राज ठाकरे: मराठी अस्मिता, सॉफ्ट हिंदुत्व, नरेंद्र मोदींना कट्टर विरोध ते भाजपला 'बिनशर्त पाठिंबा'

फोटो स्रोत, bbc
मंगळवारी (9 एप्रिल) गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे भाषण केलं. या भाषणावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं.
'नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून' आपण या लोकसभा निवडणुकीवेळी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करून 18 वर्षांचा काळ लोटला आहे. कुठल्याही राजकीय आणि सामाजिक विचारधारेसाठी पाळमुळं घट्ट करण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
पण गेल्या 18 वर्षांच्या काळात राज ठाकरे राजकीय आणि वैचारिक गोंधळात सापडले आहेत का, असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
साधारण दरवर्षी एक अशा वेगवेगळ्या आणि काही वेळेला विसंगत भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्या आहेत. राज यांच्या आतापर्यंतच्या भूमिकांवर नजर टाकूया.
पक्षाची स्थापना आणि 13 आमदार
9 मार्च 2006 रोजी शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवीन पक्षाची स्थापना केली. 18 वर्षांच्या राजकीय वाटचालीत मनसेनं अनेक चढउतार पाहिलेत.
पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार निवडून आले. त्यानंतर मात्र मनसेला असं यश मिळालं नाही.
सभांना गर्दी खेचणाऱ्या राज ठाकरेंना या गर्दीचं रुपांतर मतांमध्ये करता आलं नाही. मनसेचं प्रभावक्षेत्रही मुंबई आणि काही प्रमाणात नाशिकपलीकडे विस्तारलं नाही.

फोटो स्रोत, getty images
या काळात राज ठाकरेंनीही आपल्या भूमिका अनेकदा बदलल्या."माझ्या हातात सत्ता आली तर महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन, असं म्हणणारे राज ठाकरे प्रबळ विरोधी पक्षासाठी मला संधी द्या", अशी भाषा करू लागले. त्यांच्या भूमिकांमधला वैचारिक विरोधाभासही अधिकाधिक ठळकपणे समोर येऊ लागला.
मराठीचं हित ते हिंदुत्व, नरेंद्र मोदींची स्तुती ते त्यांना केलेला कडवा विरोध, शरद पवार- राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक ते भाजपशी संधान बांधण्याचा प्रयत्न आणि आता पुन्हा भाजपला थेट पाठिंबा, असा राज ठाकरेंचा राजकीय लंबक आता तरी स्थिरावेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या 18 वर्षांतला मनसेचा वैचारिक गोंधळ संपुष्टात येणार का, हा कळीचा मुद्दा आहे.
मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय
मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी आपण मराठी माणसाच्या हितासाठी काम करू, अशी भूमिका घेतली. मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या लोंढ्यांवर टीका केली.
त्या राज्यांतील राजकारण्यांमुळे तिथे रोजगार निर्माण झाला नाही आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात. त्यांतील सर्वांत जास्त लोंढा महाराष्ट्रात आणि मुंबईत येतात. तिथल्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचा भुर्दंड महाराष्ट्रातील जनतेने का भरावा? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता
अमिताभ बच्चन हे मुंबईत राहतात, मात्र सामाजिक कार्यासाठी ते आपल्या मूळ राज्याचीच निवड करतात, असं म्हणत राज यांनी बच्चन यांच्यावरही टीका केली होती.
ऑक्टोबर 2008मध्ये पश्चिम रेल्वेची कर्मचारी भरती परीक्षा मनसेनं उधळून लावली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाणही केली होती.

