किरगिझस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने नोंदवला निषेध

आजचे महत्त्वाचे अपडेट्स, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच राज्यातील बातम्या आणि लोकसभा निवडणुकीसंबंधीच्या घडामोडी जाणून घ्या.

थोडक्यात

  • ईशान्य दिल्लीतील निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला.
  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये छेडछाड केल्याचा स्वाती मालिवाल यांचा आरोप
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गाझाला पोहोचवली जाणारी मदत वाढवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे
  • आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा शेवटच्या सामन्यातही पराभव. लखनौचा 18 धावांनी विजय.
  • आयपीएलमध्ये आज चेन्नई विरुद्ध बंगळुरूच्या नॉक आउट सामना. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघ लढणार.

लाईव्ह कव्हरेज

नितीन सुलताने

  1. किरगिझस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने नोंदवला निषेध

    पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये करण्यात आलेली तोडफोड.

    फोटो स्रोत, MUHAMMAD BILAL

    फोटो कॅप्शन, पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये करण्यात आलेली तोडफोड.

    बिश्केकमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरुद्ध झालेल्या हिंसेसंदर्भात किरगिझस्तानच्या सरकारकडं निषेध नोंदवला असल्याचं पाकिस्ताननं सांगितलं आहे.

    परदेशी विद्यार्थी आणि स्थलांतरित कामगारांबरोबर स्थानिक लोकांची चकमक झाली होती. त्यानंतर बिश्केकमध्ये दंगलविरोधी पथक तैनात करावं लागलं होतं.

    या हिंसेमध्ये किमान 28 जण जखमी झाले आहेत आणि काही जणांना अटक करण्यात आली आहे.

    किरगिझस्तान आणि इजिप्तच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर आक्रमक झालेल्या गर्दीनं परदेशी विद्यार्थ्यांच्या होस्टेलला घेराव घातला होता.

    किरगिझस्तानात परदेशातून आलेल्या मजुरांची संख्या वाढत असल्यामुळं अनेक स्थानिक तरुणांमध्ये असंतोष आहे.

    एकिकडं किरगिझस्तानमधील अनेकांना रोजगारासाठी रशियात जावं लागतं. तर दुसऱ्या बाजूला देशात मोठ्या संख्येनं परदेशातील लोक काम करत आहेत.

    किरगिझस्तान सरकारनं देखील मागील काही वर्षात परदेशी मजुरांबाबत कडक धोरणं अवलंबण्यास सुरुवात केली आहे.

    सरकारनं बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना मोठ्या संख्येने देशातून बाहेर काढलं आहे.

    अनेक आशियाई देशांचे विद्यार्थी देखील किरगिझस्तानात शिक्षण घेतात.

  2. इराण: दोन महिलांसह 7 जणांना फाशी, मे महिन्यात आतापर्यत 50 जणांना मृत्यूदंड

    इराणमधील फोटो

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    शनिवारी इराणमध्ये 7 जणांना फाशी देण्यात आली आहे. यामध्ये 2 महिलांचा देखील समावेश आहे. इराणमध्ये मे महिन्यात आतापर्यत किमान 50 जणांना फाशीची देण्यात आली आहे.

    ज्या लोकांना फाशी देण्यात आली आहे, त्यामधील 1 महिला आणि 5 पुरुषांना अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती.

    तर इतर एक महिलेला पतीचा खून केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं. तिलादेखील फाशी देण्यात आली आहे.

    इराणमध्ये यावर्षी आतापर्यत 200 हून अधिक जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. मागील जवळपास दशकभरातील ही सर्वाधिक संख्या आहे.

    अलिकडच्या काळात फाशी देण्यात आलेल्या लोकांमध्ये इराणमधील रॅपर (गायक) तुमाज सालेही यांचा देखील समावेश आहे.

    इराण सरकारच्या विरोधातील गाण्यांमुळे गायक तुमाज सालेही चर्चेत आले होते.

