मुंबईत सोमवारी रात्री तीसहून अधिक फ्लेमिंगोंचा विमानाशी धडकेमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईच्या घाटकोपर उपनगरातील इथे लक्ष्मीनगर परिसरात ही घटना घडली.
वनविभागाने मृत फ्लेमिंगोला शवविच्छेदनासाठी पाठवले असून मंगळवारी सकाळी परिसरात आणखी जखमी फ्लेमिंगोचा शोध सुरू होता.
एमिरेट्स या विमानसेवेचं दुबईहून येणारं E508 हे विमान मुंबईत सहार इथल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) उतरत होतं.. त्यावेळी रात्री पावणेनऊच्या सुमारास, साधारण 8:40 – 8:50 वाजता ही दुर्घटना घडली. विमानतळावरील सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.
या विमानात तीनशे प्रवासी होते आणि ते सुरक्षित आहेत. पक्ष्यांची टक्कर झाल्यानंतर विमानाची सुरक्षा तपासणी केली जात असल्याची माहिती मिळते आहे.
एमिरेट्स अथवा एयर ट्रॅफिक कंट्रोलनं अजून याविषयी कुठली अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. स्थानिक रहिवाशांकडून घटनेची माहिती मिळताच कांदळवन सुरक्षा कक्षाचे वनसंरक्षक आणि अधिकारी तिथे पोहोचले. मात्र तपासासाठी एयरपोर्टवर जाण्याची परवानगी मिळाली नसल्याचं त्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं.
जिथे या फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला, तो परिसर घाटकोपर पूर्वेला विक्रोळीनजीक आहे. हा भाग विमानतळाच्या मुख्य धावपट्टीच्या सरळ रेषेत आहे, तर इथून पू्र्व दिशेला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि त्या पलीकडे ठाणे खाडीकाठी पाणथळ जागा आहेत.
या खाडीनजीकच्या कांदळवनांच्या परिसरात दरवर्षी लाखो फ्लेमिंग पक्षी स्थलांतर करून येतात. त्यामुळे इथे संरक्षित क्षेत्र आणि अभयारण्यही आहे.
मात्र आजवर कधी फ्लेमिंगोची विमानांशी टक्कर झाल्याची घटना घडल्याची नोंद नाही.
नेमके कशामुळे हे पक्षी विमानाच्या मार्गात आले याचा तपास सुरू आहे. पर्यावरणप्रेमींनी या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांकड बोट दाखवलं आहे.
वनशक्ती या संस्थेसाठी काम करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि पाणथळ जागांविषयी समितीचे सदस्य डी स्टालिन सांगतात, "फ्लेमिंगोंसाठी संरक्षित क्षेत्रात नवी वीजवाहिनी टाकली आहे, ज्यामुळे पक्ष्यांना अडथळे येतात. या पॉवरलाईन्सना इथून नेण्यास परवानगी द्यायला नको होती, त्यांच्याकडे बाकीचे पर्यायी मार्गही होते. आधी अभयारण्यातून वीजेच्या तारा न्यायला परवानगी नव्हती पण वनविभागाचे अधिकारी वीजकंपनीसमोर झुकले. खाडीतल्या अभयारण्यात भर टाकून विजेचे टॉवर्स उभारण्यात आले."
स्टालिन यांनी असाही दावा केला आहे की, "या खाडीपलीकडे नवी मुंबईत NRI काँप्लेक्स आणि चाणक्य तलावाजवळच्या परिसरात बांधकाम करण्याच्या उद्देशानं फ्लेमिंगोंना हुसकावून लावण्याचे प्रयत्न गेल्या महिन्यापासून दिसून आले आहेत. रात्रीच्या वेळी कोणी या पक्ष्यांना हुसकावूनन लावायचा प्रयत्न केला असेल तर ते या बाजूला उडत आले असण्याची शक्यता आहे."
या संदर्भात वीजकंपनी अथवा नवी मुंबईतील विकासकामांवर देखरेख ठेवणारं महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) यांची प्रतिक्रिया अजून आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी (27 एप्रिल 2024) नवी मुंबईच्या DPSs तलावाजवळ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या.