You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

उत्तरकाशी बोगदा बचावकार्य: 41 मजुरांची सुखरुप सुटका, 12 नोव्हेंबरपासून काय काय घडलं?

उत्तरकाशीच्या बोगद्यात 17 दिवसांपासून अडकलेल्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी वाचवलेल्या सर्व मजुरांना एक-एक लाख रुपयांचा मदतनिधी देण्याची घोषणा केली.

लाईव्ह कव्हरेज

  1. उत्तरकाशीमधल्या बचावकार्याचा संपूर्ण आढावा-

    12 नोव्हेंबर

    बोगद्याचा काही भाग कोसळला आणि 41 मजूर त्यामध्ये अडकले.

    13 नोव्हेंबर

    या मजुरांशी संपर्क झाला आणि त्यांना पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागला.

    14 नोव्हेंबर

    ढिगाऱ्याच्या आत 800-900 मिमी व्यासाचे स्टील पाईप ऑगर मशीनद्वारे टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सतत ढिगारा खाली पडत असल्याने दोन कामगार किरकोळ जखमीही झाले. यादरम्यान अन्न, पाणी, ऑक्सिजन, वीज आणि औषधं मजुरांपर्यंत पोहोचत राहिली.

    15 नोव्हेंबर

    ऑगर मशीनबद्दल पूर्णपणे समाधानी नसल्यामुळे, NHIDCL ने दिल्लीहून एअरलिफ्ट केलेल्या नवीन अत्याधुनिक ऑगर मशीनची मागणी केली.

    16 नोव्हेंबर

    नवीन ड्रिलिंग मशीनने खोदकाम सुरु केलं गेलं.

    17 नोव्हेंबर

    मात्र यातही काही अडथळे आल्याने इंदूरहून दुसरं ऑगर मशीन मागवण्यात आलं. पण नंतर काम थांबवावं लागलं.

    18 नोव्हेंबर

    पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी आणि तज्ज्ञांनी नव्या योजनेवर काम सुरू करण्याचे आदेश दिले

    19 नोव्हेंबर

    ड्रिलिंग थांबलं आणि यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला.

    20 नोव्हेंबर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी फोनवर चर्चा करून बचाव कार्याचा आढावा घेतला.

    21 नोव्हेंबर

    कामगारांचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला.

    22 नोव्हेंबर

    800 मिमी जाडीचा स्टील पाईप सुमारे 45 मीटरपर्यंत पोहोचला. मात्र त्यादिवशी सायंकाळी ड्रिलिंगमध्ये काही अडथळे निर्माण झाले.

    23 नोव्हेंबर

    मशीनला तडा गेल्याने पुन्हा ड्रिलिंग थांबवावं लागलं.

    24 नोव्हेंबर

    शुक्रवारी पुन्हा खोदकाम सुरू झाले पण नंतर तेही थांबवावं लागलं. ऑगर मशीन तुटल्याने तिला कापून बाहेर काढावं लागलं.

    25 नोव्हेंबर

    दरम्यान मॅन्युअल ड्रिलिंग (हाताने खोदकाम) सुरु केलं गेलं.

    26 नोव्हेंबर

    सिल्क्यारा-बारकोट बोगद्याच्या वरच्या टेकडीवर उभे खोदकाम (व्हर्टिकल ड्रिलिंग) सुरु केले गेले.

    27 नोव्हेंबर

    व्हर्टिकल ड्रिलिंग सुरूच होतं.

    28 नोव्हेंबर

    दुपारी बचाव पथक कामगारांपर्यंत पोहोचलं आणि बोगद्यात पाईप टाकण्याचं काम पूर्ण झालं. यानंतर कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. अखेर सगळ्या कामगारांची सुटका झाली.

  2. बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेनंतर नितीन गडकरींची महत्त्वाची घोषणा

  3. आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही -बाहेर पडलेल्या कामगाराच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया

    उत्तरकाशी बोगद्यातील 41 मजुरांच्या सुटकेनंतर सर्वांवर आता आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. 17 दिवसांनंतर मजुरांची सुटका झाल्यानं त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.

