आदित्य ठाकरे वरळीतून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणार, स्वतः जाहीर केली उमेदवारी

फोटो स्रोत, Getty Images
आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी सांगतो, की निवडणूक लढवणार, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. आदित्य ठाकरे शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते.
आपल्या उमेदवारीची घोषणा करताना आदित्य यांनी म्हटलं, "जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी सगळे प्रश्न घेऊन महाराष्ट्रभर फिरत होतो. अनेक आंदोलनं केली, निवेदनं केली. मला पण कुठेतरी वाटायचं मी आमदार खासदारांच्या खांद्याला खांदा लावून मदत केली पाहिजे. आपण जे प्रेम दिलेलं आहे, जे आशीर्वाद आहेत त्याच्या आधारावर मी मोठी झेप घेत आहेत. मी पडलो तरी मला सावरायला तुम्ही आहात."
वरळीमधून निवडणूक लढविण्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब करताना आदित्य यांनी म्हटलं, "वरळी, महाराष्ट्र आणि आपल्या देशाला जागतिक पातळीवर न्यायचं आहे. वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करत राहणार. "
1966 साली शिवसेनेची स्थापना झाल्यापासून स्वतः बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा इतर कोणाही ठाकरे कुटुंबातील व्यक्तिने प्रत्यक्ष निवडणूक लढवली नव्हती. मात्र आता हा इतक्या वर्षांचा पायंडा मोडून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. पक्ष स्थापन होऊन सलग 50 वर्षे झाल्यानंतर थेट तिसऱ्या पिढीतील नेतृत्व निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे त्यांची विशेष चर्चा होत आहे.
...तर अमेरिकन भारतीय म्हणतील, 'हाऊडी अॅडी'?
"या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहात होता आणि या क्षणाचे साक्षीदार असलेले सर्व शिवसैनिक आज धन्य झालेले आहेत. आदित्य ठाकरे महाराष्ट्र आपला आभारी आहे, कारण या राज्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी तुम्ही घेतलीये," अशी भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचा छावा राजकारणात आलेला आहे. शिवाजीचा छावा राजकारणात आला तेव्हा राजकारण आणि धर्मकारण बदललं. आता आमचा छावा आला आहे. आजपासून राजकाऱण मातोश्रीच्या भोवती केंद्रित झाल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊत यांनी म्हटलं.
राऊत यांनी म्हटलं, "आजचा माहौल बघून मला असं वाटतंय, की भविष्यात ट्रंप आदित्यला निवडणुकीच्या प्रचारासाठी बोलावतील आणि अमेरिकेतील भारतीय म्हणतील, हाऊडी अॅडी?"
राजकारणातील मोर्चेबांधणी
'मला महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे,' असं म्हणत आपल्या जनआशीर्वाद यात्रेद्वारे जोरदार मोर्चेबांधणी याआधीच केली होती.
राज ठाकरे शिवसेनेत असताना यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी होती. त्यांनी मनसे हा नवा पक्ष काढल्यानंतर शिवसेनेने विद्यार्थी सेनेच्या जागी युवा सेना स्थापन केली.
2010 सालच्या दसरा मेळाव्यात बाळ ठाकरेंनी युवा सेनेची घोषणा केली आणि नातू आदित्य ठाकरेंकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवली. गेल्या काही वर्षांत आदित्य ठाकरेंनी मोजक्या विषयांवर मतं व्यक्त केली आहेत. त्यांनी निवडक मुद्द्यांवर 'आंदोलनं' केली आहेत. या विषयांच्या निवडींवरून आणि 'आंदोलनां'च्या स्वरूपांवरून त्यांच्याविषयी महत्त्वाची माहिती कळते.

फोटो स्रोत, @AUTHACKERAY
2010मध्ये रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच अ लाँग जर्नी' या पुस्तकाच्या प्रती जाळून त्यांनी पहिलं आंदोलन केलं. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हे पुस्तक काढून टाकण्यासाठी त्यांनी हे आंदोलन छेडलं होतं. या पुस्तकामुळे मराठी माणसाचा अपमान होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्यातही आलं.
आदित्य यांनी आतापर्यंत मुंबईतलं नाईट लाईफ जिवंत रहावं आणि रूफ टॉप हॉटेलना परवानगी मिळावी, यासाठीचा आग्रह धरला. मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन यावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मुंबईतल्या मरीन लाइन्स तसंच वडाळ्यात खुल्या जिमही सुरू केल्या.
वरळीच का?
आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेने वरळी मतदारसंघाची निवड केली आहे. वरळी मतदारसंघामध्ये 2014 साली शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले होते. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी वरळीचे प्रतिनिधित्व केले होते. आता सचिन अहिर स्वतःच शिवसेनेत सामिल झाले आहेत.
तसेच 1990, 1995, 1999, 2004 असे सलग चारवेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघात विजयी झाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सुरक्षित वाटत असावा आणि म्हणूनच आदित्य ठाकरे यांच्यासाठी या मतदारसंघाची निवड करण्यात आली असावी.

