पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात; वाहनांना आग, मृतांचा आकडा 7 वर

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात; वाहनांना आग, मृतांचा आकडा 7 वर

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातामुळे साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी लेन काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.

संध्याकाळी 5.40 वाजण्याच्या दरम्यान अग्निशमन दल नियंत्रण कक्षात नवले पुलावर अपघात होऊन तीन वाहनांनी पेट घेतला आहे, अशी माहिती मिळाल्याचं अग्निशमन दलानं दिली. त्यानंतर एकूण अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

घटनास्थळी दोन कंटेनर आणि त्यामध्ये चारचाकी वाहन अडकल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिसलं. अडकलेल्या चारचाकी गाडीने पेट घेतला होता.

या घटनेत कंटेनरमधून दोन पुरुष आणि कारमधून दोन पुरुष, दोन महिला, तसंच एक मुलगी असे एकूण 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

उपस्थित नागरिकांकडून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना समजले की, एका मोठ्या कंटेनरने आग लागण्याआधी मागे बर्‍याच वाहनांना धडक दिली होती आणि त्यामध्ये ही अनेक जण जखमी झाले आहेत.

याठिकाणी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह चार अधिकारी आणि जवळपास चाळीस जवान कार्यरत होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)