You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावण्याची तयारी- आप नेत्या आतिशी यांचा दावा
राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
थोडक्यात
- भाजपने माढा लोकसभेसाठी विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
- 11 एप्रिलला संध्याकाळी मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं.
- हवामान खात्याने या आणखीन दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
- आगामी काळात येऊ शकणाऱ्या उष्णतेच्या लाटांसंदर्भात तयारी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली.
- पंतप्रधान मोदींनी सांगितलं की सर्व मंत्रालयांसोबत केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील वेगवेगळ्या सरकारांनासमन्वयाने काम करावं लागेल.
लाईव्ह कव्हरेज
44 अब्ज डॉलर्सची फसवणूक : 6 टन पुरावे, 2700 साक्षीदार, 200 वकील आणि मृत्युदंड
इस्रायलच्या हल्ल्यात माझी 3 मुलं आणि 4 नातवंडं मारली गेली- हमास नेत्याची माहिती
इराण आणि इस्रायलचा दौरा करू नका, भारताचा नागरिकांना सल्ला
पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी इराण आणि इस्रायलमध्ये जाऊ नये असं भारताने आपल्या नागरिकांना सांगितलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवेदनानुसार, "या देशांमधील सद्य परिस्थिती लक्षात घेता, सर्व भारतीयांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराण किंवा इस्रायलचा दौरा करू नये."
"जे नागरिक आधीपासून इराण किंवा इस्रायलमध्ये आहेत त्यांनी तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा आणि आपली नोंदणी करून घ्यावी. या दोन देशांमध्ये राहणाऱ्या लोकांनीही त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. शक्यतो बाहेर पडणं टाळावं," अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यापूर्वी अमेरिकेनेराजनैतिक अधिकाऱ्यांनी इस्रायलचा प्रवास करू नये म्हणून बंदी घातली होती.
अमेरिकन दूतावासाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना जेरुसलेम, तेल अवीव किंवा बेअर शेवाच्या बाहेर प्रवास करू नये असा सल्ला दिला आहे.
खरं तर 1 एप्रिल रोजी सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला होता, यात 13 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये इराणच्या एलिट कुड्स फोर्सचे टॉप कमांडर आणि त्यांचे सहकारी मारले गेले.
या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असून आम्ही नक्कीच बदला घेऊ असंइराणने म्हटलंय. इराण इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता पाहता अमेरिकेपाठोपाठ भारतानेही आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वं प्रसिद्ध केली आहेत.
‘माझ्याकडे भाजीपाल्यालासुद्धा पैसे नसतात, फक्त मिरचीवर जेवण बनवते, मला साडी नको, रोजगार द्या’
'कानाला गोळी लागली आणि मी रशियन सैनिकाच्या मृतदेहावर पडलो', फसवणूक झालेल्या तरुणांची कहाणी
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा विधानसभेची निवडणूक होईल, तो दिवस दूर नाही – नरेंद्र मोदी
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील ती वेळ दूर नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (12 एप्रिल) जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे एका निवडणूक सभेत म्हटलं.
ते म्हणाले, "दशकानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे ज्यात दहशतवाद, फुटीरतावाद, दगडफेक, बंद, संप, सीमेपलीकडून गोळीबार, हे निवडणुकीचे मुद्दे नाहीत. मोदी मोठा विचार करतात, मोदी दूरचा विचार करतात. त्यामुळे आत्तापर्यंत जे काही घडले ते फक्त ट्रेलर आहे. मला जम्मू-काश्मीरचे नवीन आणि अप्रतिम चित्र तयार करायचं आहे.”
“जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होतील आणि जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळेल, ती वेळ दूर नाहीये. तुम्ही तुमची स्वप्ने तुमच्या आमदार आणि तुमच्या मंत्र्यांसोबत शेअर करू शकाल. प्रत्येक वर्गातील लोकांची स्वप्ने साकार होतील. देश-विदेशातील आणखी मोठे कारखाने येथे येतील.”
2018 मध्ये भाजप आणि पीडीपीच्या युतीचं सरकार पडलं आणि जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली.
यानंतर 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवण्यात आले. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या नाहीत आणि राज्याचा दर्जा जाऊन केंद्रशासित प्रदेश हा दर्जा प्राप्त झाला.
