You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5649 वर, दिवसभरात 431 रुग्ण वाढले
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर
बीबीसी न्यूज मराठीचं आजचं लाईव्ह कव्हरेज इथंच थांबवत आहोत.
जाता जाता पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर -
- देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 20 हजारांच्या पार
- राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडा 5649 वर, एकूण 269 जणांचा मृत्यू
- आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास
- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री दुसऱ्यांदा बदलले, दत्तात्रय भरणे यांच्याकडे जबाबदारी
- लोकांनी नियमांचं पालन न केल्यास लॉकडाऊन 3 मेनंतरही सुरू राहील – आरोग्यमंत्री राजेश टोपे
- पालघर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे- अनिल देशमुख
कोरोना व्हायरस रोखण्यासाठीचा बारामती पॅटर्न आहे तरी काय?
...तर नागपुरातला लॉकडाऊन शिथील करणं शक्य – तुकाराम मुंढे
लोकांनी नियमांचं पालन न केल्यास लॉकडाऊन 3 मेनंतरही सुरू राहील – आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात लॉकडाऊन सुरु असताना अनेकजण ते पाळत नसल्याचं अजूनही आढळून येत आहे. लोकांनी नियमांचं पालन न केल्यास लॉकडाऊन 3 मेनंतरही सुरू राहील, असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या फेसबुक लाईव्हमधील प्रमुख मुद्दे -
- राज्यात नॉन-कोव्हिड-19 वरचे उपचार डॉक्टरांनी थांबवू नयेत. त्यांनी घरी बसून न राहता इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढे यावं.
- सोशल डिस्टन्सिंग राखलं जात नसेल तर ते अक्षम्य आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याला तुम्ही धोका निर्माण करत आहात.
- डब्लिंग सात दिवसांवर गेलाय. दररोज तो वाढवायचाय म्हणजे दिवस वाढवत न्यायचे आहेत.
- हॉटस्पॉट १४ होते आता ५ झालेत. मुंबई, पुणे. नागपूर, नाशिक हे प्रमुख आहेत.
- मृत्यूदर ७ होता. आता ५वर आलाय. तोही कमी करायचा आहे.
- अनेक इनोव्हेटीव्ह गोष्टी करतोय. कस्तुरबा रुग्णालयात फोटोबाथ सिस्टम सुरू केली आहे. ही सिस्टीम मुंबईत १०० ठिकाणी येत्या आठवड्यात सुरू करण्यात येईल.
- प्लाझ्मा थेरेपी मुंबईत प्रयोग करण्याचा निर्णय घेतलाय. बऱ्या झालेल्या पेशंटचे प्लाझ्मा काढून आजारी पेशंटना देण्यास आयसीएमआरने परवानगी दिली आहे.
- उद्यापासून आक्रमकपणे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणार आहोत. धारावीमध्ये होम क्वारंटाईन कऱणं शक्य नाही. धारावीत ते करणार आहोत. पुढे जरी संख्या वाढली तरी आपण त्यादृष्टीने पावलं उचलत आहोत.
- दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. ८३ टक्के हे असीम्पटेमॅटीक आहेत. त्यांना कुठलेही लक्षण नाहीत. ५६४९ रुग्ण डिस्चार्ज ७८९ (मुंबई – ३६८३ आज १५४ने वाढ झाली) एकूण लॅब्ज – ३८ दरोरज ७११२ टेस्टिंग होत आहेत.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 20 हजारांच्या पार
देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची आकडेवारी 20 हजारांच्या पार गेली आहे. आतापर्यंत देशात एकूण 20 हजार 859 लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
गेल्या 24 तासांत 1486 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आणि 49 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 652 इतकी आहे.
देशात आतापर्यंत 3959 लोक बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
रॅपिड ऍन्टीबॉडी टेस्ट म्हणजे काय, केंद्राने त्याला स्थिगिती का दिली?
केशरी कार्डधारकांना 24 एप्रिलपासूनच प्रतिव्यक्ती 5 किलो धान्यवाटप
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी रेशनकार्डधारकांना मुंबई महानगर प्रदेशातील रेशन दुकानांमध्ये प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्याचे वाटप १ मे ऐवजी २४ एप्रिलपासून सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत करणार, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडा 5649 वर, आज 18 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसग्रस्तांची संख्या आज 431 ने वाढली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 5649 वर पोहोचली आहे. आज राज्यातील 18 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. तर आज एका दिवसात 69 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
जेव्हा एका डॉक्टरवर आपल्या मृत सहकाऱ्याची कबर खोदण्याची वेळ येते
दिल्लीतील 71 पोलीस कर्मचारी क्वारंटाईनमध्ये
दिल्लीतील विशेष पोलीस पथकात काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील 71 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द
कोरोना व्हायरसमुळे यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
कोरोना व्हायरसविरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची हमी - नरेंद्र मोदी
कोरोना व्हायरसविरुद्ध पहिल्या फळीत लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षेची हमी दिली आहे. संसर्गजन्य रोग कायद्यात दुरूस्ती करून कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्याच्या सुरक्षेबाबत समझोता केला जाणार नाही. त्यांच्या सुरक्षेची हमी आम्ही घेत आहोत, असं मोदी म्हणाले.
