You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

सौरभ भारद्वाज ते गोपाल राय; 'आप' सरकारमधील कुठला मंत्री जिंकला, कुठला मंत्री हरला?

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी 70 जागांसाठी मतदान पार पडलं. आजच्या निकालातून दिल्लीवर राज्य कुणाचं, हे स्पष्ट होईल.

थोडक्यात

  • निकाल वाचण्यासाठी येथे क्लिक करा- दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल 2025
  • सुरुवातीच्या कलामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये चुरस असल्याचं दिसत होतं. मात्र आता भाजपाने स्पष्ट आघाडी घेतल्याचं दिसत आहे.
  • दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 तारखेला मतदान पार पडलं
  • एकूण 699 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात होते
  • दिल्लीत आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली
  • अरविंद केजरीवाल, आतिशी, मनिष सिसोदिया अशा दिग्गजांच्या निकालाकडे देशाचं लक्ष

लाईव्ह कव्हरेज

विनायक होगाडे

  1. जनादेश स्वीकरतो; दिल्लीकरांच्या अधिकारांची लढाई सुरुच राहिल - राहुल गांधी

    राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "दिल्लीचा जनादेश आम्ही विनम्रपणे स्वीकरत आहोत. दिल्लीतील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचं त्यांच्या समर्पणासाठी आणि सर्व मतदारांचं त्यांच्या समर्थनासाठी मनापासून आभार! प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीची प्रगती आणि दिल्लीकरांच्या अधिकारांची लढाई सुरुच राहिल."

  2. दिल्लीकरांनी केजरीवाल यांचं पितळ उघडं पाडलं - देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

    त्यांनी म्हटलं आहे की, "तब्बल 27 वर्षांनंतर भाजपची सत्ता दिल्लीत स्थापन होत आहे, त्याबद्दल दिल्लीच्या जनतेचे मी अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर तसेच त्यांनी केलेल्या कामाबद्दल जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे. दिल्लीच्या लोकांनी आप आणि अरविंद केजरीवाल यांचं पितळ उघडं पाडलं आहे. दिल्लीतील जनतेने भाजपवर दिलेला विश्वास वाया जाणार नाही. मी दिल्लीतील जनतेला आश्वासन देतो की भाजप बदल घडवून आणेल."

  3. दिल्ली विधानसभा निकालाचं विश्लेषण पाहा 'बीबीसी न्यूज मराठी'वर...

    राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीकोनातून दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण तुम्ही बीबीसी न्यूज मराठीवर पाहू शकता.

  4. अरविंद केजरीवाल 4089 मतांनी पराभूत; निवडणूक आयोगाकडून घोषणा

    दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

    अरविंद केजरीवाल 4089 मतांनी पराभूत झाले असल्याचं निवडणूक आयोगानं घोषित केलं आहे.

  5. कुमार विश्वास म्हणतात, 'खऱ्या अर्थाने अध:पतनास सुरुवात झाली'

    दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना आप पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे की, इथून खऱ्या अर्थाने अध:पतनास सुरुवात झाली आहे.

    पुढे कुमार विश्वास म्हणाले की, "कोट्यवधी लोकांना याबाबत आशा होती. लोकांनी आपल्या नोकऱ्या सोडून वेळ दिला होता. काहींशी शत्रूत्व पत्करलं होतं. त्या सर्वांच्या आशेची हत्या एका आत्ममग्न व्यक्तीने आपल्या स्वत:च्या स्वार्थाच्या पूर्ततेसाठी केली. त्या व्यक्तीला ईश्वरी न्यायाने ही शिक्षा मिळाली आहे."

    "आज टिव्हीवर जेव्हा जंगपुरा मतदारसंघाचा निकाल आला आणि मनीष सिसोदीया पराभूत झाल्याचं कळलं तेव्हा नेहमी तटस्थ आणि राजकारणापासून विरक्त राहणारी माझी पत्नीही रडू लागली. कारण, सिसोदीयांनी माझ्या पत्नीला म्हटलं होतं की, आता ताकद आहे. तेव्हा पत्नीने म्हटलं होतं की, भैया, ताकद नेहमी राहत नाही."

    आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदीया यांनी जंगपुरा मतदारसंघातून आपला पराभव मान्य केला असून ते 600 मतांनी पराभूत झाले आहेत.

