मुंबईत अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा, मुद्दाम उशीर केल्याचा ठाकरेंचा आरोप

दिवसभरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.

थोडक्यात

  • इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन
  • इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यातील हेलिकॉप्टरला 19 मे रोजी अपघात झाला होता.
  • इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर शोधण्यासाठी मोहीम सुरू आहे.
  • आज राज्यात मतदानाचा पाचवा आणि अंतिम टप्पा आहे. मुंबई, ठाणे, नाशिक या प्रमुख शहरांत आज होणार मतदान

लाईव्ह कव्हरेज

नितीन आणि नामदेव

  1. मुंबईत अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा, मुद्दाम उशीर केल्याचा ठाकरेंचा आरोप

    मतदारांची रांग.
    फोटो कॅप्शन, मुंबईत अँटॉप हिलमधील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारांच्या रांगा.

    लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानात आज मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील एकूण 13 मतदारसंघांसाठी मतदान झालं. या 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान झालं.

    यात मुंबईत अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेबाबत नाराजीच्या तक्रारी पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी गोंधळ झाल्याचंही पाहायला मिळालं.

    मुंबईत अनेक मतदान केंद्रांबाहेर लांबच्या लांब रांगा असल्याचं पाहायला मिळालं. प्रचंड उन्हामुळं अनेक मतदार मतदान न करताच परतले, अशा तक्रारीही करण्यात आल्या.

    तसंच, कल्याण, पवई, आर.ए.कॉलनी अशा, माहीम अशा काही भागांमध्ये गदारोळ झाल्याचंही समोर आलं.

    उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली. तसंच मतदान कमी व्हावं म्हणून मुद्दाम मतदान केंद्रांमध्ये उशीर केला जात असल्याची तक्रार करण्यात आली.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शिवसेनेचे आरोप फेटाळून लावले.

    नागरिकांची तक्रार

    दोन तासापासून रांगेत उभे आहोत पण पाण्याची किंवा इतर काहीही सोय नाही. तसंच, मतदान केंद्रात सोडायलाही उशीर केला जात असल्याची तक्रार अँटॉप हिल येथील मतदान केंद्रातील नागरिकांनी केली.

    मतदार मतदान न करताच गेले - उद्धव ठाकरे

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला.

    निवडणूक आयोगाकडून जाणूनबुजून पक्षपातीपणा केला जात असल्याची तक्रार उद्धव ठाकरे यांनी केली. "मतदार मोठ्या संख्येनं मतदानासाठी आले. पण त्यांना वेळ लावून ताटकळत ठेवल्यानं मतदार परतत आहेत," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    मतदारांनी मतदान केंद्रावर जावं आणि कितीही उशीर झाला तरी मतदान होईपर्यंत तिथून जाऊ नये, असं आवाहन ठाकरेंनी केलं.

    मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करू नये म्हणून मोदी सरकारचा हा डाव असल्याची तक्रारही त्यांनी केलं. शिवसेनेला ज्या भागात मतदान जास्त होतं, त्या भागातून तक्रारी मिळाल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

    मोदी सरकार पराभवाच्या भीतीनं पछाडलं आहे. त्यामुळं ते मुद्दाम लोकांना ताटकळत ठेवत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अत्यंत घाणेरडा खेळ खेळला जात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

    आदित्य ठाकरेंची तक्रार

    आदित्य ठाकरे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून निवडणूक आयोगाच्या सावळ्या गोंधळाची तक्रार केली. निवडणूक आयोगानं मतदारांसाठी पुरेशी व्यवस्था केली नसल्याचं ते म्हणाले. मतदार तासनतास उन्हात उभे आहेत. सावली, पाणी, पंखे अशी काहीही व्यवस्था नाही. आम्ही सोयी करू शकत नाही, पण निवडणूक आयोगानं व्यवस्था का केली नाही, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

    आदेश बांदेकरांनी शेअर केला व्हिडिओ

    शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनीही मुंबईच्या पवई भागातील परिस्थितीबाबतचा व्हिडिओ पोस्ट करत तक्रार केली. याठिकाणी यंत्र बंद पडल्यामुळं सुमारे तासभर मतदान प्रक्रिया बंद होती, अशी तक्रार काही नागरिकांनी केली.

