रिता फारिया ते हरनाझ संधू : कोणत्या प्रश्नोत्तरांनी या भारतीय तरुणी बनल्या 'विश्वसुंदरी'?

फोटो स्रोत, Getty Images
पहिल्या नोकरीची मुलाखत असो वा 'तिचा तो होकार', एक उत्तरात तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असते.
भारताची हरनाज संधू 70 वी 'मिस युनिव्हर्स' ठरली आहे. 21 वर्षानंतर हरनाज संधूच्या रुपात 'मिस युनिव्हर्स'चा किताब भारताला मिळाला आहे.
हरनाज संधू 21 वर्षांची आहे. 2000 साली अभिनेत्री लारा दत्ता हिला 'मिस युनिव्हर्स' स्पर्धा जिंकली होती.
इस्रायलच्या इलियटमध्ये आयोजित या स्पर्धेत मेक्सिकोची माजी 'मिस युनिव्हर्स' अँड्रिया मेजा हिने हरनाज संधूला 'मिस यूनिव्हर्स'चं मुकुट देऊन गौरवलं.
मिस यूनिव्हर्सचा किताब पटकावल्यानंतर हरनाज म्हणाली, "ईश्वर, नातेवाईक आणि मिस इंडिया संघटनेचे मी आभारी आहे, ज्यांनी या प्रवासात मला मार्गदर्शन केलं आणि मला आधार दिला. मी जिंकावं म्हणून प्रार्थना केलेल्या सगळ्यांचे आभार. 21 वर्षांनंतर हा किताब भारताला मिळाल्यानं अधिकचा आनंद आणि अभिमानही वाटतो."
हरनाजला विचारलेले प्रश्नं आणि तिची उत्तरं
अंतिम राऊंडच्या वेळेस सगळ्या स्पर्धकांना विचारण्यात आलं होतं की, आजच्या काळात दबावाचा सामना करणाऱ्या तरुणांना दबावाला सामोरं जायला मदत मिळेल यासाठी काय संदेश द्याल?
या प्रश्नाचं उत्तर देताना हरनाज म्हणाली, "आजच्या काळातील तरुणांवर असलेला सर्वात मोठा दबाव हा त्यांच्या आत्मविश्वासाशी संबंधित आहे. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तेच तुम्हाला सुंदर बनवतं. स्वतःची इतरांशी तुलना करणं बंद करा.
"संपूर्ण जगामध्ये जे काही घडत आहे त्यावर बोलणंही अत्यंत गरजेचं आहे. बाहेर पडा. स्वतःसाठी भूमिका घ्या कारण तुम्हीच स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास आहे, म्हणून मी आज इथे उभी आहे."
याआधी टॉप-5 च्या राऊंडमध्ये हरनाजला हवामान बदलाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
अनेक लोकांना हवामान बदल म्हणजे थोतांड आहे असं वाटतं, तुम्ही त्यांना समजावण्यासाठी काय कराल?, असा प्रश्न विचारल्यावर हरनाजचं उत्तर होतं, "मी निसर्गाकडे पाहते तेव्हा त्याला किती अडचणींचा सामना करावा लागत आहे हे पाहून मला वाईट वाटतं. हे सर्व आपल्या बेजबाबदार वर्तनामुळं घडतं.
"हा काळ कमी बोलण्याचा आणि जास्त काम करण्याचा आहे, असं मला ठामपणे वाटतं. कारण आपलं प्रत्येक पाऊल निसर्गाला वाचवू शकतं किंवा नष्ट करू शकतं. खबरदारी घेणं किंवा संवर्धन करणं हे पश्चात्ताप किंवा नंतर सुधारणा करण्यापेक्षा अधिक चांगलं आहे."
मानुषी छिल्लर
2017 मध्ये झालेल्या विश्वसुंदरी स्पर्धेत मानुषी छिल्लरने मुकुट पटकावला होता. या सौंदर्य स्पर्धेच्या विजेतेपदासाठी मानुषीला एक प्रश्न विचारण्यात आला होता : जगातल्या कोणत्या पेशासाठी सर्वाधिक पगार दिला गेला पाहिजे?

फोटो स्रोत, Getty Images
मानुषीनं उत्तर दिलं, "माझी आई हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यांत मोठी प्रेरणा आहे. कारण आईकडून मिळणारं प्रेम आणि आई होण्याचा सन्मान सर्वांत मोठा. त्यामुळे आई असणं हीच सगळ्यांत मोठी नोकरी आहे. आणि याला केवळ प्रश्न पैशानं मोजता येत नाही. म्हणून सगळ्यांत जास्त पगारावर तिचा पहिला हक्क आहे."
तिच्या उत्तरानं मनं, मुकुट आणि मिस वर्ल्ड 2017चा मान पटकावत भारतीयांना 17 वर्षांनंतर तो मोठा क्षण पुन्हा आणून दिला.
एखाद्या भारतीय तरुणींनं आपल्या उत्तरांनी विश्वसुंदरीचा मुकूट पटकावण्याची ही पहिली वेळ नव्हती. ही किमया मानुषीच्या आधी पाच भारतीय तरुणींनी केली आहे.
कोण होत्या त्या? आणि काय होती त्यांची उत्तरं? जाणून घेऊया.
रीता फारिया, 1966
रीता फारिया ही भारतातलीच नव्हे, तर आशियातली पहिली युवती होती जिनं मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.
स्पर्धेत भाग घेताना रिता वैद्यकीय शिक्षण घेत होती. पण मिस वर्ल्ड झाल्यावर तिनं फार काळ मॉडेलिंग नाही केली. ती डॉक्टर झाली आणि सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं.

