दृष्टिकोन : 'हिंदूंचा राग आता ज्वालामुखीसारखा उफाळू लागला आहे'

फोटो स्रोत, EPA
- Author, देवदत्त पटनायक
- Role, लेखक, बीबीसी हिंदीसाठी
हिंदूंना राग का येतो याबद्दल फारसं बोललं जात नाही. त्याची फार चर्चाही होत नाही.
हिंदू म्हणजे शांत, हिंदू म्हणजे सहिष्णू...असंच नेहमी मानलं जातं. त्यामुळे जेव्हा हिंदूंना राग येतो तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटतं. ज्यांना आश्चर्य वाटतं ते म्हणतात, 'हिंदू धर्मात असं तर सांगितलेलं नाही.'
हल्ली सगळीकडे हिंदूंचा राग मोठ्या प्रमाणावर दिसतो, पण तो राग सगळेच समजून घेत नाहीत. समजण्याचा प्रयत्नही करत नाहीत. हा आजारच आहे आणि तो गेल्या 100 वर्षांत हळूहळू वाढत होता, आता तो ज्वालामुखीसारखा उफाळू लागला आहे.
याचं कारण म्हणजे हिंदूंना असं वाटतं की देशातले इतर सर्व धर्म आहेत ते किंवा जे स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानतात असे सगळे हिंदू धर्माच्या विरोधात आहेत. त्यांच्या लिखाणात, बोलण्यात हिंदू विरोधाचा पूर्वग्रह दिसतो.
कोणाला ख्रिस्ती धर्म समजून घ्यायचा असेल तर ते बायबल वाचू शकतात. इस्लामबद्दलची माहिती कुराण वाचल्यास मिळते. पण हिंदू धर्म जाणून घ्यायचा असेल तर असं कोणतंही शास्त्र नाही. कारण हिंदू धर्म हा कोणत्याही शास्त्रावर नव्हे तर लोकांच्या विश्वासावर आधारलेला धर्म आहे. या धर्माचा मौखिक परंपरेवर विश्वास आहे.

फोटो स्रोत, ISTOCK
हिंदू धर्माची रूपं
उत्तर भारतातला हिंदू धर्म वेगळा आहे. दक्षिण भारतातला वेगळा आहे. पाचशे वर्षांपूर्वीचा हिंदू धर्म आणि आजचा हिंदू धर्म वेगळा आहे. प्रत्येक जात, प्रांत, भाषा या सगळ्यांत हिंदू धर्माची रूपं वेगवेगळी आहेत. ती विविधताच बहुतांश लोकांच्या आकलनाच्या बाहेरची असते.
हिंदू धर्माबद्दल हजारो वर्षांपासून अनेक गैरसमज आहेत. मुसलमान भारतात आले त्यांनी हिंदूंना मूर्तिपूजक म्हटलं आणि मूर्तिपूजेवर टीका केली. त्यांना वाटलं की मूर्तिपूजा हाच हिंदू धर्म आहे.
इंग्रज आले तेव्हा त्यांनी हा धर्म म्हणजे 'अनेकदेववाद' असल्याचं म्हटलं आणि त्यात काही अर्थ नसल्याचं सांगत एकेश्वरवाद हेच सत्य असल्याचं सांगू लागले.
त्यामुळे भारतीयांवर दबाव आला. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळातील लिखाणात तो दिसतो. त्या काळातलं, भारतीय बुद्धिजीवी वर्गाचं लेखन वाचलं तर ते एक प्रकारे बचावाच्या पवित्र्यात असल्यासारखे दिसतात. ब्रिटिशांच्या काळातले बहुतेक बुद्धिजीवी ते जे सांगतील ते मानत होते. त्यांनी हिंदू धर्म समजून घेण्याऐवजी त्यात सुधारणा करण्यास सुरुवात केली.

