ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी, मोदी-राहुल गांधींनी सोबत जाऊन केलं अभिनंदन

ओम बिर्ला, राहुल गांधी, नरेंद्र मोदी, किरेन रिजिजू

फोटो स्रोत, ANI

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

18 व्या लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी NDAच्या ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. ओम बिर्ला हे 17 व्या लोकसभेचेही अध्यक्ष होते.

तर इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सुरेश यांना उमेदवारी दिली होती.

या निवडींनतर ओम बिर्ला यांनी संसदेत उपस्थित सगळ्या खासदारांचे आभार मानले.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलताना म्हणाले की, "ओम बिर्ला यांची दुसऱ्यांची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालीय. ओम बिर्ला 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष असताना संसदेनं अनेक महत्त्वपूर्ण कायदे पारित आले. बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली देशाच्या इतिहासात पहिल्यांदा ते कायदे पारित करण्यात आले."

विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं.

राहुल पुढे म्हणाले की, "सरकारकडे राजकीय सत्ता असली तरी विरोधकसुद्धा भारतीय लोकांचा आवाज संसदेत मांडत असतात. संसदेचं काम व्यवस्थित चालावं, अशी आम्हाला आशा आहे. विरोधकांचा आवाज इथं मांडू दिला जाईल, अशी आम्हाला तुमच्याकडून आशा आहे. विरोधकांचा आवाज शांत करणं, हे लोकशाहीविरोधी आहे. या निवडणुकीनं दाखवून दिलंय की विरोधकांना या देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी बोलू द्यायला हवं."

समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव म्हणाले की, "संसदेत कोणत्याही भेदभावाशिवाय काम केलं जाईल अशी आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. कुणाचाही आवाज दाबला जाऊ नये. तुम्ही विरोधकांवर अंकुश ठेवत असता तसा तो सत्ताधाऱ्यांवरही ठेवावा."

बिर्ला विरुद्ध के. सुरेश

दरम्यान, मंगळवारी (25 जून) विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल आणि डीएमकेचे टीआर बालू यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेऊन सभापतीपदासाठी दोन्ही गटात सामंजस्य असावं असं म्हटलं, पण यावर एकमत झालं नाही.

सहसा उप-सभापतीपद विरोधकांना दिलं जातं. यावर वेणुगोपाल यांनी सरकारवर संसदीय परंपरा पाळण्यास नकार दिल्याचा आरोप केला.

कोडीकुन्नील सुरेश केरळमधून आठ वेळा खासदार राहिले आहेत आणि ते दलित समाजाचे नेते आहेत. ओम बिर्ला हे देखील दलित समाजातून येतात आणि ते राजस्थानमधील कोटा येथून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेत.

संख्येनुसार, तेलगू देसम पार्टी आणि जनता दल युनायटेड सारख्या मित्रपक्षांसह एनडीएकडे 543 पैकी 293 मतं आहेत.

तर इंडिया आघाडीकडे 236 सदस्य आहेत आणि त्यांना काही लहान गट आणि अपक्षांचा पाठिंबा मिळू शकतो. सध्या लोकसभेच्या 16 जागा अपक्ष आणि छोट्या प्रादेशिक पक्षांकडे आहेत.

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

फोटो स्रोत, Getty Images

सभापतीपदासाठी मतदान होण्याची तिसरी वेळ

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सभापतीपदासाठी मतदान होण्याची वेळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासात तिसऱ्यांदा आली आहे. अन्यथा या पदावर पक्ष आणि विरोधकांमध्ये नेहमीच एकमत असतं. यापूर्वी 1952, 1967 आणि 1976 मध्ये सभापतीपदासाठी मतदान झालं होतं.

मंगळवारी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, "मोदीजी म्हणतात की आपण एकत्र काम केलं पाहिजे. आम्ही एकत्र काम करायला तयार आहोत पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे. आम्ही सत्ताधारी पक्षाच्या सभापती उमेदवाराला पाठिंबा द्यायला तयार आहोत, पण मल्लिकार्जुन खरगे यांनी उपसभापतीपद देण्याचं सांगितल्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंहजींनी त्यांना कॉल बॅक करायला सांगितला, अजून तो कॉल आलाच नाही."

विरोधकांनी 'अटी' घातल्याचा आरोप करत एनडीएने प्रत्युत्तर दिलं आहे.

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "सभापती हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो. सभागृह चालवण्यासाठी त्यांची निवड एकमताने केली जाते. काँग्रेसने सभापतीपदासाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे हे दुःखद आहे."