फोटो स्रोत, ADITYA THACKERAY / FACEBOOK
मुंबईतील वरिष्ठ पत्रकार आणि "बाळ ठाकरे अॅंड, द राईज ऑफ द शिवसेना" पुस्तकाचे लेखक वैभव पुरंदरे यांच्यामते, "आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेना साहजिकच सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी करणार यात शंका नाही. त्यामुळेच वरळीचा विचार केला गेला असावा."
पुरंदरे म्हणतात, "ठाकरे कुटुंबातील व्यक्ती आता थेट लोकांमधून निवडून जाण्याचा निर्णय घेत आहे हे स्वागतार्ह आहे कारण निवडणुकांपासून दूर राहून राजकारण करण्यापेक्षा असं उत्तरदायी असणं जास्त चांगलं आहे. मात्र त्याचवेळेस उमेदवाराचं ऑटोमॅटिक सिलेक्शन होणं हे घराणेशाहीचं लक्षण आहे. ऑटोमॅटिक सिलेक्शन हे कोणत्याही लोकशाहीसाठी चांगलं चिन्ह नाही. कारण त्यामुळे उमेदवारीचे निकष बाजूला ठेवले जातात."
निवडणुकीनंतर खरी परीक्षा
"आदित्य ठाकरे यांची खरी परीक्षा निवडणुकीनंतर असेल," असं मत पत्रकार आणि 'द कझिन्स ठाकरे' पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

फोटो स्रोत, TWITTER/AADITYA THACKERAY
ते म्हणाले, "शिवसेना आता किंगमेकरच्या ऐवजी किंग होण्यासाठी निवडणुकीच्या राजकारणात उतरत असावी. वरळी मतदारसंघामधील सचिन अहिर शिवसेनेत आल्यामुळे तेथे फारसा विरोध होणार नाही. या मतदारसंघात झोपडपट्टीत राहाणारे गरीब आणि उंच टॉवर्समध्ये राहाणारे श्रीमंत असे दोन्ही वर्ग आहेत. या मतदारसंघातून पं. भगीरथ झा हे उत्तर भारतीय उमेदवारही विजयी होऊन विधानसभेत गेले आहेत. म्हणजेच हा मतदारसंघ मिश्र स्वरुपाचा आहे. यापुढे आदित्य ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेचा मूळचा रफ अँड टफ मतदार वर्ग टिकवून ठेवणे तसेच नव्या मराठी उदयोन्मुख वर्गाच्या अपेक्षा पूर्ण करणे तसेच निवडून आल्यावर स्थानिक मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही आव्हाने असतील."
ठाकरे कुटुंबीय आणि मुख्यमंत्रिपद
ठाकरे कुटुंबातील व्यक्तींनी आजवर निवडणुकीच्या राजकारणात समावेश न करण्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि 'जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' पुस्तकाचे लेखक प्रकाश अकोलकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "मुख्यमंत्री होणार नाही असं शिवसेनाप्रमुखांनी 1995 पूर्वी म्हणजे शिवसेना-भाजपाची सत्ता येण्यापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे सत्ता आल्यावर मनोहर जोशी आणि नारायण राणे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र या सत्ता आल्यावर या पदांमध्ये किती ताकद असते शिवसेनेच्या नेत्यांना आणि उद्धव ठाकरे यांना समजले. 2004 साली त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न केलेही होते. मात्र युतीची सत्ताच आली नाही."
"युतीला सत्ता का मिळाली नाही असं शिवसेनाप्रमुखांना विचारल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी 'एक फूल और दो माली' असं उत्तर दिलं होतं. म्हणजेच त्यांनी या चर्चेचा रोख नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या दिशेने वळवला होता. 2004 साली शिवसेनेच्या जागा आणखी वाढल्या असत्या तर कदाचित उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेही असते. त्यामुळे निवडणुकीत न उतरण्याची भाषा सत्तेत येण्यापूर्वीची होती हे लक्षात घ्यायला हवं," अकोलकर यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