    बिहारमधील आरा येथील एका मजुराच्या नातेवाईकानं पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांच्या वेदना आणि आनंद असा दोन्ही भावना व्यक्त केल्या.

    ते म्हणाले, "हा आनंदाचा दिवस आहे. संपूर्ण देश प्रार्थना करत होता आणि ती प्रार्थना यशस्वी झाली. हा आनंद शब्दांत मांडता येणार नाही. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या वृत्तांमध्ये या मजुरांचे कुटुंबीय आनंद साजरा करताना दिसत आहेत.

  4. वाचवलेल्या मजुरांना मिळणार एक लाखाची आर्थिक मदत-धामी यांची घोषणा

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी (28 नोव्हेंबर) सायंकाळी सिलक्याला बोगद्यातून सर्व मजुरांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर त्याबाबत माध्यमांना माहिती दिली.

    धामी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं-

    • सर्व मजूर एका वेगळ्या वातावरणातून बाहेर आले आहेत. त्यामुळं आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे जाऊ.
    • त्यांना डॉक्टरांच्या निगराणीत ठेवलं जाईल, पण सध्या कोणीही गंभीर नाही.
    • वाचवलेल्या सर्व मजुरांना एक-एक लाख रुपयांचा मदतनिधी दिला जाईल. बौखनाग मंदिर पुन्हा तयार केले जाणार.
    • बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा आढावा घेतला जाईल.
  5. मजुरांच्या सुटकेवर उत्तराखंड सरकारनं म्हटलं-डबल इंजिन सरकारचे यश, काँग्रेसने काय म्हटले?

    सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर उत्तराखंड सरकारनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मजुरांच्या बचावकार्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या संस्थांबरोबरच लष्कर, विविध संघटना आणि जगातील प्रसिद्ध तज्ज्ञ सहभागी झाले होते, असं सरकारनं म्हटलं आहे.

    बचावकार्यात एनडीआरएफ, एसडीआरएफ, बीआरओ, आरव्हीएनएल, एसजेव्हीएनएल, ओएनजीसी, आयटीबीपी, एनएचएआईडीसीएल, टीएचडीसी, उत्तराखंड राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, भारतीय लष्कर, हवाईदल यासह अनेक संघटना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भूमिका महत्त्वाची ठरली.

    उत्तराखंड सरकारनं म्हटलं की, हे यश पीएम मोदींसं सशक्त नेतृत्व आणि मुख्यमंत्री धामी यांचा दृढ निश्चय आणि बांधिलकीमुळं मिळालं आहे.

    काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिलं की, "17 दिवसांची मेहनत आणि प्रयत्नांनंतर उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना काढण्यात यश मिळालं आहे. संपूर्ण देश या मजुरांचा संयम आणि साहस याला सलाम करत आहे. संपूर्ण देश बचाव पथकाचे समर्पण, कौशल्य आणि दृढ निश्चय याचंही कौतुक करत असून त्यांचे मनापासून आभार मानत आहे."

  6. उत्तरकाशीतल्या 'त्या' बोगद्यातून मजुरांची सुखरुप सुटका

  7. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, 'हे यश भावूक करणारं'

    भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात मिळालेलं यश भावूक करणारं असल्याचं म्हटलं आहे.

    पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की - "उत्तरकाशीमध्ये आमच्या मजूर भावंडांना वाचवण्यासाठीच्या मोहिमेतील यश हे प्रत्येकाला भावूक करणारं आहे."

    "बोगद्यात अडकलेल्यांना मी सांगू इच्छितो की, तुमचं साहस आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. आपल्या सर्वांच्या कुशलतेची आणि चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. एवढ्या दीर्घ काळानंतर आमचे हे बांधव कुटुंबीयांना भेटणार आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांनीही या आव्हानात्मक काळात जे संयम आणि साहस दाखवलं त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे."

    नरेंद्र मोदींनी या बचावकार्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही सलाम केला.

    बोगद्यातून बाहे काढल्यानंतर मजुरांना बोगद्याजवळ तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्याठिकाणी त्यांची मानसिक आणि शारीरिक आरोग्याची तपासणी केली जाईल.