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि जेडीयूचे लालन सिंह यांनी विरोधक 'दबावाचे राजकारण' करत असल्याचं म्हटलं.

लोकसभा अध्यक्ष
लोकसभा अध्यक्ष

लोकसभा अध्यक्षाची निवड प्रक्रिया कशी पार पडते?

लोकसभा अध्यक्षांची निवड कशी केली जाते? हे पद महत्त्वाचं का आहे? हे प्रश्न अनेकांना पडलेले असतात.

त्यांची उत्तरं आपण या वृत्तलेखातून ते जाणून घेऊया.

17 व्या लोकसभेचे अध्यक्ष होते भाजपचे खासदार ओम बिर्ला. पण आधीच्या लोकसभा अध्यक्षांचा कार्यकाळ नवीन लोकसभेच्या पहिल्या सत्रापूर्वी पर्यंतच असतो.

म्हणूनच मग 18 व्या लोकसभेचं कामकाज सुरू होताना सगळ्यात आधी Pro-Tem Speaker म्हणजे हंगामी अध्यक्षांची निवड करण्यात आली. हंगामी अध्यक्ष खासदारांना शपथ देण्याचं काम करतात आणि सभागृहाचं कामकाज पूर्णवेळ अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत चालवतात. सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याची निवड प्रो-टेम स्पीकर म्हणून केली जाते.

सभापती

फोटो स्रोत, @rashtrapatibhvn

फोटो कॅप्शन, राष्ट्रपती दौपदी मुर्मू भर्तुहरी महताब यांची प्रो-टेम स्पीकर म्हणून शपथ दिली त्यानंतचे छायाचित्र.

काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य आणि केरळमधल्या मावेलिक्करा मतदारसंघाचे खासदार कोडीकुनिल सुरेश यंदाचे प्रो-टेम स्पीकर असण्याची शक्यता होती.

आठव्यांदा खासदार झालेले कोडीकुनिल सुरेश चौथ्यांदा मावेलिक्करामधून निवडून आलेत आणि खासदारकीच्या वर्षांनुसार सदनात सर्वात ज्येष्ठ आहेत.

मात्र, राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्तुहरी महताब यांची प्रो-टेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे.

भर्तुहरी महताब सात वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, त्यांच्या निवडीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

लोकसभा अध्यक्ष
लोकसभा अध्यक्ष
लोकसभा अध्यक्ष

लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्यासाठीच्या अटी काय?

घटनेच्या कलम 93 नुसार लोकसभा अध्यक्षांची निवड होते. खासदार आपल्यापैकी दोन खासदारांची निवड सभापती आणि उपसभापती म्हणून करतात. या लोकसभा अध्यक्षांच्या निवडीच्या आदल्या दिवशी उमेदवारांच्या पाठिंब्यासाठीच्या नोटीस सदस्यांना सादर कराव्या लागतात.

निवडणुकीच्या दिवशी साध्या बहुमताने (Simple Majority) लोकसभा अध्यक्षांची निवड होते. म्हणजेच त्यादिवशी लोकसभेत हजर असलेल्या खासदारांपैकी निम्म्यापेक्षा अधिक जणांनी मत दिलेला उमेदवार हा लोकसभेचा अध्यक्ष होतो.

संसद

फोटो स्रोत, PIB

याशिवाय लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी इतर कोणतीही अट वा पात्रता पूर्ण करावी लागत नाही. पण अध्यक्ष असणाऱ्या व्यक्तीला सभागृहाचं कामकाज, त्याविषयीचे नियम, देशाची घटना, कायदे याविषयीचं ज्ञान असणं महत्त्वाचं असतं.

लोकसभा अध्यक्ष

लोकसभा अध्यक्षांची कामं काय असतात?

कामकाज योग्य रीतीने चालेल याची जबाबदारी लोकसभा अध्यक्षांची असते. म्हणूनच हे पद अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. लोकसभा अध्यक्ष संसदीय बैठकांचा अजेंडा ठरवतात,

सभागृहात वाद झाल्यास अध्यक्ष नियमांनुसार कार्यवाही करतात.

सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही बाजूंचे सदस्य असतात. त्यामुळेच लोकसभा अध्यक्षांनी तटस्थ राहून कामकाज चालवणं अपेक्षित असतं. अध्यक्ष एखाद्या मुद्द्याविषयीचं स्वतःचं मत जाहीर करत नाहीत.

