मुंबई उत्तर मध्य लोकसभा निकाल : उज्ज्वल निकम यांच्या विरोधात वर्षा गायकवाड यांना आघाडी

फोटो स्रोत, FACEBOOK
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईत उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उज्जवल निकम यांच्या विरोधात आघाडी घेतली आहे.
भाजपनं उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानं या मतदारसंघाकडं सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.
मुंबईतला उत्तर मध्य मतदारसंघ हा उजव्या, डाव्या, मध्यममार्गी समजल्या जाणाऱ्या सर्व पक्षांना संधी दिलेला मतदारसंघ आहे.
या मतदारसंघात समाजातल्या विविध स्तरातील, विविध आर्थिक-सामाजिक स्तरातील लोक राहातात. तसेच कदाचित सर्वात जास्त धार्मिक विविधताही याच मतदारसंघात दिसून येईल.
एकीकडे बीकेसीसारखं आर्थिक केंद्र, परदेशी कंपन्या आणि बँकांच्या कार्यालयाचं स्थान तर दुसरीकडे झोपडपट्टी इतकी मोठी विविधता एकाच मतदारसंघात दिसून येते.
चाकरमानी, उद्योजक, फिल्म क्षेत्रात काम करणारे लोकही इथं राहातात आणि इथं कोळीवाडेही आहेत. मेट्रोची सुरू असलेली कामं, नवे रस्ते, नव्या पुलांची काम या मतदारसंघात सुरू असल्यामुळे भविष्यातले अनेक प्रश्न सुटणार असले तरी या काळात प्रदुषण, वाहतूक कोंडी अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.
मतदारसंघाची रचना
या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये विलेपार्ले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपाचे पराग अळवणी करतात. चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलिप लांडे, कुर्ल्यातून सेनेचे मंगेश कुडाळकर आणि कलिनामधून सेनेचेच संजय पोतनिस विजयी झाले होते.
वांद्रे पश्चिममधून भाजपाचे आशीष शेलार तर वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे झिशान सिद्दिकी विजयी झाले होते. यामुळे एक अपवाद वगळता विधानसभा निवडणुकांत या मतदारसंघांवर युतीचं प्राबल्य दिसून येतं.

आजवर कोणी प्रतिनिधित्व केलं?
या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी अनेक नेत्यांना, अनेक पक्षांना मिळाली आहे. 1952 साली काँग्रेसचे नारायण काजरोळकर आणि विठ्ठल गांधी या मतदारसंघाचे खासदार झाले.
त्यानंतर 1957 साली भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे श्रीपाद अमृत डांगे आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे गोपाळ माने यांना संधी मिळाली.
1962 साली काजरोळकर विजयी झाले. त्यानंतर 1967 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि अनुयायी रामचंद्र भंडारे या मतदारसंघाचे प्रतिनिधी झाले.
1971 सालीही त्यांचा विजय झाला. परंतु 1973 साली त्यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांना हे पद सोडावं लागलं आणि मग पोटनिवडणुकीत डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे विजयी झाल्या.
1977 साली काँग्रेसविरोधी लाटेत कम्युनिस्ट पार्टीच्या अहिल्या रांगणेकर, 1980 साली जनता पार्टीच्या प्रमिला दंडवते यांना संधी मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images
1984 साली काँग्रेसच्या लाटेमध्ये काँग्रेसचे शरद दिघे तर 1989 साली सेनेचे विद्याधर गोखले या मतदारसंघाचे खासदार झाले.
1991 साली दिघे यांना परत संधी मिळाली. 1996 साली शिवसेनेचे नारायण आठवले विजयी झाले तर 1998 साली रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले या मतदारसंघातून विजयी झाले.
1999 साली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना या मतदारसंघातून लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. याचवेळेस त्यांना केंद्रात मंत्री होण्याची आणि लोकसभेचे सभापती होण्याची संधी मिळाली. मात्र पुढच्याच निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी पराभव केला.

फोटो स्रोत, Getty Images
2009 साली प्रिया दत्त यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या लोकसभेत गेल्या. परंतु 2014 आणि 2019 साली भाजपाच्या पूनम महाजन यांनी त्यांचा सलग दोनवेळा पराभव केला.
आजवर झालेल्या निवडणुकांत रोझा देशपांडे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, प्रिया दत्त आणि पूनम महाजन अशा पाच महिलांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्या आहेत.
2019 साली काय झालं?
2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपाच्या पूनम महाजन यांना 4 लाख 86 हजार 672 मतं मिळाली तर प्रिया दत्त यांना 3 लाख 56 हजार 667 मतं मिळाली.
महाजन यांना 2014 च्या तुलनेत थोडी अधिक मतं मिळाली असली तरी त्यांच्या मतांची टक्केवारी या निवडणुकीत कमी झाल्याचं दिसून येतं. तर प्रिया दत्त यांच्या टक्केवारीत पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसतं.
2019च्या निवडणुकीआधी काही महिने प्रिया दत्त यांनी आपण निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते मात्र राहुल गांधी यांनी भेट घेऊन चर्चा केल्यावर त्यांनी आपला निर्णय बदलला होता.