  8. मिशन सिल्क्यारा अखेर यशस्वी, 17 व्या दिवशी 41 कामगार बोगद्यातून सुखरूप बाहेर

    राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांसोबतच लष्कर, विविध संस्था आणि जगप्रसिद्ध बोगदा तज्ज्ञांचा बचावकार्यात सहभाग होता. मंगळवारी (28 नोव्हेंबर) रात्री संपूर्ण देशासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बचाव पथकांच्या अथक परिश्रमामुळे ऑपरेशन सिलक्यारा यशस्वी झालं आहे.

    बोगद्यात अडकलेले सर्व 41 कामगार 17 व्या दिवशी सुखरूप बाहेर आले आहेत. उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री महामार्गावरील सिलक्यारा येथे 12 नोव्हेंबरला भूस्खलन झाल्याने 41 कामगार बोगद्यात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले.

    डेहराडूनहून आलेले एसडीआरएफचे जवान तातडीने स्थानिक पोलिस आणि जिल्हा प्रशासनासह बचावकार्यात सहभागी झाले. बोगद्यातील ढिगारा हटवण्यासाठी आधी जेसीबी तैनात करण्यात आला, मात्र वरून ढिगारा पडल्याने त्यात यश आले नाही, त्यामुळे डेहराडूनहून ऑगर मशीन मागवून बोगद्यात खोदकाम सुरू करण्यात आलं.

    स्थानिक ऑगर मशीनने नीट काम होत नसल्यामुळे दिल्लीहून अमेरिकन ऑगर मशीन घटनास्थळी पोहोचवण्यात आले. त्यासाठी हवाई दलाच्या हर्क्युलस विमानांची मदत घेण्यात आली. या विमानांनी मशीनचे भाग चिन्यालिसौर हवाई पट्टीत आणले आणि तेथून ते ग्रीन कॉरिडॉरद्वारे सिल्क्यारा येथे नेले गेले. बोगद्यात सुमारे 50 मीटर खोदल्यानंतर या मशीनमध्येही बिघाड झाला. त्यानंतर हैदराबादहून प्लाझ्मा कटर मागवण्यात आलं.

    कटरने ऑगर कापल्यानंतर 16 व्या दिवशी मॅन्युअल ड्रिलिंग सुरू करण्यात आले आणि आज 17 व्या दिवशी मजुरांची सुटका करण्यात आली. बचाव पथकांना सलाम राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व एजन्सी, अधिकारी आणि कर्मचारी आजच्या 17 व्या दिवसापर्यंत बचाव कार्यात गुंतले होते.

    NDRF, SDRF, BRO, RVNL, SJVNL, ONGC, ITBP, NHAIDCL, THDC, उत्तराखंड राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, भारतीय लष्कर, हवाई दल यासह अनेक संस्था, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 'इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशन'चे अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स यांनीही या सुटकेसाठी प्रयत्न केले.

  9. कसे अडकले होते हे मजूर?

    हा अपघात 17 दिवसांपूर्वी दिवाळीच्या दिवशी घडला होता. त्यावेळी हे मजूर या बोगद्यात काम करत होते. पण बोगदा पडल्याने हे सगळे मजूर 70 मीटर लांबीच्या ढिगाऱ्यापलीकडे अडकून पडले होते.

    यानंतर हळूहळू ढिगारा हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची आणि संस्थांची मदत घेण्यात आली.

  10. 13 मजुरांना बाहेर काढण्यात यश

    एएनआय या वृत्तसंस्थेवर आलेल्या फोटोमध्ये अडकलेले मजूर रुग्णवाहिकेतून बोगद्याच्या बाहेर पडताना दिसत आहेत.

    उत्तराखंड सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 13 कामगार बाहेर आले आहेत. रुग्णवाहिकेतून त्यांना थेट चिन्यालीसौरच्या आरोग्य केंद्रात आणण्यात येणार आहे.

    बाकीच्या मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

    अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार येत्या दोन तासांत सगळे मजूर बाहेर येतील.

