उदयनराजे भोसले-शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद काय? बाजार समितीवरून पुन्हा आमनेसामने

फोटो स्रोत, facebook
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
साताऱ्याच्या नूतन कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भूमिपूजनावरून राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
बाजार समितीचं पूजन आज (21 जून) सकाळी 10 वाजता शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नियोजित होतं. पण सकाळी 9 वाजता उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी येथील साहित्य फेकून देऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावल्याचा आरोप आहे.
पण, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या जागेचा उतारा आपल्या नावे असून निकाल आपल्या बाजूने आहे असा दावा केला. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उदयनराजे भोसले समोर उभे होते.
अतिशय नाट्यमय पद्धतीने या कार्यक्रमाचा घटनाक्रम पाहायला मिळाला. दरम्यान, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी मागच्या बाजूला सुरूच होती. या प्रसंगाची मोठी चर्चा माध्यमांमध्ये करण्यात येत आहे.
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद हा जुनाच आहे. पण चार वर्षांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली होती.
"सातारा येथे आमचे बंधू आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सदिच्छा भेट घेतली, यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली," असं ट्वीट उदयनराजे भोसले यांनी त्यावेळी केलं होतं.
शिवेंद्रराजे आणि आपल्यात ठिणगी टाकणारे निघून गेल्यामुळे आता आपला काही वाद नाही, असं उदयनराजे नंतर बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं.
पण त्याच्या चार वर्षांनी आता पुन्हा एकदा दोन्ही राजेंमधील वाद उफाळून आल्याचं दिसून येतं.

फोटो स्रोत, Twitter / @Chh_Udayanraje
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे दोघे एकमेकांचे भाऊ आहेत. तसंच सध्या एकाच पक्षात आहेत. पण दोघांमधील वाद नेमका काय आहे, याविषयी वारंवार चर्चा होत असते. दोघांमधील या वादाला एक इतिहास आहे. गोष्ट नव्वदच्या दशकातील आहे.
उदयनराजे भोसले यांचे काका अभयसिंह राजे भोसले काँग्रेसमध्ये होते. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी संस्थात्मक, रचनात्मक कामाला सुरुवात केली. सहकार चळवळीच्या माध्यमातून संघटना उभी केली. कारखाना, दोन बँका उभ्या केल्या. अशापद्धतीनं हळूहळू त्यांनी राजकारणात पाय रोवायला सुरुवात केली होती.

याबाबत 2015च्या 'कालनिर्णय'च्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी लिहिलं होतं : "अभयसिंह राजे यांचा हा उत्कर्ष कल्पनाराजे भोसले यांना खुपत होता. राजकारणातली सगळी जागा अभयसिंहांनी व्यापली तर आपल्या मुलाचं, उदयनराजेंचं काय, ही चिंता त्यांना सतावत होती. त्याच ईर्ष्येतून त्यांनी 1989मध्ये निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली. त्यानिमित्तानं महाराष्ट्रात हातपाय पसरू पाहणाऱ्या शिवसेनेला साताऱ्यातून राजघराण्यातील व्यक्ती उमेदवार म्हणून मिळाली.
"कल्पनाराजे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून साताऱ्यातून अभयसिंहराजे यांच्याविरोधात उभ्या राहिल्या. परंतु अभयसिंह यांच्या संघटनापुढे त्यांचा निभाव लागला नाही."
त्यानंतर 1991मध्ये सातारा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. याच निवडणुकीत उदयनराजेंनी काका अभयसिंह राजेंच्या विरोधात स्वत:चं पॅनेल उभं केलं. स्वत: दोन वॉर्डातून उभे राहिलेले उदयनराजे एका वॉर्डातून निवडून आले आणि एकात त्यांचा पराभव झाला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
1996मध्ये त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष राहून लढवली.
"या निवडणुकीत उदयनराजे उमेदवार असतानाही अभयसिंहराजे यांनी पक्षशिस्त म्हणून काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसले यांचा प्रचार केला. त्यामुळे अभयसिंह राजे आणि उदयनराजे यांच्यात फूट पडली," चोरमारे लिहितात.
पुढच्या पिढीत वाद
1998ला लोकसभेची निवडणूक झाली. त्यात अभयसिंहराजे साताऱ्याचे आमदार असतानाही लोकसभेला उभे राहिले आणि निवडून आले. यामुळे मग सातारा विधानसभेची जागा मोकळी झाली आणि तिथं पोटनिवडणूक घ्यावी लागली.
"अभयसिंह राजे लोकसभेत गेल्यानंतर सातारा विधानसभेची जागा आपल्याला मिळेल, अशी उदयनराजेंची अपेक्षा होती. परंतु अभयसिंहराजेंनी लोकसभेची उमेदवारी स्वीकारतानाच पुत्र शिवेंद्रराजे यांच्या उमेदवारीची हमी घेतली होती. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी शिवेंद्रराजे यांना मिळाली.
"याच काळात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष होतं. त्यांनी उदयनराजेंना हेरलं आणि भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचं मन वळवलं. ते भाजपचे उमेदवार झाले. अभयसिंहराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या रूपानं एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी, असं सत्तेचं केंद्रीकरण दिसू लागलं. त्यातून उदयनराजेंच्या बाजूनं सहानुभूती निर्माण झाली आणि त्यांनी निवडणूक जिंकली," चोरमारे लिहितात.