फोटो स्रोत, getty images
या पश्चिम रेल्वेच्या भर्तीसाठी बिहारी परीक्षार्थींचीच का निवड करण्यात आली, तसंच महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात परीक्षेची जाहिरात न देण्यास कारण काय? असा मनसेचा सवाल होता. यानंतर 'खळ्ळ खट्याक' हा शब्दप्रयोगच मनसेच्या आंदोलनांसाठी रुढ झाला. या घटनेनंतर राज ठाकरे यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं होतं.
मराठी पाट्या, मराठी चित्रपटांना अधिक शो मिळावेत म्हणून केलेली आंदोलन यामुळेही मनसे चर्चेत राहिली. पण या आंदोलनांपलिकडे मराठी माणसाच्या हितासाठी मनसेकडून फारशी रचनात्मक कृती घडली नाही.
2006 ते 2019 या 13 वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. परप्रांतीयांना विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी डिसेंबर 2018 मध्ये थेट उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
त्या मंचावरून बोलताना तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन अपमानित होता असं वाटत नाही. तुमचा स्वाभिमान कुठे आहे….तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न का विचारत नाही अशी विचारणा राज ठाकरेंनी उपस्थितांना केली.
सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका
एका बाजूला मराठीचा मुद्दा लावून धरताना राज ठाकरे कुठेतरी 'सॉफ्ट हिंदुत्वा'कडे झुकतानाही दिसत होते. ही बाब प्रकर्षानं समोर आली ती 2012 सालच्या आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान.
11 ऑगस्ट 2012 ला म्यानमार आणि आसाममध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध म्हणून काही मुस्लिम संघटनांनी आझाद मैदानावर रॅली काढली होती. या रॅलीमध्ये हिंसाचार झाला. पोलिसांवर तसंच काही पत्रकारांवरही हल्ला झाला.
राज ठाकरेंनी या हल्ल्यानंतर मुस्लीम संघटना आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यावरही टीका केली होती. या रॅलीला मोठ्या संख्येनं बांगलादेशी उपस्थित होते, असा आरोपही त्यांनी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला.
यात हिंदू विरुद्ध मुस्लीम त्यातही बांगलादेशी मुस्लीम अशी उघड भूमिका दिसत होती. विशेष म्हणजे हा तोच काळ होता, जेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा कडव्या हिंदुत्वाचा चेहरामोहरा बदलत होता.
महाराष्ट्रातल्या बदलत्या सत्ता समीकरणांमध्ये मनसे भाजपसोबत जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरे महाअधिवेशनात हिंदुत्ववादी भूमिकेचा उघड स्वीकार करणार का? हा प्रश्न आहे.

फोटो स्रोत, getty images
पत्रकार धवल कुलकर्णी यांनी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर 'द ठाकरे कझिन्स' हे पुस्तक लिहिलंय.
याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना धवल कुलकर्णी यांनी म्हटलं होतं, "राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे. दोघांचं राजकारण हे प्रतिक्रियावादी राहिलं आहे. त्यामुळे उद्धव हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यानंतर राज यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं.
"दुसरं म्हणजे राज यांनी जेव्हा पक्ष स्थापन केला, तेव्हा चार राजकीय पक्षांपलिकडेही प्रादेशिक पक्षांसाठी स्पेस आहे, अशी त्यांची भूमिका होती. ज्यामध्ये तथ्यंही होतं. राज ठाकरेंनी त्यांचा झेंडाही त्यावेळी पॉलिटिकली करेक्ट डिझाईन केला होता. पण राज ठाकरेंना 2017 मध्ये आपला झेंडा बदलायचा होता. तो काही काळानं राहून गेलं. आता कदाचित जो बहुसंख्यवाद वाढत आहे, त्याच्या लाटेवर स्वार होण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असावा.
"पण हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळताना मराठी आणि बौद्ध समाज हा विरोधात जाऊ शकतो, हेही पहायला हवं. दुसरं म्हणजे, हिंदुत्वाची भूमिका तात्कालिक फायदा मिळवून देते, पण त्यामुळे तुम्हाला ताकदीचा स्थानिक पक्ष होण्याला मर्यादा येतात. शिवसेनेनं त्यांच्या मध्यात ही भूमिका घेतल्यानं त्यांना तामिळनाडूमधल्या 'DMK' सारखा पक्ष होता आलं नाही. त्यांनी एक संधी गमावली. राज यांच्या पक्षाची स्थापना भाषिक मुद्द्यांतून झाली. पण तेही आता शिवसेनेच्याच रस्त्यावर जाताना दिसताहेत," असंही धवल कुलकर्णी यांनी म्हटलं होतं.
हात, घड्याळ की कमळ?
2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर राज ठाकरेंची भूमिका काय असेल? ते 'किंग मेकर' ठरणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला.
त्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मनसेची पीछेहाट होत गेली.
2019 मध्ये मनसेनं लोकसभेची निवडणूक लढविली नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राज ठाकरे यांचे असलेले संबंध, लोकसभा निवडणुकीच्यावेळी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींविरोधात केलेला प्रचार पाहता विधानसभा निवडणुकीच्यावेळेस मनसे आघाडीमध्ये सहभागी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती.
त्यातच जुलै 2019 मध्ये राज ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज यांनी थेट सोनिया गांधींची भेट घेतल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत अंमलबजावणी संचालनालयानं (ईडीनं) राज ठाकरे यांना ऑगस्ट 2019 मध्ये नोटीस बजावली. 22 ऑगस्टला त्यांची चौकशी करण्यात आली.
सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं चित्रच बदललं. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. ही भेट राज्यातील नवीन समीकरणांची नांदी आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
या भेटीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं, की राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू वा कायमचा मित्र नसतो."
"महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपण हे पाहिलं आहे - काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी एकत्र आले. महाराष्ट्रात शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र येताना आपण पाहिलं. जो काही निर्णय असेल तो राजसाहेब जाहीरपणे सांगतील."
अर्थात, लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींवर टीका केल्यानंतर राज ठाकरे भाजपसोबत कसे जाणार या प्रश्नाला उत्तर देताना संदीप देशपांडेंनी म्हटलं, "लोकसभेच्या वेळेस केलेली टीका ही भाजपवर केलेली टीका नव्हती तर मोदींवर केलेली टीका होती. राजसाहेबांनी त्यावेळेस भाषणात 'मोदीमुक्त भारत' झाला पाहिजे असं म्हटलं होतं. ते एका व्यक्तीबद्दल होतं. पक्षाबद्दल आम्ही काही म्हटलं नव्हतं. स्थानिक पातळीवर प्रश्न वेगळे असतात, समीकरणं वेगळी असतात. त्यादृष्टीनं स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातात. जर युतीसारखा मोठा निर्णय घ्यायचा असेलच तर तो राजसाहेबच घेतील."