  11. तब्बल 17 दिवसांनी बोगद्यातून पहिल्या मजुराची सुटका

    बोगद्यात अडकलेल्या पहिल्या माणसाची सुटका करण्यात आली आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत अन्न पोहोचवण्याची जबाबदारी असणाऱ्या साईस चंद्रन यांच्या मागे बाकीचे येत असताना दिसत आहेत.

    मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी वाचवलेल्या मजुरांची भेट घेत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग हेही बोगद्यात उपस्थित आहेत.

    मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बचाव कार्यात गुंतलेल्या कामगार आणि जवानांच्या मनोबलाचे आणि धैर्याचे कौतुक केले. बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांचे नातेवाईकही बोगद्यात आहेत. बोगद्यातून बाहेर काढलेल्या कामगारांवर तिथेच बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या वैद्यकीय शिबिरात प्राथमिक उपचार केले जाणार आहेत.

  12. उत्तरकाशी बोगद्यातून सुटका : बोगद्यात अडकलेले मजूर बाहेर आणण्याची प्रक्रिया सुरू, पाहा LIVE

    उत्तरकाशीच्या बोगद्यातून मजूर बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचं दिसतंय.

  13. अजून दोन तासात अडकलेले मजूर बाहेर येतील : बचावकार्यातील ऑपरेटरची माहिती

    उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधण्यात येत असलेल्या सिल्क्यारा बोगद्यात गेल्या 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना हळूहळू बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

    एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, ऑगर मशीनच्या ऑपरेटरने सांगितले की, येत्या दोन तासांत कामगारांना बाहेर काढले जाईल.

    या अधिकाऱ्याने सांगितले की, एनडीआरएफच्या पथकांनी कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू केलं आहे. या मजुरांना स्ट्रेचरवर झोपवून पाईपद्वारे बाहेर काढलं जाईल. या स्ट्रेचरच्या तळाशी चाके बसवण्यात आली आहेत जेणेकरून त्यांना पाईपच्या आतून सहज ओढता येईल.

    एनडीआरएफच्या चार सदस्यांच्या एकूण तीन वेगवेगळ्या टीम बोगद्याच्या आत तैनात आहेत. 17 दिवसांपूर्वी बोगद्यात चिखल झाल्याने सुमारे 60 मीटर रुंदीच्या ढिगाऱ्याच्या भिंतीपलीकडे हे कामगार अडकले होते. तेव्हापासून या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आडवे खोदकाम करून या मजुरांना बाहेर काढण्यात येत आहे.

    एनडीआरएफच्या चार सदस्यांच्या एकूण तीन वेगवेगळ्या टीम बोगद्याच्या आत तैनात आहेत.

    17 दिवसांपूर्वी बोगद्यात चिखल झाल्याने सुमारे 60 मीटर रुंदीच्या ढिगाऱ्याच्या भिंतीपलीकडे हे कामगार अडकले होते.

    तेव्हापासून या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आडवे खोदकाम करून या मजुरांना बाहेर काढण्यात येत आहे.

    झोजिला बोगदा प्रकल्पाचे प्रमुख हरपाल सिंग यांनी सांगितलं की अखेर या मोहिमेला यश मिळालं. त्यांनी सांगितलं की त्यांना मजूर दिसले आहेत. जर सगळं काही नियोजनानुसार झालं तर अजून अर्ध्या तासात आपल्याला पहिला मजूर बाहेर आलेला दिसेल.

    ते असंही म्हणाले की एनडीआरएफच्या दोन पेक्षा जास्त मजुरांना बोगद्यात पाठवण्याची गरज नाहीये. पाइपलाइनची जाडी 10 मिमी आणि व्यास 800 मिमी आहे आणि अतिशय मजबूत स्टील पासून हे पाईप बनवलं आहे

  14. मजुरांना बाहेर काढण्याचं काम रात्रभर सुरु राहणार

    राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी सांगितलं की, "हे बचावकार्य रात्रभर सुरू राहील."

