणि ढासळणारी तब्येत यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांची आहे. दोन महिन्यांपूर्वी बेशुद्ध झाल्याने वरवरा यांना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना पाईल्स आणि हृदयाशी संबंधित आजार आहे. अल्सर आणि रक्तदाबाच्या गोळ्या सुरू आहेत. राव यांना जमीन देण्यात यावा यासाठी कुटुंबीयांनी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
एन. वेणूगोपाल राव यांची फेसबुक पोस्ट
13 जुलैला राव यांचा भाचा एन. वेणूगोपाल राव यांनी वर वर राव यांना भेटल्यानंतर फेसबुकवर माहिती दिली होती.
फेसबुक पोस्टमध्ये एन. वेणूगोपाल राव म्हणतात, राव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, कुटुंबीयांना रुग्णालय प्रशासन, जेल अधिकारी किंवा सरकारकडून राव यांच्या तब्येतीबाबत कोणतीही माहिती पुरवण्यात येत नाही. राव यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहितीदेखील कुटुंबियांना देण्यात आली नव्हती. त्यांची तब्येत खूप खराब आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या माहितीनुसार, राव चालू शकत नाहीत. बाथरूमला जावू शकत नाहीत.
कोण आहेत वरवरा राव?
वरवरा हे रिवॉल्यूशनरी रायटर्स असोसिएशनशी संलग्न आहेत. वरवरा यांना हैदराबाद इथं अटक करण्यात आली आणि त्यांना पुण्याला आणण्यात आलं.
सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, नागरी हक्कांसाठी काम करणारे गौतम नवलखा, सामाजिक कार्यकर्ते अरुण फरेरा, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते व्हर्नोन गोन्सालव्हिस यांनाही अटक करण्यात आली. या सगळ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला असा त्यांच्यावर आरोप आहे. वरवरा यांनी त्यांना आर्थिक मदत पुरवली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस स्थानकात वरवरा यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या 153 (ए), 505 (1) (B), 117, 120 (B) आणि बेकायदेशीर घडामोडी रोखण्यासाठीची कलमं 13, 16, 17, 18(B), 20, 38, 39, 40 गुन्हे दाखल करण्यात आले.
भीमा कोरेगाव प्रकरणात हिंसा भडकवणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यापासून लक्ष दूर हटावं यासाठी पोलीस कपोकल्पित आरोप लावत आहेत, असं वरवरा यांनी तेव्हा बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
या पाचही कार्यकर्त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं.
न्यायालयाने गेल्या वर्षी आदेश देताना या सगळ्यांना घरीच नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला.
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या मुद्यावरून वरवरा यांना याआधीही अटक करण्यात आली होती. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांना फसवण्याचं हे षडयंत्र असल्याचं डाव्या विचारसरणीच्या लोकांनी म्हटलं होतं.
वरवरा यांच्या पत्नी हेमलता यांनी गेल्या वर्षी भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांना एक पत्र लिहून त्यांच्या सुटकेची मागणी केली होती.
वरवरा यांना पुण्यातल्या येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. अटक झाल्यानंतर वर्षभरानंतरही खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली नव्हती.
वरवरा राव यांच्या कुटुंबीयांचे आक्षेप
वरवरा यांच्या पत्नी हेमलता यांनी त्यावेळी बीबीसीला सुनावणीविषयी अधिक माहिती दिली होती.
सुनावणीत काहीही झालेलं नाही. जामीन मिळण्याच्या याचिकेवर सहा महिने सुनावणी सुरू आहे. जामीन मिळणार की नाही हे ठरवणाऱ्या न्यायाधीशांची बदली झाली. नवीन न्यायाधीश नव्याने सुनावणी करू इच्छित आहेत. उच्च न्यायायालयाकडून मदत मिळाली नसल्याचंही त्या म्हणाल्या होत्या.
ट्रायल कोर्टाने याचिका फेटाळली तर उच्च न्यायालयात दाद मागू शकता असं सांगण्यात आलं. जामीन मिळत नाही आणि सुनावणीही होत नाही अशी परिस्थिती असल्याचं त्या म्हणत होत्या.

पोलीस वरवरा यांच्या नावावर संबंध नसलेली प्रकरणं जोडत आहे. भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं. त्याला काहीही उत्तर मिळालं नाही. तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. आणीबाणीच्या वेळेस वरवरा आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव एकाच तुरुंगात होते. त्यांनाही पत्र लिहिलं. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं. मात्र पुढे काहीही झालं नाही, असं हेमलता सांगतात.
वाढत्या वयामुळे वरवरा यांची प्रकृती ढासळते आहे. त्यांना पाईल्सचा त्रास होतो आहे. त्यांना तुरुंगात कैद्यांना मिळणाऱ्या सुविधा मिळत नाहीत. वरवरा यांना बसण्यासाठी खुर्ची किंवा खाट देण्यात आलेली नाही.
पुण्यातील तुरुंगाच्या नियमांविषयी हेमलता यांनी नाराजी व्यक्त केली होती. वरवरा यांना भेटण्यासाठी मी त्यांची पत्नी असल्याचं प्रमाणपत्र हैदराबाद पोलिसांकडून घ्यावं लागतं. वरवरा यांचं आडनाव असणाऱ्या लोकांनाच त्यांना भेटण्याची परवानगी आहे. आमच्या मुलींनी लग्नानंतर आडनावं बदलली नाहीत. त्यामुळे त्यांना भेटायला देतात. मुलाच्या मुलाला भेटण्याची परवानगी आहे. मात्र आम्हाला मुलगा नाही आणि मुलींच्या मुलामुलींना भेटायची परवानगी नाही.
काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण?
मराठा सेना आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी `भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान' या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. युद्धात ईस्ट इंडिया कंपनीविरोधात महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक होते.
पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते.

या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या 'एल्गार परिषदे'तील वक्तव्यं कारणीभूत होती अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला.
या 'एल्गार परिषदे'मागे माओवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत, या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली.
28 ऑगस्टला पुणे पोलिसांनी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालविस यांना अटक केली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