    Instagram पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    Instagram पोस्ट समाप्त

    रांगेत असलेल्या प्रत्येकाला मतदान करता येणार - निवडणूक आयोग

    अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी मात्र 6 पर्यंत रांगेत असलेल्या प्रत्येक मतदाराचं मतदान झाल्याशिवाय मतदान प्रक्रिया थांबणार नसल्याचं सांगितलं. नियमानुसार सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या परिसरात रांगेत असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

    उद्धव ठाकरेंचे रडगाणे - फडणवीस

    देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांनंतर उद्धव ठाकरेंवर टीका केली.

    मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली, असं फडणवीसांनी सांगितलं.

    "नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे सुरू केलीय," असं फडणवीस म्हणाले.

    4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी उद्धव ठाकरे आताच तयार करीत आहेत. तसंच निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचंही ते म्हणाले.

  2. नेतन्याहू आणि हमासच्या नेत्यांविरोधात अटक वॉरंट जारी करा - आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय

    इस्रायल

    फोटो स्रोत, Reuters

    आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयानं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि गाझामधील हमास संघटनेचे वरिष्ठ नेत्यांविरोधात युद्ध गुन्ह्याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्याची मागणी केलीय.

    विधिज्ज्ञ करीम खान म्हणाले की, "7 ऑक्टोबर 2023 पासून मानवतेविरोधात गुन्हे केल्याची आणि युद्ध गुन्हे केल्याची या दोघांवरही जबाबदारी ठेवण्यायोग्य कारणं दिसून येतात."

    हेगस्थित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय गेल्या तीन वर्षांपासून इस्रायलच्या कारवाईबाबत चौकशी करत आहे, तसंच गेल्या हमासनं केलेल्या हल्ल्याचीही चौकशी करत आहे.

    आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाच्या वकिलांनी सांगितलं की, "माझ्या कार्यालयानं जे पुरावे गोळा केले आहेत आणि त्यांची तपासणी केली, त्याआधारे हे म्हणता येऊ शकतं की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलेंट हे गाझामध्ये झालेल्या युद्ध गुन्ह्यांसाठी जबाबदार आहेत."

  3. निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतंय का? - उद्धव ठाकरे

    मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय. तसंच, निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतंय का, असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.

    मतदानाची वेळ संपण्यास अवघ्या काही मिनिटांचा अवधी असताना, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केलीय.

    उद्धव ठाकरे

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे

    उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

    • थोडा वेळ जरी राहिला असला तरी मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका.
    • मतदानाचा हक्क बजावल्यापासून मतदान केंद्रातून बाहेर पडू नका, भले पहाट उजडू द्या.
    • मतदान केंद्रावर दिरंगाई झाल्यास जवळच्या शिवसेना शाखेत कळवा.
    • निवडणूक अधिकाऱ्यांची नावं विचारा, आपण न्यायालयात दाद मागू.
    • पराभवाच्या भीतीनं पछाडल्यानं लोकांना मतदान करू दिलं जात नाहीय.
    • शेवटचा मतदार मतदान करत नाही, तोपर्यंत मतदान थांबवलं जाऊ शकत नाही.
    • काय आणायचं ते आधीच सांगायचं ना, बसल्या जागी बाजीरावपणा का करता?
    • निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतेय का?
  4. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, 'मी अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही'

    पंतप्रधान नरेंद्र मोदी.

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी.

    "मी अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही, त्यांच्याविरोधात एकही शब्द बोललो नाहीय," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

    मुस्लिामांच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात नरेंद्र मोदी म्हणाले की, "मी अल्पसंख्याक समुदायाच्या विरोधात एक शब्दही बोललेलो नाही. मी काँग्रेसच्या व्होट बँकेचं राजकारण करण्याच्या विरोधात आहे. काँग्रेस संविधानाच्या विरोधी काम करत आहे. त्यावर मी बोलत आहे."

