शरद जोशी : ज्यांनी 'भारत' विरुद्ध 'इंडिया'ची पहिल्यांदा संकल्पना मांडली

शरद जोशी

फोटो स्रोत, शेतकरी संघटना/ Facebook

फोटो कॅप्शन, शरद जोशी

शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांचा 03 सप्टेंबर हा जन्मदिन. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य लढा दिला.

शरद जोशी यांनी त्यांच्या भाषणांतून आणि लिखाणातून इंडिया आणि भारत यांच्यातील द्वैत अधोरेखित केलं.

लेखिका वसुंधरा काशीकर यांनी शरद जोशींच्या आठवणींवर आधारित 'शरद जोशी: शोध अस्वस्थ कल्लोळाचा' हे पुस्तक लिहिलं आहे.

पुस्तकातील 'ते स्वातंत्र्य खरे नं' या प्रकरणात शरद जोशींच्या मनात इंडिया आणि भारत या संकल्पनेचा उगम कसा झाला, याचा वेध लेखिकेनं घेतला आहे.

'ते स्वातंत्र्य खरे नं'

कल्याणकारी राज्य आणि कल्याणकारी अर्थशास्त्र ( welfare state and economics) या दोन्ही संकल्पना शरद जोशींना अमान्य होत्या. सरकारच्या हस्तक्षेपामुळे, व्यक्तीमधली जबाबदारी घेण्याची वृत्ती कमी होते.

लोक आशाळभूतपणे मदतीसाठी सतत सरकारकडे डोळे लावून बसतात. व्यक्तीची आत्मप्रतिष्ठा, स्वातंत्र्य, निर्णय क्षमता, धोका पत्करण्याची वृत्ती हळूहळू क्षीण होत जाते.

सततच्या संरक्षणामुळे, आधारामुळे परावलंबी झालेल्या माणसाची स्थिती काय होते? चांदवडच्या महिला अधिवेशनात एका कार्यकर्ती बहिणीने सांगितलेली हकीकत यासंदर्भात शरद जोशी दृष्टांत म्हणून सांगतात.

''चांगली पन्नास-साठ वर्षांची बाई, संध्याकाळ झाली की किंवा दिवसासुद्धा घराबाहेर पडायचं असेल तर, पाच वर्षांच्या लहान मुलाला बरोबर घेते आणि म्हणते, पुरूष माणसाची सोबत असलेली बरी''.

थोडक्यात काय, सततच्या परावलंबित्वामुळे माणूस आत्मविश्वास गमावून बसतो.

शरद जोशी: शोध अस्वस्थ कल्लोळाचा

फोटो स्रोत, राजहंस प्रकाशन

शरद जोशींचा स्वतंत्रतावाद 'भांडवलवादी' नाही तर तो 'उद्योजकतावादी' आहे. त्यांच्या स्वतंत्रतावादात, संशोधन करणाऱ्यांना, धडाडी दाखवून उद्योगव्यापार उभे करणाऱ्यांना महत्त्व आहे. जोशी म्हणतात, ''विविधता तयार करणारा उत्पादक आणि त्याचा उपभोग घेणारा ग्राहक ही एकाच व्यक्तीची दोन अंग आहेत.

माणसानं उत्पादन करावं, ते जगासमोर ठेवावं, जगाच्या नजरेत त्याच्या या नजराण्याचे जे काही मोल असेल त्याप्रमाणे उत्पादकाला मोबदला मिळावा, त्यात कोणाचाच हस्तक्षेप असू नये अशी अर्थव्यवस्था स्वतंत्रतावाद मानतो.''

'सरकारी हस्तक्षेप नको, खुली बाजारपेठ असावी'

सरकारी हस्तक्षेप नको. खुली बाजारपेठ असावी असे शरद जोशी म्हणतात. हे म्हणताना ते खुल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतात. खुल्या अर्थव्यवस्थेचे विरोधक, खुली अर्थव्यवस्था म्हणजे चंगळवाद असा आरोप करतात.

पण शरद जोशींच्या मते, "बाजारपेठेच्या व्यवस्थेत उत्पादन वाढ करून उपभोग वाढवण्यासाठी धडपड सुरू असते ही कल्पनाच चुकीची आहे. धडपड उपभोग वाढवण्याची नाही, तर विविधता आणि विपुलता वाढवण्याची आहे. तिचा हेतू लोकांना निवडीचं अधिकाधिक स्वातंत्र्य देण्याचा आहे. क्षणोक्षणी उपभोग तर अपरिहार्य आहेच. जनावरही उपभोग घेतात आणि माणसही घेतात. मग दोघांमध्ये फरक काय? जनावरं निसर्गानी जेवढं त्यांच्यापुढे ठेवलं त्यातूनच निवड करून त्याचा उपभोग घेतात. पण माणूस निसर्गापलीकडे विविधता तयार करतो''.

