आता मागच्या सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट बंधनकारक- नितीन गडकरी #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा
1. आता मागच्या सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट बंधनकारक- नितीन गडकरी
कारच्या मागील आसनांवर बसलेल्या आणि सीट बेल्ट न लावणाऱ्या प्रवाशांनाही दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
त्याचवेळी, वाहनांमधील मागील आसनांच्या 'सीट बेल्ट'साठीही अलार्म बसवणे मोटारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी बंधनकारक करण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याची माहिती त्यांनी मंगळवारी (6 ऑगस्ट) दिली. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर वाहनांच्या सुरक्षाविषयक सुविधांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर गडकरी म्हणाले, 'मागील आसनांवरील प्रवाशांना सीट बेल्ट लावणे हे आधीपासूनच अनिवार्य आहे. परंतु, लोक त्याचे पालन करीत नाहीत. मागच्या सीटवरील प्रवाशांनी पुढच्या सीटप्रमाणे बेल्ट न लावल्यास अलार्म वाजेल. त्यानंतरही त्यांनी बेल्ट लावला नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल.'
2. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांचा आज निकाल
महाराष्ट्रात सुरू असलेला शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट हा शिवसेनेतील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. या संघर्षावर आज 7 सप्टेंबर 2022 ला सकाळी सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना केली आहे. त्यात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली, आणि न्या. नरसिंहा यांचा समावेश आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेना नक्की कोणाची या वादाबद्दल शिंगे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निर्णयाची अपेक्षा असल्याने सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाने केली होती.
निवडणूक आयोगावरील सुनावणीसाठी टाकलेले निर्बंध काढून टाकावेत अशी विनंती शिंदे गटाने सर्वोच्च न्यायलयाकडे केली होती.
3. आजपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा
भारतातील प्रत्येक नागरिकाला जोडण्यासाठी काँग्रेस पक्ष बुधवारपासून राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे. जगात प्रेम आणि बंधुता पसरवणे हा या प्रवासाचा उद्देश असल्याचं काँग्रेस (Congress) पक्षाने सांगितलं आहे.
म्हणूनच याला भारत जोडो यात्रा असे नाव देण्यात आले आहे. हा प्रवास एकतेची ताकद दाखवण्यासाठी, एकसोबत चालत भारत घडवण्यासाठी आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
एबीपी माझा ने दिलेल्या बातमीनुसार, पक्षाने सांगितलं आहे के, राहुल गांधी 7 सप्टेंबर 'भारत जोडो यात्रा' सुरू करणार आहेत. सकाळी सात वाजता माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ पहिली प्रार्थना सभा होणार आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि कामराज मेमोरियललाही भेट देतील.
4. कोव्हिडची लस आता नाकावाटेही देता येणार
भारत बायोटेकने विकसित केलेल्या BBV154 या लसीला मान्यता मिळाली असून कोव्हिडशी लढा देण्यासाठी नाकावाटे देण्यात येणारी ही पहिलीच लस आहे. 18 वर्षांवरील सर्वांना ही लस घेता येणार असून या लशीचे दोन डोस घ्यावे लागतील.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरवर ही घोषणा केली. Central Drugs Control Organisation ने या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्याचं सांगितलं.
टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. या लसीमुळे कोव्हिडविरुद्धचा लढा आणखी तीव्र होणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
5.आशिया कप स्पर्धेत भारत पराभूत, अंतिम फेरीत जाण्याबद्दल प्रश्नचिन्ह
दमदार सांघिक खेळाच्या बळावर श्रीलंकेने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतावर सहा विकेट्सनी विजय मिळवला. पाकिस्तान आणि पाठोपाठ श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागल्याने भारतासाठी फायनलचा रस्ता कठीण झाला आहे.
फायनलमध्ये प्रवेशासाठी भारताला आता अन्य संघावर अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांनी पाकिस्तानला हरवलं आणि भारतीय संघाने अफगाणिस्तानला नमवलं तर फायनलची दारं उघडू शकतात.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. के. एल. राहुल (६) आणि विराट कोहली (०) हे भरवशाचे फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी 58 चेंडूत 97 धावांची भागीदारी केली.
दोन खंदे शिलेदार तंबूत परतल्यानंतर रोहितने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेताना मनमुराद फटकेबाजी केली. आक्रमक पवित्र्यानिशी खेळणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला करुणारत्ने बाद करत ही जोडी फोडली. रोहितने 41 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारासह 72 धावांची खेळी केली.
रोहित बाद झाल्यानंतर धावगती मंदावली. दासून शनकाने सूर्यकुमार यादवला बाद करत भारतीय संघाला अडचणीत टाकलं. त्याने 34 धावांची खेळी केली.
हार्दिक पंड्या (17) आणि ऋषभ पंत (17) तसंच रवीचंद्रन अश्विन (15) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी केल्याने भारताने 173 धावांची मजल मारली.
श्रीलंकेतर्फे दिलशान मधूशनकने 3 तर चामिका करुणारत्ने आणि दासून शनका यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युतरादाखल खेळताना पाथम निसांका आणि कुशल मेंडिस यांनी 97 धावांची खणखणीत सलामी दिली. निसांका 52 धावांची खेळी करून तंबूत परतला.
यानंतर श्रीलंकेने चरिथ असालंका (0), दानुष्का गुणतिलका (1) यांना झटपट गमावलं. खेळपट्टीवर ठाण मांडून सूत्रधाराची भूमिका निभावणाऱ्या कुशल मेंडिसला युझवेंद्र चहलने माघारी धाडलं. त्याने 57 धावांची शानदार खेळी केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