    हसनैन यांनी म्हटलं की, कामगारांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी किमान तीन ते चार तास लागतील. एनडीआरएफचे कर्मचारी त्यांना स्ट्रेचरद्वारे बाहेर काढतील. एनडीआरएफच्या चार जवानांची तीन स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. प्रत्येक कामगाराला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी 3-5 मिनिटे लागतील.

  15. बोगद्यात बराच काळ अडकलेल्या व्यक्तीच्या शरीरावर काय परिणाम होतो?

    उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्कियारा बोगद्यातून 41 कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    गेल्या 16 दिवसांपासून हे कामगार बोगद्यात अडकले असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

    या कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या आरोग्याबाबत काय केले पाहिजे आणि त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं हे समजून घेण्यासाठी बीबीसी हिंदीने रांची येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्रीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजय कुमार मुंडा आणि रांचीच्या सरकारी कंपनीच्या खाण विभागातील डॉक्टर मनोज कुमार यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

    डॉ. संजय कुमार मुंडा म्हणतात की, बोगद्यात अडकलेल्या लोकांमध्ये निराशेपासून गोंधळापर्यंतची परिस्थिती उद्भवू शकते, म्हणून त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांचं सर्वसमावेशक मानसशास्त्रीय मूल्यमापन केलं पाहिजे जेणेकरून भविष्यात त्यांना कोणत्याही समस्यांना सामोरं जावं लागणार नाही.

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

  16. ‘ते बाहेर आले की आमची दिवाळी साजरा करू’

    बुधसाई बारा हे सिलक्यारा बोगद्याच्या तोंडावर बांधलेल्या एका तात्पुरत्या निवाऱ्यात उभं राहून समोर घडणाऱ्या गोष्टी बघत आहेत. बोगद्यात काम करणाऱ्या इतर काही जणांसोबत ते बसले आहेत.

    ते म्हणतात की, "बोगद्यात काम करणाऱ्या सगळ्यांशी आमची मैत्री आहे. आता आपण खूप जवळ आलो आहोत. हा अपघात घडला तेंव्हा आम्ही आमच्या खोलीत बडलो होतो. शिफ्ट संपवून आराम करत होतो.

    आम्हा सगळ्यांना खूप काळजी वाटत होती पण ते बाहेर येतील यावर आमचा विश्वास होता. आता एकदा का ते बाहेर आले की आम्हाला आनंद होईल. आम्हाला सगळ्यांना एकत्र दिवाळी साजरी करायची होती आता ते बाहेर आले की आम्ही आमची दिवाळी साजरी करू.”

    जयमल सिंग यांचा धाकटा भाऊ गब्बर सिंग सध्या बोगद्यात अडकला आहे. गेल्या 15 दिवसांपासून ते येथे आहेत. या बोगद्यापासून त्यांचं गाव सुमारे 250 किमी अंतरावर आहे. बोगदा कोसळल्यानंतरही ते रोज त्यांच्या भावाशी बोलत होते.

    सुरुवातीला पाईपमधून आणि नंतर वॉकी टॉकीमधून. त्यांच्या भावाने त्यांना चिंता करू नका असं सांगितलं होतं. अडकलेल्या मजुरांना मध्ये योगा करायला आणि फेरफटका मारायला सांगितलं होतं.

    आम्ही जयमल सिंग यांना विचारलं की, "तुमचा भाऊ बाहेर आल्यावर तुम्ही त्याची गळाभेट घ्याल का?" यावर हसत हसत ते म्हणाले की, "तो क्षण नेमका कसा असेल हे मी आत्ताच सांगू शकत नाही."

  17. बाहेर आल्या आल्या मजुरांना दिलं जाणार हे जेवण

    उत्तरकाशीच्या बोगद्यातून कामगारांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांना कुठे आणि कसं नेलं जाईल याबाबत नवनवी माहिती सातत्याने समोर येत आहे.

    आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बोगद्याच्या आत प्राथमिक उपचार देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बोगदा बांधणाऱ्या हैदराबादच्या नवयुग इंजिनीअरिंग कंपनी लिमिटेडचे ​​अधिकारी विकास राणा यांनी सांगितलं की, आज कामगारांसाठीच अन्न पाईपमधून नाही तर रुग्णवाहिकेतून पाठवलं जात आहे.

