जसप्रीत बुमराहाने ऑस्ट्रेलियाच्या मैदानात इतिहास घडवला, नावावर नोंदवला नवा विक्रम

फोटो स्रोत, Getty Images
मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं नवा विक्रम केला आहे.
जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
ट्रॅव्हिस हेडला बाद करत बुमराहने या विक्रमाची नोंद केली.
बुमराहने 44 सामन्यांमध्ये 200 कसोटी बळी घेतले आहेत. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. पहिला गोलंदाज रविचंद्रन अश्विन आहे. त्याने 37 सामन्यांमध्ये 200 कसोटी बळी घेतले होते.
रविचंद्रन अश्विन फिरकी गोलंदाज आहे, तर बुमराह वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे कसोटी सामन्यांमध्ये सर्वात वेगाने 200 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत 904 गुण मिळवले आहेत.
सध्या गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच भारताचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या.
बीबीसी प्रतिनिधी प्रदीप कुमार यांनी जसप्रीत बुमराहच्या खेळाचं विश्लेषण केलं आहे. त्यातील काही भाग खालीलप्रमाणे :
'हे' आहे जसप्रीतच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य
जसप्रीतचं त्याच्या बॉलिंगवर उत्तम नियंत्रण असल्याचं विश्लेषक सांगतात.
31 वर्षांच्या जसप्रीतने हे कौशल्य वारंवार सिद्ध केलं आहे. याचा पहिला धडा त्याला आईकडून मिळाला.
6 डिसेंबर 1993 ला अहमदाबादमधील एका व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या जसप्रीतने आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत.

फोटो स्रोत, Reuters
7 वर्षांचा असताना वडिलांचे छत्र हरपलेल्या जसप्रीतला आई दलजीतने मोठं केलं.
टीव्हीवर क्रिकेट सामने पाहून जसप्रीत घरी वेगवान गोलंदाजीची प्रॅक्टिस करायचा. भिंतींवर चेंडू टाकून तो हा खेळ खेळत असे. तो प्रॅक्टिस करत असताना चेंडूचा आवाज फार व्हायचा. त्यामुळे त्याच्या आईने त्याला फटकारले होते. आवाज होणार नसेल तरच ही प्रॅक्टिस करायची असं त्याला त्याच्या आईने सुनावले होते.


यावर जसप्रीतने वेगळाच मार्ग शोधला. जिथं भिंत आणि फ्लोअरिंग जिथं मिळते त्या कोनात बॉल टाकला तर आवाज कमी होतो, हे त्याच्या लक्षात आलं. या मार्गाने त्याची प्रॅक्टिस सुरू राहिली. लहानपणापासून जसप्रीत वेगवान गोलंदाजांची नक्कल करायचा. पण त्यांची बॉलिंगची जी अॅक्शन आहे, ती केव्हा विकसित झाली हे मात्र त्यालाही आठवत नाही. अर्थात ही अॅक्शन त्याचं वेगळेपण होईल, हे त्याला कधी वाटलं नव्हतं.
चेंडू फेकण्याच्या त्याच्या वेगळ्या अॅक्शनमुळे बॅट्समन नेहमी फसतात. शाळेत असताना त्याची निवड गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या प्रशिक्षण शिबिरात झाली होती. तेथून त्याची निवड एमआरएफ फाऊंडेशनमध्ये झाली. बघता बघता त्याची निवड गुजरातच्या 19 वर्षांखालील संघात झाली. जसप्रीतची कामगिरी लक्षात घेत त्याची निवड सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी झाली. गुजरात संघाच्या विजयात जसप्रीतची कामगिरी महत्त्वाची ठरली. पण या कामगिरीपेक्षा दुसऱ्याच एका घटनेने त्याच नशिब बदललं.
त्यावेळी मुंबई इंडियन्सचे कोच जॉन राईट पुण्यात सुरू असलेली सैय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. त्यांची नजर जसप्रीतवर पडली. त्यांनी जसप्रीतचा करार मुंबई इडियन्ससोबत केला. ज्या ड्रेसिंगरूममध्ये सचिन तेंडुलकर सारखा महान फलंदाज आणि लसिथ मलिंगा सारखा जिनियस गोलंदाज होता, तिथं तो पोहोचला.

फोटो स्रोत, Reuters
स्टार खेळाडूंच्या सहवासाचा काय परिणाम होऊ शकतो, हे जसप्रीतच्या कामगिरीवरून दिसू लागलं होतं. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विरोधात जसप्रीतला संधी दिली. विराट कोहलीने जसप्रीतच्या पहिल्या 3 बॉलवर चौकार ठोकत, त्याचं स्वागत केलं. पुढं काय करायचं, हे जसप्रीतला समजत नव्हतं. त्याने सचिनशी सल्लामसलत केली.
"तुझ्या एका चांगल्या चेंडूने या मॅचचं चित्र बदलेल. काही काळजी करू नको, फक्त खेळावर लक्ष दे," सचिनचा हा सल्ला जसप्रीतने मानला आणि याच ओव्हरमध्ये त्याने विराटला एलबीडब्लूवर बाद केलं. पहिल्याच सामन्यात त्याने 3 बळी घेतले. त्यानंतर जसप्रीतचं कौतुक अमिताभ बच्चन यांनीही केलं.
पण जसप्रीतला फॉर्म आणि फिटनेसची समस्या सतावू लागली. अशा स्थितीही मुंबई इंडियन्सचा त्याच्यावर विश्वास कायम होता.
लसिथ मलिंगा सोबत स्लो बॉल आणि यॉर्करच्या कुलुप्त्या शिकण्यात त्याला काहीच अडचण आली नाही. स्लो बॉल आणि यॉर्करला आपल्या भात्यातील घातक शस्त्र बनवण्यात तो यशस्वी ठरला. अर्थात त्याची गोलंदाजी हे त्याचं सर्वांत मोठं शस्त्र ठरलं.

फोटो स्रोत, AFP
मेलबर्नमधील सामन्यानंतर तो म्हणाला, "लहानपणापासून मी बऱ्याच गोलंदाजांना पाहात शिकलो आहे. पण ही अॅक्शन कधी विकसित झाली ते माहिती नाही. कोणत्याच कोचने मला अॅक्शन बदलण्यासाठी सांगितलं नाही. फक्त मला शरीर मजबूत बनवण्याचा सल्ला देण्यात आला. कारण शरीरावर ताण पडून वेग कमी येईल, अशी भीती त्यांना वाटत होती."
जसप्रीतला फिटनेसबद्दल अंदाज नसला तरी त्याच्या कलेवर त्याचा पूर्ण विश्वास होता. त्याच विश्वासाने तो जेव्हा नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये पोहोचला तेव्हाची प्रशिक्षिक भरत अरुण यांनी त्याच्या अॅक्शनवर विश्वास दाखवला.
याचा परिणाम असा झाला की 2016ला त्याची निवड देशाच्या टी-20 संघात आणि नंतर वनडे टीममध्ये झाली. बघता बघता तो भारतीय संघाचा सर्वांत वेगवान बॉलर म्हणून प्रस्थापित झाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











