सातारा लोकसभा निकाल : उदयनराजेंचा शशिकांत शिंदेंविरोधात 32771 मताधिक्याने विजय

फोटो स्रोत, FACEBOOK
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी
साताऱ्यातील लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांनी काँग्रेस उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात विजय मिळवला आहे.
उदयनराजे यांना 5 लाख 71 हजार 134 मते मिळाली. त्यांनी शिंदे यांचा 32 हजार 771 मतांच्या फरकाने पराभव केला.
निकालांत सुरुवातीच्या कलांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत जयवंतराव शिंदे यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं. पण नंतर उदयनराजे यांनी पिछाडी भरून काढत विजयाचा गुलाल उधळला.
भाजपनं याठिकाणी पुन्हा एकदा उदयनराजे भोसलेंना मैदानात उतरवलं होतं. शरद पवार यांनी या मतदारसंघात चांगलाच जोर लावल्याचं पाहायला मिळालं होतं.
2019 मध्ये शरद पवारांचं पावसातलं भाषण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची दिशाच बदलून गेल्याचं पाहायला मिळालं होतं.
शरद पवारांना साताऱ्याने भरभक्कम साथ देण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. पक्षाच्या स्थापनेपासूनच सातारा हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.
1996 च्या ‘त्या’ निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व
सातारा हा दीर्घकाळ काँग्रेसच्या विचारधारेकडे झुकलेला मतदारसंघ राहिला आहे. 1952 साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालिन सातारा दक्षिण आणि सातारा उत्तर मतदारसंघातून अनुक्रमे काँग्रेसचे वेंकटराव पीराजीराव पवार आणि गणेश सदाशिव आळतेकर हे निवडून आले होते. किसन वीर यांनीही या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं.
1967 ते 1984 असा प्रदीर्घ काळ या मतदारसंघाचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने केलं. आणिबाणीनंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत रायबरेलीतून इंदिरा गांधींचा पराभव झाला, मात्र साताऱ्यामधून यशवंतराव चव्हाण आणि कराडमधून प्रेमलाकाकी चव्हाण या भरघोस मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.
काँग्रेसचे नेते प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं.
काँग्रेसला भक्कम साथ मिळण्यात सहकाराच्या राजकारणाचीही वाटा होता.

फोटो स्रोत, Getty Images
1996 ची निवडणूक ही अपवाद होती. यावेळी साताऱ्यातून शिवसेनेचे उमेदवार हिंदुराव निंबाळकर निवडून आले होते. अर्थात, त्यांच्या विजयाला काँग्रेसमधील अंतर्गत कलहही कारणीभूत ठरला.
काँग्रेसचे साताऱ्याचे तत्कालिन खासदार प्रतापराव भोसले हे शरद पवार यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते.
विद्यमान खासदार असल्यामुळं प्रतापरावांची उमेदवारी कापणं शक्य नव्हतं. परंतु प्रतापराव भोसले यांचा पराभव करण्याची व्यूहरचना आखण्यात आली होती असं म्हणतात. त्यासाठी काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी अनेक समविचारी उमेदवार उभे करण्याची खेळी करण्यात आली.

याचवेळी उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्याचबरोबर पार्थ पोळके, कर्नल आर. डी. निकम असे इतरही उमेदवार उभे करण्यात आले.
त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेच्या हिंदुराव नाईक-निंबाळकरांनी प्रतापराव भोसलेंचा बारा हजार मतांनी पराभव केला.
1999 साली जेव्हा काँग्रेसपासून वेगळं होत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं आहे.
2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काय झालं होतं?
2009 साली उदयनराजे भोसले पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेच्या पुरूषोत्तम जाधव यांचा पराभव केला.
2014 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे भोसलेंनाच उमेदवारी दिली. एरव्ही भाजप-शिवसेना युतीमध्ये पहिल्यापासून सातारा मतदारसंघ हा शिवसेनेकडेच राहिला होता. मात्र, 2014 ला युतीमध्ये ही जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडण्याचा निर्णय घेतला गेला. नाराज झालेल्या पुरूषोत्तम जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.
पण उदयनराजे भोसले यांना 5,22,531 मतं मिळाली, तर पुरूषोत्तम जाधव यांना 1,55,937. रिपाइंच्या अशोक गायकवाड यांना 71808 मतं मिळाली. देशभरात मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने आपला बालेकिल्ला टिकवला.

फोटो स्रोत, FACEBOOK
2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसने तिसऱ्यांदा उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. शिवसेनेने त्यांच्याविरोधात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली.
उदयनराजेंनी या निवडणुकीत नरेंद्र पाटील यांचा पराभव केला, पण त्यांचं मताधिक्य कमालीचं घटलं होतं. उदयनराजेंना या निवडणुकीत 5 लाख 79 हजार 026 मतं मिळाली, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मतं मिळाली.
पण उदयनराजे भोसले यांनी या निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

फोटो स्रोत, FACEBOOK
साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारीही देण्यात आली. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी प्रचार सभाही घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांनी आपले जुने सहकारी आणि ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली.
शरद पवारांची पावसातील सभा हा या निवडणुकीतला टर्निंग पॉइंट होताच. पण उदयनराजेंविषयी मतदारसंघात फार अनुकूल वातावरणही नव्हतं16 व्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांची लोकसभेतील उपस्थिती अवघी 27 टक्के होती.
त्यांनी प्रश्नही उपस्थित केले नाहीत, कोणते खाजगी विधेयक मांडले नाही की चर्चेत भागही घेतला नव्हता. या सगळ्याचा फटकाही उदयनराजेंना बसलाच.
सातारा लोकसभा मतदारसंघाची रचना आणि बलाबल
सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरूवातीला अकरा विधानसभा मतदारसंघ होते. 2009 च्या पुनर्रचनेत सातारा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला.
पूर्वी कराड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता, तो पुनर्रचनेत सातारा लोकसभा मतदारसंघात विलीन झाला आणि नव्याने माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली.
आता सातारा लोकसभा मतदारसंघात वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, सातारा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
2019 च्या निवडणुकीत या प्रत्येक मतदारसंघामध्ये श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे यांचं मताधिक्य नेमकं कसं होतं हे पाहूया.

म्हणजेच कोरेगाव आणि सातारा हे दोन मतदारसंघ वगळता उरलेल्या चारही मतदारसंघात श्रीनिवास पाटलांना मताधिक्य होतं.
सध्या वाईचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील आहेत. ते अजित पवार गटाकडे आहेत. कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे आमदार आहेत.

कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील आमदार आहेत. सध्या ते शरद पवार गटाकडे आहेत. कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत.
पाटणमधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई, तर सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले हे आमदार आहेत.
साताऱ्यात तुतारी विरूद्ध कमळ
मतदारसंघाचा इतिहास पाहता महाविकास आघाडीकडून या जागेसाठी शरद पवार गट आग्रही राहणार हे स्पष्ट होतं आणि तसंच झालं.
याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदे यांना उदयनराजे यांच्या विरोधात मैदानात उतरवल्याचं पाहायला मिळालं.
मोदी लाटेतही राखलेला आपला बालेकिल्ला शरद पवार यावेळीही राखणार का हा प्रश्न राजकीय विश्लेषकांसाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच सामान्य नागरिकांसाठी विकासाच्या या या सगळ्या मुद्द्यांचा विचारही या निवडणुकीत होणार का हा प्रश्न महत्त्वाचा आहे.