    बाहेर येताच त्यांना रुग्णवाहिकेत बसवून जेवण दिलं जाईल. मेनूमध्ये बटाटा, कोबी, रोटी, डाळ आणि भात यांचा समावेश आहे.

  18. बोगद्याच्या बाहेर कसं आहे वातावरण? बीबीसी प्रतिनिधींनी सांगितली परिस्थिती

    बचाव मोहिमेचा हा 17 वा दिवस आहे.

    बोगद्यात 57 मीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

    एनडीआरएफच्या जवानांनी घोषणा देत बोगद्यात प्रवेश केला आणि आता कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.

    कामगारांना स्ट्रेचरद्वारे बाहेर काढले जाईल.

    20 हून अधिक रुग्णवाहिका तैनात आहेत, पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत. कामगारांना बाहेर काढताच त्यांना 20 किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेले जाईल. त्यांची वैद्यकीय तपासणी तिथं केली जाईल.

    रुग्णवाहिकेत कामगारांसोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित राहणार आहेत.

  19. 'गेल्या 400 तासांपासून आम्ही बचावकार्य करतोय'

    ले. जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी दिलेल्या माहितीनुसार :

    • गेल्या 400 तासांपासून आम्ही बचावकार्य करतोय
    • जेव्हा कामगार बाहेर येतील, तेव्हा बाहेर काढण्याची प्रक्रिया 3 ते 4 तास चालेल
    • डबल रोटरचं हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आलंय. मात्र हे हेलिकॉप्टर संध्याकाळी 4.30 नंतर उडवलं जात नाही. त्यामुळे या हेलिकॉप्टरची गरज पडल्यास, मजुरांना बोगद्यातच वैद्यकीय सुविधा पुरवून सकाळी हेलिकॉप्टरनं आवश्यक ठिकाणी नेण्यात येईल.
    • जेव्हा मजुरांना बाहेर काढलं जाईल, तेव्हा त्यांच्यावर 48 ते 72 तास देखरेख ठेवली जाईल.

    "ब्रेकथ्रू झालेला नाही. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी पाईप टाकण्याचं काम झाल्याचं सांगितलंय, दुपारी 4 ते 4.15 दरम्यान शेवटचे दोन मीटर पाईप पुश करण्याचं काम सुरू होतं. 58 ते 60 मीटर अंतर पार करण्यात अडचणी येऊ शकतात. येऊ नयेत अशी अपेक्षा आहे, पण अंतिम ब्रेकथ्रू झाल्याचं तेव्हाच कळेल की आरपार पाईप गेलेत आणि स्थिर झालेत. या 41 लोकांना बाहेर काढतानाही अडचणी येतील. प्रत्येक माणसाला बाहेर आणण्यात तीन ते पाच मिनीटं लागतील," असं ले. जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी सांगितलं.

    ते पुढे म्हणाले की, "शेवटच्या दोन मीटर अंतरात एक लोखंडी पाईप आला होता. तो कापून पुढे जाण्याचं काम सुरू आहे. एकीकडे चिखलही पडतोय जो तिरप्या पद्धतीने पडतो. त्यामुळे त्या पाईपपर्यंत पोहोचण्यासाठी तो त्या 60 मीटर भिंतीच्या (राडारोड्याची भिंत) दोन मीटर बाहेरही काढावा लागेल."

  20. बोगद्याच्या आतच वैद्यकीय सुविधांची तयारी

    उत्तरकाशी बोगद्याच्या आत मजुरांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मजूर बोगद्यातून बाहेर आल्यानंतर तिथेच त्यांना प्राथमिक उपचार दिले जातील.

    आरोग्य विभागानं बोगद्याच्या आत 8 बेड्सची सुविधा केलीय.

    आरोग्याची आणखी काही समस्या निर्माण झाल्यास रुग्णवाहिका आणि डॉक्टरही तैनात करण्यात आले आहे.