चंद्रपुर येथे खुल्या अधिवेशनात मार्गदर्शन करताना शरद जोशी

फोटो स्रोत, शेतकरी संघटना/facebook

फोटो कॅप्शन, चंद्रपूरमध्ये खुल्या अधिवेशनात मार्गदर्शन करताना शरद जोशी.

उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल. आपण निवारा किंवा आवासाचं उदाहरण घेऊ. जनावरं निसर्गाने दिलेल्या वातावरणात राहतात. काही प्राणी नैसर्गिक गुहांमध्ये, काही झाडावर, काही पाण्यात, काही जमिनीवर...पण माणसाने निसर्गातील घटकांवर प्रयोग करून सिमेंट बनवलं, विटा बनवल्या, टाईल्स बनवल्या. त्यातून पक्की सिमेंट-विटांची घरं बांधली.

पुढे त्या घरातही त्यानं अनेक तऱ्हेने सौंदर्य आणलं. इंटिरिअर डिझाईन आलं. मग वेगवेगळ्या दर्जाचे, प्रकारचे रंग आले. टाईल्सचे मार्बल, ग्रॅनाईट असे अनेकविध प्रकार आले. फर्निचर, नळाच्या तोट्यांपासून ते मॉड्यूलर किचनपर्यंत विविधता आली. थोडक्यात काय तर उपभोग नाही तर उपभोगाची गुणवत्ता आणि विविधताही माणसाची प्रेरणा आहे. ती प्रेरणा खुली अर्थव्यवस्था पूर्ण करते. यात माणसाच्या प्रतिभेला, कल्पकतेला वाव आहे, संधी आहे.

शरद जोशी

फोटो स्रोत, शेतकरी संघटना/Facebook

याच्याच पुढे जाऊन शरद जोशी आपली स्वातंत्र्याच्या कक्षा ( Degree of freedom ) ची संकल्पना मांडतात. हा त्यांचा अत्यंत मौलिक विचार आहे असं मला वाटतं. ते म्हणतात, "माणसाच्या आयुष्याची गुणवत्ता कशी ठरवायची? त्यासाठी खालील निकष आहेत.

१) आयुष्यात तुम्हाला निवड करण्याची संधी किती वेळा मिळते? उदाहरणार्थ- गरिबांना निवडीची संधी मिळतच नाही. गरिबाच्या पोराला खेळायला एक लाकडी बैल मिळाला तरी खूप कौतुक; पण श्रीमंताचं पोर पाचशे प्रकारची खेळणी घेऊन खेळतं, कॉम्प्युटरवर खेळतं, मोबाईलवर खेळतं. त्यातून ते निवड करू शकतं. शाळा असो, खेळ असो, व्यवसाय असो गरिबाच्या पोराला निवड करण्याची संधी कमी तर श्रीमंताच्या पोराला ती जास्त असते.

२) निवड करण्याची संधी मिळाल्यावर निवडीसाठी किती पर्याय असतात? म्हणजे गावातल्या मुलाला शाळेत जायची संधी मिळते तेव्हा पर्याय फक्त जिल्हा परीषदेचा असतो. शहरातल्या मुलाला शाळानिवडीसाठी मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, अर्ध-इंग्रजी माध्यम असे अनेक पर्याय असतात.

३) निवडीसाठी जे पर्याय उपलब्ध होतात ते किती व्यापक असतात? गावातील शाळेत एकच अभ्यासक्रम तोही मराठी माध्यमातून. शहरात एसएससी बोर्ड, सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड, फ्रेंच, जर्मन पासून अनेक भाषा शिकण्याची संधी.''

इथेच त्यांच्या इंडिया आणि भारत या संकल्पनेचा उगम कळून येतो. निवडीच्या स्वातंत्र्याच्या आधारावरच त्यांनी ही मांडणी केली आहे.

इंडियातल्या माणसांना निवडीचं स्वातंत्र्य आहे, ते उपभोगताना अनेक विकल्प उपलब्ध आहे. भारतातल्या लोकांना ते नाही. म्हणूनच सर्वांना निवडीचं स्वातंत्र्य उपलब्ध करून देणारी व्यवस्था हवी. कवी बी यांनी म्हटले आहे, ''ते स्वातंत्र्य खरे न फक्त अपुले जे तोडीते बंधने, अन्यांच्या पदश्रृंखलाच बघते निष्कंप ऐशा मने''. त्यादृष्टीने अन्यांच्या पायातील बेड्या तोडणारी खुली अर्थव्यवस्था ही स्वतंत्रतेची पहिली पायरी आहे असे जोशी मानतात.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)