  6. सौरभ भारद्वाज ते गोपाल रायपर्यंत; 'आप' सरकारमधील मंत्र्यांमध्ये कुणाची जीत, कुणाची हार?

    दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये दिल्ली सरकारमधील चारपैकी तीन मंत्र्यांना विजय प्राप्त करता आलेला आहे.

    निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये बाबरपूर विधानसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे.

    गोपाल राय यांनी भाजपचे उमेदवार अनिल कुमार यांचा 18 हजार मतांनी पराभव केला आहे.

    तर दुसऱ्या बाजूला दिल्ली सरकारमध्ये आरोग्य मंत्री राहिलेले सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलाश मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांना शिखा रॉय यांनी 3,188 मतांनी पराभूत केलं आहे.

    दिल्ली सरकारमधील अन्न आणि पुरवठा मंत्री इम्रान हुसैन यांना बल्लीमारान मतदारसंघातून विजय प्राप्त करता आलेला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार कमल बागरी यांना 29, 823 मतांनी पराभूत केलं आहे.

    दिल्ली सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या मुकेश अहलावत यांना सुलतानपूर माजरा मतदारसंघातून विजय प्राप्त झाला आहे. त्यांनी करम सिंह यांना 17,126 मतांनी पराभूत केलं आहे.

  7. हा विकास आणि सुशासनाचा विजय - नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना "जनशक्ती सर्वोपरी" तसेच "हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं" म्हटलं आहे.

    त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "दिल्लीच्या आपल्या सर्व बंधू-भगिनींनी भाजपला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल त्यांना प्रणाम आणि त्यांचं अभिनंदन. तुम्ही जो भरपूर आशीर्वाद दिला आहे, त्यासाठी मनापासून खूप खूप आभार!"

    पुढे त्यांनी म्हटलं की, "दिल्लीचा सर्वांगीण विकास आणि इथल्या लोकांचं आयुष्य उत्तम करण्यासाठी आम्ही थोडेही कमी पडणार नाही, ही आमची गॅरंटी आहे. यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीसाठी दिल्लीची भूमिका महत्त्वाची ठरेल, याकडेही आम्ही लक्ष देऊ."

    "मला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रचंड अभिमान आहे ज्यांनी हा जनादेश मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस केला. आता इथून पुढे आम्ही आणखी मजबूत पद्धतीने दिल्लीवासीयांच्या सेवेसाठी समर्पित होऊ," असंही त्यांनी म्हटलं.

  8. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर लोकांचा पूर्ण विश्वास - एकनाथ शिंदे

    दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  9. पराभव विनम्रपणे स्वीकारतो - अरविंद केजरीवाल

    दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जवळपास 4 हजार मतांनी पिछाडीवर असून आम आदमी पक्षासाठी हा पराभव धक्कादायक मानला जात आहे.

    दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी एक व्हीडिओ ट्विट करत आपल्या मतदारांचे आभार मानले आहेत.

    त्यांनी म्हटलं आहे की, "दिल्लीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. जनतेचा जो निर्णय आहे, तो आम्ही विनम्रतेने स्वीकारत आहोत. मी भारतीय जनता पार्टीचं या विजयासाठी खूप खूप अभिनंदन करतो. मी अशी आशा करतो की, ज्या अपेक्षेनं लोकांनी त्यांना हा विजय मिळवून दिला आहे, त्या सर्व आशा आणि अपेक्षा ते पूर्ण करतील.

    पुढे ते म्हणाले की, "गेली दहा वर्षे जनतेनं आम्हाला संधी दिली होती, त्या काळात आम्ही भरपूर कामे केली आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज या क्षेत्रासहितच इतरही अनेक क्षेत्रांमध्ये काम करुन लोकांच्या आयुष्यात दिलासा देण्याचा पुरेपुर प्रयत्न आम्ही केला. यासोबतच दिल्लीतील पायाभूत सुविधा अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्नही आम्ही केला. आता जनतेनं जो निर्णय दिला आहे, त्यानुसार आम्ही एक मजबूत विरोधक म्हणून काम करु तसेच लोकांच्या सुख-दु:खात नेहमीप्रमाणे सहभागी होऊ. कारण आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलेलो नव्हतो. तर आम्ही राजकारणाला लोकांच्या उपयोगी पडण्यासाठीचं साधन मानत आलो आहोत आणि ते आम्ही करत राहू."

