लंडनहून सिंगापूरला चाललेल्या विमानात टर्ब्युलन्समुळे एका व्यक्तीचा मृत्यू, 30 जण जखमी

21 मे रोजीच्या बातम्या तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.

थोडक्यात

  • भाजपाची जयंत सिन्हा यांना नोटीस, ‘मतदान का केलं नाहीत?’
  • स्वाती मालीवाल या भाजपच्या एजंट आहेत असा आरोप 'आप'ने केला आहे. याला स्वाती मालीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे
  • भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पंतप्रधान मोदी आणि जगन्नाथ यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नाराजी दर्शवली.

लाईव्ह कव्हरेज

ओंकार आणि तुषार

  1. लंडनहून सिंगापूरला चाललेल्या विमानात टर्ब्युलन्समुळे एका व्यक्तीचा मृत्यू, 30 जण जखमी

    लंडनहून सिंगापूरला चाललेल्या विमानाची अवस्था

    फोटो स्रोत, Reuters

    फोटो कॅप्शन, लंडनहून सिंगापूरला चाललेल्या विमानाची अवस्था

    लंडनहून सिंगापूरला जात असलेल्या एका फ्लाइटमध्ये टर्बलन्ससमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या टर्ब्युलन्सलमुळे 30 लोक जखमी झाले असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे.

    बँकॉक विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत 73 वर्षांच्या एका ब्रिटीश व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

    अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, त्यांचा मृत्यू कदाचित हार्ट अटॅकमुळे झालेला असू शकतो.

    लंडनहून सिंगापूरला चाललेल्या विमानाची अवस्था

    फोटो स्रोत, Reuters

    फोटो कॅप्शन, लंडनहून सिंगापूरला चाललेल्या विमानाची अवस्था

    सिंगापूरला चाललेल्या या विमानाचं लँडिंग बँकॉकमध्येच करावं लागलं.

    एअरलाइनच्या निवेदनानुसार या बोईंग 777-300 ईआर विमानात एकूण 211 प्रवासी होते आणि 18 क्रू मेंबर्स होते.

    लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानाची अवस्था

    फोटो स्रोत, Reuters

    फोटो कॅप्शन, लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानाची अवस्था

    आपल्या कुटुंबासोबत या विमानातून प्रवास करत असलेल्या एका ब्रिटीश व्यक्तीने सांगितलं की, विमान किमान दहा तास हवेत होतं.

    त्यांनी सांगितलं की, लोक निवांतपणे विमानात फिरत होते आणि सीट बेल्ट लावण्याचा कोणताही संकेत दिला गेला नव्हता.

    अचानक आलेला हा टर्बुलन्स इतका जोरात होता की ते थेट छताला धडकले आणि त्यांचा मुलगाही लांब पडला.

  2. महाराष्ट्रात कुठे उष्णतेची लाट, तर कुठे सोसाट्याचा वारा

    उष्णतेचा कडाका

    फोटो स्रोत, Getty Images

    महाराष्ट्रात एकीकडे सोसाट्याचा वारा आणि दुसरीकडे उष्णतेची लाट असं चित्र आहे.

    21 मे रोजी जळगाव येथे राज्यात सर्वाधिक म्हणजे 43.9 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. तर सातारा येथे 21°C हे सर्वात कमी किमान तापमान होते.

    हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील. तर दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि ताशी 40-50 किमी वेगाने वाहणारा सोसाट्याचा वारा तसंच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    हवामान विभाग

    फोटो स्रोत, bbc

    दरम्यान दक्षिण भारतात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी वातावरण अनुकूल बनत आहे. तर बंगालच्या उपसागरात 22 मेच्या आसपास कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची आणि ते आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

    त्या पार्श्वभूमीवर ओरिसामध्ये पाऊस पडू शकतो. उत्तर आणि वायव्य भारतात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

  3. पुणे अपघात : बाल न्याय मंडळाची भूमिका आमच्यासाठीही धक्कादायक - फडणवीस

    पुण्यात अल्पवयीन आरोपीनं कारनं दुचाकीवरील दोघांना चिरडून मारल्यानंतर, दोन दिवसांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल झाले आणि पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून आतापर्यंतच्या कारवाईची माहिती दिली.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत रिमांडचा अर्ज Juvenile Justice Board अर्थात बाल न्याय मंडळाकडे सादर केला होता. त्यात 304 चा कलम नमूद करून स्पष्टपणे लिहिलं आहे की, हा मुलगा 17 वर्षे 8 महिन्यांचा आहे.