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, "बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासह भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी देशात धर्माच्या आधारे आरक्षण मिळणार नाही, असं ठरवलं होतं."

    "आता काँग्रेस खोटं बोलत आहे. या असत्यावरून पडदा हटवणं ही माझी जबाबदारी आहे. संविधान सभेत तर माझ्या पक्षाचे लोक नव्हते. हे संविधान सभेनं ठरवलं होतं."

    मोदी म्हणाले की, "भाजप अल्पसंख्याकांच्या विरोधात नागी. ते लोक तुष्टीकरणाच्या मार्गावर चालतात आणि मी संतुष्टीकरणाच्या मार्गावर चालतो."

    "हे लोक विभाजनाच्या मार्गावर चालतात. आम्ही सबका साथ सबका विकास याबाबत बोलतो. आम्ही कोणालाही विशेष नागरिक मानण्यास तयार नाही. आम्ही सर्व नागरिकांना समान मानतो."

    लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मस्लिमांचे विरोधी असल्याचे आरोप केले आहेत.

  5. बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाची घोषणा

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उद्या म्हणजेच 21मे ला बारावीचा निकाल लागणार असल्याची घोषणा केली आहे.

    फेब्रुवारी-मार्च मध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने काढलेल्या पत्रकात असं सांगितलं आहे की 21 मे 2024 ला दुपारी एक वाजता बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.

    निकाल पाहण्यासाठी मंडळाने सहा संकेतस्थळांची यादी दिली आहे. यासोबतच यावेळी निकालाची प्रत डिजिलॉकरमध्येही जतन करता येणार असल्याचं मंडळाने म्हटलं आहे.

    बारावीचा निकाल

    फोटो स्रोत, Getty Images

    या वेबसाईटवर पाहू शकता निकाल :

  6. मुंबईच्या रणांगणात मातब्बर उमेदवाराचं भवितव्य पणाला, आज महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्याचं मतदान

    मतदार

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईतील मतदारांची मतदान केंद्राबाहेर लागलेली रांग

    महाराष्ट्रातल्या 13 लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान सुरी आहे. राज्यात पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान होत असून यात प्रामुख्याने मुंबईतील सहा आणि राज्यातील इतर सात लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदार त्यांचा कौल देणार आहेत.

    केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री वर्षा गायकवाड, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासारख्या मातब्बर राजकीय नेत्यांचं भविष्य आज मतपेटीत कैद होणार आहे.

    मुंबई व्यतिरिक्त नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, ठाणे, भिवंडी आणि कल्याणमध्ये आज मतदान होणार आहे. आज मतदानाला सुरुवात झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव, उद्योजक अनिल अंबानी, पालघरच्या ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी, वर्षा गायकवाड, राम नाईक, संजय दीना पाटील अशा प्रमुख नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मतदारांना मतदान करण्याचं आवाहनही यावेळी नेत्यांनी केलं आहे.

  7. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन

    सोमवारी सकाळी अपघाताच्या ठिकाणाची माहिती मिळाली

    फोटो स्रोत, AFP

    इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

    तेहरान टाईम्सच्या बातमीनुसार, दाट धुक्यामुळे हा अपघात झाला. अपघाताचे ठिकाण तेहरानपासून 600 किलोमीटर अंतरावर आहे.

    तेहरान टाईम्सने सांगितले की, पर्वतीय भागात शोध मोहिमेसाठी 40 वेगवेगळ्या पथकं तैनात करण्यात आली आहेत. इराणमधील एका टीव्ही वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

    इब्राहिम रईसी

    फोटो स्रोत, Getty Images

    हेलिकॉप्टरने टेक ऑफ करण्यापूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसह दोन्ही देशांच्या सीमेवरील धरणाचे उद्घाटन केले होते.

    इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी राष्ट्राध्यक्ष रईसी आणि परराष्ट्र मंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसल्याची पुष्टी केली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमाती आणि इतर अनेक लोकही होते.

  8. इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अपघात, बचावपथक अपघातस्थळाजवळ पोहोचलं

  9. शोध पथकाला रईसी यांच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले - सरकारी वृत्तसंस्था

    इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने अशी माहिती दिली आहे की राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे अवशेष अखेर सापडले आहेत.

    इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीचे प्रमुख पिरहोसेन कोलीवंद यांनी या वहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत असं म्हटलं आहे की घटनास्थळाची परिस्थिती 'चांगली' नाही.

    बचावपथक आता काही मिनिटांमध्ये अपघातस्थळी पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पिरहोसेन म्हणाले की, हेलिकॉप्टरने ज्या ठिकाणी 'हार्ड लँडिंग' केल्याचे बोलले जात आहे त्या ठिकाणापासून आमचं पथक आता अवघे 2 किमी अंतरावर आहे.

    सरकारी टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार अपघातस्थळावर कुणीही जिवंत असल्याचे कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. एका इराणी अधिकाऱ्याचा हवाला देत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सांगितलं आहे की या अपघातात हे हेलिकॉप्टर 'पूर्णपणे जाळून खाक झालं आहे.

  10. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या अपघातात काही कट असल्याचा संशयावर अमेरिकेचे खासदार म्हणाले...

    चक शूमर

    फोटो स्रोत, Getty Images

    इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघातावर अमेरिकेचे खासदार चक शूमर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    अमेरिकेच्या संसदेत डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार असणाऱ्या चक शूमर यांनी म्हटले आहे की, हेलिकॉप्टर अपघातामागे कोणतेही षड्यंत्र आहे असे आत्ताच म्हणता येणार नाही.

    शूमर म्हणाले की, "आतापर्यंत असे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत ज्याच्या आधारे हेलिकॉप्टर अपघातामागे कट होता असं म्हणता येईल."

    "उत्तर-पश्चिम इराणमध्ये हवामान खूपच खराब होते जेथे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. हे अपघातासारखं दिसत आहे. मात्र या अपघाताची संपूर्ण चौकशी अद्याप बाकी आहे." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना या अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

  11. तुर्कीच्या ड्रोनला इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची जागा सापडली

    इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या शोधात तैनात करण्यात आलेल्या तुर्कस्तानच्या ड्रोनने हे हेलिकॉप्टर नेमकं कुठे कोसळलं ते ठिकाण शोधून काढलं आहे .

    अनादोलू या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानने राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या शोध मोहिमेत मदत करण्यासाठी ड्रोन पाठवले होते.

    इब्राहीम रईसी

    फोटो स्रोत, Getty Images

    या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या ड्रोन फुटेजमध्ये रात्रीच्या वेळी एका टेकडीवर काळ्या खुणा दिसल्या आहेत. या फुटेजमधून जी काही माहिती मिळाली आहे ती इराणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे.

    रविवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लायान यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.

    इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी राष्ट्राध्यक्ष रईसी आणि परराष्ट्र मंत्री त्या हेलिकॉप्टरमध्ये बसल्याची पुष्टी केली आहे. राष्ट्रपती रईसी यांच्या शोधासाठी रविवारपासून मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्यात येत आहे.

    इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी या दुर्घटनेचा इराणच्या प्रशासनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगितलं आहे. भारतासह जगभरातील नेत्यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली आहे.

  12. नमस्कार

    आज राज्यात मतदानाचा पाचवा आणि अंतिम टप्पा आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी आज मतदान होणार आहे.

    इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांच्या ताफ्यातील हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरचा शोध अद्याप लागलेला नाही.

    19 मे च्या बातम्यांसाठी बीबीसी मराठीच्या पेजला भेट द्या.