हैदराबादमध्ये भीषण आग, 8 लहान मुलांसह 17 जणांचा मृत्यू; दुर्घटनेमागचं नेमकं कारण काय?

फोटो स्रोत, UGC
हैदरबाद शहरातील चारमिनारया जवळच्या परिसरातील गुलजार हाऊसमध्ये रविवारी (19 मे) भीषण आग लागली.
या आगीत 17 जणांचा मृत्यू झाल्याचं तेलंगणा अग्निशमन सेवेचे महासंचालक नागी रेड्डी यांनी सांगितलं.
शॉर्ट सर्किटमुळं ही दुर्घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
(इशारा - मजकूर विचलित करणारा असू शकतो)
चारमिनार जवळ असलेल्या गुलजार हाऊस चौकातील ही इमारत जी+2 म्हणजे दोन मजल्यांची होती. तेलंगणा अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदनात ही माहिती दिली.

फोटो स्रोत, ANI
आग सुरुवातीला भूमजल्यावर लागली आणि त्यानंतर वरच्या मजल्यावर पसरली अशी माहितीही त्यांनी दिली.
यात पहिल्या मजल्यावर 17 जण अडकलेले होते. त्यांना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात पोहोचवल्याचंही त्यांनी सांगितलं.
आग विझवण्यासाठी 11 बंब, एक अग्निशमन रोबो, 17 अग्निशमन अधिकारी आणि 70 कर्मचाऱ्यांचं पथक प्रयत्न करत होतं. त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवपास 2 तासांचा वेळ लागला.
प्रवेशासाठी एकच रस्ता, तोही अरुंद
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 8 लहान मुलांचाही समावेश आहे. त्या सर्वांचे वय 10 पेक्षा कमी असल्याचंही महासंचालक नागी रेड्डी यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, UGC
"ही इमारत जुनी होती. आत जाण्यासाठी एकच रस्ता होता तोही अरुंद. आतमध्ये दोन दुकानं होती. सर्वकाही जळालं. याठिकाणी रहिवासी भागही होता. त्यामुळं पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी योग्य रस्ता नव्हता. आत प्रवेश करायला जागाच नव्हती," असं ते म्हणाले.
शॉर्ट सर्किटमुळं अपघात झाल्याचं ते म्हणाले.
पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादेतील या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांसाठी राष्ट्रीय मदत निधीतून 2-2 लाखांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. जखमींसाठीही 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. मदतकार्याचा वेग वाढवून उपचारासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची नुकसान भरपाईही जाहीर केली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











