भीतीमुळे कुत्रा चावल्याचं घरच्यांना सांगितलं नाही, महिन्याभराने मुलाचा रेबीजने मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

14 वर्षांच्या मुलाला शेजाऱ्याचा कुत्रा चावला. भीतीमुळे या मुलाने ही गोष्ट घरच्यांना सांगितलीच नाही आणि महिन्याभरानंतर त्याचा मृत्यू झाला.

ही दुर्दैवी घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये.

आठवीमध्ये शिकणाऱ्या शहवाजचा सोमवारी (4 सप्टेंबर) मृत्यू झाल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

या घटनेचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरला होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहवाज विजय नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चरण सिंह कॉलनीत राहायचा. शहवाजला एक-दीड महिन्यापूर्वी शेजाऱ्यांचा कुत्रा चावला होता. मात्र, भीतीने आपल्या आई-वडिलांना त्याने ही गोष्ट सांगितलीच नाही.

त्यानंतर शहवाजला रेबीज झाला आणि एक सप्टेंबरपासून तो विचित्र वागायला लागला. त्यावेळी घरच्यांनी विचारल्यानंतर त्याने शेजाऱ्यांचा कुत्रा आपल्याला चावल्याचं सांगितलं.

ही गोष्ट कळल्याबरोबर शहवाजला दिल्लीतल्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं, मात्र त्याला तिथे दाखल करून घेतलं नाही.

त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की, शेवटी त्याला आयुर्वेदिक उपचारांसाठी बुलंदशहरात घेऊन गेले.

मात्र तिथून गाझियाबादला परत येत असताना अँब्युलन्समध्येच त्याचा मृत्यू झाला.

एसीपी निमिष पाटील यांनी सांगितलं की, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून कुत्र्याच्या मालकांवर कारवाई करण्यात येईल.

शहवाजच्या काकांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, इथे भटक्या कुत्र्यांकडूनही हल्ले होण्याचं प्रमाण जास्त आहे. कुत्रा चावण्याची ही घटना पहिल्यांदाच घडली नाहीये.

भटका कुत्रा

फोटो स्रोत, Getty Images

'रेबीज'. हा आजार अत्यंत जीवघेणा असून, वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. यामुळेच, जगभरात दरवर्षी 59 हजारपेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात.

रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात येतात. आशिया आणि अफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहे.

सामान्यांना या आजाराबाबत फार माहिती नाही. शहवाजालाही कदाचित यातला धोका कळला नसावा आणि ही गोष्ट त्याने घरच्यांपासून लपवली, जे त्याच्या जीवावर बेतलं.

रेबीज म्हणजे काय?

प्राणी चावल्यामुळे पसरणारा 'रेबीज' हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे.

रेबीजचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर, म्हणजेच मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते.

रेबीज

फोटो स्रोत, Getty Images

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रेबीज व्हायरस रुग्णाच्या मेंदूत शिरला तर रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा मृत्यू होऊ शकतो.

काही रुग्णांमध्ये पॅरालिसिसची (अर्धांगवायू) समस्या निर्माण होते. काहीवेळा रुग्णांच्या व्यवहारात अचानक बदल होतो आणि रुग्ण अधिक हायपर झालेले दिसून येतात.

प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सूपरटेल्स नावाच्या संस्थेत वरिष्ठ पशूवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉ. पूजा कडू सांगतात, "माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर रेबीज व्हायरस अत्यंत वेगाने पसरण्यास सुरूवात होते."

तज्ज्ञ म्हणतात, एकदा रेबीजचं निदान झालं तर या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय सर्वांत महत्त्वाचे आहेत.

रेबीज कसा पसरतो?

रेबीज प्रामुख्याने जंगली प्राण्यांमध्ये पण काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो.

रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून हा आजार पसरतो.

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (NCDC) माहितीनुसार, प्राण्यांनी चावल्यामुळे, अंगावर ओरखडे मारल्यामुळे, माणसांच्या अंगावरची उघडी जखम चाटल्यामुळे प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो.

भारतात 95 टक्के प्रकरणात माणसांना रेबीज होण्यामागे कुत्रा कारणीभूत आहे. तर, 2 टक्के प्रकरणात मांजर आणि 1 टक्के प्रकरणात कोल्हा किंवा मुंगूसामुळे रेबीज परसतो.

रेबीजची लक्षणं काय?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रेबीजची लक्षणं काहीवेळा फार उशीराने लक्षात येतात. पण, तोपर्यंत उपचार करणं अवघड होण्याची शक्यता असते.

नानावटी रुग्णालयाचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. हर्षद लिमये म्हणतात, "रेबीजचा संसर्ग झाल्यानंतर एका आठवड्यापासून ते एक वर्षात लक्षणं दिसू लागतात."

