मानुषी ते बाहुबली : 2017 मधल्या भारतासाठी 8 गोड बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शरत बेहरा
- Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी
नव्या वर्षाची चाहूल लागली असतानाच एकदा 2017ने आपल्याला काय काय दिलं, म्हणूनही एकदा दृष्टिक्षेप टाकायला हवा. या वर्षात अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे भारताची मान जगात उंचावली.
मानुषी छिल्लर, बाहुबली, तिहेरी तलाकबद्दलचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, अशा अनेक गोष्टींचा दाखला देता येईल. बघूया, अशा कोणकोणत्या घटना 2017मध्ये घडल्या?
1. मिस वर्ल्डचा किताब
तब्बल 118 देशांमधल्या तरुणींशी स्पर्धा करत हरयाणाच्या मानुषी छिल्लर या तरुणीने मिस वर्ल्डचा किताब पटकावला. भारताकडे हा मान 17 वर्षांनी परत आला.
'जगात सगळ्यात जास्त पगार कोणाला मिळायला हवा? या प्रश्नाचं उत्तर अंतिम फेरीत देताना मानुषी म्हणाली, "सगळ्यांत जास्त पगार खरं तर आईला मिळायला हवा."
तिच्या उत्तराने तिनं परीक्षकांची मनं जिंकली होती, आणि भारतासाठी मिस वर्ल्डचा मुकुटही.
20 वर्षांची मानुषी मेडिकलची विद्यार्थिनी आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ती सहावी भारतीय तरुणी आहे.
2. इस्रोची गगनभरारी
भारताची अंतराळ संशोधन संस्था Indian Space Research Organization (ISRO)ने यंदा एका दिवसात एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 104 उपग्रह अंतराळात सोडत इतिहास घडवला. विशेष म्हणजे, नेटकऱ्यांनी या पराक्रमाची तुलना 'बाहुबली' या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या यशाशी केली.

फोटो स्रोत, ISRO
आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटर मधून 15 फेब्रुवारी 2017ला हे 104 उपग्रह घेऊन एक रॉकेट आकाशात झेपावलं. यापैकी 3 उपग्रह भारताचे होते, तर उर्वरित 101 उपग्रह अमेरिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इस्राईल, कझाकस्तान आणि UAE या देशांचे होते.
इस्रोच्या या पराक्रमाआधी रशियाने सर्वाधिक म्हणजे 37 उपग्रह आकाशात सोडले होते.
3. ''बाहुबली'ची 'दंगल'
भारतासाठी 2017 हे वर्ष दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनी गाजवलं - दंगल आणि बाहुबली. दंगल 2016च्या डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. तरीही या चित्रपटाने 2000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला तो याच वर्षात! हा चित्रपट जगभरात नावाजला गेला.

फोटो स्रोत, facebook/BaahubaliMovie
त्या खालोखाल एस. राजमौली यांच्या 'बाहुबली'ने भारतातले बॉक्स ऑफिसचे सगळे विक्रम मोडीत काढले. या चित्रपटाने एकट्या भारतात 1400 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
4. नौदलात शुभांगीच्या निमित्ताने महिलांचा समावेश
भारतीय नौदलात पायलट म्हणून नियुक्ती होणाऱ्या शुभांगी स्वरूप या पहिल्या महिला अधिकारी आहेत. मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या शुभांगी 'मॅरिटाइम रेकनन्स एअरक्राफ्ट'चं सारथ्य करतील.

फोटो स्रोत, Twitter/dpradhanbjp
याव्यतिरिक्त नौदलाची उपशाखा असणाऱ्या 'नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टरेट' विभागात पहिल्यांदाच तीन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.
5. जगभरात एक नंबर!
क्रिकेट आणि भारत यांचं नातं काही खासच आहे. हे नातं 2017मध्ये आणखीनच वेगळ्या पातळीवर पोहोचलं.
या वर्षात भारताने कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये ICCच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं.
एकाच वेळी दोन्ही प्रकारांमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची ही भारताची पहिली वेळ आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अंधांसाठी असलेला T20 वर्ल्डकप यंदा भारतीय टीमने जिंकला.
भारताच्या किदांबी श्रीकांतने बॅडमिंटनमध्ये एका वर्षात चार सुपर सिरीज जिंकण्याचा पराक्रम करत इतिहास घडवला. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये श्रीकांत अजिंक्य ठरला.
6. फिफा स्पर्धा भारतात
क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल विश्वकपचं आयोजन होणं, ही कल्पनाच भन्नाट. आणि 2017 ने ती कल्पनाही साकार करून दाखवली.

फोटो स्रोत, Getty Images
अंडर-17 फिफा वर्ल्डकप यंदा भारतात रंगला, आणि देशभरात तब्बल 13.5 लाख लोकांनी या वर्ल्डकपचा आनंद लुटला.
भारताला या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये काहीच जिंकता आलं नसलं तरी, केवळ यजमानपद मिळाल्याने भारतीय तरुणाईचा आनंद गगनात मावेनासा झाला.
7. 'तिहेरी तलाक'
भारतातल्या मुस्लीम महिलांना दिलासा देणारा एक निर्णय ऑगस्ट 2017मध्ये सुप्रीम कोर्टानं दिला. सुप्रीम कोर्टाच्या पाच पैकी तीन न्यायमूर्तींनी मुस्लीम समाजात प्रचलित असलेली तिहेरी तलाकची पद्धत घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला.
ही पद्धत पूर्णपणे बंद करण्याऐवजी सरकारने कायदा करेपर्यंत सहा महिने त्यावर बंदी घालावी, असं मत इतर दोन न्यायमूर्तींनी दिलं.

फोटो स्रोत, Getty Images
तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारं विधेयक केंद्रीय न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी 28 डिसेंबर 2017 रोजी संसदेत मांडलं.
आणि लोकसभेनं पास करत ते विधेयक आता राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.
8. ट्रान्सजेंडरचं सक्षमीकरण
या वर्षात ट्रान्सजेंडर लोकांचं सक्षमीकरण व्हावं, या दृष्टीने यंदा अनेक प्रयत्न झाले. पश्चिम बंगालच्या ज्योइता मोंडल यांची भारतातल्या पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

फोटो स्रोत, Getty Images
तामिळनाडूच्या प्रीतिका अश्नी यांनी 'तामिळनाडू युनिफॉर्म सर्व्हिसेस रिक्रूटमेंट बोर्ड'च्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर त्या पहिल्या पोलीस उपनिरीक्षक बनल्या.
तसंच भारतात पहिल्यांदाच कोचीच्या मेट्रोमध्ये 23 ट्रान्सजेंडरना एकाच वेळी नोकरी देण्यात आली.
तुम्ही हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