एखाद्या प्रस्तावावरच्या मतदानात अध्यक्ष सहभागी होत नाहीत. पण जर प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधात सारखीच मतं पडली - टाय झाला, तर मात्र अध्यक्षांचं मत निर्णायक ठरतं.

संसद

फोटो स्रोत, Getty Images

लोकसभेचे सभापती विविध समित्यांची स्थापना करतात आणि त्यांच्या सूचना - मार्गदर्शनानुसार या समित्यांचं काम होतं.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या सदस्याने सदनात अयोग्य वर्तन केल्यास त्यांना निलंबित करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे असतो.

2023 डिसेंबरमध्ये संसदेच्या हिवाळी सत्रादरम्यान लोकसभेतील घुसखोरीविषयी चर्चेची मागणी करण्याऱ्या एकूण 141 विरोधी पक्ष नेत्यांना गैरवर्तन केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं. यापैकी 95 जणांचं लोकसभेतून तर 46 जणांचं राज्यसभेतून निलंबन करण्यात आलं होतं. ही लोकशाही थट्टा असल्याचं म्हणत विरोधकांनी याचा निषेध केला होता.

बीबीसी मराठी
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीवरील बातम्यांसाठी बीबीसीच्या व्हॉट्सअप चॅनेलला जॉइन व्हा.

यापूर्वीचे लोकसभा अध्यक्ष

लोकसभेत यापूर्वी सत्ताधारी पक्षाचे नसलेल्या खासदारांनाही अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे.

12व्या लोकसभेचे अध्यक्ष होते तेलुगु देसम पक्षाचे जीएमसी बालयोगी. त्यावेळी पंतप्रधान होते भाजपचे अटलबिहारी वाजपेयी.

13व्या लोकसभेचे सभापती म्हणूनही बालयोगी यांचीच निवड करण्यात आली होती. पण या पदावर असतानाच त्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला.

त्यांच्यानंतर 13व्या लोकसभेचे अध्यक्ष होते शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी.

आजवरच्या इतिहासात एम. ए. अय्यंगार, जी. एस. धिल्लन, बलराम जाखड आणि जीएमसी बालयोगी या नेत्यांची लागोपाठ दोन लोकसभांचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी फक्त बलराम जाखड यांनी सातव्या आणि आठव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून आपला कार्यकाळ दोन्ही वेळा पूर्ण केला.

काँग्रेसचे नेते नीलम संजीव रेड्डी यांची चौथ्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आल्यानंतर अध्यक्ष तटस्थ असावा हे तत्त्व पाळण्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता.

लोकसभा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, 17व्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला

तर मनमोहन सिंह यांच्या UPAच्या पहिल्या सरकारला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला होता, आणि तेव्हा ज्येष्ठ माकप नेते सोमनाथ चॅटर्जी लोकसभेचे अध्यक्ष झाले होते. पुढे भारताच्या अमेरिकेशी अणुकराराच्या वादावरून माकपने सरकारचा पाठिंबा काढला, आणि चॅटर्जींना लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं.

पण त्यांनी तसं करण्यास नकार दिला, म्हणून नंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

2009 - 2014 या काळातील 15व्या लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार या लोकसभा अध्यक्षपद भूषणवणाऱ्या पहिल्या महिला होत्या.

तर त्यांच्या नंतर भाजपच्या सुमित्रा महाजन 16व्या लोकसभेच्या अध्यक्ष झाल्या.

लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवलं जाऊ शकतं का?

लोकसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवता येण्याचा अधिकार घटनेच्या कलम 94ने सदनाला दिलेला आहे. 14 दिवसांची नोटीस देऊन 50 टक्क्यांपेक्षा अधिकच्या प्रभावी बहुमताने (Effective Majority) मंजूर झालेल्या ठरावाने लोकसभा अध्यक्षांना पदावरून हटवलं जाऊ शकतं.

प्रभावी बहुमत (Effective Majority) म्हणजे त्या दिवशी लोकसभेत हजर असणाऱ्या सदस्य खासदारांपैकी 50% पेक्षा अधिक.

याशिवाय The Representation of The People's Act च्या सेक्शन 7 आणि 8नुसारही लोकसभा अध्यक्षांना हटवलं जाऊ शकतं.

अध्यक्षांना स्वतःहून पदावरून बाजूला व्हायचं असेल तर ते त्यांचा राजीनामा उपाध्यक्षांकडे सादर करतात.