पण, सामान्यत: आजाराची लक्षणं 2-3 महिन्यात दिसून येतात.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार रेबीजची लक्षणं खालीलप्रमाणे-

  • ताप आणि अंगदुखी
  • व्हायरस सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये (चेतासंस्थेत) शिरल्यानंतर मेंदू आणि मणक्यात सूज येणं
  • फ्युरिअस रेबीजमध्ये रुग्णाचं वागणं बदलतं. रुग्ण हायपर होतो किंवा त्यांना पाण्याची भीती वाटू लागते
  • हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू होणं
  • पॅरेलॅटीक रेबीजमध्ये स्नायू हळूहळू कमकूवत होतात. रुग्ण कोमात जातो आणि त्यानंतर मृत्यू होतो

प्राणी चावलेली जागा स्वच्छ कशी करावी?

रेबीज व्हायरस प्राण्यांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर जखमेची जागा स्वच्छ करणं सर्वांत महत्त्वाचं आहे.

डॉ. लिमये म्हणतात, "प्राण्याने चावल्यानंतर जखमेवर योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संसर्ग शरीरातील इतर भागात पसरण्यावर नियंत्रण मिळवता येतं. ज्यामुळे पुढील गुंतागुंत कमी होते."

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (NCDC) प्राणी चावल्यामुळे झालेली जखम कशी स्वच्छ करावी यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्यात.

  • प्राणी चावल्यामुळे जखम झालेल्या जागेवरची लाळ लवकरात लवकर स्वच्छ करावी.
  • पाणी आणि साबणाने जखमेचा भाग 15 मिनिटं स्वच्छ धुवावा.
  • जखम धुवून झाल्यानंतर त्यावर अॅन्टिसेप्टिक लावावं.
  • साबण किंवा व्हायरसविरोधी पदार्थ (अल्कोहोल, प्रोव्हिडोन आयोडिन) उपलब्ध नसेल तर जखम पाण्याने धुवावी.
  • जखमेत संसर्ग होऊ नये यासाठी टीटॅनसचं इंजेक्शन घ्यावं.
  • कुत्रा चावलेल्या रुग्णाला मानसिक आधार द्यावा.
  • तात्काळ डॉक्टर किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय मदत घ्यावी.

डॉक्टरांकडे केव्हा जावं?

कुत्रा किंवा प्राणी चावल्यानंतर तात्काळ योग्य वैद्यकीय उपचार मिळाले तर रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो.

फोर्टिस रुग्णालयाचे आपात्कालीन-विभाग संचालक डॉ. संदीप गोरे म्हणतात, "कुत्रा किंवा मांजर चावल्यानंतर जखम झालेली जागा तात्काळ साबण आणि पाण्याने धुवून रुग्णालयात जावं. सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, रेबीजवर नियंत्रण हा एकमेव पर्याय आहे."

लोकांमध्ये रेबीज या आजाराबाबत आणि वैद्यकीय उपचारांबाबत जनजागृती नसल्याने लोक उशीरा डॉक्टरांकडे उपचारांसाठी पोहोचतात. काही प्रकरणात रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होईपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो.

तज्ज्ञ म्हणतात, प्राणी चावल्यानंतर किंवा प्राण्याने अंगावर ओरखडा मारल्यानंतर तात्काळ डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.

डॉ. हर्षद लिमये सांगतात, "प्राण्याने शरीरावर ओरखडा मारला असेल तर रुग्णाला तातडीने रेबीजची लस दिली जाते. पण, जखमेतून रक्त येत असेल किंवा प्राण्यांच्या लाळेशी संपर्क झाला असेल तर लशीसोबत रेबीज इम्युनोग्लोबिन देण्यात येतं."

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

प्राणी चावल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार घेतल्यामुळे लक्षणांवर योग्य उपचार होतात आणि रोगाचा प्रसार नियंत्रणात ठेवता येतो.

पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा कडू यांच्याकडून आम्ही प्राणी चावल्यानंतर रेबीजविरोधी लस कशी देण्यात येते याची माहिती आम्ही जाणून घेतली.

त्या सांगतात, "रेबीज प्रतिबंधासाठी रेबीजविरोधी लशीचे पाच डोस घ्यावे लागतात. प्राणी चावल्यानंतर त्याच दिवशी लस घ्यावी लागते. याला शून्य दिवस असं म्हटलं जातं. त्यानंतर तीन, सात, 14 आणि 28 व्या दिवशी रेबीजविरोधी लस घ्यावी लागते."

जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील प्राण्यांनी चावा घेतल्यानंतर अशाच पद्धतीने लसीकरणाबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)