यवतमाळ-वाशिम लोकसभा : भावना गवळींना डावलून राजश्री पाटलांना शिंदेंच्या शिवेसनेची उमेदवारी

लोकसभा निवडणूक

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भावना गवळी यांना डावलून शिंदेंच्या शिवसेनेकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेचं वर्चस्व राहिलेला विदर्भातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर आता दोन्ही गटांनी याठिकाणची लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिंदेंच्या राजश्री पाटील यांच्या विरुद्ध आता ठाकरेंचे संजय देशमूख अशी याठिकाणी लढत होणार आहे.

महाविकास आघाडीचा विचार करता ठाकरे गटाच्या शिवसेनेनं या जागेवरची दावेदारी सिद्ध करत जागा मिळवली आहे.

भाजपमधून येत पुन्हा ठाकरेंचं शिवबंधन बांधलेले संजय देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी विद्यमान खासदार असल्या तरी शिंदेंच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव जाहीर केलं नाही. आता तर त्यांचा पत्ताच कट करण्यात आला आहे.

त्यामागचं गणित म्हणजे यवतमाळ-वाशिममधून भावना गवळींना असलेल्या विरोधामुळं त्यांचं तिकिट कापलं. त्यांच्या जागी राजश्री यांच्या रुपानं महिला उमेदवार दिल्या आहेत.

तसंच हेमंत पाटलांची नाराजीही पत्नीला तिकिट देऊन दूर केली आहे, असं सांगण्यात येत आहे.

राजश्री पाटील यांचा सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. तसंच त्यांची वक्तृत्व शैलीही चांगली असल्यामुळं त्याचा फायदा होऊ शकतो.

राजश्री पाटील तिरळे कुणबी समाजातील आहेत. यवतमाळ - वाशिम मतदारसंघात अंदाजे दीड लाखावर मतं या समाजाची आहेत.

ती मचं खेचण्यासाठी या उमेदवारीचा फायदा त्यांना होऊ शकतो.

ठाकरे गटाचे संजय देशमुख किती ताकदवान?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं स्वगृही परतलेल्या माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

संजय देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाल्यानंतर बराच काळ ते अपक्ष आमदार राहिले. त्यांनी 10 वर्ष दिग्रस आणि आर्णी मतदारसंघाचं विधानसभेमध्ये नेतृत्व केलं.

अपक्ष आमदार असतानाही मंत्रिपद मिळवण्याची किमया त्यांनी साधली होती. 2002 ते 2004 या काळात ते राज्यमंत्री होते.

संजय देशमुख

फोटो स्रोत, Sanjay Uttamrao Deshmukh

फोटो कॅप्शन, संजय देशमुख
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

संजय देशमुख आणि संजय राठोड यांची राजकीय कारकिर्द बऱ्याच अंशी समकालीन राहिली आहे. जिल्ह्यामध्ये या दोन्ही नेत्यांकडं एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणूनच पाहिलं जातं.

2019 मध्ये संजय देशमुख यांचा संजय राठोड यांनी पराभव केला होता.

शिवसेना तालुकाप्रमुख पदापासून ते पक्ष संघटनेतही काम केलं असल्यामुळं संजय देशमुख यांचा जनसंपर्क चांगला राहिलेला आहे.

तसंच शिवसेनेच्याच दोन गटांचे उमेदवार आमने-सामने असतील तर संजय देशमुख तगडं आव्हान उभं करू शकतात.

महायुतीच्या उमेदवाराची घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. महायुतीच्या गोटात सध्या अनेक नावांच्या चर्चा आणि दावे प्रतिदावे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

मतदारसंघातील विद्यमान आमदार भावना गवळी या पाचवेळा खासदार राहिलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना सलग सहाव्यांदा संधी मिळणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

काही दिवसांपासून शिंदे गटाकडून भावना गवळी यांची उमेदवारी कापत संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या.

यावर प्रतिक्रियाही समोर आल्या. भावना गवळींनी तर राठोड यांना उमेदवारी मिळाल्यास आपण त्यांच्या जागी विधानसभा लढवू असंही म्हटलं होतं.

भावना गवळी

फोटो स्रोत, FACEBOOK/BHAVANA PUNDLIKRAO GAWALI

फोटो कॅप्शन, भावना गवळी

त्याचवेळी ही जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार अशा चर्चाही जोरावर होत्या.

राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना तिकिट मिळावं यासाठीही प्रयत्न सुरू होते.

नाईक आणि गवळी यांच्यातील राजकीय संघर्षदेखिल इथं महत्त्वाचा ठरतो.

गुलाम नबी आझादांना इथून दिली उमेदवारी

मतदारसंघ पुनर्रचनेत दोन वेळा बदल झालेला आणि महाराष्ट्राला वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री देणारा हा मतदारसंघ आहे.

पूर्वीच्या खामगाव लोकसभा मतदारसंघाचं रुपांतर होऊ 1977 पासून हा मतदारसंघ वाशिम लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर 2008 मधील पुनर्रचनेनंतर हा यवतमाळ-वाशिम मतदारसंघ बनला.

प्रामुख्यानं 90 च्या दशकापर्यंत इथं काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं. 1977 मध्ये वसंतराव नाईक हे वाशिमचे खासदार बनले. त्यापूर्वी अर्जुन कस्तुरे दोन टर्म खासदार होते.