नेपाळच्या पंतप्रधानांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
भारताने कोव्हिड-19चा सामना करण्यासाठी नेपाळला 23 टन औषधं पुरवली आहेत. त्यासाठी नेपाळच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
कोरोनाविरुद्ध लढाईतील कर्तव्ये पार पाडताना पोलीस, पत्रकारांनी स्वत:चीही काळजी घ्यावी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरुन लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती देखील कोरोनाग्रस्त होत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.
कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी ही मंडळी सुरक्षित राहिली पाहिजेत, त्यासाठी या सर्वांनी आपली कर्तव्ये पार पाडताना वैयक्तिक सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक असून अजूनही काहींना परिस्थितीचे गांभीर्य कळलेले नाही, हे दुर्दैवं आहे. नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. टाळेबंदीच्या यशाला मर्यादा पडत आहेत.
पोलिस, डॉक्टर, शासकीय यंत्रणेवरचा ताण वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरातंच थांबण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नागरिकांनी घरातंच थांबून सहकार्य केल्यास कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लवकर रोखता येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राज्यात आतापर्यंत ७२२ रुग्ण कोरोनामुक्त - आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून २८१ महिला आहेत.
त्यामध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० वयोगटातील १६० रुग्ण बरे झाले आहेत तर ९८ रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत. यात ९१ ते १०० वयोगटातील एका रुग्णाने कोरोनाला हरविण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
दरम्यान, राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची ३७४ एवढी आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात १२० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय. २३ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात ७२२ रुग्ण घरी गेले आहे.
हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे २६ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहता लक्षात येईल की साधारणता ३१ ते ६० वयोगटातील ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा कोरोना अहवाल आज येणार
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा कोरोना व्हायरसबाबतचा अहवाल आज मिळणार आहे.
इमरान खान यांनी मागच्या आठवड्यात एका धर्मादाय संस्थेचे प्रमुख फैसल एधी यांची भेट घेतली होती. फैसल यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर पंतप्रधान इमरान खान यांचीसुद्धा कोरोनाबाबतची तपासणी करण्यात आली होती.
कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही
कारखान्यामधील किंवा आस्थामनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणुची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
कामगाराला विषाणू लागन झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे शासनासमवेतच्या एका बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती सोशल माध्यमे किंवा व्हॉटस्ॲपवरुन फाॅरवर्ड केली जात आहे. अशी बैठक महाराष्ट्रात झालेली नाही व त्या निर्णयाचा महाराष्ट्राशी सूतराम संबंध नाही. किंबहुना मुळात तसा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीनसुद्धा नाही, असे स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.
फाॅरवर्ड केले जाणारे पत्रक हे अन्य राज्यातील एका औद्योगिक आस्थापनांच्या बैठकीतील वृत्तांत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पण ते महाराष्ट्रातील असल्याचे भासवून राज्यात प्रसारित करुन गैरसमज पसरविण्यात येत आहे. कारखाने सुरु केले आणि त्यातील कामगाराला कोरोने विषाणुची लागण झाल्यास मालकाविरुद्ध कारवाई येईल, अशी चुकीची माहिती या पत्रकाच्या आधारे पसरविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही औद्योगिक संघटनेच्या बैठकीमध्येही अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. हे परिपत्रक फॉरवर्ड करु नये तसेच त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.
कोरोना विषाणूची कोणालाही लागण झाल्यास शासनाच्या आरोग्य विभागामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. चिंता करण्याचे कोणताही कारण नाही. राज्यातील ज्या भागात कारखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे तेथील कारखाना आस्थापनांनी कोरोना रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात पत्रकात करण्यात आले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी ठिकठिकाणी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. या कर्मचाऱ्यांवर काही ठिकाणी हल्ला होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा प्रकारे आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास संबंधित व्यक्तीला 6 महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येईल, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला खपवून घेतला जाणार नाही. हल्लेखोरांवर तुरुंगवासासह 1 ते 5 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षाही होऊ शकते, असं जावडेकर म्हणाले.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री दुसऱ्यांदा बदलले, दत्तात्रय भरणे यांच्याकडे जबाबदारी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचं पालकमंत्रीपद दुसऱ्यांदा बदलण्यात आलं आहे. नुकत्याच आलेल्या शासननिर्णयानुसार सोलापूरचं पालकमंत्रीपद आता सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सुरूवातीला सोलापूरचं पालकमंत्रीपद कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील नंतर हे पद बदलून एका महिन्यापूर्वीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण आता एका महिन्यातच सोलापूरचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत.
नूतन पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे आमदार आहेत. त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सलग दोनवेळा पराभव केला आहे.