झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांचा राजीनामा
झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत राहण्यास सांगितलं आहे.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकूण 81 जागांच्या झारखंड विधानसभेत बहुमतासाठी 41 जागा आवश्यक आहेत. झारखंड विधानसभा निवडणूक निकालांचे सर्वांत ताजे अपडेट्स इथे.
झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत राहण्यास सांगितलं आहे.
झारखंडमध्ये आमच्या आघाडीनं निर्णायक विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्ष आणि आमच्या सहकारी पक्षांचे मी अभिनंदन करतो – राहुल गांधी
हेमंत सोरेन आज दुपारी वडील शिबू सोरेन यांची भेट घेतली, तो क्षण...
पत्रकार मारया शकील यांनी हा फोटो ट्वीट केला आहे.
महाआघाडीला 47 जागा मिळाल्या आहेत. ज्या उद्देशानं आघाडी बनवली होती, त्यामुळे भाजपचा दारुण पराभव झाला आहे. - हेमंत सोरेन
झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी डुमका मतदारसंघात भाजपच्या लॉईस मरांडी यांचा 13,188 मतांनी पराभव केला.
"आम्हाला अनेक वर्षं सेवेची संधी दिल्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे आभार मानतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घेतली, त्यांचेही आभार मानतो. आम्ही यापुढेही राज्याची सेवा करत राहू आणि वेळोवेळी लोकांचे प्रश्न उठवत राहू," असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
"निवडणुकीतील विजयासाठी हेमंत सोरेन आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या आघाडीचं अभिनंदन. पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा," असंही ते पुढे म्हणाले.
झारखंडचा निकाल हा मैलाचा दगड आहे. लोकांनी दिलेल्या कौलाबद्दल त्यांचे आभार मानतो, असं झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन म्हणाले.
झारखंडच्या जनतेनं दिलेला कौल आम्ही स्वीकारतो, असं भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणाले.
"आम्हाला 5 वर्षं काम करण्याची संधी दिल्याबद्दल इथल्या जनतेचे आभार मानतो. राज्यातील विकास कायम राहावा, यासाठी भाजप बांधील आहे," असंही ते म्हणाले.
झारखंड निवडणुकांचे निकाल हळुहळू स्पष्ट होत आहेत, ज्यानुसार भाजपची सत्ता जाण्याची चिन्हं आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांची आघाडी पुढे असल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या झारखंडमधल्या या अवस्थेची कारणं जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने 'द हिंदू'च्या नॅशनल ब्युरोच्या राजकीय संपादक निस्तुला हेब्बार, बीबीसी भारतीय भाषांचे डिजिटल संपादक मिलिंद खांडेकर आणि बीबीसी हिंदीचे डिजिटल संपादक राजेश प्रियदर्शी यांच्याशी चर्चा केली.
मावळते मुख्यमंत्री रघुवर दास यांची पत्रकार परिषद सुरू आहे. ते म्हणाले, "जोवर संपूर्ण निकाल येत नाही, तोवर याविषयी बोलता येणार नाही. संपूर्ण निकाल लागल्यानंतर मी सविस्तर बोलेल. भाजपचा पराभव होत असेल, तर तो माझा पराभव असेल."
झारखंडच्या निकालांबरोबरच शरद पवारांनी सरकारच्या CAA-NRC गोंधळावरही वक्तव्य केलं. ते म्हणाले -
या सरकारला सर्वंच आघाडींवर अपयश आलं आहे, आणि त्यापासून लोकांचा लक्ष हटवण्यासाठी ते NRC-CAAसारख्या मुद्द्यांचा आधार घेत आहेत. केंद्र सरकारने देशाचं अर्थकारण व्यवस्थित हाताळलं नाही, देशातलं गुंतवणुकीचं वातावरण बिघडलं आहे.त्याचा सामान्य माणसाला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे साहजिकच एक प्रकारची नापसंती भाजपसाठी लोकांच्या मनात आहे.
तसंच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारखे प्रश्न उपस्थित करून एकप्रकारे देशात धार्मिक अंतर वाढवण्याचा प्रयत्न देशात केला जात आहे.
पंतप्रधान मोदी आपल्या दिल्लीच्या एका भाषणात म्हणाले की हा विषय त्यांनी संसदेत किंवा मंत्रिमंडळात चर्चिला गेला नाही. मी तसंच प्रफुल्ल पटेल या चर्चांच्या वेळी उपस्थित होतो. पटेलांनी तर या चर्चेत भागही घेतला होता.
एवढंच नव्हे तर राष्ट्रपतींच्या 2019च्या अभिभाषणातही NRC देशभरात आणण्याची या सरकारने भूमिका घेतली आहे, असं सांगण्यात आलं होतं. राष्ट्रपतींचं भाषण हे तर सरकारचं अधिकृत धोरण असतं. मग अशा वेळी संसदेत यावर चर्चा झालीच नाही, हे पंतप्रधानांनी म्हणणं साफ चुकीचं ठरेल.
झारखंडच्या आमच्या साथीदारांनी सांगितलं की या सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनात विश्वास राहिला नाही, आणि NRC सारख्या मुद्द्यांमुळे ते आणखी दुरावले गेले.
निकाल आमच्या बाजूनं लागतील, अशी मला आशा आहे. पूर्ण निकालाची मी वाट पाहतोय. मात्र, भाजप लोकांचा कौल स्वीकारेल - रघुवर दास, झारखंडचे मुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यातील काही ठळक मुद्दे -
निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, भाजप आतापर्यंत 31 जागांवर तर काँग्रेस-जेएमएम-राजद युती 40 जागांवर आघाडीवर
वरिष्ठ राजकीय पत्रकार निस्तुला हेब्बार यांनी बीबीसी प्रतिनिधी पंकज प्रियदर्शी यांच्याशी बोलताना सांगितले, झारखंडमध्ये भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही, रघुवर दास यांनी स्वतःच्या मार्गातच काही अडथळे तयार केले. त्यांनी 13 आमदारांची तिकिटं कापली, या सगळ्याचा एकत्रित तोटा भाजपाला झाला.
काँग्रेसचे झारखंड प्रभारी आरपीएन सिंग यांनी आपली आघाडी झारखंडमध्ये सत्ता स्थापन करेल असं सांगितलं तसेच हेमंत सोरेन आपल्या आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री होतील असं सांगितलं आहे.