गुलाम नबी आझाद

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, गुलाम नबी आझाद

विशेष म्हणजे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले गुलाम नबी आझाद हे दोन वेळा इथून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर अनंतराव देशमुख यांनीही दोन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

1996 मध्ये शिवसेनेनं या मतदारसंघातलं अस्तित्व दाखवून दिलं. भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव गवळींनी काँग्रेसच्या ताब्यातून हा मतदारसंघ मिळवला. पण दोनच वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये सुधाकरराव नाईक यांनी पुन्हा काँग्रेसला इथं विजय मिळवून दिला.

त्यानंतर मात्र 1999 मध्ये भावना गवळी यांना शिवसेनेनं संधी दिली आणि त्यांनी विजय मिळवला. नंतर या मतदारसंघावरची पकड शिवसेनेनं सैल होऊ दिली नाही. सलग पाच टर्म भावना गवळी याठिकाणच्या खासदार आहेत.

2019 मध्ये माणिकराव ठाकरेंचा पराभव

शिवसेनेनं 2019 मध्ये भावना गवळी यांना उमेदवारी देत त्यांना सलग पाचव्यांदा खासदार बनण्याची संधी दिली. शिवसेनेला बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ राखण्यात पुन्हा एकदा त्यांना यश आलं आणि त्यांनी विजय मिळवला होता.

काँग्रेसनं अनेक दिग्गज नेते दिलेल्या या मतदारसंघातून 2019 मध्ये भावना गवळी यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रमुख नेते माणिकराव ठाकरे यांना गवळी यांच्या विरोधात मैदानात उतरवलं.

माणिकराव ठाकरे

फोटो स्रोत, Manikrao Thakare

फोटो कॅप्शन, माणिकराव ठाकरे

भावना गवळी यांनी या निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांचा जवळपास एका लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव केला. वंचित बहुजन आघाडीची यात महत्त्वाची भूमिका होती, असं म्हणता येऊ शकतं.

वंचितच्या उमेदवारानं या निवडणुकीत 95 हजारांच्या आसपास मतं मिळवली होती. त्यामुळं त्याचा फायदा तेव्हा महायुतीला झाला असं सांगितलं जातं.

गेल्या चार वर्षांतली स्थिती काय आहे?

विधानसभा मतदारसंघांचा विचार करता या मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील दोन आणि यवतमाळमधील चार मतदारसंघांचा समावेश होतो. त्यापैकी 4 ठिकाणी भाजप, एका ठिकाणी शिंदे गट तर एका ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळं तसं पाहिलं तर सगळीकडं महायुतीचं वर्चस्व दिसतं.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर या मतदारसंघातील शिवसेनेचे एकमेव आमदार आणि मंत्री संजय राठोड आणि मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी दोघंही एकनाथ शिंदेंबरोबर गेले.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील जागा

फोटो स्रोत, bbc

ठाकरे गटाकडून वारंवार ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं या नेत्यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे. या घडामोडींनंतर आता मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसभेच्या दृष्टीनं या मतदारसंघात कायमच शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. त्यामुळं ठाकरे गटाकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे.

निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारी आणि पर्यायानं प्रचाराच्या बाबतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आगेकूच केली आहे. तर महायुतीचं घोडं मात्र उमेदवारीवर अडल्याचं दिसून आलं.

भाजप, शिंदे गट आणि अजित पवार एकत्र असल्यानं त्यांची शक्ती नक्कीच वाढली आहे. पण त्याचबरोबर उमेदवारीवरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता कोण कुणाला किती मदत करणार असा प्रश्नही निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

त्याचवेळी दुसऱ्या गटातही काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आहेच. शिवाय संजय देशमुखांचा जनसंपर्क आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून असलेली पोहोच याचाही त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.

महाराष्ट्रात कापसाचं सर्वाधिक उत्पादन यवतमाळ जिल्ह्यात घेतलं जातं.

फोटो स्रोत, bbc

फोटो कॅप्शन, महाराष्ट्रात कापसाचं सर्वाधिक उत्पादन यवतमाळ जिल्ह्यात घेतलं जातं.

वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी सुभाष पवार यांना मैदानात उतरवलं आहे. वंचितनं जास्त मतं मिळवली तर महाविकास आघाडीच्या मतांमधून त्याचं विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामीण भागातील मतदारांची लक्षणीय संख्या पाहता मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न कॉटन सेझ, शेतमालावर प्रक्रिया उद्योग हेही मुद्दे महत्त्वाचे आहेत. तसंच आरोग्य, बेरोजगारी, रेल्वे या प्रश्नांवरही लोक मत मांडत असल्याचं पाहायला मिळत आहेत.

या मतदारसंघामध्ये जातीय समीकरणांचा बराच प्रभाव पाहायला मिळतो. प्रामुख्यानं या मतदारसंघात बंजारा आणि मराठा-कुणबी समुदायाचं प्राबल्य पाहायला मिळतं. त्यामुळं राठोड किंवा नाईक यांच्या उमेदवारीनं महायुती डाव खेळू शकते.

त्यामुळं आता हा मतदारसंघ मिळवण्यासाठी नेमकी कुणाची चाल अधिक प्रभावी ठरणार आणि मतदार कुणाला चेकमेट करणार हे 4 जूनच्या निकालातच समोर येईल.