फोटो स्रोत, INSTAGRAM/MISSWORLD
गेल्या वर्षी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत रीतानं मुकुट पटकावण्याआधी विचारलेल्या प्रश्नोत्तरांची माहिती दिली होती.
रीताला पर्सनॅलिटी राऊंडमध्ये विचारण्यात आलं होतं की "तुला नेमकं डॉक्टर का व्हायचं आहे?"
रिता म्हणाली, "भारतात महिला तज्ज्ञांची विशेष आवश्यकता आहे. तसंच भारतात लहान मुलांची संख्याही मोठी असून त्यांच्यासाठीही काम करण्याची गरज आहे."
सौंदर्य आणि समाजाचं भान, अशी उत्तम सांगड साधणाऱ्या रिताला विजेती घोषित करण्यात आलं.
ऐश्वर्या राय, 1994
ऐश्वर्याला विचारण्यात आलं होतं, "जर तुम्ही विश्वसुंदरीचा किताब पटकावलात तर पुढे काय कराल? आणि 1994 सालच्या विश्वसुंदरीमध्ये कोणते गुण असले पाहिजे?"

फोटो स्रोत, INSTAGRAM
ऐश्वर्याचं उत्तर होतं, "मी जर आज मिस वर्ल्ड झाली तर मी माझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण करेन. शांतता, दया आणि सौहार्दाचा संदेश देण्याचा मी प्रयत्न करेन. त्यामुळे आपला 'ब्यूटी विथ पर्पज' हा हेतू साध्य होऊन त्याला माझ्याकडून न्याय मिळेल."
"आतापर्यंत ज्या मिस वर्ल्ड झाल्या आहेत, त्यांनी सामान्यांबद्दल आतापर्यंत दया दाखविली आहे. एक सच्चा माणूस मिस वर्ल्डचा दावेदार आहे. धन्यवाद."
आणि पुढे काय घडलं, ते तर तुम्हाला माहीत आहेच.
डायना हेडन, 1997
आपण जर मिस वर्ल्ड झालात तर पारितोषिकाच्या रकमेचं काय कराल? तुम्ही ही रक्कम दान कराल का?
"मी मला मिळालेली रक्कम इतरांना का देऊ? ही रक्कम मी मित्र-परिवार किंवा कुटुंबावर खर्च करेन. माझ्या मनाप्रमाणे खर्च करेन किंवा त्याची गुंतवणूक करेन," असं वेगळं उत्तर डायना हेडननं दिलं.

फोटो स्रोत, Getty Images
एका मुलाखतीत डायना हेडननं या उत्तराबद्दल सांगितलं होतं - "परीक्षकांना नेहमी 'पृथ्वी वाचवायला हवी' आणि 'विश्वात शांतता नांदायला हवी', अशी उत्तरं या प्रश्नांवर येत असतं. पण, माझ्या उत्तरानं परिक्षक चक्रावून गेले. त्यांना या उत्तराची अपेक्षा नव्हती."
युक्ता मुखी, 1999
तुमचं आवडतं खाणं कोणतं? जर जगात तुम्हाला काही बनायला सांगितलं तर तुम्ही कोण व्हाल? त्यासाठी कोणत्या देशात जाल?

फोटो स्रोत, Getty Images
"मी गेल्या 20 वर्षांपासून भारतीय खाद्यपदार्थच खात असून त्यांना मी अजून बोअर झालेली नाही. पण माझं आवडतं खाद्य हे थाई फूड आहे," असं युक्ता म्हणाली.
"ब्रिटीश कलाकार आड्री हेपबर्नच्या सौंदर्याची आणि तिच्यातल्या दयाभावाची मी चाहती आहे. तिचं तेज आणि तिच्यातली शांतता तिच्या चेहऱ्यावर झळकते," हे तिच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं.
"आणि भारत वगळता मला फ्रान्सची राजधानी पॅरीसला जायची इच्छा आहे. कारण हा मॉडेल्सचा प्रदेश आहे," असं उत्तर देत युक्ता मुखी मिस वर्ल्ड झाली.
प्रियंका चोप्रा, 2000
आज भारतातल्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी प्रियंका चोप्रा 2000 साली मिस वर्ल्डच्या मुकुटापासून केवळ एक प्रश्न दूर होती. तो प्रश्न होता - "गेल्या वर्षीच्या सौंदर्य स्पर्धेची विजेती देखील भारतीयच होती. यामुळे तुमच्यावर दबाव आहे का? आणि हयात असलेल्या कोणत्या महिलेस आपण सगळ्यांत यशस्वी मानता?"
प्रियंका म्हणाली, "मी दबावात सगळ्यांत चांगलं काम करते. कारण जेव्हा दबाव असतो तेव्हा यशस्वी होण्यासाठी माझ्यात जोश संचारतो."
"असे अनेक जण आहेत ज्यांच्या कार्यामुळे मी प्रभावित झाले आहे. यांच्यापैकी एक महिला म्हणजे मदर तेरेसा या आहेत. त्या भावुक, उत्साही आणि मानवतावादी आहेत. त्यांनी आपलं सगळं आयुष्य लोकांच्या तोंडावर हसू उमटवण्यासाठी अर्पण केलं. मी त्यांचा मनापासून सन्मान करते."

फोटो स्रोत, Getty Images
प्रियांका चोप्राला 2000 साली विश्वसुंदरीचा किताब मिळाला खरा, पण तिच्या उत्तराची फार चर्चा झाली.
कारण तिला विचारण्यात आलं होतं की, तुम्ही "हयात असलेल्या" म्हणजे जिवंत असलेल्या कोणत्या महिलेला मानता. मात्र मदर तेरेसांचं निधन 1997 सालीच झालं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








