रमजान की रमदान, तुम्ही काय म्हणता?

रमजान नमाज

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या मंगळवारपासून भारतात मुस्लीम लोकांनी रोजे ठेवायला सुरुवात केली आहे. मुस्लिमांच्या या पवित्र महिन्याला 'रमजान' म्हणायचं की 'रमदान' यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

भारतामध्ये गेली अनेक वर्षं रमजान असंच म्हटलं जात असे. पण गेल्या काही वर्षांत या महिन्याला आता रमदान असं म्हटलं जात आहे. हा फरक का आहे याचा शोध घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला.

इंडियन काउन्सिल फॉर वर्ल्ड अफेअर्समध्ये काम करणारे सीनियर रिसर्च फेलो डॉक्टर फज्जुर्रहमान यांचं म्हणणं आहे की, हा केवळ उच्चारांचा फरक आहे.

अरबी भाषेत 'ज्वाद' या अक्षराच्या स्वराचा ध्वनी (हिंदीत 'ज'च्या खाली जो नुक्ता असतो त्याला ज्वाद अक्षर म्हणतात) इंग्रजीच्या 'झेड' ऐवजी 'डीएच' असा होता. त्यामुळं अरबी भाषेत रमदान म्हणतात तर उर्दूमध्ये रमजान असं म्हणतात.

रमजान

भारत आणि सौदी अरेबियामध्ये वाढणाऱ्या सांस्कृतिक संबंधांचा हा परिणाम असल्याचं ते सांगतात. त्यांचं म्हणणं आहे की, 'भारतातून अनेक जण सौदी अरेबियात जातात तिथून परतल्यावर साहजिकच त्यांचं राहणीमान, वेशभूषा इत्यादी गोष्टींचं ते अनुकरन करतात.'

रहमान यांच्याप्रमाणेच इतर तज्ज्ञांचं देखील हेच मत आहे. अजमेर शरीफ येथे राहणारे गद्दीनशीन सैय्यद सरवर चिश्ती सांगतात, "हा केवळ उच्चाराचा फरक आहे."

त्यांचं म्हणणं आहे, "पूर्वी भारतात रमजान म्हटलं जात असे. पण गेल्या काही वर्षांपासून रमदान हा शब्द वापरला जात आहे."

"भारत आणि सौदी अरेबियाचे वाढते सांस्कृतिक संबंध आणि भारतीय मदरशांमध्ये सौदी अरेबियाच्या वाढत्या प्रभावामुळे रमदान हा शब्दप्रयोग स्वीकारला गेला," असं चिश्ती सांगतात.

केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येसुद्धा हा वाद निर्माण झाला आहे.

पाकिस्तानचे एक प्रसिद्ध कार्टुनिस्ट साबिर यांनी यावर एक छान कार्टून काढलं आहे. त्यांनी काढलेल्या चित्रात अरबी वेशभूषा असलेली एक व्यक्ती आपल्या पोपटाला शिकवताना दिसत आहे. तो आपल्या पोपटाला सांगतो, 'अरे बाबा रमदान म्हण, रमजान नाही.'

रमजान महिन्यात काय केलं जातं?

रमजान ईद कधी साजरी केला जातो याबद्दल सोमण म्हणाले, "मुस्लीम कॅलेंडरमध्ये रमजान हा नववा महिना आहे. या महिन्याच्या अमावस्येनंतर चांद्रदर्शन झाल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरा केला जातो.

यानंतर शव्वाल महिना सुरू होतो. रमजान महिन्याच्या काळामध्ये प्रेषितांच्या साहाय्याने पवित्र कुराण स्वर्गातून पृथ्वीवर आले असं मानलं जातं. त्यामुळे चंद्रदर्शन झाल्यावर ईद- उल-फित्र हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. लोक एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात."

मुंबईतील वांद्रे येथील नमाजाचे दृश्य

फोटो स्रोत, Huw Evans picture agency

फोटो कॅप्शन, मुंबईतील वांद्रे येथील नमाजाचे दृश्य.

रमजान ईदबद्दल सांगताना मुंब्रा येथील इस्लाम धर्माचे अभ्यास सैफ आसरे सांगतात, "हा महिना इस्लाम धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

रमजान महिन्याची सुरुवात चंद्र दर्शनाने झाली की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रोजे (उपवास) केले जातात. या दिवसापासून जन्नतचे (स्वर्गाचे) दार उघडले जाते आणि जहान्नुमचे (नरकाचे) बंद केले जाते."

"रमजानच्या महिन्यात रोजा, नमाज, शब-ए-कद्रची रात्र, कुराण आणि जकातुल फित्र या गोष्टी महत्त्वाच्या असतात असं आसरे सांगतात. ते म्हणाले, रोज पहाटे सूर्योदयापूर्वी न्याहारी करून नंतर संध्याकाळी सूर्यास्तावेळी जेवण केलं जातं.

दररोजच्या पाच नमाजांव्यतिरिक्त रात्री तराविहची विशेष नमाज आयोजित केली जाते. शब-ए-कद्रही रात्र अत्यंत पवित्र मानली जाते कारण या रात्री दिव्य कुराणाचे अवतरण सुरू झाले.

या महिन्यात आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या कुटुंबांकडून एकूण उत्पन्नाच्या 2.5 टक्के उत्पन्न किंवा धान्य गरीब कुटुंबाना दिलं जातं. प्रत्येक व्यक्तीमागे 2.5 किलो धान्याचा दानधर्मही केला जातो."

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)