    पुढे आपल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करताना केजरीवाल म्हणाले की, "मी आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी खूप मेहनत घेतली आणि शानदार पद्धतीने निडवणूक लढवली."

  10. राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आनंद

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला जबरदस्त विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपच्या धोरणांबद्दल असलेल्या विश्वासाचा विजय आहे. या देशातील जनतेचा भरोसा हा मोदीजींच्या विश्वसनीयतेवर तसेच भाजपच्या सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे."

  11. वारंवार खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करता येत नाही - अमित शाह

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आघाडीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली.

    ते म्हणाले, “दिल्लीच्या जनतेनं दाखवून दिलं की, वारंवार खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करता येत नाही.”

    पुढे अमित शाह यांनी एक्स सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत लिहिले की, “दुषित झालेली यमुना नदी, घाणेरडं पिण्याचं पाणी, खराब रस्ते, तुंबलेली गटारं आणि प्रत्येक गल्लीबोळीत उघडलेल्या दारुंच्या दुकानांविरोधात जनतेनं मतांद्वारे उत्तर दिलंय.”

    अमित शाह यांनी एक्स अकाउंटवरुन एकामागे एक पोस्ट करत लिहिले की, “दिल्लीच्या जनतेने खोटी वचनं, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा काचेचा महल नष्ट करून दिल्लीला 'आप'मुक्त केलंय.”

    “दिल्लीनं आश्वासने मोडणाऱ्यांना असा धडा शिकवला आहे जो देशभरातील जनतेला खोटी आश्वासनं देणाऱ्यांसाठीचं उदाहरण बनेल. दिल्लीचा विकास आणि जनतेच्या विश्वासाच्या नव्या युगाची ही सुरूवात आहे.”

    दरम्यान, निवडणूक आयोगाच्या दुपारी 1:30 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपने चार जागा जिंकल्या असून ते 44 जागांवर आघाडीवर आहेत. तर, आम आदमी पक्षाने चार जागा जिंकत 18 जागांवर आघाडी घेतली आहे.

  12. आतिशी यांचा विजय, रमेश बिधुडी आणि अलका लांबा पराभूत

    कालकाजी मतदारसंघात आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप यांच्यात तिरंगी लढत झाली. आतिशी यांनी भाजपचे रमेश बिधुडी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांचा पराभव करून विजय मिळवला आहे.

  13. स्वाती मालीवाल यांचं सूचक ट्वीट

    आम आदमी पक्षाचा दिल्लीत पराभव झाल्यावर या पक्षाच्या माजी नेत्या स्वाती मालीवाल यांनी टीका केली आहे. अहंकाराचा पराभव झाल्याचं सुचित करणारं ट्वीट त्यांनी केलं आहे.

  14. आम आदमी पक्षाच्या कार्यालयाजवळ शुकशुकाट

  15. दिल्ली विधानसभा निवडणूक: प्राथमिक आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष पिछाडीवर, अण्णा हजारे काय म्हणाले?

    सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रारंभिक आकडेवारीत पिछाडीवर गेलेल्या आम आदमी पक्षाला त्यांचीच नीती जबाबदार असल्याचं म्हटलंय.

    दिल्लीचा कथित दारु घोटाळाही या पराभवातील प्रमुख कारणांपैकी एक कारण असल्याचं हजारे म्हणाले.

    एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, “मी आधीपासूनच सांगत आलोय की, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे आचार-विचार शुद्ध असणे, जीवन निष्कलंक असणे तसेच अपमान सहन करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. जर उमेदवारांत हे गुण असतील, तर मतदारांचा त्याच्यावर विश्वास बसतो की हा माणूस जनतेसाठी काहीतरी करेल.”

    "मी वारंवार हे सांगत होतो, पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि शेवटी हीच बाब पुढे आली. दारु घोटाळ्याची चर्चा का झाली? कारण ते पैशाच्या मोहात वाहुन गेले आणि बदनाम झाले. त्यामुळे लोकांनाही हे बोलण्याची संधी मिळाली की, हा एकीकडे चारित्र्यावर भाष्य करतो आणि दुसरीकडे मद्यधोरणावर चर्चा करतो."

    अण्णा हजारे पुढे बोलताना म्हणाले की, याच कारणामुळे आज आम आदमी पक्षाला निवडणुकीत पराभव पत्करावा लागत आहे.

    मद्य धोरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे का?