कलम 370 हटवण्याची प्रक्रिया कायदेशीर ठरवताना सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभा निवडणुका व्हाव्यात आणि राज्याचा दर्जा परत दिला जावा, असंही निर्णयात म्हटलं होतं.
जगातल्या वाढलेल्या तापमानाबद्दल संशोधक काय भीती व्यक्त करत आहेत?
दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावण्याची तयारी- आप नेत्या आतिशी यांचा दावा
आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेल्या आतिशी यांनी, केंद्र सरकार पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत राष्ट्रपती शासन लागू करणार असल्याचा दावा केला आहे.
पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना आतिशी म्हणाल्या की, "आम्हाला विश्वसनीय सुत्रांकडून अशी माहिती मिळालीय की केंद्र सरकार दिल्लीत राष्ट्रपती शासन लागू करणार आहे. मागच्या काही दिवसांपासून याचे बरेच संकेत मिळाले आहेत."
"मागच्या बऱ्याच महिन्यांपासून दिल्लीत नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाहीये. केंद्र सरकार दिल्लीतील आयएएस अधिकाऱ्यांना नियुक्त करत असतं. त्यांचे नियंत्रण केंद्र सरकार करतं. गेल्या अनेक महिन्यांत एकाही आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही."
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या रद्द करण्यात आलेल्या दारू धोरणातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. या प्रकरणी मनीष सिसोदिया गेल्या वर्षभरापासून तुरुंगात आहेत.
अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवत आहेत. तुरुंगातही ते दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील हे आम आदमी पक्षाने सांगितलेलं आहे. अलीकडेच आपचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे.
निवडणुकीपूर्वी मोदी सरकार सरकारी संस्थांचा वापर करून विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे.
धैर्यशील मोहिते पाटलांचा अखेर राजीनामा, राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
भाजपने माढा लोकसभेसाठी विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची गुरुवारी (1 एप्रिल) भेट घेतल्यानंतर ते ही निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शेतकरी मेळावा घेत शक्तिप्रदर्शनही केलं होतं.
या आधीच शरद पवारांनी 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघातला मोहिते पाटील घराण्याचा प्रभाव लक्षात घेता धैर्यशील मोहिते पाटलांचा राजीनामा ही मोठी घटना आहे.
ओबीसी आरक्षणाचे शिलेदार व्ही. पी. सिंह राजकारणातले हिरो की व्हीलन?
मराठवाडा-विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपलं, पीकांचं मोठं नुकसान
विदर्भात यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशीम, वर्धा तर मराठवाड्यात सगळ्याच जिल्ह्यांसाठी वादळी वारे, पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय.
11 एप्रिलला संध्याकाळी मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं. हवामान खात्याने या आणखीन दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा सामना करावा लागत असून. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं आहे.
तीन दिवसांपासून नागपूर, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी वारा आणि गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला.
दैनिक लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार बुलढाणा जिल्ह्यात 50 हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं तर अमरावती जिल्ह्यातील 35 हजार 389 हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह फळबागांचं नुकसान झालं आहे.
अकोला जिल्ह्यात 4000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालं असून यवतमाळ जिल्ह्यातल्या 2000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर उभ्या असलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे.
हवामान विभागाने मराठवाड्यातल्या बीड, लातूर, धाराशिव आणि जालना तसेच सोलापूर आणि सांगलीच्या काही भागांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.
त्यानुसार 11 एप्रिलच्या संध्याकाळी परभणी, बीड, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत.ज्वारी, हळद, आंबा आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात येऊ शकणाऱ्या उष्णतेच्या लाटांसंदर्भात तयारी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे आणि हवामान विभागाने देशातील तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
त्यामुळे सरकारी पातळीवर यासंदर्भात तयार करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. आरोग्य खात्याकडून अत्यावश्यक औषधे, इंट्राव्हेनस फ्लुइड्स, आइस पॅक, ओआरएस आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत केलेल्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. टेलिव्हिजन, रेडिओ आणि सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांचा वापर करून नागरिकांना सुरक्षिततेचे उपाय सांगण्याचे आणि वाढत्या तापमानाबाबत जागरूकतेसाठी प्रयत्न करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की सर्व मंत्रालयांसोबत केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील वेगवेगळ्या सरकारांनासमन्वयाने काम करावं लागेल.
गुड मॉर्निंग,
नमस्कार... बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजवर तुमचं स्वागत आहे. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता.
11 एप्रिलच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.