    "निर्भया प्रकरणानंतर झालेल्या दुरुस्तीनंतर जर अल्पवयीन गुन्हेगार हा सोळा वर्षे वयापेक्षा जास्त असेल आणि त्याचा गुन्हा हा निर्घृण असेल तर त्याला प्रौढ म्हणूनच वागवलं पाहिजे. पण या अर्जावर दुर्दैवाने बाल न्याय मंडळाने त्यावर केवळ अर्ज मिळाल्याचा शेरा मारला. याचा पोलिसांनाही धक्का बसला."

    देवेंद्र फडणवीस

    फोटो स्रोत, ANI

    बाल न्याय मंडळाने घेतलेली भूमिका ही शासनाच्या आणि नागरिकांच्या मनात शंका निर्माण करणारी असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

    देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "पोलिसांनी याविरोधात वरच्या कोर्टात अपील केलं. मात्र, त्यांनी हा अर्ज पुन्हा बाल न्याय मंडळाकडे पाठवण्याची सूचना केली. कारण त्यांचा निर्णय तेच मागे घेऊ शकतात. पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलं असून दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. एक म्हणजे आरोपी अल्पवयीन असतानाही त्याला दारु दिल्याबद्दल आणि दुसरा म्हणजे आरोपीच्या वडिलांवर. आपला मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला गाडी दिल्याबद्दल."

    पुण्यात कारनं दुचाकीवरील दोघांना चिरडल्याचं संपूर्ण प्रकरण काय आहे, त्यात आतापर्यंत काय काय घडलंय, जाणून घेण्यासाठी या बातमीवर क्लिक करा.

  4. कोसळलेल्या बोल्टिमोर पुलाखाली अडकलेलं जहाज दोन महिन्यानंतर सुटलं तेव्हा...

    व्हीडिओ कॅप्शन, बोल्टिमोर पुलाखाली अडकलेलं जहाज दोन महिन्यानंतर सुटलं तेव्हा...
  5. बारावीचा निकाल जाहीर, मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी; 'इथे' पाहता येईल निकाल

  6. विमानांशी झालेल्या धडकेमुळे मुंबईत 30 हून अधिक फ्लेमिंगोंचा मृत्यू

    मुंबईत सोमवारी रात्री तीसहून अधिक फ्लेमिंगोंचा विमानाशी धडकेमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईच्या घाटकोपर उपनगरातील इथे लक्ष्मीनगर परिसरात ही घटना घडली.

    वनविभागाने मृत फ्लेमिंगोला शवविच्छेदनासाठी पाठवले असून मंगळवारी सकाळी परिसरात आणखी जखमी फ्लेमिंगोचा शोध सुरू होता.

    एमिरेट्स या विमानसेवेचं दुबईहून येणारं E508 हे विमान मुंबईत सहार इथल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) उतरत होतं.. त्यावेळी रात्री पावणेनऊच्या सुमारास, साधारण 8:40 – 8:50 वाजता ही दुर्घटना घडली. विमानतळावरील सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.

    या विमानात तीनशे प्रवासी होते आणि ते सुरक्षित आहेत. पक्ष्यांची टक्कर झाल्यानंतर विमानाची सुरक्षा तपासणी केली जात असल्याची माहिती मिळते आहे.

    फ्लेमिंगो

    फोटो स्रोत, PRASHANT NANAVARE

    एमिरेट्स अथवा एयर ट्रॅफिक कंट्रोलनं अजून याविषयी कुठली अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. स्थानिक रहिवाशांकडून घटनेची माहिती मिळताच कांदळवन सुरक्षा कक्षाचे वनसंरक्षक आणि अधिकारी तिथे पोहोचले. मात्र तपासासाठी एयरपोर्टवर जाण्याची परवानगी मिळाली नसल्याचं त्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं.

    जिथे या फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला, तो परिसर घाटकोपर पूर्वेला विक्रोळीनजीक आहे. हा भाग विमानतळाच्या मुख्य धावपट्टीच्या सरळ रेषेत आहे, तर इथून पू्र्व दिशेला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि त्या पलीकडे ठाणे खाडीकाठी पाणथळ जागा आहेत.

    या खाडीनजीकच्या कांदळवनांच्या परिसरात दरवर्षी लाखो फ्लेमिंग पक्षी स्थलांतर करून येतात. त्यामुळे इथे संरक्षित क्षेत्र आणि अभयारण्यही आहे.

    मात्र आजवर कधी फ्लेमिंगोची विमानांशी टक्कर झाल्याची घटना घडल्याची नोंद नाही.