    या प्रश्नावर बोलताना अण्णा हजारे म्हणाले, “राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण आरोप झाले, तर ते चूक-बरोबर जे काही आहे ते जनतेसमोर स्पष्ट करणं गरजेचं आणि महत्वाचं असतं. जर ते सिद्ध करता आलं, तर कुणीही काही बिघडवू शकत नाही.”

  16. मी अजून निकाल पाहिला नाही- प्रियंका गांधी

    काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी बोलताना दिल्ली निवडणुकीचा निकाल पाहिला नसल्याचं सांगत प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. केरळच्या कन्नूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मी अद्याप पाहिलं नाही, त्यामुळं मला माहिती नसल्यानं प्रतिक्रिया देणं टाळलं.

  17. मनिष सिसोदियांनी मान्य केला पराभव

    आम आदमी पक्षातील क्रमांक दोनचे नेते असलेले मनीष सिसोदिया यांनी पराभव मान्य केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी 600 मतं कमी पडल्याचं सांगत पराभव मान्य केला. विजयी उमेदवाराचं अभिनंदन करत त्यांनी जनतेचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलं.

    मनीष सिसोदिया हे भाजपचे तरविंदर सिंग यांच्याकडून पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत सिसोदिया यांनी आपला मतदारसंघ बदलला होता. दरम्यान, काँग्रेसचे फरहाद सूरी तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत.

  18. काँग्रेसचे नेते उदित राज यांनी दिला स्वपक्षाला घरचा आहेर

    काँग्रेसचे नेते उदित राज यांनी आपल्याच पक्षाला कानपिचक्या दिल्या आहेत. ते ट्वीटमध्ये लिहितात, 'दिल्ली विधानसभा निकालांचे कल पाहता भाजपला फायदा होत असल्याचं दिसत आहे.

    काँग्रेसची जी मतं आपकडे वळली होती, ती काँग्रेसच्या विचारसरणीची असूनही भाजपकडे वळली आहेत. राहुल गांधी यांच्या हे लक्षात आलं होतं. त्यामुळं त्यांनी निवडणुकीच्या भाषणांद्वारे वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला.

    पण दिल्ली काँग्रेसनं तिसरा मुद्दा असलेल्या सामाजिक न्यायाबाबत काहीही काम केलं नाही. त्यामुळं आप आणि भाजप यांच्या काँग्रेस मध्येच लटकलेली दिसली. पक्षाला हातून गेलेली मतं पुन्हा मिळवण्याची ही सुवर्णसंधी होती. हायकमांड आणि स्थानिक नेतृत्वातील मतभेदाचे परिणाम स्पष्ट दिसत आहेत.'

  19. बाबरपूरमध्ये कोण जिंकणार?

    निवडणूक आयोगाच्या मते, बाबरपूर मतदारसंघात आम आदमी पक्षाचे गोपाल राय आघाडीवर आहेत.

    या मतदारसंघात भाजपकडून अनिल कुमार वशिष्ठ तर, काँग्रेसकडून मोहम्मद इशराक खान हे निवडणूक लढवत आहेत.

    सध्या हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार भाजपचे अनिल कुमार वशिष्ठ दुसऱ्या स्थानी, तर मोहम्मद इशराक खान तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, अजून अनेक फेऱ्यांची मतमोजणी बाकी असून अंतिम निकाल येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

  20. भाजप-आम आदमी पक्षाला किती टक्के मतदान?

    दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला वेग आला असून, प्राथमिक कलानुसार भाजपनं 40 हुन अधिक जागांवर आघाडी घेतल्याचं दिसत आहे.

    दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष सध्या 27 जागांवर आघाडी राखून आहे. तर, तिसरी प्रमुख ताकद असलेल्या काँग्रेसला मात्र प्रारंभिक कलानुसार कोणत्याही जागेवर आपलं खातं उघडू शकलेली नाही.

    मतदानाच्या टक्केवारीबाबत बोलायचं झाल्यास, सकाळी 11:30 वाजेपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार – भाजपला 46.92 टक्के मतं, आपला 43.38 टक्के मतं, तर, काँग्रेसला 6.61 टक्के मतं मिळाली आहेत. असं असलं तरी ते कोणत्याही जागेत परिवर्तित होताना दिसत नाही.

    ही सर्व आकडेवारी प्राथमिक कलावर आधारित असून अद्याप अनेक फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे.