कोरोना व्हायरसवर होमिओपॅथीमध्ये उपचार आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अॅलिस्टर कोलमन
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
होमिओपॅथीमध्ये कोरोना व्हायरस वा कोव्हिड-19 वर कोणताही 'उपचार' असल्याचा दावा आपण कधीही केला नसल्याचं आयुष मंत्रालयाने म्हटलंय. पण असं असूनही कोरोना व्हायरसवर पर्यायी उपचार पद्धतींमधली औषधं लागू पडत असल्याचा दावा करणारे संदेश इंटरनेटवरून पसरत आहेत.
भारत सरकारचं आयुष मंत्रालय (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी मंत्रालय) पारंपरिक आणि पर्यायी औषधांना प्रोत्साहन देतं.
कोरोना व्हायरससच्या लक्षणांवरच्या उपचारांसाठी होमिओपॅथीमध्ये औषधं असल्याचा दावा याच वर्षी 29 जानेवारीला आयुष मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला होता.
काय म्हटलं होतं आयुष मंत्रालयाने?
29 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकाचं शीर्षक होतं - 'कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं रोखण्यासाठी होमिओपॅथी, युनानी औषधपद्धती उपयोगी."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता राखणं विशेष आवश्यक असल्याचा सल्ला यामध्ये देण्यात आला होता. सोबतच या संसर्गापासून बचावासाठी होमिओपॅथीमधलं आर्सेनिक अल्बम 30 औषध घेण्याचा सल्लाही देण्यात आला होता.
होमिओपॅथीमधल्या सिद्धांतानुसार जास्त पाण्यासोबत जर एखादी खाण्याची गोष्ट माणसाच्या पोटात गेली तर त्याची 'मेमरी' किंवा आठवण शरीरातली रोग प्रतिकार प्रक्रिया सुरू करू शकते. आयुष मंत्रालयाने ज्या 30C डायल्यूशनबद्दल सांगितलेलं आहे त्यानुसार सहसा पोटात पोचेपर्यंत आर्सेनिकमच्या अणूंची संख्या शून्य होते.
आर्सेनिक ट्रायऑक्साईडला अधिक पातळ अथवा सौम्य केल्यानंतर आर्सेनिकम मिळतं. होमिओपॅथीमध्ये अनेक लक्षणांवरच्या उपचारांसाठी याचा वापर केला जातो.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

30 सी सौम्य केल्यानंतर आर्सेनिकम मिळत असल्याने यामध्ये प्रत्यक्ष आर्सेनिकचा कोणताही अणु नसतो आणि यामुळे मुख्य उपचार पद्धती याला सुरक्षित पण निष्प्रभ मानतात.
मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकावर टीका झाल्यानंतर आयुषय मंत्री श्रीपाद नाईक यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं, "हे पत्रक फक्त त्या औषधांबद्दल माहिती देतं जी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे कोरोना व्हायरस संपुष्टात येऊ शकतो असा दावा कधीही करण्यात आलेला नाही."

फोटो स्रोत, AYUSH.GOV.IN
'सामान्य संदर्भ' म्हणून सल्ल्याखातर हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि याचा रोगाच्या उपचारांशी संबंध नव्हता, असं मंत्रालयाचं म्हणणं आहे.
यानंतर सरकारने 4 फेब्रुवारीला सरकारकडून आणखी एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलं. मीडिया आणि संशोधन संघटनांमध्ये अशी काही वृत्तं आलेली आहेत ज्याने आयुष मंत्रालयाची प्रतिमा खराब होत असून या उपचार पद्धतींबद्दल लोकांमध्ये अविश्वास पसरत असल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे.
शिवाय 'मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या सल्ल्यामध्ये कोरोना व्हायरसवर प्रभावी उपचार असल्याचा दावा करण्यात आलेला नाही आणि कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी कोणत्याही विशिष्ट औषधाच्या वापराचा सल्लाही देण्यात आलेला नाही.'


