बॅ. ए. आर. अंतुले : शेतकऱ्यांना पहिल्यांदा कर्जमाफी देणारे मुख्यमंत्री
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
'कुलाबा' जिल्ह्याचं नाव 'रायगड' करणं असो वा लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणण्याची घोषणा असो, बॅरिस्टर अंतुले यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ अनेक घोषणांनी, घटनांनी गाजला.
तारीख 9 जून 1980. महाराष्ट्राच्या राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा दिवस. महत्त्वाचा यासाठी की, या दिवशी 'अब्दुल रेहमान अंतुले' नावाच्या माणसानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. केवळ मुस्लीम व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाली, इतकेच या घटनेला महत्त्व नव्हतं. तर त्यामागं महाराष्ट्राच्या गत राजकारणातल्या घटना आणि घडामोडीही कारणीभूत होत्या.
इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर महाराष्ट्रासह देशाचं राजकारण बदललं होतं. इंदिरा गांधींविरोधात देशभरात संतापाची लाट होती. त्यामुळं आणीबाणीनंतर जनता पक्षाच्या राजवटीवेळी इंदिरा गांधींशी फारकत घेत, काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून अनेकांनी पटापट उड्या मारल्या.
"ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या अस्सल काँग्रेसी नेत्यांनीही इंदिरा गांधी यांची साथ सोडली. मात्र, या काळात महाराष्ट्रातील काही मोजके नेते इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्येच राहिले. या नेत्यांमधील एक महत्त्वाचे नेते म्हणजे ए. आर. अंतुले." असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात.
...आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले
1980 साली लोकसभा निवडणुका झाल्या. केंद्रात इंदिरा गांधी यांचं सरकार आलं आणि त्याच पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. केंद्रात सत्तेत आल्या आल्या इंदिरा गांधी यांनी बिगर-काँग्रेसी सत्ता असलेल्या राज्यांची सरकारं बरखास्त केली. याचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला.
महाराष्ट्रात तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्त्वात पुरोगामी लोकशाही दलाचे अर्थात पुलोदचं सरकार होतं. इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्रातील पुलोदचं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानतंर काही दिवसांनीच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला बहुमत मिळालं. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली.
"वसंतदादा पाटील, प्रतिभा पाटील आणि ए. आर. अंतुले असे तत्कालीन काँग्रेस नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते. या तिघांनाही विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्ली गाठली होती," असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात.
इंदिरा गांधी यांच्या मनात महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्रिपदाचं नाव निश्चित होतं. ते नाव होतं, अब्दुल रेहमान अंतुले म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले बॅरिस्टर ए. आर. अंतुले.
"अंतुलेंकडे दोन गोष्टी विशेष होत्या आणि इंदिरा गांधी यांना याच गोष्टी अधिक भावल्याची चर्चा तत्कालीन राजकीय वर्तुळात नेहमीच होत असे. पहिली गोष्ट म्हणजे गांधी घराण्यावरील अपार निष्ठा आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील असूनही प्रसंगी मराठा आणि सहकार दबाव गटांशी दोन हात करण्याची तयारी." असं लोकसत्ताच्या अग्रलेखात म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
ए. आर. अंतुले हे केवळ इंदिरा गांधी यांचीच निवड नव्हती, तर त्यांचे पुत्र संजय गांधी यांचीही निवड होती. ए. आर. अंतुले हे संजय गांधी यांचे निष्ठावंत मानले जात.
दुर्दैवविलास म्हणजे, 9 जून 1980 रोजी अंतुलेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि अवघ्या 15 दिवसांनीच म्हणजे 23 जून 1980 रोजी संजय गांधी निधन झालं.
अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रातील 'मराठा' राजकारणाला मोठा धक्का बसला. सहकार, मराठा समाज इत्यादींचं राजकारण बाजूला सारून इंदिरा गांधी यांनी ए. आर. अंतुले यांची निवड केली होती. अंतुले यांना कुठलाही सहकारी चळवळीचा वारसा नव्हता. अंतुले हे कोकणातील नेते होते.
'रायगड'चं प्रेम
रायगड जिल्ह्यातील महाडमधील आंबेत या गावात 9 फेब्रुवारी 1929 रोजी ए. आर. अंतुलेंचा जन्म झाला. सुरूवातीचं शिक्षण महाडमध्येच झालेल्या अंतुलेंनी पुढं मुंबईतून कायद्याचं शिक्षण घेतलं आणि लंडनमधून 'बॅरिस्टर' झाले.
रायगडमधून सार्वजनिक आयुष्यात पाऊल ठेवलेले अंतुले 1962 साली पहिल्यांदा श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेत गेले. त्यानंतर ते सलग 1976 पर्यंत आमदार म्हणून विजयी होत राहिले. 1969 ते 1976 या काळात त्यांनी राज्यात मंत्रिपदंही भूषवली होती. त्यामुळं राज्यातील मंत्रिपदाचा अंतुलेंना अनुभव होताच.

