अनिल देशमुखांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

अनिल देशमुख

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, अनिल देशमुख

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टानं मंजूर केलेल्या जामिनाला स्थगिती देण्याची सीबीआयची मागणी हायकोर्टानं फेटाळलीय.

गेल्या वर्षभराहून अधिक काळ अनिल देशमुख मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कैद आहेत.

अनिल देशमुखांचे वकील अॅड. अनिकेत निकम यांनी माहिती दिली की, “मुंबई हायकोर्टानं देशमुखांच्या जामिनाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर सीबीआय सर्वोच्च न्यायालयात गेली होती. पण त्यांना सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीसाठी वेळ दिला नाही. त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी 27 डिसेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. आज हा वेळ संपलाय. म्हणून आम्ही पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं अनिल देशमुख यांचा जमीन कायम ठेवला आहे.”

यानंतर नागपुरात अनिल देशमुखांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. देशमुखांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते गोळा होऊन आपला आनंद व्यक्त केला.

जामीन मिळूनही देशमुख तुरुंगात का होते?

100 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात आला होता. मात्र, याविरोधात CBI ने (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर या जामिनाला स्थगिती देण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर 2022 रोजी अनिल देशमुख यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. या निकालात CBIला निकालाविरोधात अपील करण्याची मुभाही देण्यात आली होती.

मात्र, त्याचवेळी या जामिनाला 10 दिवसांची स्थगितीही उच्च न्यायालयाने दिली होती. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाने देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली होती.

अनिल देशमुख

फोटो स्रोत, Facebook

अनिल देशमुखांची गृहमंत्रिपदी झालेली अनपेक्षित निवड

महाविकास आघाडी सरकारच्या काळात जेव्हा खातेवाटप जाहीर झालं होतं, तेव्हा गृहमंत्रिपद कुणाला मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. राष्ट्रवादीचे काटोलचे आमदार अनिल देशमुख यांच्या खाद्यांवर गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. कारण या पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा नव्हती.

एकीकडे अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील अशा दिग्गजांची फळी राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांनी गृहमंत्रिपद अनिल देशमुखांकडे दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं.

अपक्ष आमदार म्हणून सुरुवात, पहिल्याच टर्ममध्ये युती सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री, मग शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत प्रवेश, नंतर आघाडीच्या प्रत्येक सरकारमध्ये महत्त्वाचं मंत्रिपद... अशी अनिल देशमुखांची आजवरची कारकीर्द राहिली आहे.

अनिल देशमुख

फोटो स्रोत, FACEBOOK/ANIL DESHMUKH

आमदार झाले आणि थेट मंत्रिपदी

1995 साली अपक्ष आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत दाखल झालेल्या अनिल देशमुखांनी युती सरकारमध्ये सहभागी झाले. देशमुखांकडे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य या खात्यांची मंत्रिपदं देण्यात आली.

विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी देशमुखांनी युती सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्री असताना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सुरू केला.

बालेकिल्ला - काटोल

नागपुरातील काटोल मतदारसंघ अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्याच्या रुपात पुढे आला. 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी काँग्रेससह अनेक पक्षातील तिश-चाळीशीतले नेते पवारांसोबत नव्या पक्षात आले.

अनिल देशमुख यांनीही पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर लगेच झालेल्या 1999 सालच्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख पुन्हा काटोलमधून आमदार झाले. पुढे 2004 साली पुन्हा राष्ट्रवादीकडून जिंकत काटोलमधी हॅटट्रिकचीही नोंद केली.

2014 ते 2019 हा काळ वगळल्यास अनिल देशमुख यांच्याकडे कायम मंत्रिपद राहिलंय. राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी देण्यात आली.

अनिल देशमुख

फोटो स्रोत, FACEBOOK/ANIL DESHMUKH

अनिल देशमुख यांनी आतापर्यंत सांभाळलेली मंत्रिपदं

  • 1995 (युती सरकार) - कॅबिनेट मंत्री, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक कार्य
  • 1999 (आघाडी सरकार) - राज्यमंत्री, शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क
  • 2001 (आघाडी सरकार) - कॅबिनेट मंत्री, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषधीद्रव्य प्रशासन
  • 2004 (आघाडी सरकार) - कॅबिनेट मंत्री, सार्वजनिक बांधकाम
  • 2009 (आघाडी सरकार) - कॅबिनेट मंत्री, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

2014 सालच्या निवडणुकीत अनिल देशमुख यांचा भाजपकडून लढलेले (आणि आता काँग्रेसमध्ये परतलेले) आशिष देशमुख यांनी काटोलमधून पराभव केला. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुखांना काटोलमधूनच राष्ट्रवादीनं उमदेवारी दिली आणि ते जिंकले.

अनिल देशमुखांनी मंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयांची राज्यभर चर्चा झाली. त्यात शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री असताना सिनेमागृहात राष्ट्रगीताची त्यांनी केलेली सक्ती असो वा अन्न व औषधीद्रव्य प्रशासनाचे मंत्री असताना केलेली गुटखाबंदी असो. शिवाय, देशमुख सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच मुंबईतील सात किलोमीटरचा वांद्रे-वरळी सी लिंक बांधून पूर्ण झाला होता.