नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला ममता बॅनर्जी यांचा उपस्थित राहण्यास नकार

फोटो स्रोत, Getty Images
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.
30 मे रोजी दिल्लीमध्ये मोदी सरकारच्या शपथविधी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शपथविधीला हजर राहण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण पाठविण्यात आलं आहे.
पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचारात मारल्या गेलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही भाजपनं शपथविधी कार्यक्रमाचं आमंत्रण दिल्याचं सांगितलं जात आहे.
बंगालमधील राजकीय हिंसाचारात आपले 54 कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा भाजपनं केला आहे. ममता बॅनर्जींनी अर्थातच हा दावा फेटाळून लावला आहे.
ममता बॅनर्जींनी यासंबंधी ट्वीट करून म्हटलं, की शपथविधी कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस असतो, कोणत्याही राजकीय पक्षाकडून लोकशाहीचा सन्मान कमी करण्याचा नाही.
"नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमचं अभिनंदन. घटनात्मक आमंत्रणाचा स्वीकार करून शपथविधी कार्यक्रमाला येण्याचा माझा विचार होता. मात्र भाजपकडून बंगालमधील राजकीय हिंसाचारात 54 कार्यकर्ते मारले गेल्याचा दावा केला जात आहे. या बातम्या माध्यमांमधून येत आहेत. हे धादांत खोटं आहे," असं त्या म्हणतात.
आधी स्वीकारलं होतं आमंत्रण
ममता बॅनर्जींनी लिहिलं आहे, "बंगालमध्ये राजकीय हत्या होत नाहीयेत. वैयक्तिक वैमनस्य, कौटुंबिक वाद किंवा इतर बाबींमधूनही या हत्या झालेल्या असू शकतात. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आमच्याकडे यासंबंधीची काहीच माहिती नाही."
त्यांनी म्हटलं आहे, की "नरेंद्र मोदीजी, मला माफ करा. या कारणामुळं मी शपथविधी कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"कोणत्याही पक्षानं आपल्या राजकीय हितासाठी अशा औचित्यांचा संधी म्हणून वापर करू नये. कृपया मला माफ करा," असं ममता यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मंगळवारी ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींच्या शपथविधी कार्यक्रमाला हजर राहण्याचं मान्य केलं होतं. ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार बैरकपूरचे भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी ममता बॅनर्जींना टोमणा मारला होता. आपल्या भाच्याला वाचविण्यासाठी ममता शपथविधी कार्यक्रमाला जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
ममतांनी आमंत्रण नाकारण्याच्या आदल्याच दिवशी तृणमूल काँग्रेसचे दोन आमदार आणि 50 नगरसेवक भाजपमध्ये सहभागी झाल्यानंही दोन्ही पक्षांमधील कटुता वाढली आहे.
निवडणूक प्रचारादरम्यानही नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जींदरम्यान शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले झाले होते. एका प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं, की तृणमूलचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, जे निवडणुकीनंतर पक्षत्याग करतील.
पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर ममता बॅनर्जींनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती आणि तृणमूलनं पंतप्रधानांचं हे वक्तव्यं घोडेबाजाराला उत्तेजन देणारं असल्याचं म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








