व्ही. एस. नायपॉल : बाबरी मशीद पाडल्याचं समर्थन करणारा लेखक

फोटो स्रोत, JOHN MINIHAN
साहित्यिक आणि नोबेल पुरस्कार विजेते विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल तथा व्ही. एस. नायपॉल यांचं रविवारी निधन झालं. मूळ भारतीय वंशाचे असलेले नायपॉल चर्चेत राहिले ते इस्लामवर केलेल्या टीकांमुळे. त्यांचं असं मत होतं की इस्लामनं लोकांना गुलाम बनवलं आणि दुसऱ्या संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
नायपॉल यांचं मत होतं, "ज्यांचं धर्मांतर झालं त्यांच्यावर विनाशकारी प्रभाव पडला. ज्यांचं धर्म परिवर्तन होतं त्यांचा भूतकाळ नष्ट होतो. तुम्हाला तुमचा इतिहास चिरडून टाकायचा असतो. तुम्हाला सांगायचं असतं की तुमच्या पूर्वजांची संस्कृती अस्तित्वात नाही किंवा त्यामुळे काही फरक पडत नाही."
त्यांचं म्हणणं असं होतं की, "मुस्लिमांकडून अशा प्रकारे ओळख पुसण्याचा जो प्रयत्न झाला तो वसाहतवादापेक्षा भयंकर होता."
यासाठी ते पाकिस्तानचं उदाहरण देतात. ते म्हणतात, "खरं पाहिलं तर पाकिस्तानची कथा एका दहशतीची कथा आहे. ती एका कवीपासून सुरू झाली. हा कवी असा विचार करत होता की मुसलमान विकसित आहेत ज्यांना भारतात राहाण्यासाठी स्वतंत्र जागा हवी."
मूळ भारतीय वंशाचे असलेले नायपॉल यांचा जन्म 1932ला त्रिनिदाद इथं झाला. 1880ला त्यांचं कुटुंब भारत सोडून गेलं होतं. नायपॉल यांनी भारतावर बरचं खुलेपणाने लिहिलं आहे. त्यांनी इस्लाम भारतासाठी नुकसानकारक ठरल्याचं म्हटलं होतं.
मुसलमान टुरिस्ट बसने आले होते का?
1999ला नायपॉल यांनी आऊटलूकसाठी दिलेल्या मुलाखत दिली आहे. ते यात म्हणतात या सहस्राची सुरुवात भारतासाठी फारच त्रासदायक होती. ते म्हणतात, "या सहस्राची सुरुवात मुस्लीम आक्रमणाने झाली. उत्तरेत हिंदू आणि बौद्ध संस्कृती नष्ट करायला सुरुवात केली."

फोटो स्रोत, NICK HARVEY
त्यांनी म्हटले आहे, "कला आणि इतिहासाच्या पुस्तकांत असं लिहिलं आहे जसं मुसलमान भारतात टुरिस्ट बसमधून आले आणि निघून गेले. मंदिर आणि मूर्ती तोडण्यात आल्या. लुटमार झाली. स्थानिकांना गुलाम बनवण्यात आलं."
उत्तरेत हिंदू स्मारकं नाहीत याचं हेच कारण आहे. त्याकाळातली कोणतीही हिंदू नोंद अस्तित्वात नाही. कारण पराभूत लोक इतिहास लिहीत नाहीत. जेते त्यांचा इतिहास लिहितात आणि मुसलमान जेते होते. तर दुसऱ्या बाजूच्या लोकांसाठी ते अंधकार युग होतं, असं त्यांनी म्हटलं होतं.
नायपॉल यांनी भारताचा इतिहास, संस्कृती यावर अॅन एरिया ऑफ डार्कनेस आणि ए वुंडेड सिव्हिलायझेशन ही पुस्तकं लिहिली आहेत.
'ख्रिश्चन धर्मापेक्षा इस्लाममुळे मोठं नुकसान'
त्यांचं असंही मत होतं की भारताचं जेवढं नुकसान इस्लाममुळं झालं आहे तेवढं ख्रिश्चन धर्मामुळे झालेलं नाही.
त्यांनी म्हटलं होतं, "भारतात ख्रिश्चन धर्म दोन मार्गांनी आला. एक म्हणजे ब्रिटिशांच्या माध्यमातून आणि दुसरं म्हणजे मिशनऱ्यांच्या माध्यमातून. इस्लामला जेव्हा आपण भारतीय संस्कृती समृद्ध केल्याच्या दृष्टिकोनातून पाहातो तेव्हा आपण भोजन, संगीत आणि कविता अशा बाबींकडे पाहातो."
"इस्लाम आणि ख्रिश्चन अशा दोन मोठ्या धर्मांनी जगाला कायमचं बदललं. त्यांच्या धर्मशास्त्रानुसार या धर्मांनी जगाला बंधुभाव आणि सामाजिक विचार दिला."
हिंदू जीवनपद्धतीचं कशाप्रकारे नुकसान झालं, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात, "दशकांच्या पराभवामुळे आत्मसमर्पणाच्या भावनेला नुकसान पोहोचवलं."
बाबरी पाडल्याचं समर्थन
इतिहासतज्ज्ञ मुशीर उल हसन यांनी 2012मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की नायपॉल यांनी त्यांचं पुस्तक ए मिलियन म्युटिनिज या पुस्तकाच्या प्रकाशानंतर दोन वर्षांनी बाबरी मशीद पाडल्याचं समर्थन केलं होतं. त्यांनी बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला ऐतिहासिक संतुलनाचं एक कृत्य म्हटलं होतं.
2004ला भाजपच्या कार्यालयात त्यांनी कथितपणे म्हटलं होतं, "अयोध्या एकप्रकारे ध्येयाने प्रेरित होतं. अशाप्रकारच्या ध्येयांना प्रोत्साहान दिलं. मी अशा ध्येयातून होणाऱ्या कामांचं समर्थन करतो कारण त्याकडे नवनिर्मिती म्हणून पाहिले पाहिजे."
त्यांच्या या वक्तव्यांमुळे वादही झाला. नोव्हेंबर-2012ला मुंबईमध्ये झालेल्या एका साहित्य संमेलनात त्यांनी इस्लामवर मतप्रदर्शन केलं होतं. त्यावरून वाद झाला होता.

फोटो स्रोत, GERRY PENNY/EPA/REX/SHUTTERSTOCK
याच साहित्य संमेलनात प्रसिद्ध नाटककार, लेखक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांनी त्यांच्यावर टीका केली होती. नायपॉल यांना भारतीय इतिहासातील इस्लामच्या योगदानाबद्दल काही माहीत नाही, अशी टीका कर्नाड यांनी केली होती. नायपॉल अविश्वासू लेखक आहेत, अशीही टीका त्यांनी केली होती. नायपॉल यांना संगीताबद्दल काहीही आत्मियता नाही, असं कर्नाड म्हणाले होते. नायपॉल यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला होता.
त्यानंतर नायपॉल यांनी भारतावर काहीही लिहिणार नाही, असं म्हटलं होतं. मी भारतावर 4 पुस्तकं, 2 कादंबऱ्या आणि बरेच लेख लिहिले आहेत. मला असं वाटत नाही की मी भारतावर काही लिहिलं नाही, असं ते म्हणाले होते.
नॉयपॉल यांना 2001ला साहित्यातल्या नोबेलनं गौरवण्यात आलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