फोटो स्रोत, Getty Images
1999ला विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी उदयनराजे यांच्यासमोर खुद्द अभयसिंहराजे यांचं आव्हान होतं. मतदानाच्या आदल्या रात्री अभयसिंहराजे गटाचे नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. त्यात मुख्य आरोपी म्हणून उदयनराजेंविरुद्ध फिर्याद देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना अटक झाली. ते 22 महिने तुरुंगात होते. नंतर उदयनराजेंची यातून निर्दोष मुक्तता झाली.
"या खून खटल्यात अभयसिंहराजे यांनी आपल्याला गोवलं आणि आपली राजकीय कारकीर्द संपवली, असा आरोप उदयनराजेंनी केला. या प्रकरणानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद वाढीस लागला," असं 'पुण्य नगरी'च्या सातारा आवृत्तीचे वृत्त संपादक विनोद कुलकर्णी सांगतात.
भावांचं मनोमिलन
2006ला सातारा नगरपालिकेची निवडणूक झाली आणि निकाल त्रिशंकू लागला. 19 जागा उदयनराजेंच्या आघाडीला, 18 जागा शिवेंद्रराजेंच्या आघाडीला तर 2 जागा विरोधकांना मिळाल्या.
"त्यावेळेस या राजघराण्यातील ज्येष्ठ असलेल्या शिवाजीराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन सगळं घराणं एक करायचं ठरवलं. त्यांनी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचं मनोमिलन घडवून आणलं. मग या दोघांनी मिळून नगरपालिकेची सत्ता हस्तगत केली. पुढेची 10 वर्षं हे मनोमिलन कायम राहिलं. पण 2016च्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते मनोमिलन तुटलं," असं विनोद कुलकर्णी बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.
वाद अजूनही कायम?
2016 मध्ये सातारा नगरपालिकेची निवडणूक झाली. यावेळी जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून येणार होता.
या निवडणुकीत शिवेंद्रराजे यांच्या गटाकडून त्यांच्या पत्नी वेदांतिका राजे उमेदवार होत्या तर उदयनराजेंच्या गटाकडून माधवी कदम उमेदवार होत्या. या निवडणुकीत माधवी कदम यांचा विजय झाला.

"2019मध्ये शरद पवारांनी उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंसाठी काम केलं, मात्र निवडणूक झाल्यानंतर ते भाजपमध्ये गेले. त्यांचं महत्त्व भाजपमध्ये वाढणार, हे लक्षात घेऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील संघर्ष हा सत्तासंघर्ष आहे. तो आजही कायम आहे," कुलकर्णी सांगतात.
उदयनराजे या वादावर काय म्हणतात?
"माझ्यात आणि शिवेंद्रराजे यांच्यात कोणताही वाद नव्हता. काही लोक त्यांचं इप्सित साध्य करण्यासाठी वाद लावायचे प्रयत्न करत होते. माझा आणि शिवेंद्रराजे यांचा प्रवास सुरळीत चालणार आहे, जे ठिणगी टाकणारे होते ते आता राहिले नाहीयेत," असं उदयनराजे यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