फोटो स्रोत, Getty Images
"अंतुलेंना रायगड जिल्ह्याबद्दल अपार प्रेम होतं. रायगड जल्ह्याचं पूर्वीचं नाव 'कुलाबा' होतं. मात्र, ही शिवरायांची भूमी आहे, त्यामुळं त्यांचंच नाव या जिल्ह्यालाही हवं असं म्हणत ए. आर. अंतुलेंना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी 'कुलाबा'चं 'रायगड' असं नामांतर केलं." असं रायगडमधील ज्येष्ठ पत्रकार मिलिंद अष्टीवकर सांगतात.
दांडगी निर्णयक्षमता आणि एकदा निर्णय घेतला की अधिकाऱ्याच्या पाठीशी खंबरीपणे उभं राहणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख होती. त्यांनी घेतलेल्या अनेक धाडसी निर्णयांची आजही चर्चा होत राहते.
रत्नागिरी जिल्ह्यापासून वेगळं करत 'सिंधुदुर्ग' आणि उस्मानाबादपासून वेगळं करत 'लातूर', अशा नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा निर्णयही ए. आर. अंतुले यांनीच घेतला.
"धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध"
"मराठी, इंग्रजी, हिंदी आणि ऊर्दू या चारही भाषांवर कमालीचं प्रभुत्व आणि इंग्लंडमधील कायद्याची पदवी यामुळे अंतुलेंनी थोड्याच अवधीत प्रशासनावरही चांगली पकड बसवली होती. परिणामी सरकारच्या योजना राबवण्यासाठी त्यांना कधीच प्रशासनाची सोबत मिळाली. ते धाडसी निर्णय घेण्यासाठी अधिक प्रसिद्ध होते." असं ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे सांगतात.
राज्य पोलीस दलातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या गणवेशात फुलपँटचा समावेश करण्यापासून ते राज्यातील 60 वर्षांवरील वयोवृद्धांना पेन्शनसाठी संजय गांधी निराधार योजनेतून दिलासा देण्याचा निर्णय असो.

फोटो स्रोत, Getty Images
प्रशासकीय कामांसोबतच महाराष्ट्राच्या कलासंस्कृतीचीही अंतुलेंना विशेष ओढ होती. याची प्रचिती त्यांच्याच एका निर्णयातूनही येते. 1980पूर्वी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये कीर्तनकारांचा समावेश नव्हता.अंतुले यांनी कीर्तनाला राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारात स्थान दिले.
अंतुलेंची निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयाशी ठाम राहण्याची एक घटना महाराष्ट्रातील शेतकरी कायम लक्षात ठेवतील, ती म्हणजे कर्जमाफीचा निर्णय.
ज्येष्ठ पत्रकार शां. मं. गोठोसकर हे लोकसत्ताच्या 2010 च्या दिवळी अंकातील लेखात सांगतात, "छोट्या शेतकऱ्यांचं 49 कोटींचं कर्ज त्यांनी माफ केलं."
विशेष म्हणजे, तोपर्यंत कुठल्याही राज्यानं कर्ज माफ करण्याची प्रथा नव्हती. त्यानंतर आरबीआयशी त्यांचा संघर्षही झाला होता.
सिमेंट घोटाळ्याचा आरोप
अंतुले हे धडाडीचे नेते असले, तरी त्यांच्या अनेक निर्णयांमुळं वादही झाले. मात्र, ते आपल्या निर्णयांशी ठाम राहिले. अशाच निर्णयांमधून आणि वेगवेगळ्या योजनांमधून ते आरोपांच्या जाळ्यातही अडकत गेले. सिमेंट घोटाळ्याचा आरोपही तसाच.
31 ऑगस्ट 1981 रोजी इंडियन एक्स्प्रेसमध्ये अरूण शौरी यांची सिमेंट घोटाळ्यातील गैरव्यवहाराशी संबंधित बातमी प्रसिद्ध झाली आणि महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात हलल्कल्लोळ माजला.
ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे सांगतात, "सप्टेंबरमध्ये लोकसभेचं अधिवेशन होतं. त्यामुळं अर्थात इंडियन एक्स्प्रेसच्या अंतुलेंच्या कथित सिमेंट घोटाळ्याच्या बातमीचे पडसाद संसदेत उमटले. मराठीत लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरींनीही हे प्रकरण लावून धरले होते. त्यानंतर 2 सप्टेंबर 1981 रोजी जवळपास नऊ तास संसदेत या मुद्द्यावर तुफान चर्चा झाली. महाराष्ट्रासह देशभरात ए. आर. अंतुलेंच्या कथित सिमेंट घोटाळ्यावरून काँग्रेसवर आरोप होऊ लागले. याचमुळं ए. आर. अंतुले अखेर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार झाले."

फोटो स्रोत, Getty Images
देणग्या गोळा करण्यासाठी अंतुलेंनी जो ट्रस्ट स्थापन केली होता त्या ट्रस्टचं नाव होतं 'इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठान'. इंदिरा गांधी यांच्या नावाने असलेल्या ट्रस्टचं नाव वादात अडकणं ही गोष्ट तत्कालीन काँग्रेस नेत्यांना पटली नाही. त्यामुळे अंतुलेंनी जानेवारी 1982 मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अगदी दीड ते दोन वर्षेच त्यांना मुख्यंत्रिपदाच्या खुर्चीवर बसता आलं.
पुढे अंतुलेंवरील हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं. तब्बल 16 वर्षे खटला चालला. शेवटी अंतुले निर्दोष सुटले. मात्र, या सिमेंट घोटाळ्याच्या आरोपांमुळे अंतुलेंचं मुख्यमंत्रिपद गेलं होतं.
अंतुलेंच्या निवडीनं महाराष्ट्रातील सहकाराशी संबंधित आणि मराठा नेते नाराज झाले होते, असं ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे सांगतात.
पुढे ए. आर. अंतुलेंनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री इंदिरा गांधी यांनी बाबासाहेब भोसले यांची निवड केली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