    नेमके कशामुळे हे पक्षी विमानाच्या मार्गात आले याचा तपास सुरू आहे. पर्यावरणप्रेमींनी या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांकड बोट दाखवलं आहे.

    फ्लेमिंगो

    फोटो स्रोत, KEDAR BHAT

    वनशक्ती या संस्थेसाठी काम करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि पाणथळ जागांविषयी समितीचे सदस्य डी स्टालिन सांगतात, "फ्लेमिंगोंसाठी संरक्षित क्षेत्रात नवी वीजवाहिनी टाकली आहे, ज्यामुळे पक्ष्यांना अडथळे येतात. या पॉवरलाईन्सना इथून नेण्यास परवानगी द्यायला नको होती, त्यांच्याकडे बाकीचे पर्यायी मार्गही होते. आधी अभयारण्यातून वीजेच्या तारा न्यायला परवानगी नव्हती पण वनविभागाचे अधिकारी वीजकंपनीसमोर झुकले. खाडीतल्या अभयारण्यात भर टाकून विजेचे टॉवर्स उभारण्यात आले."

    स्टालिन यांनी असाही दावा केला आहे की, "या खाडीपलीकडे नवी मुंबईत NRI काँप्लेक्स आणि चाणक्य तलावाजवळच्या परिसरात बांधकाम करण्याच्या उद्देशानं फ्लेमिंगोंना हुसकावून लावण्याचे प्रयत्न गेल्या महिन्यापासून दिसून आले आहेत. रात्रीच्या वेळी कोणी या पक्ष्यांना हुसकावूनन लावायचा प्रयत्न केला असेल तर ते या बाजूला उडत आले असण्याची शक्यता आहे."

    या संदर्भात वीजकंपनी अथवा नवी मुंबईतील विकासकामांवर देखरेख ठेवणारं महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) यांची प्रतिक्रिया अजून आलेली नाही.

    काही दिवसांपूर्वी (27 एप्रिल 2024) नवी मुंबईच्या DPSs तलावाजवळ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

  7. भाजपाची जयंत सिन्हा यांना नोटीस, ‘मतदान का केलं नाहीत?’

    हजारीबाग लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी झालेल्या मतदानात मत द्यायला का गेला नाहीत आणि भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला मदत का केली नाहीत अशी नोटीस भाजपानं माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

    झारखंड भाजपाचे महामंत्री आणि राज्यसभा खासदार आदित्य साहू यांनी पत्र पाठवून जयंत सिन्हा यांना 2 दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहेत.

    आदित्य साहू लिहितात, “लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जेव्हापासून हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून पक्षाद्वारे श्री मनिष जयस्वाल यांना उमेदवारी घोषित केली आहे. तेव्हापासून तुम्ही निवडणूक प्रचार-प्रसार किंवा संघटनात्मक कार्यात सहभाग घेतलेला नाही. त्याचप्रमाणे आपला मताधिकार बजावासाही वाटला नाही. तुमच्या या भूमिकेमुळे पक्षाची प्रतिमा धुळीस मिळाली आहे.

    भाजपाचे माननीय प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांच्या निर्देशानुसार याबाबतीत दोन दिवसांत स्पष्टीकरण आपण द्यावे.”

    जयंत सिन्हा सध्या हजारीबागचे खासदार आहेत. ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्रीही होते, मात्र भाजपानं या निवडणुकीत त्यांना तिकीट दिलं नाही. 20 मे रोजी झालेल्या मतदानावेळीस जयंत सिन्हा मत द्यायला गेले नाहीत. मात्र त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आपल्या पत्नीसह मतदान करुन आले.

    भाजपाची जयंत सिन्हा यांना नोटीस, ‘मत का दिलं नाहीत?’

    फोटो स्रोत, ANI

    जयंत सिन्हा यांनी यावर कोणतीही टीप्पणी सार्वजनिकरित्या केलेली नाही. त्यांचे पुत्र आशिर सिन्हा काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये गेले आहेत. तर यशवंत सिन्हा यांनीही आधीपासूनत इंडिया आघाडीला पाठिंबा दिला आहे.

    जयंत यांच्याप्रमाणे धनबादचे आमदार राज सिन्हा यांनाही नोटीस देण्यात आली आहे. भाजपा उमेदवाराला सहकार्य का करत नसल्याचा प्रश्न या नोटिशीत विचारण्यात आला आहे. राज सिन्हा यांच्यासह धनबाद जिल्ह्यातील भाजपाच्या 5 मंडल अध्यक्षांना हा प्रश्न विचारण्यात आला आहे.