पण उशीरा देण्यात आलेल्या या स्पष्टीकरणावर 'द हिंदू' वर्तमानपत्राने टीका केली. सुरुवातीला प्रसिद्ध करण्यात आलेलं पत्रक 'अतिशय बेजबाबदारपणाचं' असल्याचं या वृत्तपत्राने म्हटलं.
या लेखात म्हटलं होतं, "स्वतःच औषध घेऊन स्वतःवर उपचार करण्याचा अर्थ असा की, संसर्ग झालेल्या या व्यक्तीबद्दल कोणालाही समजू शकणार नाही आणि व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरण्याच्या शक्यता वाढतील."
व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारे मेसेज
मंत्रालयाने स्पष्टीकरण देऊनही या पत्रकातल्या अर्धवट माहितीच्या आधारे भारतात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मेसेज शेअर केले जात आहेत.
पर्यायी औषध पद्धतींमधली औषधं कोव्हिड-19 वरचा इलाज करू शकतात अशा स्वरूपाचे सल्ले व्हॉट्सअॅपवर दिले जात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
या व्हायरल मेसेजेसविषयी भारतीय फॅक्ट चेकिंग वेबसाईट BOOM ने म्हटलंय, की त्यांना होमिओपॅथीची औषधं कोरोना व्हायरस कोव्हिड-19 चा प्रसार रोखण्यासाठी मदत करू शकतात या दाव्याचं समर्थन करणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा अद्याप मिळालेला नाही."
सोशल मीडियावर व्हायरल होणारे संदेश द लॉजिकल इंडियनने पडताळून पाहिले. सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्यांनी मंत्रालयाच्या या माहितीचा चुकीचा अर्थ लावल्याचं त्यांना आढळलं.
या वेबसाईटने म्हटलंय, "कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबवण्याबाबत आर्सेनिक अल्बम 30 चा कधीही अभ्यास करण्यात आलेला नाही आणि असं कोणत्याही तपासणीतून सिद्धही झालेलं नाही."
पण गेल्या काही काळात रोगांवर होमिओपॅथीने उपचार करण्याची मागणी वाढल्याच्या बातम्या भारतातल्या माध्यमांमध्ये छापून आल्या होत्या.
इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका बातमीनुसार तेलंगणा राज्यामध्ये 3,500 लोकांना होमिओपॅथीच्या 11,500 गोळ्या वाटण्यात आल्या.

फोटो स्रोत, Getty Images
या औषध वितरणाच्या कार्यक्रमादरम्यान न्यूज मिनिट वेबसाईटशी बोलताना एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं, "या गोळ्या फक्त कोरोना व्हायरससाठी नाहीत तर सगळ्या प्रकारच्या इन्फ्लूएन्झा (सर्दी, खोकला)साठी आहेत. एका व्हायरसची ताकद दुसऱ्यापेक्षा वेगळी असते आणि हे औषध उपचारांसाठी नसून फक्त प्रतिबंधासाठी आहे."
पण कोरोना व्हायरस किंवा त्यावरच्या उपचारांबद्दल स्पष्टता नसल्याने आणि लोकांमध्ये फारशी जागरूकता नसल्याने अनेकजण याच्या उपचारांसाठी होमिओपॅथीचं औषध घ्यायला तयार होते.
एका माणसाने न्यूज मिनिटच्या प्रतिनिधीला सांगितलं, "कोरोना व्हायरसबद्दल अनेक समज पसरलेले आहेत. मला वाटतं की, आम्ही पूर्णपणे सज्ज राहणंच चांगलं असेल. तसंही याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसल्याचं लोक म्हणतात."
आयुष मंत्रालयाची गरज का आहे?
भारतातल्या पारंपरिक उपचार पद्धती आणि औषधांना प्रोत्साहन देण्याचं काम आयुष मंत्रालय करतं आणि यावर लक्ष ठेवतं. यापैकी अनेक उपचार पद्धती आध्यात्मिक विश्वासावर आधारित आहेत.
पण होमिओपॅथी ही 18 व्या शतकात युरोपातून उदयाला येऊन नंतर भारतात लोकप्रिय झालेली विशिष्ट उपचार पद्धती आहे.
चुकीच्या समजांना प्रसिद्धी दिल्याबद्दल मंत्रालयावर टीका होत आलेली आहे. सोबतच हिंदू राष्ट्रवादाच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्याबद्दलही या मंत्रालयावर टीका होत आलेली आहे.
भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. पण 2019मध्ये वॉशिंग्टन पोस्टमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालच्या भाजप सरकारने भारताच्या प्राचीन इतिहासाचं संवर्धन करण्यासाठी पारंपरिक उपचार पद्धती स्वीकारल्या असून या पद्धतींना प्रोत्साहनही देण्यात येत आहे.
पण देशातली 93 टक्के लोकसंख्या विज्ञानावर आधारित उपचार पद्धती स्वीकारत असल्याचं भारत सरकारच्याच एका अभ्यासात 2017मध्ये आढळलंय.
कोरोना व्हायरस आणि कोव्हिड 19 वर अजून पर्यंत कोणताही प्रभावी उपचार मिळालेला नाही आणि यावरची कोणतीही लसही शोधण्यात आलेली नाही. अशा परिस्थिती लोक पर्यायी औषध पद्धतींचा मार्ग स्वीकारतायत. पण होमिओपॅथीमध्ये कोरोना व्हायरसवरचा उपचार आहे, असा याचा अर्थ होत नाही.
पण कोरोना व्हायरसवरच्या उपचारांबद्दलच्या खोट्या बातम्या फक्त भारतातच नाही तर युके, अमेरिका, घाना आणि इतर देशांमध्येही सोशल मीडियावरून शेअर केल्या जात आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