  3. केजरीवालांचं मोदींना आव्हान - 'उद्या दुपारी 12 वाजता भाजपाच्या कार्यालयात येतो आहे...'

    केजरीवालांचं मोदींना आव्हान - 'उद्या दुपारी 12 वाजता भाजपाच्या कार्यालयात येतो आहे...'

    फोटो स्रोत, ANI

    कथित मद्य घोटाळा प्रकरणात जामिनावर सुटका झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे.

    केजरीवाल म्हणाले की "मी उद्या दुपारी 12 वाजता भाजपाच्या कार्यालयात येतो आहे." केजरीवाल म्हणाले, "मी माझ्या पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि आमदारांना घेऊन उद्या दुपारी 12 वाजता भाजपा मुख्यालयात येतो आहे. तुम्हाला ज्यांना ज्यांना तुरुंगात टाकायचं आहे, टाकू शकता."

    एका विधानात केजरीवाल यांनी दावा केला आहे की भाजपा आम आदमी पार्टीला संपवू इच्छिते. केजरीवाल म्हणाले की आम आदमी पार्टी हा एक विचार आहे. आम आदमी पार्टीच्या जितक्या नेत्यांना तुरुंगात पाठवलं जाईल तितके अधिक नवीन नेते तयार होतील.

    केजरीवाल म्हणाले, "हे लोक आम आदमी पार्टीच्या मागे कसे हात धुवून लागले आहेत ती गोष्ट लोकांसमोर आहे. हे लोक एकामागोमाग एक आमच्या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकत आहेत. यांनी मला तुरुंगात टाकलं, मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकलं, संजय सिंह यांना तुरुंगात टाकलं, सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकलं आणि आज माझ्या पीए ला तुरुंगात टाकलं आहे."

    केजरीवाल म्हणाले, "राघव चड्डा आत्ताच लंडनहून परतले आहेत. आता हे म्हणतायेत की राघव चड्डा यांना देखील तुरुंगात टाकणार. थोड्या दिवसांनी सौरभ भारद्वाज यांना तुरुंगात टाकणार, अतिशी यांना तुरुंगात टाकणार."

  4. जे.पी.नड्डा- "भाजपला पूर्वी आरएसएसची गरज होती.., पण आता पक्ष सक्षम आहे.."

    जे.पी.नड्डा

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, जे.पी.नड्डा

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतच्या एका वक्तव्यावरून चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

    भारतीय जनता पक्षाला आधी आरएसएसची गरज होती, पण त्यातुलनेत आता पक्ष विस्तारला आहे असून, स्वतःचा कारभार चालवण्यास सक्षम असल्याचं मत जे.पी.नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसबरोबर बोलताना व्यक्त केलं.

    तसंच आरएसएस ही भाजपची वैचारिक आघाडी असल्याचंही जे.पी.नड्डा यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

    अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील स्थितीची तुलना करता तेव्हा पक्षाला आरएसएसची गरज होती, पण आता पक्ष मोठा झाला असल्याचं ते म्हणाले. "सुरुवातीला आम्ही थोडे अक्षम असू, कमी असू तेव्हा आरएसएसची गरज होती. आज आम्ही प्रगती केली आहे. भाजप आता स्वत:चा कारभार स्वतः चालवतो, हाच फरक आहे," असंही नड्डा म्हणाले.

    मग आता भाजपला आरएसएसची गरज नाही का? यावर नड्डांनी, सगळ्यांच्या भूमिका ठरलेल्या आहेत असं सांगितलं. आरएसएस ही सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे तर भाजप राजकीय संघटना आहे, असं स्पष्टीकरणही नड्डांनी दिलं.

  5. शरद पवार म्हणतात, 'नरेंद्र मोदी लोकांच्या मनातून उतरू लागले आहेत'; बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य

  6. शरद पवार बीबीसी मुलाखत: अजित पवार यांनी मदतीसाठी हात पुढे केला तर...?