फोटो स्रोत, Getty Images
सगुण भक्तीवर टीका, निर्गुण भक्तीचं कौतुक, मूर्तिपूजा, रितीरिवाजांवर टीका हेच त्यांच्या लिखाणात दिसत होतं.
त्यांनी पाश्चात्य धर्मांशी हिंदू धर्माची तुलना करण्यास सुरुवात केली. पाश्चात्य धर्माचं शास्त्र आणि नियम स्पष्ट होते. एक प्रकारची सुधारणांची मोहीमच सुरू झाली.
हिंदू धर्मावर टीका
हिंदू धर्माला विशिष्ट रूप देण्याचं काम 200 वर्षांपूर्वी इंग्रजांनी केलं. हे काम सुरू असताना त्यांचा जो काही अभ्यास होता तो राजकारणानं भारलेला होता. त्यांना ख्रिस्ती धर्म हा हिंदू धर्मापेक्षा वरचढ असल्याचं दाखवायचं होतं.
हळूहळू जग धर्मनिरपेक्षतेकडे सरकू लागलं होतं. त्यावेळी इंग्रज विद्वानांची जागा डाव्या विचारवंतांनी घेण्यास सुरुवात केली. डावे लोक धर्म मानतच नाहीत. त्यामुळे त्यांनी धर्मावर टीका केली. हिंदू धर्मावर तर त्यांचा जास्तच रोष होता. त्यांच्या लिखाणातून ते धर्माचं विश्लेषण करत नाहीत तर त्याबद्दल लोकांना समजावून सांगत आहेत, असंच वाटतं. शिवाय पुस्तकांच्या माध्यमातून एक प्रकारची मोहीम चालवत असतात.
ही विचारधारा हिंदू धर्माला केवळ महिलाविरोधी, जातीयवादी मानते आणि हिंदू धर्मातल्या महत्त्वाच्या गोष्टी - जसं की वेद, यांना एक प्रकारची फसवणूक मानते.

फोटो स्रोत, PUNEET BARNALA/BBC
डावे विचारवंत असं समजावून सांगतात की, वेद आणि भारतीय दर्शन शास्त्र हे हत्तीच्या दातांसारखं म्हणजे फक्त दाखवण्यासाठी आहे. हिंदू धर्माचा खरा चेहरा हा जातीयवादीच आहे.
बदलते सण
समानतावादी आणि धर्मनिरपेक्ष जगात प्रत्येक धर्माला सारख्याच नजरेनं पाहिलं जात नाही. पैगंबराला ऐतिहासिक आणि अवतारांना काल्पनिक मानलं जातं. सोशल मीडियामध्ये देवाच्या चमत्कारांची थट्टा केली जाते.
प्रत्येक विश्वास आंधळाच असतो. पण हिंदूंना असं वाटतं की केवळ हिंदू धर्माच्या कृतींनाच अंधविश्वास असल्याचं म्हटलं जातं.
जगभरात या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. कोठेही गेलो की हिंदू धर्माविषयी लोक दोनच गोष्टी बोलत असल्याचं कानावर येतं. एक म्हणजे हिंदू मूर्तिपूजक आहेत आणि दुसरं म्हणजे ते जातीयवादी आहेत. धर्माला नागा साधूंशी, संन्याशांशी जोडण्यात येतं. एक प्रकारे हिंदू धर्म हा विचित्र असल्याचं ठसवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे हिंदू धर्म मानणाऱ्यांना त्याचं वाईट वाटतं.
सणांच्या काळात वर्तमानपत्रात काय दिसतं? हिंदूंचे सण आले की लोक हिंदूंवर टीका करणं सुरू करतात. दिवाळीच्या काळात प्रदूषण वाढल्याच्या बातम्या येतात. प्रत्येक पूजेच्या बाबतीत असंच होतं. त्यांच्या हे लक्षात येत नाही की औद्योगीकरणामुळे सणांचं रूप बदललं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पूर्वी पूजा फुलापानांनी होत होती. आता प्लास्टिक आलं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस आलं आहे. फटाके आले आहेत. सणांचं आधुनिक रूप हे पर्यावरणास अनुकूल नाही. समस्या आहे ती औद्योगीकरण आणि व्यावसायीकरण यांची. धर्माची नाही. पण टीका मात्र नेहमीच धर्मावर केली जाते.
हिंदू धर्म स्त्रीविरोधी?
हिंदू व्रतं ही स्त्रीविरोधी असल्याचं म्हटलं जातं. सगळ्याच परंपरा या पुरुषांना मोठेपणा देणाऱ्या आहेत, असंही म्हटलं जातं. पण तसं तर सर्वच धर्मांच्याबाबतीत आहे. इस्लाममध्ये सगळं पुरुषप्रधान आहे. महिला पैगंबरबद्दल कोणीच बोलत नाही. तसा काही उल्लेख नाही.
मदर मेरीचा अपवाद वगळता कुठेही महिलांचा उल्लेख नाही. पण त्यावरही कोणीच बोलत नाही.

