सोशल - महिला सुरक्षितपणे वाहन चालवतात का?

फोटो स्रोत, Getty Images
महिला ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करतात आणि पुरुषांपेक्षा कमी अपघात करतात, असं दिल्ली ट्रॅफिक पोलीसचे सहआयुक्त सत्येंद्र गर्ग यांनी म्हटलं आहे. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
BBC मराठीच्या वाचकांना याबाबत काय वाटतं?
काहींनी या निष्कर्षाला पाठिंबा देत महिलांच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं आहे. तर अनेकांनी याच्या विरोधात.
शिल्पा तांडेल, ज्योती कोचुरे, दोपाल बेहरे, गणेश चव्हाण, यांनी 'हो' असं उत्तर दिलं आहे. तर अतुल पाटील, मारुती काटे, सागर हजारे यांच्यासह अनेकांनी 'नाही' उत्तर दिलं आहे. उल्लेखनीय म्हणजे यामध्ये पुरुषांचीच संख्या जास्त आहे.

फोटो स्रोत, Facebook
आनंद भोसले म्हणतात,"हो, हा निष्कर्ष योग्य आहे. महिला गडबड करत नाहीत. आणि बेदरकारपणे वाहनं चालवत नाहीत. त्यात त्यांचा वेगही नियंत्रित असतो."
या उलट अक्षय काळे म्हणतात, "महिलांना अतिशय असभ्यपणे गाड्या चालावतात. त्यात त्यांना पार्किंगचंही काही तारतम्य नसतं. फ्लायओवरवरून उतरल्यावर मध्येच ब्रेक मारून गाडी थांबवतात. पार्किंग करताना, बाकीच्या गाड्यांचे आरसे फोडतात."
ओम शिंदे यांनी या प्रश्नावर आभ्यसपूर्वक उत्तर दिलं आहे. ते म्हणतात-

फोटो स्रोत, Facebook
सागर यादव म्हणतात, "अनेक गाड्या ऑटोमॅटिक गेअरवर असल्यामुळे पूर्वीसारखं अवघड राहिलं नाही आहे आता."
"हेल्मेट न घालता वाहन चालवणं हा बेजबाबदारपणा स्त्रियांच्याच बाबतीत दिसून येतो," असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, Faceboook
सौरभ दामले यांनी "महिला स्वत: सुरक्षित राहून दुसऱ्या ड्रायव्हरचा जीव धोक्यात घालतात, याला तुम्ही सुरक्षित ड्रायव्हिंग म्हणतात का?" असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तर मानसी लोनकर म्हणतात, "हो, महिला नेहमी सतर्क असतात. मुळात जबाबदारीने कसं वागावं ह्याचं कौशल त्यांना अवगत असतं. स्वतःपेक्षा इतरांच्या जिवाची पर्वा त्या करतात."
मोहन अडसूळ सांगतात, "महिलांचं ड्रायव्हिंग बिल्कुलही सुरक्षित नसतं. पण त्याला काही अपवादही असू शकतात."
मिलिंद पाटील यांनी सविस्तर मत नोंदवलं आहे. "गाडीला आरसे असतात, त्यात त्या स्वतःशिवाय दुसरं कोणालाच बघत नाही. कुठेही वळताना सिग्नल (त्यांना कदाचित इंडिकेटर म्हणायचं आहे!😀 ) देत नाही, रस्त्यात कुठेही थांबतात. मागून कोणी धडकल्यावर धडकणाऱ्याची चूक काढतात आणि एक स्त्री म्हणून सहानुभूती मिळवतात. म्हणून कोणी स्त्रियांच्या विरुध्द तक्रार नाही करत."

फोटो स्रोत, Facebook
"ज्या शहरात सिग्नलची व्यवस्था आहे, तिथल्या महिला व्यवस्थित गाडी चालवतात. परंतु नवी मुंबईत जे खेडेगाव आत्ता शहरांचे रूप पाहू लागलेत, इथल्या स्त्रिया कुठल्याही साईडला जायचं असो, डायरेक्ट टर्न घेतात. मागच्यांचा विचारच करत नाहीत! आणि मग त्यांना वाचवताना पुरुष मंडळींचे अपघात होतात," असं मनोज म्हात्रे सांगतात.
तर विकास सणस यांनी, "महिला शौक म्हणून किंवा आवड म्हणून गाडी चालवत नाहीत. काही कामानिमित्तच त्या गाडी चालवतात." तर पुरुष बेजबाबदारपणे चालवतात या बाबतीत ते सहमत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