  8. निवडणूक आयोगावर यावेळी इतकी टीका का झाली, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला तडा गेलाय का?

    निवडणूक आयोगावर सातत्याने निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे त्यांची प्रतिमा ढासळली आहे का ?

    फोटो स्रोत, ANI

    लोकसभा निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर यापूर्वी कधी नाही झाली इतकी टीका निवडणूक आयोगावर होताना दिसत आहे.

    आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळेनिवडणूक आयोगवादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. निवडणूक आयोगाबद्दल निर्माण झालेल्या विविध मुद्द्यांचा हा आढावा...

    भारतात 1952 मध्ये जेव्हापहिल्यांदाच निवडणुकाघेतल्या जाणार होत्या तेव्हा अनेकांना वाटलं होतं की ही सर्व प्रक्रिया कशी पार पडणार.

    त्यावेळेस जवळपास 17 कोटी मतदारांमध्ये फक्त 15 टक्के मतदार वाचू आणि लिहू शकत होते. त्यामुळे अशी भीती होती की कट्टरपंथी गट या गोष्टीचा फायदा सांप्रदायिक तणाव वाढवण्यासाठी करतील.

    सर्व जगाचं लक्ष त्यावेळेस भारतावर होतं. स्वतंत्र झालेल्या भारतात असंख्य आव्हानं आणि प्रश्नांना तोंड देत यशस्वीरित्या निवडणुका पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाचं प्रचंड कौतुक झालं होतं.

    या भारतीय लोकशाही प्रक्रियेला आधीसुकुमार सेनआणि नंतरच्या काळातटी.एन. शेषन, जे.एम. लिंगडोह यांच्यासारख्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी बळकटी दिली.

    निवडणुका स्वतंत्रपणे आणि तटस्थपणे करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावरच आहे.संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- निवडणूक आयोगावर सातत्याने निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे त्यांची प्रतिमा ढासळली आहे का ?

  9. स्वाती मालीवाल म्हणतात, विभव कुमारविरोधात तक्रारीनंतर लेडी सिंघमची भाजपा एजंट झाले?

    स्वाती मालीवाल म्हणतात, विभव कुमारविरोधात तक्रारीनंतर लेडी सिंघमची भाजपा एजंट झाले?

    फोटो स्रोत, ANI

    आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल आणि त्यांचा पक्ष यांच्यामधीन बेदिली दिवसेंदिवस वाढत चालली आहे. माझ्याविरोधात पक्षाने पसरवलेल्या प्रत्येक असत्याविरोधात मी कोर्टात जाणार असा निश्चय त्यांनी बोलून दाखवला आहे.

    अरविंद केजरीवाल यांचे नीकटवर्तीय विभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप स्वाती यांनी केला होता. त्यानंतर मालीवाल या खोटं बोलत आहे असा आरोप त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी केला होता.

    @SwatiJaiHind

    फोटो स्रोत, @SwatiJaiHind

    स्वाती मालीवाल यांच्याविरोधात एक भ्रष्टाचाराचं प्रकरण होतं, त्याचा खटला सुरू होता त्यामुळेच त्या भाजपाच्या षड्यंत्राच्या चेहरा बनल्या आहेत असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

    त्यावर मालीवाल यांनी उत्तर दिलं आहे.

    त्यांनी एक्स वर लिहिलंय, “कालपासून दिल्लीचे मंत्री असत्य पसरवत आहेत की माझ्यावर भ्रष्टाचारासंबंधी एफआयआर झालाय म्हणून भाजपाच्या इशाऱ्यामुळे मी हे सगळं केलं आहे, हा एफआयआर 6 वर्षांपूर्वी 2016 साली झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री आणि एलजी दोङांनी मला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमलं. ही केस पूर्णतः खोटी आहे. त्यावर गेले दीड वर्ष माननीय उच्च न्यायालयाने स्टे आणला आहे. त्यांनी पैशाची कोणतीही देवाणघेवाण झाली नसल्याचं मान्य केलं आहे.”

    विभव कुमारविरोधात तक्रार केल्यावर मी यांच्या हिशेबाने लेडी सिंघम होते त्याची आज भाजपा एजंट झाले? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

  10. नमस्कार

    देशात निवडणुका सुरू आहेत. पाच टप्प्यातील मतदान आता संपले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.

    या सर्व घडामोडी तुम्हाला बीबीसी मराठीच्या या पेजवर वाचायला मिळतील.

    20 मे च्या घडामोडी आणि अपडेट्स वाचण्यासाठी या पेजला भेट द्यावी.