फोटो स्रोत, iStock
धर्माची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा असं म्हणतात की, भारतात सर्वांत चांगला धर्म हा बौद्ध धर्म हाच आहे. तो ब्राह्मणांनी नष्ट केला, इस्लामनं त्यात फूट पाडली, असं म्हटलं जातं. पण हे कोणी सांगत नाही की बौद्ध धर्म ही पुरुषप्रधान आहे. विनय पिटकमध्ये समलैंगिक (पाली भाषेत त्यांना पंडक म्हणतात) आणि महिला यांच्यावर टीका केलेली आहे.
आणखी एक गोष्ट सांगितली जाते की, हिंदू धर्मात स्वत:चे मूळ विचार नाही. सर्व विचार युनानी, तुर्की, फारसी, इंग्रज यांच्याकडून आले आहेत. हाही एक बुद्धिजीवींनी पसरवलेला विचार आहे.
आता तर अमेरिका योग वर हक्का सांगू लागली आहे. हिंदू धर्म आणि भारत यांचा काही संबंध नाही असं सांगितलं जात आहे.
जेव्हा अशाप्रकारे जाणूनबुजून, सातत्याने एखाद्या श्रद्धास्थानावर हल्ला केला जातो तेव्हा राग येणं स्वाभाविक आहे. बुद्धिजीवी असं मानतात की, हिंदू धर्मात कोणालाही पाप करण्यापासून रोखण्याची काही व्यवस्था नाही. अशा स्थितीमध्ये तुम्हाला कोणी योग्य म्हणतो की अयोग्य यानं काय फरक पडतो?
जर हिंदूंना असं वाटतं की त्यांच्या धर्माबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत, तर तो एक विरोधाभास असून सत्य नाकारण्यासारखं आहे.
असं ऐकलं की हिंदूंचा राग आणखी वाढतो.

फोटो स्रोत, iStock
एकूणात, हिंदुत्व चुकीचं आहे असं मानून तो धर्म समजून घेण्याऐवजी धर्म सुधारण्याचा प्रयत्न करतात, याचा लोकांना राग येतो.
कधी तरी लोकांना राग येणारच होता. गेली 100 वर्षँ ही परिस्थिती कायम आहे. आता तो राग प्रकर्षानं समोर आला आहे.
पण भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे ते लक्षात ठेवायला हवं -
'जेव्हा राग येतो तेव्हा बुद्धी भ्रष्ट होते आणि हेच आपल्याला चारीबाजूंना दिसत आहे.'
(या लेखात व्यक्त झालेले विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. त्यातली दावे आणि विचार बीबीसीचे नाहीत. तसंच बीबीसी त्याची कोणतीही जबाबदारी आणि उत्तरदायित्व घेत नाही.)
(लेखक देवदत्त पटनायक व्याख्याते आहेत. त्यांनी पुराणांतल्या गोष्टींवर आधारित 40 पुस्तके आणि 800 लेख लिहिले आहेत. त्यांची वेबसाईट - devdutt.com)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)