फोटो स्रोत, getty images
आता मात्र राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे पाहूनच महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या या एकूण राजकीय प्रवासाबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी म्हटलं होतं, "दर कालांतरानं नवीन भूमिका घेणं हे 'मनसे'च्या मतदाराला पटणं अवघड जाईल. अनपेक्षितपणे या विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे मनसेला मतं मिळाली आहेत, ती पाहता लोकांना वाटतंय की राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरून पाय रोवावेत. एक पर्याय तयार करावा, पण ते जर कोण्या एका पक्षाच्या आधाराला जाणार असतील तर त्याचे काही तात्कालिक फायदे असतात, पण मर्यादा अनेक असतात."
नरेंद्र मोदींना पाठिंबा ते कट्टर विरोध
2019 च्या लोकसभा निवडणुका मनसेनं लढवल्या नव्हत्या. मात्र तरीही राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मोजक्या सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर कडाडून टीका केली होती.
मोदींची आश्वासनं, त्यांनी जाहीर केलेल्या योजना यांची आजची परिस्थिती काय आहे, याचं व्हीडिओ प्रेझेंटेशनच राज ठाकरे आपल्या सभांमधून द्यायचे. त्यांचं 'लाव रे तो व्हीडिओ' हे वाक्य प्रचारादरम्यान भरपूर गाजलं.
राज कोणासाठी प्रचार करत आहेत, हा प्रश्न त्यावेळी उपस्थित होत होता. पण राज यांनी आपण नरेंद्र मोदी-अमित शहांना मत देऊ नका, यासाठी प्रचार करतोय, असं स्पष्ट केलं होतं.

फोटो स्रोत, getty images
गुढीपाडव्याला घेतलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदाची संधी द्यायला काय हरकत आहे, असं विधानही केलं होतं.
पण नरेंद्र मोदींनी निवडून देऊ नका, असं म्हणणारे राज ठाकरेंनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता. नरेंद्र मोदी हे देशात पंतप्रधानपदासाठी एकमेव लायक उमेदवार आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं.
आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण या लोकसभा निवडणुकीवेळी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज यांनी सांगितलं.
शिवसेनेबाबतचा गोंधळ
2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राज ठाकरेंना युतीत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपने प्रयत्न केले होते.
2013 च्या दरम्यान हे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेनं सामनातून नाराजी व्यक्त केली होती. पण दुसरीकडे शिवसेना नेते टाळीसाठी हात पुढे असल्याचंही म्हणत होते. राज ठाकरेंनी या सगळ्याची खिल्ली उडवताना 'खिडकीतून डोळे कसले मारता', असं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, getty images
पण 2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळेस हे चित्र बदललं. महापालिका निवडणुकीत सेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
राज ठाकरेंनी उद्धव यांना फोन केला होता, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असंही वृत्त आलं होतं. राज ठाकरेंनी शिवसेना-मनसे युती अफवा असल्याचं नंतर म्हटलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)