    व्हीडिओ कॅप्शन, शरद पवार बीबीसी मुलाखत: अजित पवार यांनी मदतीसाठी हात पुढे केला तर...?
  7. गाझा संघर्ष : तांबड्या समुद्रात तेलाच्या टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला तर इस्रायलचे 70 ठिकाणी बॉम्बहल्ले

    संग्रहित छायाचित्र

    फोटो स्रोत, MOHAMMED HAMOUD/GETTY IMAGES

    येमेनच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर पनामाचा ध्वज असलेल्या एका तेलाच्या टँकवर क्षेपणास्त्रानंहल्ला करण्यात आला आहे.

    सागरी सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अॅम्ब्रेझ या सुरक्षा संस्थेनं ही घटना लाल सागरात मोठा बंदराजवळ घडल्याचं म्हटलं आहे.

    या हल्लानं जहाजावर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. पण तेलाचा हा टँकर पुढं निघाला आहे.

    अद्याप कोणत्याही गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. साधारणपणे येमेनमधील हुती बंडखोर लाल सागरात हल्ल्याची जबाबदारी घेतात.

    हुती बंडखोरांनी या नव्या भागात अनेक जहाजांवर हल्ले केले आहेत. गाझामध्ये पॅलिस्टिनींवर इस्रायलच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात जहाजांवर हल्ले करत असल्याचं या बंडखोरांचं म्हणणं आहे.

    इस्रायलकडून 70 ठिकाणी बॉम्बहल्ले

    गाझामध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या स्थितीत इस्रायलच्या लष्करानं त्यांनी गेल्या 24 तासांमध्ये 70 पेक्षा अधिक ठिकाणी बॉम्बहल्ले केल्याचं म्हटलं आहे.

    गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष

    फोटो स्रोत, Getty Images

    उत्तर गाझाच्या जबालिया परिसरात सर्वात भीषण संघर्ष पाहायला मिळत आहे.

    इस्रायलच्या लष्तकरानं गाझाचा हा परिसर हमासच्या ताब्यातून मुक्त केल्याचा दावा केला होता. पण आता याठिकाणी हमासचे सदस्य पुन्हा इस्रायलच्या लष्करावर हल्ला करत आहेत.

    जबालियामध्ये शरणार्थींची मोठी छावणीही आहे. याठिकाणच्या अरुंद गल्ल्यांमध्ये इस्रायलचे सैनिक आणि हमासच्या सदस्यांमध्ये गल्लो-गल्ली संघर्ष पाहायला मिळत आहे.

    इस्रायलच्या लष्करानं बुडडोझरनं दुकानं आणि घरं तोडल्याचं स्थानिकांचं म्हणणं ाहे.

    तर गाझाचं दुसरं टोक असलेल्या राफामध्ये संघर्ष सुरू आहे. इस्रायलनं याठिकाणी हमासची अनेक तळं उध्वस्त केल्याचा आणि इस्लामिक जिहादच्या एक कमांडरला ठार केल्याचा दावा केला आहे.

  8. नरेंद्र मोदी यांची हिंदू मुस्लीम भाषणं - 'व्होट जिहाद', 'घुसखोर' ते 'मंगळसूत्र'

    व्हीडिओ कॅप्शन, नरेंद्र मोदी यांची हिंदू मुस्लीम भाषणं - 'व्होट जिहाद', 'घुसखोर' ते 'मंगळसूत्र'
  9. बिभव कुमार यांच्यावरील कारवाईला 'आप'ने बेकायदेशीर का म्हटले?

    संजीव नासियर

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, संजीव नासियर

    अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे लीगल सेल प्रमुख संजीव नासियर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    संजीव नासियर यांनी त्यांना अद्याप एफआयआरची कॉपी मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.

    दिल्ली पोलिसांनी स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीवरून कथित मारहाण प्रकरणी बिभव कुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं.

    एएनआयशी बोलताना संजीव नासियर म्हणाले की, "पोलिस बिभव कुमार यांना घेऊन गेले आहेत. त्यापूर्वी आम्ही कोर्टात अर्ज दिला आहे. संपूर्ण देशात व्हायरल होत असलेला एफआयआर अजून बिभव कुमार आणि त्यांच्या वकिलांनाच मिळाला नसल्याचं, त्यांचं म्हणणं आहे."

    "पोलीस नोटीस न देता बिभव कुमार यांना घेऊन गेले आहेत. 41 ए ची नोटीस गरजेची असते. आम्हाला आत जाऊन पोलिसांनी त्यांना फक्त चौकशीसाठी आणलं आहे की अटक केली आहे, हे जाणून घ्यायचं आहे?"असंही ते म्हणाले.

    संजीव नासियर म्हणाले की, "आम्हाला बिभव कुमार यांना भेटू दिलं जात नाहीये. कायदेशीरदृष्ट्या ते चुकीचं आहे."

    आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी 13 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.

    तर आम आदमी पार्टीनं बिभव कुमार यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

  10. दक्षिण आफ्रिकेच्या इस्रायलविरुद्धच्या नरसंहाराच्या खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ काय?

  11. 'शेतकरी राजा वगैरे काही नाही, फाटका झालाय' - धुळ्यातले शेतकरी व्यक्त झाले

    व्हीडिओ कॅप्शन, धुळे लोकसभा निवडणूक पूर्वी शेतकरी व्यक्त झाले तेव्हा...
  12. स्वाती मालिवाल यांना कथित मारहाण प्रकरणी केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार ताब्यात

    स्वाती मालीवाल

    फोटो स्रोत, ANI

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    बिभव कुमार यांच्यावर आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याचा आरोप आहे.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिभव कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे.

    शुक्रवारी स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

    यानंतर केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांनी दिल्ली पोलिसांकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील सुरक्षेचा भंग झाल्याची तक्रार दिली होती, ज्यावर अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

  13. कोल्हापूरच्या कागलमध्ये वेदगंगा नदीत बुडून चार जणांचा मृत्यू

    कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील आणूर येथे वेदगंगा नदीत बुडून चौघां जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    बुडालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीनं पाण्याबाहेर काढण्यात आले तर आणखी एक मृतदेह शोधण्याचं काम बचाव पथकाकडून सुरू होतं. या घटनेची नोंद कागल पोलिस स्थानकात झाली आहे.

    जितेंद्र विलास लोकरे (वय 36, मुरगूड), सौ. रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34, अथणी, कर्नाटक), सौ. सविता अमर कांबळे (वय 27 रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय 17, अथणी, कर्नाटक),अशी बुडालेल्यांची नावे आहेत.

    बुडणारे हात

    फोटो स्रोत, Getty Images

    आणुर गावाच्या यात्रेसाठी हे चौघेही आपल्या पाहुण्यांच्या घरी आले होते. दुपारी तीनच्या सुमारास वेदगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना,सविता कांबळे आणि रेश्मा दिलीप येळमल्ले,पाण्यात उतरला,मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे पाण्यात बुडू लागल्या.

    त्यांना वाचवण्यासाठी जितेंद्र लोकरे आणि यश येळमल्ले पाण्यात उतरले,मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने चौघेही पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली.

    याबाबतची माहिती ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी त्वरित नदीवर दाखल होत मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले. यावेळी दोन महिलांसह तिघांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश मिळालं, मात्र यश दिलीप येळमल्ले याचा मृतदेह अद्याप मिळाला नसल्याने गावकऱ्यांकडून शोध मोहीम सुरू आहे.

  14. कन्हैया कुमारवर प्रचारादरम्यान हल्ला, म्हटलं- 'ए साहेब...गुंडे मत भेजिए'

    कन्हैया कुमार

    फोटो स्रोत, ANI

    ईशान्य दिल्लीतील निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    ईशान्य दिल्लीतील उस्मानपूर येथील आम आदमी पार्टीच्या स्थानिक पक्ष कार्यालयाबाहेर प्रचार करत असताना काही लोकांनी आधी त्याच्यावर शाई फेकली आणि नंतर त्यांना थप्पड मारली. आम आदमी पार्टीच्या समुपदेशक छाया शर्मा यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे उत्तर-पूर्व दिल्लीचे उप पोलीस आयुक्त म्हणाले.

    शुक्रवारी (17 मे) संध्याकाळी उशिरा घडलेल्या या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

    या घटनेनंतर कन्हैया कुमारने जाहीर सभेत या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

    एनएसयूआयने एक व्हिडिओ ट्वीट केला आहे ज्यात कन्हैया म्हणत आहे, "ओ साहेब, गुंडांना पाठवू नका, आम्ही तुमचे पोलिस पाहिले, आम्ही तुमचा तुरुंग पाहिला. आमच्या रंगात स्वातंत्र्य सैनिकांचे रक्त वाहत आहे, आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत. जर आम्ही इंग्रजांना घाबरलो नाही, तर इंग्रजांची हुजरेगिरी करणाऱ्यांना तर कधीच घाबरणार नाही?"

    मनोज तिवारी

    कन्हैया कुमार हे दिल्लीच्या ईशान्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि दोन वेळा भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्याविरोधात ते निवडणुकीत उतरले आहेत.

    इंडिया आघाडीतील जागावाटपानुसार, दिल्लीतील लोकसभेच्या एकूण सातपैकी तीन जागांवर काँग्रेस लढत आहे, तर आम आदमी पक्ष चार जागांवर निवडणूक लढवत आहे.

    येथील सर्व सात जागांसाठी सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार आहे.

  15. योगी आदित्यनाथ यांचा 'बुलडोझर' दलित, आदिवासी आणि मागासवर्गाच्या आरक्षणावर- जयराम रमेश यांचा आरोप

    योगी आदित्यनाथ यांचा 'बुलडोझर' दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

    जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना हा आरोप केला आहे. शुक्रवारी बाराबंकी येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले होते की, "काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बुलडोझर कुठे चालवावा हे योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिकले पाहिजे."

    जयराम रमेश यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्ट मध्ये असं लिहिलं की, "मावळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून बुलडोझर चालवायला शिकण्याचा सल्ला दिला आहे. आता तुम्हीच बघा आदिवासी, मागासवर्गीयांच्या आरक्षणावर योगींचा बुलडोझर कसा चालतोय ते."

    जयराम रमेश

    फोटो स्रोत, ANI

    "पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगायला हवं की ते आरक्षणाबाबतच्या त्यांच्या मतामुळे योगींना पाठिंबा देत आहेत. हेच त्यांच्या 400 पारच्या घोषणेमागचे रहस्य आहे.

    बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात दुरुस्ती करून दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षणाचे अधिकार हिरावून घेण्यासाठी संसदेत 400 जागांचे बहुमत मिळवून त्यांना हे हवे आहे."

    जयराम रमेश म्हणाले की, अनेक दशकांपासून सुरू असलेले संघाचे षडयंत्र त्यांना यशस्वी करायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान रद्द करून मनुवादी विचारावर आधारित नवीन राज्यघटना त्यांना बनवायची आहे."

    "ही वेबसाइट कदाचित जास्त काळ उपलब्ध नसेल, पण सध्या तुम्ही हा 'लेख' इथे वाचू शकता." जयराम रमेश यांनी या लेखाचा व्हिडिओही शेअर केला आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

    शुक्रवारी(17मे) पंतप्रधान मोदी म्हणाले की, "त्यांच्यासाठी (काँग्रेस आणि सपा) देश काहीच नाही, त्यांच्यासाठी कुटुंब आणि सत्ता हेच सर्वस्व आहे.

    सपा आणि काँग्रेस सत्तेत आल्यास राम लल्लाला पुन्हा तंबूत पाठवतील आणि मंदिरावर बुलडोझर फिरवतील. बुलडोझर कुठे चालवायचा आणि कुठे चालवायचा नाही ह्याची शिकवणी योगीजींकडून त्यांनी घेतली पाहिजे."

  16. भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर पैशांचं वाटप झाल्याचा आरोप

    शुक्रवारी (17 मे) रात्री मुंबई ईशान्य लोकसभेचे भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या खाजगी कार्यालयातून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

    ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदारांचं तिकीट कापून मिहीर कोटेचा यांना संधी दिलीय, तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

    17 मे ला मुंबईत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची एक दुसरी सभादेखील होती.

    दोन्ही मोठ्या राजकीय सभांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा प्रचार रंगात आलेला असतानाच शुक्रवारी रात्री ठाकरे गटाने ईशान्य मुंबई मतदारसंघात मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयातून पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप केला आहे.

    अंबादास दानवे

    या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपच्या पदाधिका-यांमध्ये वाद झाल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

    त्यानंतर गृहमंत्री यांनी त्या ठिकाणी भेट दिली. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात धाव घेतली.

    घडलेल्या प्रकारची माहिती परिमंडळ 7 चे पोलीस उपायुक्त यांच्याकडून घेतली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील घटनास्थळी दाखल झाले होते.

    माध्यम प्रतिनिधींशी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात पोलीस आणि निवडणूक आयोग पक्षपाती पणे वागत असल्याचा आरोप केला. तसेच पैसे वाटप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी गृहमंत्री आले होते, असा आरोप देखील दानवे यांनी केला.

    देवेंद्र फडणवीस

    फोटो स्रोत, DevendraFadnavis/X

    भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी संजय दीना पाटील यांच्यावर आरोप केला असून. त्यांनी व्हिडिओ प्रसारित करत संजय पाटील यांना इशारा दिला आहे.

    प्रसारित झालेल्या व्हिडिओत संजय पाटील म्हणाले की, "मानखुर्दचे नवाब संजय पाटील आज आम्ही पंतप्रधानांच्या सभेला गेल्यानंतर तुमचे गुंड मुश्ताक खान आणि इतर यांनी माझ्या वॉर रूमवर भेकड हल्ला केलाय.

    त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण केलीय, आज मी शपथ घेतो निवडून आल्यानंतर तुमचे सगळे काळे धंदे ड्रग्स, मटका, गुटखा हे बंद करणारच आणि मानखुर्दचं नाव छत्रपती शिवाजीनगर करणारच."

  17. जो बायडन म्हणतात, की पॅलेस्टिनी लोक त्रासात; तातडीने मदत पोहोचविणं आवश्यक

    जो बायडन

    फोटो स्रोत, Getty Images

    अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी पॅलेस्टिनी लोक त्रासात आहेत आणि तिथे (गाझामध्ये) तातडीने मदत पोहोचवणं आवश्यक असल्याचं मान्य केलं आहे.

    गाझामध्ये समुद्रमार्गे मदतीचा पहिला टप्पा पोहोचवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्यानंतर त्यांनी गाझाच्या परिस्थितीबद्दल मत व्यक्त केलं.

    जो बायडन यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे की,“पॅलेस्टिनी त्रासात असल्याचं स्पष्ट आहे आणि तिथे तातडीने मदत पोहोचवायला हवी.”

    “गाझामध्ये आम्ही इस्रायलसोबत मिळून मदत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत.”

    याआधी अमेरिकन सैन्याने गाझामध्ये समुद्रमार्गे मदतीची पहिली खेप पोहोचविल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

    जो बायडन यांची पोस्ट

    फोटो स्रोत, Twitter

    अमेरिकेकडून सांगण्यात आलं की, “गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांच्या मदतीसाठी बहुराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. समुद्रमार्गे पोहोचवली जाणारी ही मदत पूर्णपणे मानवतावादी आहे.”

    अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत गाझामध्ये 500 टन मदत साहित्य पोहोचविलं जाईल.